Tuesday, August 18, 2020

2. दृष्टिकोन आणि भूमिका

 दृष्टिकोन:

तर एक जपानी चित्रपट आहे. रोशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा.  हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक अकुरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.
एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कशी दिसू शकते याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हा चित्रपट. वाटल्यास इथेच थांबा, आणि तो चित्रपट बघून या, जेमतेम दिड तासाचा हा चित्रपट. पण आपली विचारप्रक्रिया उलटपुलट करून टाकणारा! 
आता अशी एखादी घटना आठवा, की जी तुम्ही प्रत्यक्ष बघितली/ अनुभवली होतीत आणि तीच घटना नंतर कोणीतरी तुम्हाला सांगितली/ वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलत. आठवली?
माझी एक आठवण सांगते. 1974 चा काळ. माझी मोठी बहिण भोसला मिलिट्री स्कुलच्या कोर्सला गेलेली. खास मुलींना सैनिकी शिक्षणाचा अनुभव मिळावा म्हणून दिड महिन्याचे अतिशय व्हिगरस ट्रेनिंग यात दिले गेले. अगदी शारीरिक मेहनत, तलवारबाजी, रायफल शुटिंग, स्विमिंग, घोडसवारी, लढाईसाठीची स्ट्रॅटेजिक माहिती, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होता. अतिशय सुरेख अनुभव होता तो. तर त्याच्या निरोप समारंभात तेव्हाचे .... मंत्री आलेले. त्यांच्या हस्ते बक्षिस समारंभ झाला अन नंतर त्यांनी अध्यक्षीय भाषण केलं.
आम्ही सगळ्यांनी ते भाषण प्रत्यक्ष एेकलेलं.
या भाषणात मुलींना हे सैनिकी शिक्षण कशाला द्यायला हवं, त्यांना याचा काय उपयोग? नवऱ्याशी युद्ध करणार का, अशा धर्तीची अतिशय विचित्र विधानं महोदयांनी केलेली. सगळे पालक भयंकर चिडलेले. कारण एका अर्थाने या सजग पालकांचे वागणे कसे चुकीचे होते असच ते बोलत होते.
दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमान पत्रांमधे सदर मंत्री कसे दूरदृष्टी असणारे आहेत, सैन्यातही महिला दल असलं पाहिजे, .... असे मांडले होते. आम्ही त्या बातम्या वाचून खरोखर चकित झालो. नराचा नारायण कसा केला जातो याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला.
आता तुम्ही म्हणील. ओके ठिके. मुद्दा कळला की एकाच घटनेला अनेक बाजू असतात, किंवा एकच घटना कशीही मांडली जाऊ शकते. याचा इतिहासाशी काय संबंध???
यस, इथेच तर खरा इतिहासाशी संबंध येतो. काल काय घडले किंवा 100 वर्षांपूर्वी काय घडले किंवा 1000 वर्षांपूर्वी काय घडले हे इतिहासात आपण अभ्यासतो. पण अभ्यासतो म्हणजे काय? तर एखाद्या इतिहास काराने त्या घटनेवर काय लिहिलय ते आपण अभ्यासतो. नाही पटत?
दोन उदाहरणं घेते. ब्रिटिश काळात 1857 च्या घटनेला सैनिकी असंतोष म्हटलं गेलं, स्वातंत्र्य लढ्यात याच घटनेला स्वातंत्र लढा म्हटलं गेलं तर आज या कडे उठाव म्हणून पाहिलं जातं. हे नुसते शब्दाला प्रतिशब्द नाहीत तर त्यामागे त्या त्या काळातील विचारप्रवाह स्पष्ट होतात.
दुसरी घटना. मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना 2010 पर्यंत दादोबा कोंडदेवांना शिवाजीच्या कारकिर्दित दिले गेलेले महत्व आणि 2010 पासून बदललेली परिस्थिती.
या दोन्ही घटना मी फक्त उदाहरणांसाठी घेतल्यात. याच चांगले/ वाईट, योग्य / अयोग्य, अशी कोणतीच भूमिका मी घेत नाहीये. इतिहासकाराने ती कधीच घ्यायचीपण नसते. मला सांगायचय ते इतकच की एकच घटना, पण तिचे अर्थ कसे वेगवेगळे लावले जाऊ शकतात. काळ, परिस्थिती, लोकांची मतं, लोकांचे विचार, नवीन पुढे आलेले पुरावे, इतर गोष्टी,.... अनेक कारणांमधून एकच एक घटना वेगळी वाटू शकते, दिसू शकते, अगदी असूही शकते.
रोशोमानची पुन्हा आठवण करून देते.
तर हे असं आहे.

