Thursday, April 6, 2017

4. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
(डिसक्लेमर : कथा सांगताना थोडी लेखकाची स्वयत्तता वापरली आहे; जाता जाता मुलामुलींना पाळीबद्दल सोपी माहिती देता येईल या कारणास्तव)

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.



अगदी थोडं खाली उतरलं की लगेच मोठं रान होतं. मोठं गवत तिथे असे. आधी हिरवं गार अन आता पिवळं धमक.
आज ते कापायला जायचं असं आई म्हणत होती. आता त्यातून धान्याचे दाणे मिळणार होते.  खूप लहान पणापासून आई बरोबर इथे येत होते, त्यामुळे आज मला काही वेगळं वाटलं नाही. या रानात लाल बेरीची काही झाडंही होती. आम्ही मुली त्या बेरी गोळा करत असू. आजही आईला सांगून आम्ही मुली बेरीच्या झाडाजवळ आलो.
 


एकमेकींना मदत करत आम्ही झाडावर चढलो. मस्त लालचुटूक्क बेरी लगडल्या होत्या. मग आम्ही थोड्या तोंडात टाकत, थोड्या खांद्यावरच्या झोळीत टाकत होतो. झाडावरून खाली बघितलं तर, सगळ्या आया खाली गवत कापत होत्या. कसा सरसर हात चालवत होत्या. त्याच्या हातातले दगडी विणे सपासप गवतावर चालत होते.


मध्येच मला हुक्की आली, आपणही कापुयात का गवत? मग मी झाडावरून खाली आले. आई जवळ गेले आणि म्हटलं, " आई मला पण शिकव ना, गवत कापायला. " आई हसली, म्हणाली " अगं थोडी मोठी हो, मग शिकवेन हं " मी नाराज झाले. तिला म्हटलं, " बघ मोठी झालेय की, तुझ्या खांद्या पर्यंत आलेय की " आई हसली, " तशी नाही वेडाबाई, कळेल तुला काही दिवसातच. जा आता सगळ्यांना गोळा कर. गुहेत परतायचय. "

मला काही कळलं नाही, मी अगदीच हिरमुसले आणि परत बेरीच्या झाडापाशी आले. " चला ग सगळ्या परत जायचय. " मी जारा घुश्यातच म्हटलं. मग आमची सगळी वरात परत आली. परत आलो तर दारातच मोठी आई हातात छोटसं गाठोडं घेऊन उभी होती. आई लगबगीने पुढे झाली. " अगबाई आला का नवीन पाहुणा? की पाहुणी? " आजी हसत म्हणाली " पाहुणी आहे हो, छोटीशी "

अरे हां, आई थोड्या दिवसांपूर्वी म्हणालेली, छोट्या आईला बाळ होणारे ! मग काय सगळे ओरडायला लागले, " नवीन बाळ, नवीन बाळ " मग मोठी आई रागावली, " हळु की जरा, बाळ घाबरेल." मग सगळ्यांनी हळूच बाळाला लांबूनच पाहिलं. छोटी आई आत झोपली होती. खूप दमलेली दिसली ती. "आई, छोटी आई तर आली नव्ह्ती आपल्या बरोबर गवत काढायला. मग ती इतकी का दमली ? " मी विचारलं. तशी हसून आई म्हणाली, " कळेल, मोठी झालीस न की कळेल आपोआप ! "
मी पुन्हा विचार करू लागले, कधी मोठी होणार मी? मग बाबा मंडळीही आली. सगळ्यांनी बाळाला बघितलं. सगळेच आनंदात होते.



तेव्हढ्यात बाळ रडायला लागले. इतकुसा आवाज त्याचा. मग मोठ्या आईने त्याला छोट्या आईकडे सोपवले. अन त्या दोघी आत गेल्या.

रात्री सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं यावर खल केला. मी म्हटलं , " बाळ, पिटुकल्या लाल लाल बेरी सारखं आहे, त्याला बेरीच म्ह्णूयात? " सगळेच हसायला लागले. मग छोटी आई म्हणाली, "  पिटुकली लाल म्हणुन लीला म्हणुयात तिला. " आणि मग सगळ्यांनाच ते नाव आवडलं.

रात्री मला सारखी गवत कापायची आणि छोट्या बाळांची स्वप्न पडत होती. एकदा तर गवत कापतना हातातला विळा चुकून पोटाला लागला असा भासही झाला. पोटात एकदम खूप दुखलं ही... अगदी दचकून जाग आली. शेजारी आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपले, तेव्हा जरा बरं वाटलं.



