Thursday, August 1, 2024

सोनोपंत दांडेकर

(संकलनपर)

 (२० एप्रिल १८९६ — ९ जुलै १९६८). महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवत भक्त, श्री सार्थ ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. त्यांचे मूळ नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते.

मूळचे माहिमचे पम नंतर पुण्यात. फर्गसन महाविद्यालयातून बीए. पुढे प्लेटोचे तत्वज्ञान यावर एम ए.

शिक्षण प्रसारक मंडळी चे आजीव सदस्य. पुढे सप महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक.

भारतीय,पाश्चात्य दोन्ही तत्वज्ञानांचा प्रचंड अभ्यास.ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक. संत वाड्मयाचा अभ्यास. डॉ राधाकृष्णन यांनीही त्यांच्या ज्ञान अन अभ्यासाचे कौतुक केलेले. 

नंतर नू म विचे मुख्याध्यापक. नंतर रुईयात उप प्राचार्य. अन नंतर स प मधे प्राचार्य.

प्रसाद मासिकाचे काही काळ संपादक. भारतीय.तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष. 

पंढरपूरची वारी नेमाने करत. निवृत्ती नंतर नेवासे इथली ज्ञानेश्वरांच्या मंदीराचे पुनरुज्जीवन. ज्ञानदेवांच्या पैस भोवती मोठे देऊळ बांधले. अनेक देवळांचे पुनरुज्जीवन,डागडुजी. 


ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. यान्वये तयार झालेल्या सार्थ ज्ञानेश्वरी मधली त्यांची प्रस्तावना फार मोलाची.

गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले.

ज्ञानेश्वरी, बरोबरच नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले.

धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा; धर्माला अध्यात्माची जोड द्या; धर्म म्हणजे आत्मधर्म, तो साधण्यासाठी भक्तिप्रधान, उदार भागवतधर्माची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले.

महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या अंतःकरणात प्रेमादराचे स्थान मिळविले. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांमध्ये भावभक्तीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करून त्यांची सोनोपंतांनी सोज्ज्वळ सांगड घातली.

संतांचा धर्म आणि विद्यमान अणुयुगाचे मर्म यांचा समन्वय त्यांच्या विचारात, उक्तीत आणि वृत्तीत आढळतो. भक्तिमार्गाला अद्ययावत शास्त्रशुद्ध कल्पनांची जोड देऊन सोनोपंतांनी या पंथाला व्यापक, नित्य, नवे, चैतन्ययुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी रूप दिले.

तत्त्वज्ञान, अध्यात्म हे ग्रंथांत ठेवावयाचे विषय नाहीत. ते सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. पाश्च्यात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्याचे फलित म्हणजे त्यांचा प्लेटो व ज्ञानेश्वर यांच्यावरील ज्ञानदेव आणि प्लेटो हा तुलनात्मक ग्रंथ होय.

Monday, June 10, 2024

पद्मसंभव

 


हिमालय परिसरात बुद्धां प्रमाणेच पद्मसंभव  ही देखिल अतिशय आदराची, पूजनीय व्यक्ती!

पद्मसंभव हे एक गुढच आहे. यांचा निश्चित काळ ज्ञात नाही. काहींच्या मते, ते आठव्या शतकात होऊन गेले. तर काहींच्या मते ते पहिल्या शतकातच होऊन गेले.

प्रसिद्ध प्राचीन नालंदा विद्यापीठात पद्मसंभव शिकले. त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. त्यांची हुषारी, अभ्यास आणि व्यासंग पाहून नालंदामधेच त्यांची अध्यापक म्हणून नेमणूक झाली. अनेक वर्ष त्यांनी तिथे शिकवले.

दरम्यान आजच्या लडाख परिसरात बौद्ध मॉनेस्ट्री निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. परंतु अनेकदा प्रयत्न करूनही तसे घडेना. काही ना काही विघ्न येत असे. शेवटी या विघ्नांचा नाश केवळ पद्मसंभवच करू शकतील अशा विचारांतून तेथील महंतांनी पद्मसंभव यांना विनंती केली. अन त्याला मान देऊन पद्मसंभव लडाखला गेले.

पद्मसंभव यांनी आपल्या ज्ञान, तंत्र यांमार्फत तेथील वाईट शक्तींना पराभूत केले. आणि तिथल्या महंतांना वाईट शक्तींशी लढताना स्वत: च्या आत असणारे सामर्थ्य जागवण्याचा मंत्र अन तंत्र शिकवले. त्यांची ही शिकवण बौद्ध धर्मामधे समाविष्ट केले गेली.
पद्मसंभव यांचा भर तंत्रविद्येवर जास्ती होता. हिंदु धर्मातील नाथ संप्रदायातील तंत्रविद्या आणि पद्मसंभव यांची तंत्रविद्या यात साम्य आढळते.

