Thursday, March 2, 2017

न्या. महादेव गोविंद रानडे


भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.
राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.
सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.
इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.
भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.
न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.
भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.
समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.
समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.
भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.
कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.
येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.
राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.
न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.
न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.
एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.
ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.
तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.
एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

18. मध्ययुग आणि महाराष्ट्र


( डिसक्लेमर : शिवाजी इतका हृदयाच्या जवळचा आहे की त्याला अहोजाहो म्हणताच येत नाही. तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे जाऊ नयेत हिच इच्छा!
आदरार्थी बहुवचन! मराठी भाषेचं हे वेगळेपण कधी कधी भयंकर त्रासाचं ठरतं. माझ्यापुरता मध्यम मार्ग मी सर्वच वैचारिक लिखाणांपुरता काढला. तो म्हणजे आधुनिक कालखंडातील प्रत्येकाला आदरार्थी बहुवचन लावेन. प्राचीन, मध्ययुगीन काळातली व्यक्ती कितीही आदरणीय असली तरी तो आदर मी लिखाणात केवळ आदरार्थी बहुवचन वापरून करण्याएेवजी त्या व्यक्तीचे मोठेपण मांडून व्यक्त करेन.
आधुनिक कालखंड हा जास्त जवळचा असल्याने ह्या कालखंडातल्या व्यक्ती, अगदी जिवंत असण्याचीही शक्यता अाहे. तेव्हा या कालखंडातील सर्व, अगदी सर्व व्यक्तींना मात्र मी हे आदरार्थी बहुवचन वापरेन. काहींना हे खटकण्याची खूप शक्यता आहे. पण यात केवळ एक सोय अभिप्रेत आहे.)
____________