भूमिका:
नुसते पुरावे म्हणजे इतिहास नाही. त्या पुराव्यांचा अर्थ लावणे काळ, परिस्थिती, इतर पुरावे, अर्थ लावणारी व्यक्ती अशा सगळ्यांचा प्रभाव या अर्थ लावण्यावर पडणार. मग खरा इतिहास? प्रत्यक्षात काय घडलं हे कसं कळणार? खरं तर प्रत्येक इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा त्याच्या नजरेतून पाहिलेला इतिहासच असतो.
सो इथे मी जे लिहिणार आहे ते सगळं माझ्या नजरेतून बघितलेला, मला जाणवलेला, मला समजलेला इतिहास असेल. हे एकदा स्पष्ट असले की वादंगांना इथे स्थान असणार नाही. ज्यांना हे लिखाण पटले नाही, त्यांनी हे सगळे सरळ ओलांडून पुढे जावे, आणि स्वत: त्यांना पटलेला, वाटलेला, समजलेला इतिहास लिहावा, वाचावा.
परत सांगते, याचा असाही अर्थ नाही, की मी जे लिहेन त्याला पुरावे नाहीत  माझे सगळे लिखाण अगदी " बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल " या उक्ती प्रमाणेच असेल . फक्त त्या पुराव्यांचा लावलेला अर्थ माझा असेल. उगाच पुराणातली सांगोवांगी गोष्टी मी लिहिणार नाही. पण त्याच बरोबर उगाच माझा मुद्दा पटवायला वादही घालणार नाहीये.
सो इतिहास! असे असे घडले ! हे माझ्या दृष्टीने, माझ्याकडे असलेल्या पुराव्यांवरून लिहिण्याचा हा प्रयत्न!
कधी एखादीच घटना लिहेन, कधी एकादा मागोवा घेईन, कधी पूर्णच आढावा घेईन, कधी एखाद्या व्यक्ती बद्दल लिहेन, कधी एखाद्या तत्वप्रणालीबद्दल.. हे मी जसं मनात येईल तसं लिहेन. जसजसे लिखाण होत जाईल तसतसे त्यांची रचना करत जाईन. खरे तर हे सगळं आधी लिहून, मग नीट संकलित करून इथे टाकायला हवं. पण त्याला मी खूप वेळ लावेन. आणि एखाद वेळेस माझ्याकडून कंटाळा केला जाईल. आताच इथे नोंदवले की हे सगळं लिहायचा तगादा माझा मलाच राहील. आणि मी उशीर केला तर तुम्हीही मला ढोसत रहाल biggrin
कधी एखादी माहिती तुम्हाला हवी वाटली तर कळवा, मी अभ्यास करून लिहायचा प्रयत्न करेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मीही इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे काही गोष्टी मला माहित नसण्याचीही शक्यता आहे. पण मी त्या माहिती करून घेईन आणि मांडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तिथे योग्य त्या पुस्तकांचा उल्लेख करेन, माहिती देईन.
या संपूर्ण लिखाणाची भाषा शक्य तेव्हढी साधी सोपी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. इतिहास म्हणजे क्लिष्ट, कंटाळवाणा हा समज बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच मुळे हे काही संशोधनपर( रिसर्च लेव्हलचे) लिखाण असणार नाही. तसे लिखाण लिहिण्याचे हे व्यासपीठही नाही याची जाणीव मला आहे.
माझ्यातल्या गंजलेल्या इतिहास अभ्यासकाला जरा बाहेर ओढून काढण्याची ही धडपड आहे. 