सकाळी आईने उठवलं. तर पुन्हा पोटात खूप दुखलं. माझा कळवळलेला चेहरा पाहून आईने काळजीने विचारले, " काय ग, काय झालं ? काही दुखतय का? "
 " आई पोटात खूप दुखतय.." मी रडतच  म्हटलं. "बरं मग तू पडून रहा आता. मी येते थोड्या वेळाने" आई म्हणाली. आणि भरभर चालत मोठ्या आईपाशी गेली. त्या दोघींचे काही तरी खुसूर-फुसूर झाले. तशी मोठी आई माझ्या जवळ आली. माझ्या जवळ बसून माझी तपासणी सुरू केली. नंतर माझ्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत बसून राहिली.




मग पुन्हा उठली आणि आईला काही तरी सांगितलं. मग आईने बाकीच्या सगळ्यांना नेहमीच्या कामांसाठी पाठवलं.

" आई मलाही जायचय बेरी काढायला " मी उठायचा प्रयत्न करत म्हटलं. तशी मोठी आई चटकन माझ्या जवळ आली. म्हणाली, " थांब इतक्यात नको उठूस. " मला काही कळेच ना? मोठी आई एरवी मला लवकर उठ, लवकर उठ म्हणायची. आज उलटं का म्हणतेय?

सगळे बाहेर, जंगलात, रानात गेले.  तशी आई माझ्या जवळ आली. मोठी आई आता काही महत्वाचे सांगणार याची जाणीव झाली मला. मी थोडी घाबरलेली. काय झालय मला? आता पोटात अजूनच कसं तरी होत होतं. उलटी होईल असंही वाटत होतं. अंगात अगदी ताकदच नाही असं वाटत होतं. आणी पोटात काहीतरी तुटत होतं, काही तरी सुटत होतं...

"सीता, मला वाटतं तू आता मोठी होतेयस." आई.
" म्हणजे आता मी गवत कापू शकेन ? " - मी
मोठी आई हसत म्हणाली. " अग हो , हो, किती घाई तुला? तशी तर मोठी होशीलच. पण त्याहून एक खूप छान मोठेपण येणारे तुला. "
" घाबरू नको बाळा. हे असं सगळ्या मुलींना होतं " - आई
" म्हणजे, असं पोटात दुखण? " - मी
" हो ग, प्रत्येक मुलीला मोठं झाल की दर काही दिवसांनी  पोट थोडं दुखतं. आणि पोटात साचलेली बाळासाठीची गादी साफही होते"
" म्हणजे? मला बाळ होणारे? मला नाही, मला नको बाळ... " मी जोरात रडत म्हतलं.
" अगं , इतक्यात नाही ग होणार तुला बाळ, नको घाबरू. आता फक्त बाळासाठी पोटात मऊ मऊ रक्ताची गादी तयार होते दर महिन्यात. आणि इतक्यात बाळ होणार नाही म्हणुन मग ती पोटातून बाहेर टाकली जाते. तेव्हा थोडं दुखतं सुरुवातीला. पण मग एकदा सवय झाली की नाही दुखत काही. " - मोठी आई.

" मऊ रक्ताची गादी? पण माझं पोट तर इतकुसं आहे, त्यात गादी कशी मावणार? आणि गादी तर मऊ गवताची असते, रक्ताची कशी?" - मी
" अग, पोटाच्या आत गवत कसं रहाणार? तुलाच टोचेल नं? म्हणुन आपल्या रक्ताचीच गादी असते पोटात. अगदी छोटीशी. बाळ पोटात आलं तर ती गादी मोठी होते अन मग बाळही त्यात मोठं होतं. आणि बाळ पोटात नाही आलं तर दर महिन्याला पोटातली रक्ताची गादी हळुहळु चार दिवसात बाहेर पडते. शू बाहेर पडते न तशी. पण शू कशी दिवसातून ७-८ वेळा बाहेर पडते तसं नाही होत."- आई
" ती गादी चार दिवस थोडी थोडी सारखी बाहेर येते.म्हणुन मग आपण कमरेला वेगळी पिशवी लावतो. आणि मग ती सकाळी पलीकडच्या छोट्या ओहळात धूवून टाकून पुन्हा वापरतो. घाबरू नको. मी आणि आई मदत करतो तुला सवय होई पर्यंत." - मोठी आई
" पण मग बाळ कधी येणार पोटात? मला नको इतक्यात बाळ बिळ. ते सारखं रडतं. " मी अगदीच बावचळले होते.
आई हसून म्हनाली. " नाही हं इतक्यात नाही येणार बाळ. तुला हवं तेव्हाच होईल हं. आणि त्यासाठी तुला आधी मित्र शोधावा लागेल. तो तुला आवडावा लागेल. मग बाळबीळ. हं "
मनात काही तरी हुळहुळलं, काय कळलं नाही .. मग म्हटलं, " हा मग ठिक. बरं आता मी जाऊ बेरी गोळा करायला? "
" नाही बाळा, आता हे चार दिवस थोडे सांभाळायचे. आपली ताकद थोडी कमी होते, पोट, पाय दुखू शकतात. म्हणुन हे चार दिवस गुहेतलीच कामं करायची, फारतर खाली फिरून यायचं. पण ही आपली हक्काची विश्रांती बरं " आई डोळे मिचकावत बोलली .
" आणि गवत कापणं? माझ्या विळा? " - मी
" हो ग बाई, आता तुला गवत कापणंही शिकवायचं. तुझ्यासाठी वेगळा विळा तयार करायचा. इतकच नाही तर गुहेतली चित्र कशी काढायची हेही शिकवेल मोठी आई. होना आई ? "-आई
" वॉव, मी मोठी झाले? गवत कापणार आता मी! आणि ती रंगीत मस्त चित्रही काढणार ! आई मला न छान नाच करावासा वाटतोय ! " - मी
" हो , हो, तू मोठी झालीस आता. सगळं शिकायचं आता. पण हळूहळू. गडबड नको हा. आधी आपण नवीन पिशवी कशी बांधायची शिकायचय, हो ना? " - मोठी आई
" हो, हो. चला आता आपण पलिकडच्या ओहळा कडे जाऊ. " - आई.