फाल्गुन वद्य तृतिया नुकतीच होऊन गेली. शिवजयंतीचा उत्सव पार पडला. मध्ययुगात होऊन गेलेला एक आगळावेगळा राजा! आज त्याच्या बद्दल बोलणार आहे.
लक्षात आलं ना मी का मध्ययुग निवडलं. शिवाजी म्हटलं प्रत्येक मराठी माणसाला भरून येतं, अभिमानाने मान ताठ होते. राजा असावा तर असा, अशी भावना मनात येते.
या शिवाजी बद्दल इतकं लिहिलं गेलय, जातय की मी नवीन काय सांगणार?
आजकाल व्हॉट्स अपच्या माध्यमातून तर महापूर लोटतो ज्ञानसागराचा. तिथे काही विरोध केला, पुरावे मागितले की लगेच मानभंग वगैरे होतात. त्यामुळे अशा कोणत्याच गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.
मी बोलणार आहे ते फक्त आणि फक्त मध्ययुगातील एक वेगळी दृष्टी असणार्‍या , स्वत:चा वेगळा ठसा पाडणार्‍या, त्याकाळाची बंधने ओलांडून पुढे जाणार्‍या एक दूरदृष्टी असलेल्या , समंजस, सहृदय, कर्तव्यकठोर अशा शहाजी आणि शिवाजी या पितापुत्रांविषयी ! शहाजी, शिवाजी कसे घडले , कोणत्या परिस्थितीत घडले , त्यांचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न करते. खूप मोठा विषय, पण थोडक्यात मांडणार आहे.
तर मध्ययुगात महाष्ट्रात यादवांचे राज्य मोडून बहामनी राज्य आलेलं. पण त्याचीही विभागून पाच वेगवेगळी शकलं झालेली. पैकी महाराष्ट्रात उत्तरेकडची मुघल सत्ता, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आशा तीन वेगवेगळ्या सत्तांचे आलटून पालटून नियंत्रण होते. सतत कोणाचा न कोणाचा सत्ता संघर्ष , युद्ध चालत होती. शिवाय स्थानिक वतनदारांचे एकमेकांशी असणारे संघर्षही चालूच असत. जोडीने वेळोवेळी पडणारे दुष्काळ, कोणीच वाली नसल्याने न मिळणारी मदत, यामुळे महाराष्ट्रातील जनता अगदीच हवालदिल झाली होती. अनेक गावे ओस पडली होती. अनेक कुटुंबे आपली वहिवाटीची जमीन सोडून परागंदा झालेली. एकंदरच कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नाही; अंदाधुंदी, कोणी वाली नाही, युद्ध, अस्थिरता, असा अतिशय असंतोषाचा काल महाराष्ट्र अनुभवत होता.
इतिहासातील गुप्त साम्राज्य, यादव राजवट, वाकाटक राजवट, विजयानगराचे साम्राज्य अशा अनेक उत्तम राजपदांचा अनुभव असल्यामुळे मध्ययुगातील जनतेला अन्याय, असुरक्षितता खूपच जास्त जाणवत होती.
या परिस्थितीत वेरुळच्या एका घराण्याने पुढाकार घेतला. मालोजी आणि विठोजी भोसले या भावंडांनी आपले लष्करी कर्तृत्व निजामशाही मध्ये राहून दाखवले. मालोजीचा पुत्र शहाजी यानेही आपले लष्करी कर्तृत्व सिद्ध केले.
शहाजीचा काळ तर अजूनच अंदाधुंदीचा होता. सतत कटकारस्थाने, युद्धे चालू होती. तत्कालिन सर्व राज्यकर्ते; मुघल सम्राट , निजामशहा, आदिलशहा हे आपापल्या वर्चस्वाखाली जास्तीत जास्त प्रदेश आणण्यासाठी कोणतेही विधीनिवेश पाळत नव्हते. स्वाभाविकच प्रत्येक सरदार, वतनदार सतत सत्ताबदल करत. शहाजीचीही परिस्थिती अशीच होती. कधी निजामशाही; तिथे दगाफटका झाला कि आदिलशाहीकडे . तिथे कमी महत्व मिळाले कि पुन्हा निजामशाही. तिथे कारस्थाने झाली कि मुघलांकडे. तिथे दगाफटका झाला कि पुन्हा आदिलशाही, तिथे अंदाधुंदी कि पुन्हा निजामशाही. अशी त्रिस्थळी यात्रा सतत सुरु होती.
या सगळ्यात शहाजीच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.
१. मुगलांचा दक्षिणेत शिरकाव होता कामा नये.
२. स्वत:च्या अधिकारातला काही परगणा- प्रांत हवा.
३. स्थानिक लोकांचे राज्य असायला हवे.
४. त्यासाठी काही हुशार, जिवाला जीव देणार्‍या आणि निष्ठावान व्यक्ती शोधून त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजेत.
यादृष्टीने शहाजीने हालचाली सुरु केल्या.
१. पुणे, सुपे, चाकण येथील वतनदारी आपल्या नावावर करून घेतली. निजामशाही, आदिलशाही इतकेच नव्हे तर मुघलांकडूनही त्या वेगवेगळ्या वेळी मान्य करून घेतले.
२. महाराष्ट्रात निजामशाही वा आदिलशाही बलवान व्हावी यासाठी प्रयत्न केले.
३. शिवाजीची रवानगी पुण्याला केली.
४. शिवाजी बरोबर अत्यंत हुशार, निष्ठावान, विश्वासू अशा व्यक्तींचे "प्रधान मंडळ" सोबत दिले.