7. स्थिर समाज आणि टोळ्यांचे राज्य

शेतीचा शोध लागला आणि मानवाचे जीवन पालटूनच गेले. जिथे सपाट जमीन आहे, मऊ माती आहे आणि आसपास पाणी आहे आशा ठिकाणी शेती करता येते हे एव्हाना मानवाला कळले होते. त्याच मुळे आता डोंगरावरच्या  गुहेत न राहाता तो डोंगराखालच्या माळरानावर आला. जमीन सपाट करणे, ती उकरून मोकळी करणे, त्यात बिया टाकणे, पाऊस आला तर ठीकच नाहीतर नदीतून पाणी आणून घालणे, रोपांची काळजी घेणे, तयार कणसं तोडून ती नीट जपून ठेवणं यात मानवाचे वर्ष सरू लागले.

गुहेत असताना त्याला एक नैसर्गिक संरक्षण होते. गुहेची जागा पावसा उनापासून मानवाला वाचवत होती. इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करायलाही ही गुहा उपयोगी पडत होती. गुहेच्या तोंडावर दगड सरकवला की  आतले सगळे सुरक्षित रहात. आता माळरानावर आल्यावर मात्र सुरक्षितता हा एक मोठाच प्रश्न उभा राहिला. ऊन पाऊस आणि हिंस्त्र प्राणी या तीनही गोष्टींपासून वाचायच होतं. 

यावरही मानवाने आपल्या बुद्धीचातुर्‍याने मात केली. जमिनीत खळगा करून जमिनीच्या खाली गुहा केली. त्यावरून गवत पसरलं. पण पावसात आजूबाजूचे पाणी आत वाहून येऊ लागलं. तशी मग त्याने खळग्याच्या भोवती दगड रचले, फटींमध्ये ओली माती भरली. वरून गवत टाकले. आता जमिनी खालची गुहा सुरक्षित झाली. हळूहळू त्याच्या लक्षात आले की अरेच्या खळगा कराची गरज नाही आपण दगड एकावर एक ठेवत उंच भिंत केली अन मातीने ती घट्ट केली अन वरून गवत टाकले की छान जमिनीवरची गुहा तयार होते. आशा रीतीने घराची निर्मिती झाली . काळानुरूप, त्या त्या जागेत उपलब्ध असणा-या वस्तूंनुरूप घरांची बांधणी बदलत गेली. आधी दगडांची मग त्या सह मातीची. पुढे  नुसती मातीची. कधी मातीसोबत गवत वापरले जाई. कधी जावळया. कधी झाडांच्या फांद्या, खोड... 

जमिनीवरच्या वास्तव्यात अजून एक मोठी भीती होती ती हिंस्त्र प्राण्यांची.  मानवाला अग्नी कसा वापरायचा आणि तो कसा तयार करायचा याची माहिती एव्हाना माहिती झाली होती. इतकेच नव्हे तर प्राणी या अग्नीला घाबरतात हेही माहिती झाले होते. याचाच उपयोग करून रात्री वसतीमध्ये अग्नी प्रजवलीत ठेवायची प्रथा सुरू झाली. शिवाय अग्नी सत्ता जागता ठेवला की तो पटकन हाताशी असणार होता. त्यामुळे अग्नी निर्माण करण्याचा खटाटोपही वाचणार होता. यातूनच वस्ती मध्ये एक तरी अग्नी सत्ता प्रज्वलित ठेवला जाऊ लागला. 

या बरोबरीने प्राण्यांना अटकाव व्हावा यासाठी वस्तीच्या सभोवताली काटेरी झाडांचे कुंपणही मानव घालू लागला. 

आशा रीतीने मानवाने शेती हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानून घेतला. शेती भोवतीच मानवी समाज विकसित होत गेली. 

अनेक ठिकाणी  हे घडत होते. जसा जशी स्थिरता येत गेली तसतशी मानवी वसाहत मोठी होत गेली. मग आपआपल्या वस्तीची कुंपणं वाढवली गेली. मानवांचा मोठा समूह तयार होत गेली. त्यांच्यातल्या शहाण्या सुरत्या / वयाने अनुभवी व्यक्ती यांच्या मताने त्या त्या समूहात कामकाज चाले. एक सुनियंत्रित अशी समाज रचना असणारी एक टोळी तयार होत असे. 