आम्ही बाहेर पडलो. मला आता खूप छान वाटत होतं. मी मोठी झाले होते. मला गवत कापता येणार, चित्रं काढता येणार, आणि नंतर मित्रही शोधायचाय अन बाळही... आईला मी नाही म्हटलं पण आत मनाच्या एका कोपर्‍यात मित्र, बाळ म्हटल्यावर लक्कन काहीतरी हललं होतं.

हो, मी मोठी झाले होते !

___

( ते बेरीचे झाड सोडता बाकीची चित्र मीच काढली आहेत फोटोशॉपमध्ये. बेरीचे झाड मीच काढलेल्या फोटोला बेर्‍या चिकटवल्यात अन जरा फोशॉ इफेक्ट दिलेत ;)  हे लिखाण पूर्णतः माझी कल्पनाशक्ती आणि तर्कशास्त्र यावर आधारित आहे. सो "पुरावे द्या" ह्याला यावेळी पास )

Tuesday, April 4, 2017

3. आणि मी मोठा झालो.

(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )


रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !
सगळी मुलं गप्प बसून ऐकू लागली. छोटी मुलं आपापल्या आयांच्या मांडित जाऊन बसली.

" आज आम्ही डोंगरापलीकडच्या जंगलात गेलो होतो. आज तुम्ही जे लाल मुळे खाल्ले ना; ते त्या जंगलात खुप उगवतात. तुम्हाला ते जसे आवडतात तसे ते सशांनाही खुप आवडतात. त्यामुळे त्या जंगलात ससेपण खुप असतात. " बाबा सांगू लागले.

" रामचे बाबा ससे म्हणजे काय? " आमच्यातला नुकताच मोठा होउ लागणार्‍या बंटीने विचारले.

मोठे बाबा उठले आणि दिव्याजवळ गेले. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. दिव्यापलिकडच्या भिंतीवर आता मोठे बाबा मजेची चित्र दाखवणार म्हणून सगळे खुष झाले होते.

मोठ्या बाबांनी दिव्याची वात मोठी केली. आणि ते दिव्याच्या पलिकडे जाऊन उभे राहिले.
मग त्यांनी एक हात आडवा केला. दुसर्‍या हाताची बोटं त्या हातावर ठेवली.
आणि एका तालात दोन्ही हात उड्या मारत पुढे नेऊ लागले.
त्याबरोब्बर मागच्या भिंतीवर ससा आला अन उड्या मारू लागला.
मध्येच त्याने कान हलवले. मग तोंड हलवले.


पुन्हा उड्या मारत तो अंधारात पळून गेला.
मग मोठ्या आजोबांनी विचारलं, " कळला का ससा? "
"हां हां, म्हणजे मीनाच्या डोक्यावर भिंतीवर जे चित्र काढलय ते ? " बंटी म्हणाला.
आता बंटीला ससा म्हणजे काय ते बरोब्बर समजलं होतं.

तेव्हढ्यात सखादादा पुढे आला.
त्याने डोक्यापाशी हाताची दोन - दोन बोटं वर करून सश्यासारख्या उड्या मारायला सुरूवात केली.
मग काय आम्ही सगळेच सश्यासारख्या उड्या मारू लागलो.

बाबांची गोष्ट तशीच राहिली.
थोड्या वेळाने मोठे बाबा म्हणाले, "चला आता मुलांनी झोपायला जा. आम्हाला थोडं बोलायचयं आहे. " आम्ही सगळी छोटी मुलं उठलो आणि आईंबरोबर आत गेलो.