५. वेळोवेळी शिवाजीच्या आक्रमक हालचालींची पाठराखण निजामशाही-आदिलशाहीमधे केली.
शहाजीचा हा सगळा विचार, कृती निश्चितच मध्ययुगाचा विचार करता फार वेगळी होती. मध्ययुगातून महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळालेली दिसते ती शहाजीच्या कारकिर्दीपासून! शहाजीने हे सगळे अतिशय विचारपूर्वक, नियोजनबद्ध केलेले दिसते. हीच दूरदृष्टी , नियोजन पुढे शिवाजीनेही दाखवलेले दिसते.
शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१; इंग्रजी कॅलेंडर नुसार स.न. १९ फेब्रुवारी १६३० . अत्यंत धामधुमीचा - मुघलांच्या आक्रमणाचा काल. सुरुवातीची, बालपणीची सहा वर्षे शिवाजी सह्याद्रीच्या गडकोटांवर होता. पुढे सहा वर्षे बंगळूरला शहाजीच्या बरोबर होता. १६४१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शिवाजीला शहाजीने जिजाबाई,दादोबा कोंडदेव यांच्या बरोबर पुण्याला पाठवले. पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस असे स्वतंत्र अधिकारी; सोबत घोडदळ, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य, अध्यापक, उंच ध्वज, विपुल द्रव्य असे सगळे सोबत पाठवले. शिवाय शहाजीने आपल्या मावळ वतनातील पोट मोकासा म्हणून ३६ गावेही शिवाजीच्या नावे केली.
एका अर्थाने स्वतंत्र, स्वायत्त असा छोटा राजा म्हणूनच शिवाजीची पाठवणी शहाजीने केली. पुढे आपल्या दोन सरदारांना "राजश्री शिवाजी पुणे येथे आहेत, तिथे इमाने सेवा करा" असेही सांगितले. या सर्वातून शहाजीने नियोजनबद्ध, परिस्थितीचा साधकबाधक विचार करून प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल केलेली दिसते.
शिवाजीला या सर्वाची खूप लहानपणापासून जाणीव असावी. पहिल्या बारा वर्षात वडिलांची धडपड, मते, कर्तृत्व आणि त्यांनी पाहिलेले स्वायत्त-स्वराज्याचे स्वप्न निश्चितच शिवाजीला माहिती होते. याचेच पडसाद आपल्याला शिवाजीच्या कारकिर्दीत दिसतात. पुण्यात आल्या नंतर पहिल्या चार वर्षातच आसपासच्या परिसरात - बारा मावळ प्रांतात आपला दबदबा शिवाजीने निर्माण केला. १६४२-४७ या काळात शिवाजी, दादोबा कोंडदेव, आणि सहकार्यांनी एक फार मोठे कार्य केले. कौल देऊन गावं वसवण्याचे. अनेक वर्षांच्या अंदाधुंदी मुळे जमीन, गावं उजाड झाली होती. ही जमीन लागवडी खाली आणणे, गावं वसवणे, ती स्थिर करणे, लोकांना अभय देणे-आश्वस्थ करणे, जमीन लागवाडीसाठी हत्यारे-पैसा-बीबियाणं पुरवणं. पेरणीपासून धान्य हाती येईपर्यंतचा ६-७ महिन्यांच्या काळात युद्ध-नासाडी होणार नाही याचे विश्वास देणे आणि टिकवणे. भावी काळात या सर्वातून निर्माण झालेल्या धनधान्यावर कर लावून तो वसूल करणं. ही सगळी व्यवस्था या पहिल्या ४-५ वर्षाय मावळ प्रांतात शिवाजी आणि सहकार्यांनी प्रत्यक्षात आणली. जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेचे जीवन सुरक्षित, मूळपदावर आणले. त्यासाठी वेळप्रसंगी स्थानिक बलवान वतनदारांना दंड - शासन केले.
हे सर्व करत असताना शिवाजीने सर्वात जास्त कमावला तो म्हणजे " लोकांचा विश्वास" ! या कालखंडा मध्येच त्याने आपले अतिशय निष्ठावान सहकारी मिळवले. येसाजी कंक, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, तानाजी मालुसरे, हंबीरराव असे अनेक सच्चे, कर्तृत्ववान, आणि आपापल्या क्षेत्रातले श्रेष्ठ सहकारी शिवाजीने मिळवले.
पुढे जावळीच्या चंद्रराव मोरेंपासून अफजलखान, शाहिस्तेखान, आग्राभेट, दक्षिण मोहिम, राज्याभिषेक पर्यंतचे सगळे तपशील सर्वांना माहितीच आहेत. अगदी शालेय पातळीवर याचा अभ्यास आपण केलाय. तेव्हा, मध्ययुगाचा विचार करताना शिवाजीचे जाणवलेले वेगळेपण फक्त मांडायचा प्रयत्न आता करणार आहे. ( मागचा लेख डोळ्यासमोर ठेवलात तर हे वेगळेपण जास्त ठळक होईल)
शिवाजीने आपल्या अधिपत्याखाली अनेक छोट्या- मोठ्या वतनदारांना एकत्र आणले. बारा मावळ, जावळी, महाराष्ट्रातील अनेक वतनदार, या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभे केले. चाळीस हजार होन इतक्या वतनापासून एक कोटी होन वतनापर्यंत हे राज्य वाढवले.