अशी नवीन पद्धत शिकवणारा हा दुसरा बुद्ध!  एकीकडे जास्तीत जास्त जीवनाशी जोडणारी आणि दुसरीकडे जास्तीत जास्त अध्यात्मिक पातळीवर जागृती करणारी अशी ही पद्मसंभव यांची शिकवण!

लडाख सारख्या अतिशय टोकाच्या ( एक्स्ट्रिम) निसर्गामधे रहाण्यासाठी ही विचारसरणी अतिशय उपयुक्त ठरली. आणि म्हणूनच पद्मसंभव यांना बुद्धांच्या बरोबरच मानाचे स्थान बौद्ध धर्मामधे आहे.

Thursday, May 9, 2024

8. न्या. मा. गो. रानडे

भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.

राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.

सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.

इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.

भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.

ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.

कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.

येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.

न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

(सिरिजसाठी रिपोस्ट)

Saturday, May 4, 2024

आजची गरज

 सुधारकांची सिरिज लिहिते आहे त्यामागे काही विचार आहे.  त्याकाळात विभागलेला समाज जोडण्यासाठी शिक्षण, समाज सुधारणा, जातीभेदांचे खंडन असा गोष्टी या सुधारकांनी केल्या. सर्व समाजाला एकत्र करून पुढे नेले. म्हणून तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षण, बालविवाह बंदी, विधवापुनर्विवाहाला चालना, सर्वांना शिक्षण, सर्वांना नोकरीव्यवसायाची संधी, जातीभेद नष्ट होत गेला.

जेव्हा जेव्हा समाजात दुफळी माजवली जाते, भेदाभेद अधोरेखित (हायलाईट)  केला गेला तेव्हा तेव्हा इथला समाज गर्ततेत गेला. अन जेव्हा जेव्हा समाज एकोप्याने चालला, एकमेक भेद असून- ते स्विकारून, हे विश्वची माझे घर ही बंधुत्वाची भावना घेऊन चालला तेव्हा तेव्हा आपला समाज जास्त घट्ट बनला, जास्त सुधारलेला झाला.
इतिहास हे सतत सांगतो अन तरीही आपण पुन्हा पुन्हा समाजातल्या दुफळीला वर काढतो. 
यातून कोणाचा नक्की फायदा होतो? ज्या समाजातल्या घटकाला आपण वेगळे काढू पहातो, तो घटक हजारो वर्ष आपलाच आहे न? शरीराचा एखादा भाग दुखावला,जास्त अटेंक्शन मागू लागला तर तो तोडून टाकतो का आपण? की त्याला योग्य ते अटेक्शन देऊन, त्याची नीट देखभाल करून त्याला सुधारतो?
करोडो लोकांमधल्या काहींनी चुका केल्या म्हणून त्यांच्या सगेसोयऱ्यांसकट त्यांना समाजबहिष्कृत करणार का, रादर करू शकणार का आपण? अन मग असे हाताची बोटं दुखावली म्हणून हातच छाटून टाकून सशक्त समाज बनणार का आपण?
अन चुका कोणाकडून होत नाहीत? प्रत्येक व्यक्ती कधी न कधी चुकते. समाजाचा प्रत्येक घटक कधी न कधी चुकतो.
दलित वर्गाला उच्चवर्णीयांनी चुकीची वागणूक दिलीच न? मग उच्चवर्णीयांना छाटून टाकलं का समाजाने?
सॉरी कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, कोणी दुखावले गेले तर माफीही मागते🙏🏻
पण समाजातली ही दुफळी अजिबात बघवत नाही, जीव कासावीस होतो. म्हणून लिहिलं. विष भराभर पसरत चाललय, त्यावर उतारा केवळ प्रेमाचा आहे, सहानुभूतीचा आहे, सहसंवेदनेचा आहे! 
एकमेकांना सावरूत, मदत करू. सनातन धर्म हेच सांगतो, विश्वबंधुत्व सांगतो.

Wednesday, May 1, 2024

7. कृष्णशास्त्री चिपळूणकर (1824-1878)


कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुण्यातला. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून तर ओळखले जात. पुण्यातल्या पाठशालेमध्ये त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले त्यांची हुशारी पाहून त्यांचे गुरुजन त्यांना, बृहस्पती म्हणून संबोधत. पुढे आपल्या गुरूंच्या आपल्या आदेशानुसार पुना कॉलेजमध्ये इंग्रजीचा अभ्यास करायला कृष्णशास्त्रांनी सुरुवात केली. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. अलंकार, न्याय व धर्म या तीनही शास्त्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर विषयांचेही अध्ययन त्यांनी केले. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 मध्ये अनुवादक म्हणून सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला. पुढे पुण्याच्या पाठशाळेमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले.  दक्षिणा प्राइस कमिटीचे काही काळ ते चिटणीस होते. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. कृष्णशास्त्री हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते.  ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मप्रसाराला आणि हिंदू धर्मविरूद्ध ते करत असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी चिपळूणकरांनी "विचारलहरी" नावाचे वृत्तपत्र काही काळ चालवले. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना "शाळापत्रक" हे नियतकालिकेही त्यांनी चालवले.