बाहेर सगळे बाबा थोडावेळ बोलले. मग तेही आले झोपायला.
माझे बाबा आले अन म्हणाले, " बरं का, मोठ्या बाबांनी सांगितलय; उद्यापासून रामलाही बाहेर घेऊन जायचय. तो आता मोठा होतोय. जंगलचे कायदे त्याने शिकायला हवेत. "
आई काळजी करत म्हणाली, " अहो, अजून लहानच आहे तो. इतक्यात कशाला? "

पण मला मात्र खुप आनंद झाला. मी मोठा झालोय अन उद्या मला जंगलात जायला मिळणार , अरे वा !
बाबा हसून म्हणाले, " अगं तुला तो कितीही मोठा झाला तरी तसच वाटेल. पण ते काही नाही. उद्या राम येईल आमच्याबरोबर. काय राम येणार ना? "
मी जोरजोरात हो म्हणून मान हलवली.

आता मला झोपच येईना. बाहेरचे रातकिड्यांचे, माकडांचे इतर प्राण्यांचे, खालच्या नदीच्या पाण्याचे आवाज ऐकत; त्यांना मनातल्या मनात सांगत बसलो; ' उद्या भेटूच!'

"राम, ए राम! अरे ऊठ ! तुला आज जंगलात ना जायचय? चल ऊठ ! " आई हाका मारत होती.
मी डोळे उघडले. बघतो तर काय अजून रात्रच होती.
"आई, झोपू दे ना थोडं अजून. आम्हाला सकाळी जायचय. अजून तर बाहेर अंधारच आहे."
"ऊठ राम," बाबांचा आवाज आला. " अरे आत्ता होईल पहाट ! आपल्याला खुप दूरवर जायचय. चल उशीर होईल. सगळे तयार झाले बघ !"

मग मात्र मी लगेच ऊठलो. पटकन तोंड धुतले, आईने दिलेले पाणी प्यायलो. आणि बाबांसमोर जाऊन उभा राहिलो.
"राम हा टोकेरी दगड धर हातात. पाडायचा नाही बरं का ! जंगलात टोकेरी दगड जवळ असलेला बरा. काल रात्री हा मी खास तुझ्यासाठी ठोकून, घासून तयार केलाय बरं का ! " बाबांनी बोलत बोलत हात पुढे केला.
त्यांच्या हाततला तो टोकेरी दगड घेताना कसलं भारी वाटलं, सांगू !






आईने माझ्या कमरेला एक वेल बांधली. मी त्या वेलीत तो दगड पोटाशी खोचून ठेवला. आईने एक मुळाही त्या वेलीत बांधला. म्हणाली, " भूक लागली तर खा बरं का ! "

हळूहळू गुहेच्या तोंडाशी सगळे बाबा अन मोठी मुलं जमली.
मोठ्या बाबांनी मला हाक मारली.
म्हणाले, " हं राम, आज तुझा पहिला दिवस ! सगळ्या मोठ्यांना नमस्कार करा ! "
मी लगेच सगळ्यांना वाकून नमस्कार केला.

"हं. शाब्बास! आता महत्वाचे ऐक !" मोठे बाबा सांगू लागले. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो.
" जंगलात जाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे एकट्याने कोठेही जायचं नाही. टोळीच्या शेवटी राहायचं नाही. सुरूवातीला काही दिवस टोळीच्या मध्यातच तू चालायचं. जंगलात आपले कान, डोळे, नाक उघडे ठेवायचे. पण तोंड मात्र अगदी बंद ठेवायचे. चालतानाही खाली बघून नीट चालायचं. बाकी सर्व गोष्टी तू हळूहळू शिकशीलच. "

आता मोठी आई पुढे आली.
मला जवळ घेऊन म्हणाली, " बरं का मुला, ही आपली टेकडी आणि गुहा लक्षात ठेव. आपल्या टेकडीची खूण म्हणजे हे मोठं झाड बरं का ! खुप लांबूनही लक्षात येतं हे झाड. त्याच्यावरच्या आगीच्या रंगाच्या फुलांचाही रंग लक्षात ठेव. त्याच्या मागच्या झाडांच्या पानांचा रंग लक्षात ठेव. इतर झाडांपेक्षा गडद रंगाची ही झाडं वेगळी दिसतं बघ !
आणि हो, एकटा कुठे जावू नको. मोठ्यांचे ऐक. गुहेच्या बाहेरच्या जगात खुप वाईट गोष्टी आहेत. काळजी घे. स्वतःला जप ! नीट जा हो." मोठ्या आईने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मला जरासं रडूच आलं. मग सगळे हसू लागले.

आई चटकन पुढे झाली माझे डोळे पुसले. अन म्हणाली " मोठा होतोय माझा सोन्या! "

" चला तर. सगळे आले ना? " मोठे बाबा म्हणाले.
आता मलाही घाई झाली होती जंगलात जाण्याची !
तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी एक लांब वेल तोडली. तिचे एक टोक माझ्या हाताला बांधले अन दुसरे टोक माझ्या बाबांच्या हातात दिले. आता मी हरवण्याचा प्रश्नच नव्हता.