राजकीय स्तरावर मुघलांचा दक्षिण शिरकाव शिवाजीने थोपवून ठेवला. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांना महाराष्ट्रापासून दूर ठेवण्याचे कामही शिवाजीने केले. महाराष्ट्राची सीमा थेट कर्नाटका पर्यंत वाढवली.
हे स्वराज्य उभे करत असतानी वडील शहाजी यांचे पूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंबा शिवाजीला होता. किंबहुना शहाजीने तयार केलेल्या पार्श्वभूमीवरच शिवाजीने स्वराज्य उभे केले. आणि वेळोवेळी शहाजीचा सल्ला, पाठिंबा त्याने मिळवला. तसेच आपल्या मुलाला- संभाजीलाही त्याच दृष्टीने घडवले. अगदी गरज भासली तेव्हा संघर्षापेक्षा समन्वय आणि सामंजस्याने प्रश्न सोडवला.
कोणत्याही वर्चस्वाखाली न जाता स्वत:चे राज्य उभे केल्यामुळे शिवाजीने "सतत बाजू बदलणे" हे मध्ययुगाचे धोरणही स्वीकारले नाही. उलट आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक वतनदार, सैनिक, अधिकारी , जनता यांच्या मध्ये त्याने निष्ठा निर्माण केली. शिवाजी बद्दलचा आदर, विश्वास वाढीस लागला. आणि त्याचे कर्तृत्व पाहून मध्ययुगात हरवत चाललेली निष्ठा पुन्हा प्रस्थापित झाली.
आर्थिक बाबतीत शिवाजीने अनेक नवीन पावलं उचलली. शेतीचे मोजमाप योग्य करण्यासाठी, त्यात सारखेपण आणण्यासाठी शिवकाठी वापरली जाऊ लागली. जमिनीची प्रतवारी ठरवली गेली. त्यानुसार कर आखणी , आकारणी सुरु झाली. करव्यवस्थेत समानता आली. सततच्या युद्धांपासून सुटका झाल्यामुळे आणि संरक्षणामुळे शेतीची घडी बसू लागली. त्यातून उत्पन्न आणि त्यातून ठराविक कर राज्याकडे जमा होऊ लागला. या राज्याकडे येणाऱ्या कराचा अतिशय काटेकोर हिशोब ठेवला जाऊ लागला. स्वाभाविकच राज्याची आर्थिक बाजू बळकट होऊ लागली. याचा उपयोग व्यापार, सैन्य, आरमार आणि किल्ले उभारणीसाठी झाला.
लष्कराची बाजूही शिवाजीने बळकट केली. राज्याच्या रक्षणासाठी लष्कर किती महत्वाचे आहे हे त्याने जाणले. त्यानुसार लष्कराची बांधणी केली. त्यांना योग्य आणि पुरेसा दारुगोळा, हत्यारं मिळतील अशी व्यवस्था केली. कमी सैनिकांमध्ये मोहिम यशस्वी करण्यासाठी गनिमी कावा ही पद्धती विकसित केली. सैनिकांशी अतिशय चांगले संबंध आणि युद्धातील प्रत्यक्ष सहभाग यातून शिवाजी बद्दलचा आदर, त्याच्या प्रति असणाऱ्या निष्ठा वाढीस लागल्या. यातून शिवाजीचे मावळे हे एक अभूतपूर्व रसायन बनले. जिवाला जीव देणारे सैनिक, अधिकारी याची उदाहरणे म्हणून बाजी प्रभू देशपांडे आणि जीवा महाला ही नावे पुरावीत.
शिवाजीने महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या राज्याला बाह्य आक्रमणांपासून सतत सुरक्षित केले. आदिलशाही, निजामशाही, मुघल इतकेच नव्हे तर पाश्चात्य सत्तांनाही योग्य ते बंध घातले. मध्ययुगीन त्रस्त जनतेला आश्वस्त केले.
राज्यांतर्गत सुरक्षितता, स्वास्थ्य आणले. जनतेचा मनातली भीती, असुरक्षितता पूर्णत: दूर केली. तत्कालिन राजांचे जनतेप्रति असणारे दुर्लक्ष ही परिस्थिती शिवाजीने बदलली. तो लोककल्याणकारी राजा बनला. सामान्य, स्थानिक लोकांचे हित जपणारा राजा, एक उत्तम शासनकर्ता म्हणून शिवाजी मध्ययुगात वेगळा उठून दिसतो. शासनासमोर सर्व सारखे ही आधुनिक काळातली संकल्पना शिवाजीने काही अंशी मध्ययुगातच स्वीकारलेली दिसते.स्त्रियांना मानाची वागणूक ही देखिल तत्कालिन परिस्थितील वेगळी उठून दिसणारी.
राज्यकारभाराच्या स्तरावर योग्य, अनुभवी व्यक्तींची अतिशय नेमकी पारख शिवाजीने केली. करवसूली, हिशोब तपासणी आणि विनियोगावरील योग्य पकड, यातून मराठी राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम केली. शेतजमिनीची प्रतवार मोजणी, योग्य कर आकारणी, वसुली आणि अतिशय स्वच्छ , पारदर्शी अर्थव्यवस्था शिवाजीने निर्माण केली. जोडीने न्यायव्यवस्थेतील निरपेक्षपणाही जपला . जात, धर्म, नातेवाईक कसलाही भेदभाव या न्यायव्यवस्थेत ठेवला नाही.
एकुणातच मध्ययुगातील सर्व अंधःकारमय बाजू दूर करणारी अशी ही शिवाजीची कारकिर्द! आणि म्हणूनच वेगळी, मानाची, अभिमानाची !
आज या निमित्ताने शहाजी आणि शिवाजीला एक कडक सलाम ____/\____