मराठी ग्रंथकार म्हणून कृष्णशास्त्रांना मान्यता मिळाली. अलौकिक बुद्धिमत्ता, संस्कृत आणि इंग्रजी शब्दांना भाषांवरील प्रभूत्व आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे जनमानसात त्यांना मान प्राप्त झाला. पाश्चात्य साहित्याचा त्यांचा खूप अभ्यास होता. पौर्वात्य आणि पश्चिमी ज्ञान प्रवाहांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला होता.

कृष्णशास्त्रींनी कालिदासांच्या मेघदूताचा केलेला मराठी अनुवाद अतिशय गाजला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सोपे करून दाखवण्याची हातोटी त्यांची होती. आरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी हा ग्रंथ कृष्णशास्त्रींनी मराठीत आणला, आणि अद्भुतरम्य कथाविश्वाचे दालन मराठी साहित्याला उपलब्ध करून दिले.

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले.  अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, पद्यरत्नावली, सॉक्रेटिस्टचे चरित्र, रसेलस, अनेक विद्यामूलतत्व संग्रह,  अर्थशास्त्र परिभाषा, मराठी व्याकरणावरील निबंध, संस्कृत व्याकरणावरील निबंध अशा विविध विषयांवर चिपळूणकरांनी लेखन केले.
ग. त्र्यं. माडखोलकरांनी यांनी लिहिल्या प्रमाणे, ‘‘कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी, पहिले शैलीकार साहित्यिक!" होत.
---

Monday, April 29, 2024

6. वामन आबाजी मोडक ( 1835? - 1897)


मूळचे रत्नागिरी येथील वामन आबाजी मोडक यांचे, प्राथमिक शिक्षण दापोलीला झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबईतील एका पारशी विद्या फंडातून आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुकर झाले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी वामन आबाजी एक. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रा गो भांडारकर, बी. एम वागळे हे बाकीचे तीन. साल होते 1862. पुढे संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. व्याकरण, साहित्य, वेदांत, न्याय यांचा अभ्यासही त्यांनी केला. हिंदु धर्म तसेच ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, पारशी या धर्मांचाही त्यांनी अभ्यास केला.

एल्फिन्स्टन हायस्कूलमधे ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जवळ जवळ अकरा वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला.
मुंबई विद्यापीठाची फेलोशीपही त्यांना मिळाली.
प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. तिथे कीर्तनं करणे, त्या मार्फत समाजप्रबोधनाचा प्रयत्न ते करत. किर्तनाची पद्धत जुनी परंतु कीर्तनाचे विषय नवीन असत. अगदी येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, व्यापार, विविध कौशल्य, बालविवाहाचे दोष, जुगाराचे तोटे असे विविध विषय ते आपल्या कीर्तनामधे मांडत.
वामन आबाजी यांनी लेखनापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. याचे उत्तम उदाहरण ही कीर्तने होत.

तसेच वामन आबाजी, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून हुजूरपागा ही शाळा सुरु केली.
कामगारांना शिक्षण देण्यासाठी रात्रशाळा प्रार्थना समाजाने सुरु केल्या, त्यातही वामन आबाजींचा मोठा सहभाग होता. 
मुंबईमधे पहिला विधवा विवाह झाला (1893) तेव्हा त्या विवाहाला वामन आबाजींनी जाहीर संमती दिली. तेव्हा त्यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला होता.

वामन आबाजींनी उपनिषदे मराठीमधे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काम अपूर्ण राहिले. त्यांची सुधारणे संदर्भातली, प्रार्थना समाजातील अनेक पदे आजही उपलब्ध आहेत. शिवाय "उत्तरनैषधचरित" नावाचे एक गद्य-पद्य असलेले नाटकही त्यांनी लिहिले.

न्या. रानडे, डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडीत यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आयुष्यभर राहिले.
--- 

Thursday, April 25, 2024

5. विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1872)


विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म  1825 मध्ये रायगड जिल्ह्यातल्या शिरवली गावामध्ये झाला.
अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आणि गरीबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना दुकानांमध्ये कस्टमच्या कार्यालयामध्ये य अशा विविध ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्यात. लहानपणापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडील होता. त्यामुळे आपल्या नोकरीच्या काळातही विविध धार्मिक ग्रंथांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास चालू ठेवला. त्याचबरोबर कथाकिर्तेने, पुराणे,  साधू संन्यासी यांच्याशी संवाद अशांमधे त्यांचे मन रमत असे.  कालांतरानं यातही त्यांचे समाधान होई ना. अखेर 23 व्या वर्षी त्यांनी सगळ्याचा परित्याग केला आणि ते अरण्यामध्ये निघून गेले. विष्णुबुवांनी त्यानंतर अनेक सद्गुरुंना गुरु मानण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेच त्यांचे समाधान झाले नाही. अखेर सप्तशृंगीच्या डोंगरावर ते गेले आणि तेथील देवीचे सानिध्यात फक्त कंदमूळ खाऊन वेदांत विचार ध्यान साधना यावर त्यांनी स्वतःला गुंतवून  घेतले.  कालांतराने ज्यासाठी आपण साधना केली होती ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. उग्र तपश्चर्याच्या योगाने आपण स्वतःचा कल्याण तर साधला; पण आपला कार्यभाग पूर्ण झाला नाही. समाजाच्या कल्याणासाठी आपले उर्वरित आयुष्य आपण वेचले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.  त्याच वेळेस " पाखंडी मतांचे खंडन करून;  तू वैदिक धर्माची पुन्हा स्थापना कर" असा संदेश परमेश्वराने आपल्याला दिला आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे ते गावाकडे परत आले. विष्णुबुवा त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा वेगवेगळ्या गावी गेले. वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या वक्तृत्वाची छाप लोकांना पडत असे. लवकरच त्यांचं नाव सर्वांना माहिती झाले. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा या नावाने ओळखू लागले. 1856 मध्ये विष्णुबुवा मुंबईस आले. त्या काळी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी भारतीय लोकांच्या मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे काम अतिशय पद्धतशीरपणे चालवले होते. ख्रिस्ती धर्मातील उदात्त तत्त्वे, मानवतावादी तत्त्वे यांच्या आधारे सुशिक्षितांवरील प्रभाव त्यांनी पाडण्यास सुरुवात केली होती. आणि मिशनऱ्यांच्या  सेवाभावी वृत्तीचा सामान्य जनतेवर प्रभाव पडत होता.  ख्रिस्ती धर्मप्रचाराकांच्या या दुहेरी आक्रमणामुळे हिंदू धर्मावर मोठे संकट येऊ घातले होते.  ख्रिश्चन धर्मांच्या या प्रभावावर नियंत्रण घालण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी प्रयत्न सुरु केले.  ख्रिस्ती धर्म प्रचारकांच्या प्रचाराला उत्तर म्हणून विष्णुबुवांनी जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्मातील दोष सांगत असत, त्यांचे विष्णुबुवा आपल्या व्याख्यानातून खंडन करत. जवळ जवळ 50 सभा त्यांनी घेतल्या. यात त्यांनी वैदिक धर्मातील आक्षेपांचे खंडन करून त्याची श्रेष्ठता समाजाला पटवून दिली. आपल्या तार्किक युक्तिवादाने आणि पुराव्यांनी समाजातील सर्वांची मने त्यांनी पुन्हा हिंदू धर्माकडे खेचून आणली. त्यांच्या या व्याख्यानांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाले. त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलवायला झाला पुढे ख्रिस्ती धर्माच्या धर्मपदेशकां बरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी वीस दिवस जाहीर वादविवाद झाले. समुद्रकिनाच्या वादविवादांंचा समाजावरती खूप मोठा प्रभाव पडला. मुळात धार्मिक क्षेत्रात मिशनऱ्यांना अडवण्याचे पहिले पाऊल विष्णुबुवांनी उचलले.
पुढे विष्णुबुवांनी तामिळनाडू, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात येथे जाऊनही हिंदूंचे प्रबोधन केले.

विष्णुबुवा वैदिक धर्माचे अभिमाने असले तरी त्यांनी समाजाची दोषांकडे देखील त्यांनी डोळेझाक केली नाही. प्रचलित जातीधर्म हा वेदांतील वर्णव्यवस्थेला सोडून आहे. या जातीभेदामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे हिंदी समाजाची दुर्गती झाली आहे असे त्यांनी मांडले. समाजसुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यांचे व्यक्तिगत आचरण हे सुधारणांच्या विचारांना धरून होते. ते कोणाच्याही हातचे पाणी पीत असतात, अन्न खात असत. खाण्यापिण्याचे बाबतीत जातीभेदाचे, धर्माचे, स्पर्शाचे बंधन त्यांनी कधी पाळले नाही.
समाजातील जाती विषमतेप्रमाणेच अतिशूद्रांवर होणाऱ्या अमानुष अन्यायाविरुद्ध देखील विष्णुबुवांनी आवाज उठवला. दलितांच्या मागासलेपणाची जबाबदारी सर्व उच्च वर्णीयांवरती आहे. आणि म्हणून त्यांच्या सुधारण्यासाठी उच्च वर्णीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मत मांडले.
पुनर्विवाह, घटस्फोट, प्रौढविवाह, शुद्धीकरण या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे विचार आधुनिक होते. लोकांच्या स्तुती वा निंदा कशाची पर्वा त्यांनी केली नाही.