आणि मग आम्ही सगळे गुहेच्या बाहेर पडलो.

मग आम्ही सगळे टेकडी उतरू लागलो. हळूहळू उजेड होत होता. सूर्यदेव आकाशात आला. सगळीकडे चकचकीत उजेड झाला. आम्ही आता नदीच्या जवळ आलो. नदीत सगळ्यांनी स्वच्छ होऊन घेतलं. मला तर नदीत डुंबायला खुप मज्जा आली. मग बाहेर आलो.

तेव्हढ्यात मोठे बाबा ओरडले, " राम! हातातला वेल कुठे आहे? का काढलास ? "
मी घाबरलो, रडू लागलो. नदीत पाण्यात खेळताना तो कधी गळून पडला, हे कळलंच नव्हतं.
बाबाही मला हाका मारत धावत पुढे आले. ती वेल त्यांनी पुन्हा माझ्या हाताला बांधली, यावेळेस जरा जास्तच घट्ट !

मग आम्ही नदीच्या कडे कडेने थोडे वर जाऊ लागलो.
"बाबा, जंगल तर तिकडे खाली आहे. आपण वर का जातोय? " मी जरा जोरातच विचारलं.
"शूsss! राम हळू बोल बरं. बघ तो ससा घाबरून पळून गेला बघ. अशाने आपण शिकार कशी करणार? आणि दुसरं म्हणजे, आपल्याला जंगलात जायचं तर नदी ओलांडावी लागते. अन वरच्या अंगाला नदी छोटी असते. शिवाय तिथे मोठे मोठे दगड असल्याने त्यांच्यावरून नदीच्या पलिकडे जाणं सोपं जातं.

चल आता लवकर लवकर. आपल्याला टोळीच्या मध्ये राहायला सांगितलय ना मोठ्या बाबांनी ? " बाबांनी समजावलं.

जंगलातल्या माझ्या शिक्षणाची अशी सुरुवात झाली. जंगलात हळू का बोलायचं आणि नदी कोठून ओलांडायची याची माहिती आता मला मिळाली होती.

हळूहळू आजूबाजूची झाडं गच्च व्हायला लागली. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. मध्येच माकडं ओरडत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. बाबांनी हळुच सांगितलं, " आपण आलोय हे माकडांना समजलं की ते हे असं ओरडून म्हणजे हूल देऊन, सांगतात बरं का इतर प्राण्यांना ! "

तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी हात वर केला अन ते थांबले. त्याबरोब्बर सगळे थांबले. मला आपोआप कळले, आता अजिबात आवाज करायचा नाही. मोठ्या बाबांनी बोटानी खूण केली. पुढे उजवीकडे थोडी मोकळी जागा होती. अन मध्ये गवताचे रान उगवले होते. सकाळच्या उन्हात खुप ससे छोटी झुडुपं उकरून त्या खालची गाजरं खात होते.

अरे वा ! आज पहिल्यांदा मी शिकार पाहणार होतो, नाही-नाही करणार होतो. बाबा, मोठे बाबा यांनी सांगितलेल्या कितीतरी शिकारीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण आता मी ती शिकार प्रत्यक्ष पाहणार होतो. अनुभवणार होतो.

हळुहळु सगळे लांब लांब झाले. लांबूनच सगळ्यांनी त्या सशांभोवती गोल केला.


आणि खाली वाकून, हळुहळू, आवाज न करता सगळे जवळ येउ लागले. आता ससे आमच्या अगदी दोन हातांवर होते. मला तर त्यांना उडी मारून पकडावे वाटत होते. तेव्हढात एका माकडाला आमची चाहूल लागली अन त्याने हूल दिली. म्हणजे वेगळाच आवाज काढून सशांना सांगितलं, "माणसं आलीत."

माकडाच्या त्या आवाजासरशी सगळे ससे सुसाट पळत सुटले. मग आम्हीपण जलदी केली. पटापट त्या सशांवर आपले टोकेरी दगड मारले. काहींनी सशांवर उड्या मारल्या अन त्यांना हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात मी पण एका सशाला पकडण्यासाठी धावलो. पण माझ्यापेक्षा तो ससा जास्ती अनुभवी होता ना ! तो माझ्या पायांतून उडी मारून पळून गेला. मध्येच काहींचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. सशांचेही ओरडणे ऐकू आले. मग थोड्यावेळाने सगळे शांत झाले.

प्रत्येकाने आपापले टोकेरी दगड शोधून काढले. आणि मग आम्ही सगळे एकत्र आलो. सगळ्यांनी मिळून हाताच्या बोटांइतके ससे पकडले होते. त्यातले काही जिवंत होते. मग मोठ्या बाबांनी बंटीच्या बाबांना हाक मारली. त्यांच्याकडे जुनी मोठी वेल होती. त्या वेलीने सगळे ससे एका वाळक्या फांदीला बांधून घेतले.