कधी कधी एखाद्या ठिकाणचे पाणी संपले किंवा तिथे प्राण्यांचा जास्त उपद्रव सुरू झाला तर ती टोळी  उठून वेगळी जागा शोधत असे. अशात एखाद्या ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या टोळ्या  येत. त्यांतल्या कोणी आपली वसाहत बांधायाची यावरून वाद होऊ लागले. कधी ते सामंजस्याने सोडवले गेले तर कधी कधी त्यांच्यात सरळ मारामारी होत असे. अन जी टोळी या मारामारीत  बलवान ठरे ती टोळी त्या ठिकाणावर आपला हक्क सांगत असे. यातून मग शस्त्र, लढण्याचे कौशल्य, लढाऊ योद्धे आणि सैन्य अशा संकल्पना पुढे आल्या. 

जसजसा टोळीतील लोकसंख्या वाढू लागली तसतशी कोणताही निर्णय घेणं अवघड होऊ लागलं. मग काही टोळ्यांमध्ये शहाण्यासुरत्या लोकांचे एक मंडळ तयार झालं, तर काही टोळ्यांमध्ये वयस्कर व्यक्तीच्या हाती सगळे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवले गेले, तर काही टोळ्यांमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगात जास्त ताकद होती त्याच्या हाती सगळे अधिकार आले. यातूनच हळूहळू राजकीय सत्ता ही संकल्पना तयार झाली. यातूनच राजा तयार झाला; राजेशाही सुरु झाली. 
अन मग या अशा वसाहती मोठ्या मोठ्या होत गेल्या. त्यांचे सैन्य उभे राहू लागले. स्वाभाविकच सुरक्षितता आली. अन मग ह्या वसाहती वाढत गेल्या, एका ठिकाणी स्थिरावत गेल्या. अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहात असताना त्यांची म्हणून जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धती तयार झाली; म्हणजेच संस्कृती तयार झाली. 

जगात विविध ठिकाणी, प्रामुख्याने नाद्यांच्या काठावर, दोआबात, खोऱ्यात अशा अनेक संस्कृती आपल्याला दिसतात. याच त्या प्राचीन संस्कृती ! मेसोपोटेमियातील विविध संस्कृती,  इजिप्तची संस्कृती, सिंधु संस्कृती, चिनी संस्कृती,  माया संस्कृती, इंका संस्कृती, ॲझटेक संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या काही महत्वाच्या प्राचीन संस्कृती होत. 





Monday, August 17, 2020

10. असं होतं एक आटपाट जग

(आज अनेक ठिकाणच्या उत्खननांना समर्पक अशी उत्तरं सापडतातच असं नाही। म्हणून मग लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन ही कथा रचली आहे। खरं खोटं काळच ठरवेल। खऱ्या अर्थाने हा इतिहास ठरेल का हेही मला नाही माहिती। पण मनात आलं ती गोष्ट लिहिली.) 

एक आटपाट जग होतं. हो हो जग होतं. नगर नाही तर चक्क जग होतं. खुप मोठ्ठं होतं. त्याला इतिहासही मोठा होता. दहा हजार वर्षांचा. चकीत झालात ना ?
तर आज मी ही अशी वेगळीच गोष्ट सांगणार आहे, ऐकणार ना?

तर एक होतं आटपाट जग ! खुप मोठमोठी शहरं, खुप मोठमोठ्या इमारती, कितीतरी यंत्र, वाहनं, कितीतरी प्रगती केली होती त्या जगाने. त्यांच्या इमारती तर फार वेगळ्या, अतिशय भक्कम होत्या. कारण माहितीय का? त्या होत्या चक्क दगडांच्या, खरं तर खडकांच्या !

तुम्ही म्हणाल; हात्तीच्या ही तर आज गुहेत राहणा-या माणसाची गोष्ट सांगतेय.