Wednesday, March 1, 2017

17. मध्ययुग


इतिहासात प्राचिन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तीन प्रमुख कालखंड.
प्राचीन आणि आधुनिक युगांच्या मधले हे युग  म्हणून मध्य युग. यालाच अंध: काराचे युगही म्हटले जाते.

कसे होते हे मध्य युग, का होते अध:काराचे?

प्राचीन काळी राजेशाही अस्तित्वात होती. मोठी मोठी साम्राज्ये होती. कालांतराने एव्हढी मोठी साम्राज्ये चालवणे अवघड होत गेले. काही राजांची पुढची पिढी तितकी बलवान राहिली नाही. राज्य कारभारासाठी वेगवेगळ्या प्रदेशात राजाने आपले अधिकारी- सरदार- सरंजामदार नेमले होतेे. त्या त्या प्रदेशातले ते अधिकारी बनले.  हळूहळू हेच राजाचे सरदार बलवान होऊ लागले. एका अर्थाने आपापल्या विभागात ते सत्ताधिश बनू लागले. आणि राजाचे साम्राज्यावरचे  नियंत्रण सुटू लागले. राजा नाममात्र होऊ लागला.

जगभर बहुतांशी ठिकाणी साधारण अशीच परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू मोठ्या साम्राज्याची छोटी छोटी राज्ये तयार झाली. यालाच सरंजामशाही ही म्हटले जाते.  इंग्रजीत यालाच फ्युडॅलिझम म्हटले जाते. आणि सरंजामदारांना फ्युडल लॉर्ड्स.

य़ा युगाला अंध:काराचे, ब्लॅक एज असेही म्हटले गेले. त्याची कारणे बघताना आपोआपच या काळाची ओळख आपल्याला होऊन जाऊन जाईल.

राजकीय परिस्थिती तर आपण पाहिली. एका बलवान राजाकडून छोट्या छोट्या अनेक सरदार, सरंजामदारांकडे सत्ता गेली. कधी कधी तर सत्ता नेमकी कोणाची याचा पत्ताही लागेनासा झाला. आपला राजा कोण या बाबत प्रजा आंधळी झाली म्हणून हे अंध: काराचे युग.

तशात सत्ता मिळवण्यासाठी सतत संघर्ष झाले. अगदी वडिल- मुलगा, दोन सख्खी भावंडं, भावजय- दिर, काका-पुतण्या अशा विविध नात्यांमधे अगदी जिवावर उठण्या इतका संघर्ष सतेसाठी झाला या काळात.
आणि हे अत्यंत स्वाभाविक म्हणून मानले गेले. राजाच्या मुलाने राजा विरुद्ध केलेले बंड हा जणुकाही पायंडा पडून गेला.

त्याच बरोबर सतत बाजू बदलणे, आज एका राजाचा सेनापती तर पुढील काळात दुसऱ्याचीच नोकरी स्विकारणे हेही घडत होते. आज एकाची मनसब उद्या दुसऱ्याची. हे सहज होत होते.

सामान्य जनताही कधी एका राजाच्या वर्चस्वाखाली तर पुढे दुसऱ्याच राजाचे नागरिक होऊ लागली. एकाच व्यक्तीला दोन दोन विरुद्ध राजांना कर द्यावा लागत असे.  एव्हढेच नाही तर वर्षातला आठ महिने व्यक्ती शेतकरी असे तर उरलेले चार महिने तीच व्यक्ती सैनिक असे.