" चला आता आपण रताळी गोळा करूयात." मोठे बाबा म्हणाले.
मग मला बाबांनी रताळ्याचे झाड कसे ओळखायचे ते शिकवले. लांब, थोडीशी खरखरीत हिरवी पानं पाहून मी ते झाड जोरात ओढले. तशी फक्त काही पानं तुटून माझ्या हातात आली, अन मी मागे धाडकन पडलो. सगळी हसू लागली.

बाबांनी मला उठवले, म्हणाले, " अरे घाई करू नको. आधी सगळे समजून घे. मग कर. बरं का रताळे असे उपटू नको. हातात काहीच येत नाही. इतकं सोपं नसतं कोणतही काम ! " बाबा सांगू लागले. " हे बघ तुझ्याकडे तो टोकेरी दगड आहे ना? त्याने आधी या झाडाच्या खालची माती बाजूला करायची, ही अशी बघ." बाबा दाखवू लागले.


झाडाची मूळं अन त्याच्या खालचे रताळे मोकळे करून घायचे. मग ते ओढायचा. कळलं ? "

मी लाजलो. " बरं, बरं. " म्हणत कमरेशी खोचलेला टोकेरी दगड बाहेर काढला.
आता घाई न करता, बाबा कसं करताहेत ते बघत बघत, तसे करत मी हळूहळू रताळे बाहेर काढले. मला इतका आनंद झाला. मी मोठ्यांदा ओरडलो, "माझे रताळे, माझे रताळे ! " सगळ्यांनी मला शाब्बासकी दिली.


मोठ्या बाबांनी मला जवळ घेतलं. मला खुप अभिमान वाटला. रताळे माझ्या कमरेशी लटकवत मोठे बाबा म्हणाले, " आज जे जे रताळे तू काढशील ते सगळे तुझ्याजवळ ठेव. गुहेत गेल्यावर ते सगळी रताळी मोठ्या आईला दे आणि नमस्कार कर. ती सगळ्यांना तुझी रताळी वाटेल. आजची ही तुझी पहिली कमाई ! शाब्बास ! असेच कष्ट कर. आपल्या कुटुंबाला वाढव, सांभाळ ! शाब्बास पोरा ! "

मला खुप आनंद झाला होता. पहिल्यांदा वाटलं, 'नाही नाही , हे माझे रताळे आहे. तो मीच खाणार !' पण मग मला मोठ्या बाबांचं म्हणणं पटलं. मी आता मोठा होतोय. माझ्या आधी माझ्या कुटुंबाला मी दिलं पाहिजे. त्यामुळे सगळी रताळी मोठ्या आईलाच दिली पाहिजेत.

मी उत्साहाने नवीन झाडं शोधू लागलो. पुन्हा हळूहळू माती बाजूला करून रताळी बाहेर काढू लागलो. मी आता नक्कीच मोठा झालो होतो. मी भराभर काम करू लागलो. काढलेली रताळी माझ्या कमरेतल्या वेलीत खोचू लागलो.

"राम, राम. आता पुरे."बाबा म्हणाले. " पहिल्याच दिवशी एकदम फार जोर करू नकोस. हात सोलून निघतील."
मी थांबलो. हातांकडे बघितलं तर सगळे लाल लाल झाले होते. हातावरची माती झटकत मी उभा राहिलो. पाठ दुखत होती अन हातही चुरचुरत होते.

मी आजूबाजूला बघितलं. बाकीच्यांनी खुप रताळी गोळा केली होती. त्यांच्या छोट्या छोट्या जुड्या त्यांनी वेलींनी बांधल्या.

आता आम्ही परत नदीकडे निघालो. नदीवर आल्यावर सगळे थांबले. सगळ्यांनी आपापले हात, पाय, तोंड नदीच्या पाण्यात धुतले. मलातर नदीच्या गार पाण्यातून हात बाहेर काढवतच नव्हते. बाबा म्हणाले तसे खरोखर हात सोलून निघाले होते. नखांत माती साचली होती. डोक्यावर माती उडाली होती. मग बाबांनी मला सरळ आंघोळच घातली

 :heehee: आता उन चढू लागलं होतं. सगळ्यांना भूकाही लागल्या होत्या. आम्ही भराभर गुहेच्या दिशेने चढू लागलो. लांबूनच आम्हाला पाहून लहान मुलं धावत पुढे आली. मला आठवलं , पूर्वी मीही असाच धावत येत असे. मुलांच्या मागोमाग आई होती. तिला बघताच मी धावत सुटलो. तिच्या कुशीत शिरलो. आईपासून इतका वेळ लांब मी पहिल्यांदाच राहिलो होतो.