नाही नाही, खरच; खुप प्रगती केलेल्या जगाचीच गोष्ट सांगतेय. पण त्यांच्या इमारती होत्या खडकांच्या. हे कसं शक्य आहे ना? तर ऐका हं ।

त्या जगात अनेक वर्षांपूर्वी एका शात्रज्ञाने एक फार वेगळा शोध लावला. निसर्गातील विविध गोष्टींचा अभ्यास करताना त्याच्या मनात आलं की आपण दगडाचा अभ्यास का बरं करत नाही? वेगवेगळे धातू आपण शोधले, त्याचा वापर आपण करतो तर दगडाचा का नाही? आणि मग त्याने प्रयोगशाळेत खुप प्रयत्न केले आणि निसर्गात असतो तसाच दगड प्रयोगशाळेत त्याने तयार केला. त्या दगडाचा रंग जरा वेगळा, जरा लालसर होता. पण अतिशय मजबूत दगड त्याने निर्माण केला. महत्वाच हे की हा दगड विशिष्ट पद्धतीने वितळवता येत असे आणि त्याला विशिष्ठ पद्धतीने गार केला की तो हव्या त्या आकारात तयार होत असे.

या शोधामुळे झालं असं की जसं लोखंड वितळवून ते हव्या त्या साच्यात ओतून गार करून हवा तो आकार करता येतो; तशाच दगडाच्याही हव्या त्या वस्तू बनवता येऊ लागल्या. अन मग त्या काळात अनेक उत्तम उत्तम दगडी इमारती तयार झाल्या. अतिशय सुबक, सुंदर आणि अतिशय भक्कम ! शिवाय स्वतःचा लालसर छान रंगाच्या बरं का!

आता दगड कोरून शिल्प करण्याची गरजच नाही उरली. दगड वितळवायचा, हव्या त्या साच्यात ओतायचा. गार झाला की अप्रतिम सुंदर शिल्प तयार.

अशीच अनेक बाबतीत या जगाने प्रगती केली होती. त्या त्या प्रगतीची माहितीही त्याने लिहून ठेवली होती. असं सगळं छान चालू होतं. कधी कधी तिथल्या लोकांच्यामधे काही वाद होत असत. पण ते सोडवलेही जात. म्हणतात ना रामराज्य तसं अगदी आलबेल चाललेलं त्या जगात !

पण प्रत्येक गोष्टीत जसं काही संकट येतं तसच याही जगात झालं. नक्की कशामुळे कळलं नाही पण अचानक हवामान तापू लागलं. नदी नाले आटू लागले. जी जमीन अतिशय सुपीक होती ती कोरडी होऊ लागली. हळुहळू सगळीकडे वाळवंट तयार होऊ लागले. सगळे हवालदिल झाले. निसर्गाचा हा कोप का याचा शोध घेऊ लागले. पण काहीच कारण कळेना. तशात शास्त्रज्ञांनी शोध लावला की उत्तर आणि दक्षिण धृवांवरचे बर्फाचे डोंगर उष्णतेने वितळू लागले आहेत. आणि त्यामुळे समुद्राची पातळी उंचावते आहे.

जगामध्ये एकच भीतीची लाट उसळली. खुप जुन्या काळात त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधे कधी काळी लिहून ठेवले होते की फार फार पूर्वी जगबुडी झाली होती. समुद्र उंचावला होता आणि सगळी शहरं, सगळ्या वसाहती त्यात बुडून गेल्या होत्या. पण आजवर ही एक गोष्ट म्हणुन तीही सांगोवांगी गोष्ट म्हणुन मजेत उडवून लावलेली सगळ्यांनी. पण आता हे भावी वास्तव म्हणुन समोर उभं राहिलं होतं. सगळी मानवी जमात धोक्यात आली होती. आजवर केलेली सगळी प्रगती पाण्यात वाहून जाणार होती.

पण आता हाती फार काळ नव्ह्ता. शक्य तितक्या उंच डोंगरावर जाण्याचा विचार सगळे करू लगले. त्यातून अनेक संघर्ष घडू लागले. सगळ्यांनाच उंच डोंगरावर जायच होतं. पण हे शक्य नव्हतं. शेवटी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ठरवलं की यावर काही उपाय केला पाहिजे, काही निर्णय घेतला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे लिहून, काही अती महत्वाच्या गोष्टी घेऊन, काही लोकं जगातील सर्वात उंच पर्वतावर जातील. बाकी सर्वांनी आपल्या जवळच्या उंच डोंगरावर आसरा घ्यायचा.