एकुणातच निष्ठा हा प्रकार बदलता राहिला. कशाचीच शाश्वती राहिली नव्हती.

सामाजिक बाबतीत या काळात अनेक बंधने, नियम आले. त्या त्या प्रदेशापुरतीच गरज भागवणे, इतर प्रदेशांशी संबंध न ठेवणे होऊ लागले. आपला वावराचा परिघ लहान झाला की आपली दृष्टी, दृष्टिकोनही संकुचित होत जातो, तसंच या काळात झालं. धार्मिक बंधने वाढली. रुढी परंपरा यांची जाचक बंधने आली. विचारांची कवाडं मिटली गेली.  एका अर्थाने समाजाने स्वत:ला बंदिस्त अंधारात कोंडून ठेवले. म्हणून हे अंध:काराचे युग.

आर्थिक बाबतीतही संकुचितता आली. आधी राजेशाहीत मोठा पैसा राजाच्या हाती केंद्रित होता. स्वाभाविकच राजदरबार श्रीमंत होता. व्यापारासाठी लागणारा, गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा उपलब्ध होता. शिवाय जहाजबांधणी, भांडवल यासाठीही हे उपयुक्त होते. पण आता राजेशाहीची जागा सरंजामशाहीने घेतली. स्वाभाविकच आर्थिक सत्ताही विभागली गेली. अनेक छोटे छोटे सरदार, सरंजामदार झाले आणि एकसंध मोठी आर्थिक सत्ताही विकेंद्रित झाली. व्यापार, जहाजबांधणी, भांडवल यासाठी मोठा, खेळता पैसा राहिला नाही. यामुळे समाजाचा आर्थिक विकास थांबला म्हणून हे अंध:काराचे युग.

लष्करी आघाडीवर ही याचा परिणाम झाला. पूर्वी एक मोठे सैन्य राजाच्या नेतृत्वाखाली होते. आता त्याचीही विभागणी झाली. सरदार सरंजामदार आपल्या प्रदेशापुरते सैन्य ठेऊ लागले. शिवाय या सरदार- सरंजामगारांचे आपापसात वाद, भांडणं, युद्ध होऊ लागली. छोट्या छोट्या पण सततच्या कुरबुरी चालूच राहिल्या.

याच सुमारास इतर धर्मीयांची आक्रमणे, संपर्क, प्रभावही होऊ लागला. यातून आपला धर्म टिकवण्यासाठी धर्माची बंधने, नियम अजून कठोर केली गेली.

एकुणातच प्रजेला कोणाचाच भरवसा राहिला नाही. आपला तारणकर्ता कोण याबाबत एक संदिग्धता समाजात निर्माण झाली. सततची युद्धे, खालावलेले जीवनमान, आर्थिक उतरती कळा, धार्मिक छळ आणि धर्मांधता, पडलेल्या दुष्काळांतून वर येण्यासाठी राजाची मदत नाही,.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे या युगातला अंध:काराचे युग मानले जाते.

भारतात मध्ययुग कधी सुरु झाले याबद्दल मतभिन्नता आहे. काहींच्यामते  गुप्त साम्राज्यानंतरचा काळ म्हणजे साधारण इ.स. 650 पासून मध्ययुगाचा काळ धरला जातो. तर काहींच्यामते  इ.स. 1000 मधल्या तुर्कांच्या आक्रमणापासून मध्ययुग; तर काहींच्या मते   इ.स.1206 पासून सुरु झालेल्या गुलाम वंशाच्या दिल्ली सल्तनत पासून.
पण ते असो.

आता आपल्याला लक्षात घ्यायचय ते इतकच की मोठी मोठी साम्राज्य मोडून पडली आणि त्याची छोटी छोटी छकलं तयार झाली. अन या छोट्या प्रदेशापुरते स्थानिक राज्यकर्ते आले. समाजात रुढीपरंपरांचा पगडा वाढला. सततची छोटी युद्ध सुरु झाली. विज्ञाना पेक्षा मान्यतांना स्विकारले जाऊ लागले. समाज अधिकाधिक शेतीवर अवलंबून राहू लागला. व्यापार, इतर जगाशी संपर्क कमी होऊ लागला. आपापसातला संशय, अविश्वास वाढू लागला. सामान्य जनतेला वाली उरला नाही.....
हे सगळे घडले तो काळ म्हणजे मध्ययुग, अंध:काराचे युग!