तेव्हढ्यात आईचे लक्ष माझ्या हातांकडे गेलं. तिला तर रडूच फुटले. मी म्हटलं, " अगं आई, इतकं काही नाही दुखते." बाबाही रागवले, " अगं मोठा होतोय तो. थोडं लागणारच. त्याने जरा घट्ट्मुट्ट व्हायलाच हवय. आणि त्यापेक्षा त्याची कमाई बघ :) अरे राम, दाखव ना तुझे रताळे, तिला !"

मी आनंदाने कमरेला खोचलेले रताळे तिला दाखवले. तिने आनंदाने माझे मुके घेतले.
 "राम" मोठ्य बाबांनी हाक मारली. " राम , अरे तुझी पहिली कमाई मोठ्या आईला दे. " मी पुढे झालो. मोठ्या आईला नमस्कार केला. आणि हातातले रताळे तिला दिले. मोठ्या आईने खूप महत्वाच असल्यासारखे ते हातात घेतले. अन माझ्या आईला हाक मारली. " कौसल्या, यावर तुझा अधिकार बरं !"

आईनेही हसत ते हातात घेतले. "राम, सगळ्यांना नमस्कार कर बरं. आज तू मोठा झालास. कुटुंबाची जबाबदारी हळुहळू उचलायला लागलास. शब्बास ! " आईने मला जवळ घेत म्हटलं.

मग आम्ही सगळे जेवायला बसलो. मुळे, फळं आणि हो, मी काढलेल्या रताळ्याचा एक एक तुकडाही ! प्रत्येकाला मोठी आई वाढत होती. छोटी मुलं माझ्याकडे आदराने बघत होती. अन सगळे मोठे दादा आता माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्याशी जंगलातल्या गप्पा मारू लागले.

 खरच, एका दिवसात मी मोठा झालो होतो.

Sunday, April 2, 2017

20. मध्य युगाचा शेवट आणि प्रबोधन काळाची सुरुवात

निसर्गाच्या घडामोडीतील मानवची निर्मिती काही  लाख वर्षांपूर्वीची .  त्यातही आजच्या मानवाचा इतिहास  गेल्या एक लाख  वर्षांपासूनचा.
या संपूर्ण इतिहासाचे दोन प्रमुख भाग पडतात. इतिहासपूर्व  काळ आणि ऐतिहासिक काळ .
ऐतिहासिक कालखंडाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन मुख्य भाग पडतात.  प्राचिन प्रगत संस्कृतीचा काळ साधारण इ.स.पू. ५००० ते इ.स. ५०० पर्यंत मानला जातो. सुमेरियन, चिनी, इजिप्त, सिंधु, ग्रीक, रोमन या काही महत्वाच्या संस्कृती. शेती, व्यापार, शासनव्यवस्था, विज्ञान, कला, साहित्य अश विविध अंगांनी या संस्कृत्यानी आपली प्रगती साध्य केली.

कालांतराने या संस्कृती काही कारणांनी एकतर नामशेष झाल्या अथवा तेथील राज्यकर्ते दुर्बळ बनले.  त्यामुळे या संस्कृतीं मधली प्रगती थंडावली.  येथून  पुढील  काळात त्या त्या मानवी समाजामध्ये शिथिलता, धर्माचे प्राबल्य, कर्मकांडांचे महत्व आणि एकूणच आहे त्या परिस्थितीत राहण्याचा कल निर्माण झाला.  स्वाभाविकच प्रगती नाही, नवे विचार नाहीत, नवीन शोध नाहीत अशी काहीशी स्थितिशील जीवनपद्धती या मानवी समुहांनी स्विकारली.  म्हणूनच या कालखंडाला अंधकाराचे युग, तमोयुग असे म्हटले गेले.  हेच ते मध्ययुग!
प्रदेश परत्वे या मध्ययुगाचा कालखंड वेगवेगळा होता. युरोपमध्ये साधारण सहावे ते तेरावे शतक, आशिया खंडात नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका पर्यंत तमोयुग मानले जाते.
साचेबंदपणा, अराजकता, अंधश्रद्धा, अस्मानता, काम आणि मोबदला याचे विषम वाटप ही या मध्ययुगाची काही ठळक वैशिष्ठ्ये !
कालांतराने याही परिस्थितीमधे बदल होऊ लागला. समाजातील सरंजामदार, धर्मगुरु यांचे महत्व कमी होऊ लागले. राजा, व्यापारीवर्ग, मध्यमवर्ग यांचे स्थान महत्वाचे बनू लागले. ख्रिश्चन मुस्लिम धर्मीयांमधे संघर्ष होऊ लागला. युरोपमधील लोकांचा इतर खंडातील लोकांशी संपर्क वाढू लागला. भौगोलिक शोध, राजसत्तेचा वाढता प्रभाव, नवीन शास्त्रीय शोध, कलेच्या क्षेत्रातील नवीन विचार-प्रयोग सुरु झाले. धर्माबाबत विचार सुरु झाला.
समाजातील ह्या नवीन वैशिष्ठांनी युक्त अशा काळाला प्रबोधन कालखंड ( रेनेसाँ पिरियड) असे संबोधले जातेे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद इ. नवीन आधुनिकतेची मुल्ये या प्रबोधन काळाची देन आहेत.  