विष्णुबुवांनी 'वेदोक्तधर्मप्रकाश' या नावाचा धर्मग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजनीति संदर्भात एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिले आहे.  पुढे त्याच मतांचा विस्तार करून 1867 मध्ये 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी मांडलेले विचार साम्यवादाशी खूपच मिळते जुळते आहेत.  उदाहरणादाखल त्यांनी असं लिहिलंय की "सर्व प्रजे कडून सर्व जमिनीची लागवड करावी. आणि अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न उत्पादन करून गावोगावी कोठारे भरून ठेवावीत. त्यामधून सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तितके अन्न द्यावे. याप्रमाणे बाराही महिन्यात एकसारखे सर्व जमिनीतून उत्पन्न घ्यावे. ते सर्वांचे उत्पन्न एकत्रच ताब्यात राहून त्यातून सर्वांस खावयास भरपूर न्यावे.
सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगा मुलगी राजाच्या ताब्यात द्यावी. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकून ज्याला त्याला, ज्या कामात गती आहे तो उद्योग करण्याची सवड द्यावी." विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या या विचारावरून  त्यांनी साम्यवादा सारखाच विचार मांडला होता असे म्हणावे लागते. अर्थात बुवांचे हे विचार कार्ल मार्क्स याचे लिखाण वाचून बनलेले नव्हते, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे डोळेसपणे अवलोकन अवलंबून करून, साकल्याने विचार करून लिहिलेले आहेत.  यावरून त्यांची बौद्धिक झेप आणि आणि द्रष्टपणा कळून येतो. 

विष्णुबुवांनी भावार्थसिंधू , वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतु:श्लोकी भागवताचा अर्थ, बोधसागराचे रहस्य, सेतूबंधनी टीका, सहजस्थितीचा निबंध, समुद्र किनारीचा वादविवाद इत्यादी पुस्तके लिहिली होती.
---

Tuesday, April 23, 2024

4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)




रामचंद्र उर्फ भाऊ दाजी लाड यांचे सर्व शिक्षण मुंबईत झालं. विद्यार्थीदशेत ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. आणि अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (1843) त्यांनी दोन वर्षे मुंबईच्या एल्फिन्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. पुढे 1845 मध्ये ग्रँड मेडिकलची स्थापना झाली तेव्हा भाऊ दाजींनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. आणि 1850 वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या सन्माननीय डॉक्टरांमधले भाऊ दाजी हे एक होते.  त्यानंतर लगेचच ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी काही काळ सब असिस्टंट सर्जन आणि दुय्यम अध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसायात भाऊंनी अतिशय लौकिक कमावला. या काळात मुंबईतील एक विख्यात धन्वंतरी म्हणून ते ओळखले जात असतात.
वैद्यकीय संशोधनाचा पाया त्यांनी इथे घातला. महारोगावरील औषधाचा शोध त्यांनी लावला. (जागतिक पातळीवर आता जे औषध वापरले जाते ते शोधले, 1873 मध्ये नॉर्वेमधील जीएच आर्माउर हॅन्सन यांनी. 1874 मधे डॉ. भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू झाला. काळाचा हा संदर्भही मनात असू देत :)  )
परंतु एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात डॉ. भाऊ दाजी लाड हे कुष्ठरोग्यांवर उपचार करीत. ते कोणत्या औषधांचा उपचार करीत ते गुपित त्यांच्याबरोबरच काळाच्या पडद्याआड गेले. त्या उपचारांमध्ये ‘खष्ट’ या वनस्पतीचा ते वापर करीत असावेत, असा एक अंदाज आहे. खष्ट म्हणजे चौलमुद्रा ही सदापर्णी वनस्पती. वनस्पती गोळा करण्यासाठी ते संपूर्ण देशात फिरत, महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार करीत. अशी माहिती मिळते.
अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध करून समाज सुधारणेचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक प्रश्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांचा त्याग केल्याशिवाय आपल्या लोकांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे त्यांचे मत होते. समाजसुधारणेसाठी शक्य त्या पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. उदाहरणार्थ 1860-70 च्या दशकात एका भोंदु बाबाविरुद्ध करसनदास मुळजी यांनी खटला चालवलेला. यात डॉ. लाड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरलेली. 

भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. अर्थात त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची ही भूमिका होती. इंग्रजी राजवटीमुळे आपल्या लोकांना प्रगतीचे दारे उघडली जात आहेत, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. इंग्रजी स्वतःचे समर्थन करत असताना भाऊ दाजींनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट येथील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत असे आग्रह धरून बरेच प्रयत्न  त्यांनी केले.

भाऊ दाजींनी विधवा विवाहाचे उघड समर्थन केले. तसेच ते शिक्षण स्त्री शिक्षणाचे पुरस्कार होते.

तत्कालीन नवसुधारकांमधले भाऊ दाजी लाड हे देखील एक महत्त्वाचे नेते होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचे प्रयत्न भाऊ दाजी यांनी केले.

आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहिले.  समाजातील गोर गरीब, निराधार लोकांना मोफत औषध उपचार केले  केले. मोफत दवाखाने उघडले.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा उभारणीत सहभाग घेतला.

इंग्रजी प्रशासनात  ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिकाऱ्यांना हिंदी अधिकाऱ्यांना कमी महत्व दिले जात असे त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यासाठी 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन मध्ये ते सहभागी होते.

