Sunday, September 29, 2019

16. कोरलंय काय या डोक्यावरती?

( लेखातील छायाचित्र By Saqib Qayyum - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=31036234 आणि नेटवरून साभार


परवा आपण  पृथ्वीच्या पाठीवर ठेवलेल्या टोपीखालची गंमत बघितली. आज आपण एका उंच डोंगराच्या डोक्यावर काय कोरलं बघुयात. याठिकाणाच नाव आहे सिगरिया ! आता तुम्हालाओसायरिस आणि सिगरिया यात काही साम्य हि दिसेल. अगदी नावापासून, हो ना?  OSIRIS and SIGARIYA पण या दोन जागा एकमेकींपासून खूप लांब आहेत/ ओसायरिस आहे इअफ्रिकेत उत्तरेला तर सिगरिया आहे आशिया मध्ये दक्षिणेला . श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. तशी हि जागा  आता बहुतेकांना माहिती असते. जागतिक वारसा म्हणून घोषित आणि संरक्षित आहे. बहुतांश श्रीलंका पर्यटना मध्येही याचा समावेश असतो.

श्रीलंकेच्या मध्यात असलेल्या डांबूला या गावाजवळ एक प्रचंड मोठी शिळा आहे. तिचेच नाव सिगारिया (म्हणजे  सिंहगिरी )


असं म्हट्लन जातं कि कश्याप राजाने (इ.स. ४७७ -४९५) या सिंहगिरीवरती आपली राजधानी वसवली. परंतु त्याच्या मृत्यूनेणार हि वसाहत ओस पडली.
काहीं पुरावे असे सांगतात कि तिसऱ्या शतकापासून चवदाव्या शतका पर्यंत इथे बुद्ध विहार होते. बॊध्द साधकांनी अनेक गुहा कोरून तिथे आपली साधना केली.

त्यांनतर सिगारियाचा जगाला विसर पडला. पुढे १८३१ मेजर जोनाथन फोर्ब्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली. अन तेव्हापासून आधुनिक जगाला या ठिकाणाची माहिती  मिळाली. पुढे १८९० मध्ये काही प्रमाणात उत्खनन झाले. १९८२ मध्या श्रीलंकेच्या सरकाराने  यावर पुन्हा काम सुरु केले. आणि आता हे ठिकाण आधी म्हटल्याप्रमाणे जागतिक वारसा म्हणून जाहिर केले गेले आहे .

६६० फूट उंच असलेल्या या उभ्या कातळाच्यावरती एक आश्चर्य आहे. या कातळावरती जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक वाट नाही. सुरुवातीला काही दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर सुरेख रचलेली बाग लागते.



विविध चौकोनी दगडी हौद त्यात पाणी आणि आसपास सुरेख हिरवळ. काही अंतर गेल्यानंतर मात्र आपण उभ्या कातळापाशी  येतो.



 आणि समोर असते ती अतिशय अवघड अशी लोखंडीशिड्यांची माळ. तीही तशी नवीन आहे. जरा बाजूला नजर फ़िरवली कि या कातळाला सिगारिया का म्हणातात याची पहिली प्रचिती येते.


कातळातून कोरलेला सिहंचा पंजा .

समोरच्या अतिशय उंच, चढाच्या जवळ जवळ १२०० पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सिगारियाच्या वरती पोहचतो.  खाली बघताना फार विहंगम दृश्य दिसतं.




या कातळाच्या वरती चढून गेल्यानंतर आपल्याला हा नजारा दिसतो.


 .


Monday, September 23, 2019

लोकशाही समाजवाद



यामध्ये दोन विचारसरणी एकत्र आल्या आहेत. लोकशाही आणि समाजवाद
लोकशाही म्हणजे काय हे बहुतांशी आपणास माहिती असते. समाजवाडा बद्दल मात्र काही शंका मनात असू शकतात.
लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. अगदी साधी सोपी, सरळ व्याख्या म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून केलेले राज्य. परंतु हि व्याख्या अतिशय सोपी, खरं तर अतिशय डायल्युट पातळ केलेली व्याख्या आहे. फार पूर्वी ग्रीक नागरराज्यामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. कालांतराने परिस्तितीनुरूप त्यात बदलही होत गेले. आज प्रामुख्याने वास्तवात आहे ती लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. यामध्येहि काही प्रकार आहेत, परंतु आता त्या तपशिलात जायला नको. इतकंच माहिती असू द्या कि एखाद्या देशातील लोक सार्वत्रिक मतदानाने आपले प्रतिनिधी निवडून देतात. आणि हे प्रतिनिधी लोकांच्यावतीने राज्याचा कारभार चालवतात.

लोकशाही हि प्रामुख्याने राज्यव्यवस्था कशी चालावी या संदर्भात आहे. तर समाजवाद हा समाजातील उत्पादनांच्या साधनांच्या मालकी बाबत आहे. कोणत्याही समाजामध्ये उत्पादनाची साधने असतात. जसे कि जमीन, कारखाने, कलाकौशल्याची साधने, कार्यालये, उद्योग, व्यापार, पर्यटन, असे सर्व ज्यातून अर्थ/ पैसा उत्पन्न होतो अशा सर्व गोष्टी. ह्या उत्पादनांच्या साधनांवर कोणाचा अधिकार असेल ह्यावरून त्या त्या समाजाची अर्थव्यवस्था ओळखली जाते.

या दोन्हीची एकत्रित  व्यवस्था म्हणजे लोकशाही समाजवाद.म्हणजे  एखाद्या समाजामध्ये राज्यकारभाराचे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींकडे सोपवले असतील. आई समाजातील सर्व उत्पादनांच्या साधनांचें अधिकार या लोकनियुक्त सरकार कडे सोपवलेले असतील.
या व्यवस्थेमध्ये सरकारही लोकांचे आणि उत्पादनाची साधने अशा लोकांच्या सरकारकडे असल्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त भले कसे होईल हे राजकीय आणि आर्थिक बाबतीतही बघितले जाईल. समाजाच्य जडणघडणीतील रहा आणि राजकारण असे लोकोपयोगी असले कि आपोआपच असा समाज जास्ती प्रगती करेल, जास्ती  सुखी असेल असे मानले जाते.


Wednesday, September 18, 2019

19. शिवाजी सूरत - वस्तुस्थिती


( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.