शेवटी काहीच लोकं जिवंत रहाणार हे आता सर्वांना पटले होते. किमान तितपत शहाणपण, सामंजस्या त्या जगात अस्तित्वात होते. आणि मग म्हणूनच सर्व प्रगतीचे तपशील, महत्वाची यंत्र, काही हुषार माणसं आणि काही शहाणी माणसं, काही बलवान माणसं या ऊंच पर्वतावर जायला निघाले. यांमध्ये स्त्रिया, पुरुष, काही तरुण मुलंमुली यांचा समावेश होता.

बर्फ आता फारच भराभर वितळत होता. आधी समुद्रकिनार्‍यावरच्या शहरांचा त्याने घास घेतला. हळू हळू करत सर्वच सपाट प्रदेशात समुद्राच पाणी पसरलं. अन मग एक दिवस आकाश झाकाळून गेलं. वातावरणात एक भयाण शांतता आली. श्वासही घेता येणार नाही इतकी हवा विरळ झाली. अन जेमतेम काही तासातच पाण्याची एक प्रचंड राक्षसी लाट जमिनीवर धाऊन आली. सपाट जमीन, उंचवटे, छोटे छोटे डोंगर, मोठे डोंगर, अगदी उंच पर्वतही या लाटेने गिळंकृत केले. जगातला सर्वात मोठा पर्वत; जिथे महान लोक आश्रय घेऊन होते तिथेही या लाटेने तडाखा दिला.

जगाचा महाप्रलय ! संपूर्ण जग या प्रलयात पाण्याखाली बुडालं. आणि मग आली ठंडीची एक महाभयंकर मोठी लाट! अन मग अनेक वर्ष जगभर बर्फाचे राज्य सुरुच राहिले.

काय झालं त्या जगाचं? तिथल्या माणसांचं? तिथल्या प्रगतीच??????

अनेक प्रश्न प्रश्न प्रश्न !!!

उत्तरं कशाचीच नाहीत. मी म्हटलं ना सुरुवातीला; वेगळीच गोष्ट सांगणार आहे म्हणून !
कधी कधी या हरवलेल्या जगाचे काही पुरावे सापडतात कुठे कुठे. कधी एखाद्या उंच पर्वतावर एखाद्या प्रार्थना स्थळात काही अगम्य लिपीतली भुर्जपत्रे सापडतात. कधी एखाद्या उंच वाळवंटी पर्वतावरच्या गुहेतली पत्र, वस्तु. कधी एखाद्या पर्वतावरची अनाकलनीय बांधकामं. प्रचंड मोठी दगडी बांधकामं. जमिनी खालच्या नऊ स्तरावरच्या गुहा. एकाच खडाकात उलटे कोरलेले प्रार्थनास्थळ. तर कधी खोल समुद्रात मोठमोठ्या दगडी इमारती ....

कितीतरी मोठी यादी आहे, न संपणारी. पण त्याचा अर्थ लावणं हे मात्र हातात नाही, काही पुरावे नाही, काही क्लुज नाहीत! काही नाही...

ना कोणी राजपुत्र आला संकटावर मात करायला. ना उत्तरं सांगायला कोणी ऋषी आले. ना जादुची कांडी फिरली. ना झोपलेल्या राजकन्येला कोणी उठवायला आलं.

काहीच घडलं नाही या आटपाटच्या जगात. पण म्हटलं नं, वेगळीच गोष्ट सांगणार आहे आज...

तर असं होतं एक आटपाट जग!

---

नुकतीच एक चर्चा ऐकली. जिऑलॉजिसिटची मुलाखत आहे. जरूर पहा, ऐका https://youtu.be/zSjnvlDWwrE

Thursday, August 13, 2020

6. अश्मयुग : सामान्य माहिती

अश्मयुग ! अश्म म्हणजे दगड ! म्हणजे दगडांचे युग ? नक्की काय असावं  अश्मयुग म्हणजे ? अगदी  प्रथम ( स्टोन एज ) हा शब्द वापरला गेला तो दॅनिश स्कॉलर ख्रिस्टिन जे. थॉम्सन यांनी, एकोणिसाव्या शतकात.  त्यांनी अगदी सुरुवातीच्या मानवी इतिहासाचे तीन प्रमुख टप्पे मांडले. अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग ( स्टोन एज, ब्रान्झ एज आणि आयर्न एज ) प्रामुख्याने विशिष्ठ काळात मानवाची हत्यारे ज्या वस्तूंपासून तयार झालेली सापडली; त्यांचे नाव त्या काळाल त्यांनी दिले.  ज्या काळात प्रामुख्याने दगडाचा वापर करून हत्यारे बनवली गेली त्या काळाला त्यांनी अश्मयुग हे नाव दिले.