बॉम्बे असोसिएशन प्रमाणे हिंदी जनतेच्या हितासाठी सनदशीर मार्गाने कार्य करण्याचे उद्देशाने निर्माण आलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेतही भाऊंचा महत्त्वाचा सहभाग होता. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत, आपणास अनुकूल करून घेणे; हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापारी उद्योगधंदे यावर कर बसवणारे एक विधेयक तयार केले होते (लायसन्स बिल). यामुळे भारतातील उद्योग आणि व्यापार यावर अनिष्ट परिणाम होणार होता.  या विरोधकाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा बोलवली गेली होती या सभेत भाऊ दाजी सक्रिय सहभागी होते.

1894 मधे स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेमधे भाऊ दाजींही सामील होते.

मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून भाऊंची नेमणूक झाली होती.

तसेच मुंबई विद्यापीठाचे फिलो म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती.

इंग्रजी इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लेखनातील चुका भाऊंनी दाखवून दिल्या. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामधे त्यांनी अनेक इतिहासपर अनेक लेख लिहिले. गुप्तकाल खंडावर त्यांचा विषेश अभ्यास होता. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांवर त्यांचा अभ्यास होता.

ग्रँट मेडिकल  सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

मुंबईच्या नगरपाल पदावर त्यांची दोनदा नियुक्ती केली गेली होती.

1855 च्या अँग्लो अफगाण युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदत करण्यासाठी त्यांनी एक वेगळा निधी जमवला होता.

तसेच मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्ध मोहिम उघडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
---

Sunday, April 21, 2024

3. दादोबा पांडुरंग (1814 ते 1882)


मुंबई येथे जन्म झालेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर जावरा संस्थांच्या नवाबाकडे त्यांची खाजगी शिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली. नंतर सुरत मध्ये सुरू झाले इंग्रजी शाळेतील त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तर 1852 मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर असतानाच 1857 मध्ये भिल्लांच्या बंडांचा बिमोड केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना "रावबहादूर" हा किताब दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. 

नोकरी चालू असतानाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुधारणांचा आरंभ झाला. दादोबा पांडुरंग यांचा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील समाजसुधारकांमध्ये समावेश होतो. हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होऊ लागला आणि त्यातून नवीन विचारांना चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे डोळस बनून आपल्या धर्मातील वैगुण्ये लक्षात येणाऱ्या तरुणांचा एक नवा वर्ग एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झाला. दादोबा पांडुरंग हे अशाच तरुणांपैकी एक होय.  हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा दादोबांना खटकू लागल्या. याच गोष्टीच हिंदू धर्माच्या पतनास कारणीभूत झाल्या आहेत अशी त्यांची खात्री झाली होती. परंतु धर्म न बदलता, स्वधर्मात राहून  सुधारणा करण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.  आणि म्हणून दादोबा पांडुरंगांनी मानवसभा व परमहंस सभा या संस्था स्थापन केल्या.  1844 मध्ये  सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना त्यांनी केली. या सभेच्या सभासदांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू धर्मातील जाती संस्थेला ही त्यांचा विरोध होता. निराकार प्रभूची प्रार्थना करण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरवले.  माणसामाणसांतील समानतेवर त्यांचा विश्वास होता. मानव सभेचे वरील तत्वे अतिशय उदात्त असली तरी ती उघडपणे पाळणं, स्विकारणे त्या काळात फार अवघड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ दादोबांना मिळाले नाही. आणि त्यामुळे ही संस्था लवकर संपुष्टात आली.
एलफिन्स्टन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. आपल्या देश बांधवात ज्ञानाचा प्रचार, प्रसार करणे आणि सामाजिक जागृती करून आणणे ही त्याची प्रमुख उद्दिष्टे होती. दादोबा पांडुरंग या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

पुढे 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची दुसरी संस्था दादोबा पांडुरंग यांनी सुरू केली. हिची तत्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वासारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्ती पूजा करू नये, जातपात मानू नये, विधवाला संमती असावी, अशा तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. परमहंस सभेत सर्व जातीचे सभासद प्रार्थनासाठी एकत्र जमत आणि नंतर सह भोजनही करत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिचे कामकाज गुप्तपणे चालत असे. याचे कारण त्या सभेच्या सदस्यांना सामाजिक आणि धार्मिक सुधारण्यासाठी तळमळ वाटत होती; परंतु त्याबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीतून सनातनी आणि कर्मठ लोकांचा जो जो रोष पत्करावा लागला असता, त्याला तोंड देण्यात की ताकद त्यांच्या अंगी नव्हती. यामुळे 1860 मध्ये ही सभा बरखास्त झाली.

याशिवाय आपल्याला समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून दादोबांनी प्रयत्न केले. आपल्या लोकांनी आधुनिक ज्ञान, विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे त्यांचे मत होते. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारचा आग्रह धरला. ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांचा परिचय करून देण्यावर त्यांनी भर दिला.