दगडी हत्यारे कोठे कधी वापरली गेली हे ठरणार असल्याने त्यानुसार प्रत्येक प्रदेशात हा काळ बदलतो. पण सर्वसाधारणपणे पणे सुमारे अडिच मिलियन वर्षापूर्वीपासून आफ्रिकेमध्ये अश्मयुगीन मानव रहात होता. तर काही प्रदेशात इ. स. पूर्व  ३०००  वर्षामध्येही अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सापडते. प्रामुख्याने दगडी हत्यारे  वापरणारा मानव म्हनजे अश्मयुगीन मानव !

त्यातूनही अश्मयुग म्हणजे फक्त दगडी हत्यारे असे नव्हे तर नैसर्गिक साधनांचा हत्यारासाठी उपयोग करणारा मानव यात अपेक्षित आहे. दगड, लाकूड, प्राण्यांची हाडं - दात यांपासून हत्यारे तयार करणारा मानव म्हणजे अश्मयुगीन मानव !

अश्मयुगाचा काळ खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचे काही  टप्पेही मानले जातात.  पॅलिओलिथिक एज किंवा जुने अश्मयुग, मेसोलिथिक किंवा मध्य अश्मयुग आणि निओलिथिक म्हणजे नव अश्मयुग ! या काळात अतिशय कमी लोकसंख्या, तीही अतिशय विखुरलेली अशी होती. या काळातील मानव हा प्रामुख्याने हंटर अँड गॅदरर म्हण्जे शिकारी आणि निसर्गातील फळ फळावल, धान्य  जमवून आपली उपजिवीका जगत होता.

शिकार केलेल्या प्राण्याचा अन्न आणि हत्यारं, वस्त्र यासाठी वापर केला जाई. मांस खाण्यासाठी, कातडी वस्त्र म्हणून तर हाडं-दात यांचा वापर हत्यारांमध्ये केला जाई.
जंगलातील जंगली बेरी- छोटी फळं, जंगलात उगवणारे जंगली पण खाण्या योग्य धान्य आणि फळं हेही त्याच्या आहारात होते.
प्राणी आणि ही जंगलसंपत्ती स्वाभाविकच एका ठिकाणची खाऊन संपत असे, त्यामुळे हा मानव सतत स्थलांतर करत राही. शिवाय या काळात वातावरणातही सतत बदल होत असल्याने हा मानव एका ठिकाणी वस्ती करून फार काळ रहात नसे.

जुने अश्मयुग साधारण अडिच मिलियन वर्षांपासून पहिल्या हिमयुगापर्यंत म्हणजे इ. स. पू ९६०० पर्यंतचे मानले जाते. हत्यारांबरोबरच दागिने, गुहेतील भित्ती चित्र यांतून या काळातील मानवाची थोडी माहिती मिळते.
मध्य अश्मयुग हे इ.स. पू. ९६००  पासून मानवाने शेती करायला सुरुवात करे पर्यंतचा काळ म्हणजे साधारण इ. स. पू  ७००० ते इ.स.पू. ४००० हा मानला जातो. याकाळात पृथ्वीवरचे वातावरण प्रचंड थंड ऐवजी हळूहळु गरम होत गेले. उत्तर धृवावरचा बर्फ वितळू लागला. स्वाभाविकच समुद्राची पातळी वर आली. त्यातून भूभागातही बरेच बदल झाले. साधारण इ. स. पू. ५००० पर्यंत आज जसा भूभाग आहे, खंड आहेत तशी विभागणी तयार झाली.
नव अश्मयुग हे मानवाने शेती करणे सुरू केले तेव्हापासून  ते तांब्याचा वापर सुरू केला इथपर्यंत मानले जाते.