दादोबांचे वाङ्मयीन कार्यही मोठे आहे. मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यामुळे "मराठी भाषेचे पाणिनी" असे त्यांना म्हटले जाते.
तसंच इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दादोबांनी इंग्रजी व्याकरण मराठीत आणलं. त्यांनी संस्कृत व्याकरणही मराठीत उपलब्ध करून दिले.
तसेच मोरोपंतांच्या केकावली यावर त्यांनी 'यशोदा पांडुरंगी' नावाची टीका लिहून; मराठी भाषेतील आधुनिक समीक्षेचा पाया घातला.

याशिवाय लघुव्याकरण, महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, विधवाश्रुमार्जन, आत्मचरित्र इत्यादी पुस्तकात यांनी लिहिली. तसेच
नकाशाचं पुस्तक मराठीत काढण्याचा पहिला स्तुत्य उपक्रमही त्यांनी केला होता.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे गाढे अभ्यासक  अ. का. प्रियोळकर यांनी दादोबा पांडुरंग यांचे फार सुंदर अन तपशीलवार चरित्र लिहिले आहे.

Thursday, April 18, 2024

2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे पहिले पाक्षिक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून (काळबादेवी) सुरू केले. तसेच त्यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्याच वेळी, मे 1840 पासून सुरू केले. 

जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता सुरू केली तो काळ पेशवाईच्या अस्तानंतरचा (1818) होता. महाराष्ट्रातील पेशव्यांचे राज्य गेल्यानंतर मराठी माणसांचे मन, मेंदू, मनगट बधिर झाले होते. ते पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचे प्रतिबिंब! दर्पण सुरु केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे वीस वर्षे. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील ‘ज्ञानेश्‍वरी’नंतरचे महत्त्वाचे संक्रमण मानले जाते. त्या पाक्षिकात प्रत्येक पानावर अर्ध्या पानाचा मराठी मजकूर व त्यापुढेच त्याचे इंग्रजीत भाषांतर अशी छपाई असे. मराठी जनतेला काय म्हणायचे आहे ते मराठी भाषेत व ते इंग्रज प्रशासनास कळावे यासाठी इंग्रजीत अशी त्या मजकुराची कल्पक रचना होती. वाचकांना विचारप्रवृत्त करणे हा त्यांचा हेतू होता. मराठी भाषा व साहित्य-संस्कृती यांवर इंग्रजांच्या राजवटीमुळे काही संक्रमण होऊ लागले होते. त्याला पर्याय म्हणजे विकासाचा मार्ग म्हणून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे हा विचार जांभेकर यांचा होता. वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम शिक्षण, लोकशिक्षण, मराठी साहित्य व पाश्चिमात्य सुधारणावादी ज्ञानविज्ञान यांच्या प्रसारासाठी आहे अशी त्यांची धारणा झाली. 

पोंभुर्ले, ता. देवगड,  रत्नागिरी येथील गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा धाकटा मुलगा बाळ जांभेकर. वयाच्या तेराव्या वर्षी, 1826 च्या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी व अन्य विषयांच्या शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये दाखल झाला. बाळ जांभेकर बुद्धिमान होते. त्यांनी अवघ्या दोन वर्षांत इंग्रजी, गणित व अन्य नऊ भाषा यांत प्राविण्य मिळवले. त्यांची ती तडफ लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थिदशेतच उपएतद्देशीय सचिव म्हणून नियुक्ती प्रथम मिळाली. तो मराठी माणसासाठी फार मोठा गौरव होय !

गर्व्हनर एल्फिन्स्टन यांनी बाळ जांभेकर यांची विद्वत्ता ओळखून त्यांना आणखी पुढे संधी दिली; मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकाशी संबंधित ग्रंथ तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर पुढे, मार्च 1830 पासून त्याच शिक्षण संस्थेत (बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी) उप एतद्देशीय सचिव (डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी) म्हणून दरमहा पन्नास रुपयांवर नियुक्ती केली. बाळशास्त्री यांनी त्या काळात मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, हिंदी, फारसी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच अशा विविध भाषांत प्राविण्य मिळवले. तसेच अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, अंकशास्त्र, शून्य उपलब्धी गणित या विषयांतही विशेष प्राविण्य मिळवले. त्यांचे उत्तम अध्यापन, संस्थेबद्दल निष्ठा, सद्वर्तन आणि मुलांच्यातील व सहाध्यायींमधील लोकप्रियता हे गुण लक्षात घेऊन त्यांची त्याच संस्थेत पूर्ण वेळ एतद्देशीय सचिव म्हणून मार्च 1832 पासून सन्मानाने दरमहा शंभर रुपये पगारावर नियुक्ती झाली. 

तसेच 1831 मध्ये लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील पौर्वात्य भाषांतर समितीचे एतद्देशीय भाषा सचिव म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. पुढे 1842 मधे एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कार्यकारी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय  एप्रिल 1845 मध्ये मुंबई येथे सुरू केले. 

त्यांनी मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने 1845 मध्ये सुरू केले. 

लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’1845 मध्ये स्थापन केली. सार्वजनिक प्रश्नावर निबंध वाचन व त्यावर चर्चा असे सोसायटीमधील कार्यक्रमांचे अभिनव स्वरूप होते. 

काळबादेवी भागात वाडा भाड्याने घेऊन त्यात पहिले वसतिगृह 1845 मध्ये सुरू केले. 

तसेच मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही वर्षभर काम केले.

लंडन येथील जिऑग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेत कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून 1842 ते 1846 पर्यंत होते. 

प्रा. बाळशास्त्री जांभेकर पुरातत्त्व व इतिहास संशोधन असे काम लंडन येथील दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई येथील शाखेत (1830 पासून) करत असत. त्या शाखेने 1841 पासून ‘जर्नल ऑफ दि बॉम्बे ब्रँच एशियाटिक सोसायटी’ सुरू केले.

त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा सन्मान 1840 मध्ये मिळाला होता. तो त्या काळातील बहुमान समजला जात असे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ‘ग्रँड ज्युरी’मध्ये बसू शकत होते. 

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मधून साहित्यलेखनाचा आरंभ केला होता. त्यांचे लेखन भाषांतराच्या माध्यमातून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कॅप्टन जर्व्हिस यांचे लॉर्ड ब्रॉग्हम यांच्या ‘ट्रेएटाईज ऑन द ऑब्जेक्ट्स – अ‍ॅडव्हांटेज अँड प्लेजर्स ऑफ नॉलेज’ नावाच्या प्रसिद्ध शास्त्रीय पुस्तकाचे ‘विद्येचे लाभ, उद्देश आणि संतोष’ या नावाने भाषांतर केले. ते 1829 मध्ये छापले गेले. त्यांनीच पहिला मराठी शब्दकोष आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकासाठी संपादन व भाषांतर केले होते.

जांभेकर यांनी त्यांच्या ‘दर्पण’ व नंतर ‘दिग्दर्शन’मधून बरेच निबंध व लेख लिहिले आहेत. जांभेकर हे आद्य निबंधकार व आद्य गद्य लेखक होत. त्यांचे निबंध व लेख यांचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यातून धार्मिक व सामाजिक सुधारणा, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी-परंपरा यांचा त्याग, ज्ञान व विज्ञान यांची माहिती, स्त्रियांचे शिक्षण, शालेय शिक्षण ह्यांचे दर्शन होते.

त्यांनी ‘दर्पण’मधून हिंदुधर्म आणि सती, जातिभेदाचा प्रश्‍न , स्त्रियांस वेदाभ्यास, स्त्री शिक्षणाची दिशा , स्त्री-पुरुषांना समान हक्क 1 व 2 , ग्रंथपरीक्षणाचा नमुना , मुंज मुलींची का नाही?, सरकारी नोकरीत जातीयता , नाटकशालेस प्रोत्साहन  असे पुरोगामी विचारांचे लेख प्रसिद्ध केले होते. आणि ‘दिग्दर्शन’ या मासिकातूनही रसायनशास्त्र, इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोडी व बाळबोध अक्षरांचे ताम्रपट, वाफयंत्रे, ज्योतिष शास्त्र, सिद्ध पदार्थ विज्ञान असे अनेक विषय हाताळले.

भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन नाणी, चित्रलिपी, गूढ लिपी यांवर संशोधन करून इंग्रजीतून लेखन प्रसिद्ध केले

त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळाप्रेसवर मुद्रण सर्वात प्रथम 1845 मध्ये केले. 

त्यांच्यामुळेच ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत शक्य झाली.

त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नुसती नावे वाचूनही थक्क व्हायला होते. 

1. नीतिकथा

2. सारसंग्रह 

3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 व 2, 4. भूगोलविद्येची मूलतत्त्वे, 

5. भूगोलविद्या गणितभाग, 

6. बालव्याकरण (यांतील क्रमांक 4 व 6 ही पुस्तके मुंबई इलाख्याच्या प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासली जात होती), 

7. मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, 

8. शब्दसिद्धी निबंध, 

9. समीकरणाविषयी टिपणे, 

10. शून्यलब्धी गणित व मूलपरिणती, 

11. हिंदुस्थानचा इतिहास, 

12. हिंदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, 

13. मानसशक्ती विषयीचे शोध (अपूर्ण). 

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात.  बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात

विचार, लेखन आणि प्रत्यक्ष कृती अशा तीनही स्तरांवर मोठे काम केले. 

 त्यांचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरण.  शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या काळात त्यांनी लढा दिला.  सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना सामाजिक व धार्मिक रोषाला सामोरे जावे लागले; धार्मिक बहिष्कारही सहन करावा लागला. परंतु कायदेशीर आणि संमत मार्गाने लढा देता येऊ शकतो आणि न्याय मिळवता येतो याचा पाया त्यांनी भारतात घातला.

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी 17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचा मुंबईमधे मृत्यू झाला.

---