या सर्व घडामोडींची सुरुवात झाली ती एका वेगळ्याच घटनेमुळे ! त्याकाळातही युरोपमधील देशांचा  आशिया खंडातील देशांशी  यांचा व्यापार  चालत असे, हा व्यापार  प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने- जमिनीवरील रस्त्यामार्फत. या व्यापारीमार्गावरती एक महत्वाचे ठिकाण होते ते म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल! 
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांची ताकद वाढत गेली. अरबस्थानातील तेव्हाची प्रगतीहि  आपण पाहिली . या त्यांच्या प्रगतीमुळे त्यांची ताकद वाढत गेली. आणि १४५३ मधे या अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांनी कॉन्टंटिनेपल जिंकून घेतले. तसं बघायला गेले तर त्या काळात एखादे शहर, एखादा देश जिंकण हरणं सतत होत होतं, कारण या काळात सतत लढाया होतच असत. पण कॉन्टंटिनपलची गोष्टच वेगळी होती. ज्याचा कॉन्टंटिनपलवर कब्जा त्याचा युरोप व आशियाच्या व्यापारावर ताबा. अशी परिस्थिती होती. 

आता पर्यंत या व्यापारावर युरोपीय ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा मक्ता होता. पण व्यापारी मार्गावरचे मोक्याचे ठिकाण,  कॉन्स्टॅन्टिनोपल मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाती गेले. अन सगळा खेळ पालटला. पूर्वी व्यापारी ख्रिश्चन अन राज्यकर्तेही ख्रिश्चन. त्यामुळे या व्यापाराला चालना मिळावी म्हणून ख माफक असत. पण आता राज्यकर्ते मुस्लिम अन व्यापारी ख्रिश्चन. स्वाभाविक राज्यकर्त्यांनी कर वाढवले. जो व्यापार पूर्वी अतिशय फायद्याचा होता; आता तो इतका फायद्याचा राहील नाही. स्वाभाविकच आता काय करता येईल? ज्यान्वये पूर्वी सारखा व्यापार फायदेशीर होईल असा विचार करणे भाग पडले. 
अन मग त्यातून कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ऐवजी दुसरा कोणता मार्ग आपल्याला सापडू शकतो का याचा प्रयत्न सुरु झाला. अनेक खलाशी पुढे झाले. अनेक ख्रिश्चन, युरोपीय राजांनी आर्थिक मदत या खलाशांना देऊ केली. एकुणात व्यापार पुन्हा फायद्याचा व्हावा हि सर्वच युरोपियन लोकांची गरज होती. अन जसे प्रयत्न सुरु झाले; नवे मार्ग सापडत गेले. कोलंबस हा खलाशी नवा मार्ग शोधता शोधता चुकून नवीन भूमीवर  अमेरिकेच्या बेटांवर गेला. तर वास्को ग गामा हा संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून थेट भारतात पोहोचला. तर मॅगेलन याने पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणाच केली. 

एकदा का माणूस विचार करू लागला कि हे विचार करणे सर्वच बाबतीत करू लागतो. या नवीन व्यापारी मार्गांबाबतही तसाच झाले. जर व्यापारासाठी नवीन मार्ग सापडू  शकतो तर इतर बाबतीतही काही वेगळे मार्ग असू शकतील का याचा विचार मध्ययुगीन माणूस करू लागला. मग यातूनच विविध कला- चित्र कला, शिल्पकला, संगीत यांत काही नवीन विचार, प्रयोग सुरु झाले. इतकेच नाही तर एकुणातच आपल्या जीवनपद्धतीबाबत माणूस नवीन विचार करू लागला. मग राजा, देव, धर्म, मूल्य, तत्त्वज्ञान या सर्वांबाबत विचार सुरु झाले. 

तशात आता पर्यंत ख्रिश्चन धर्म हाच श्रेष्ठ धर्म असे युरोपीय जगात मानत होते. पण असे असूनही ख्रिश्चन आणि मी इस्लाम धर्मीय यांच्यातील युद्धात आता फक्त ख्रिश्चनांचाच विजय अशी परिस्थिती राहिली नाही. आपण समजतो त्यापेक्षा प्रत्यक्षात काही वेगळे घडू शकते, वेगळे असू शकते. आपण आजपर्यंत मानत होतो त्यापेक्षा वेगेळे वास्तव असू शकते याची सुस्पष्ट जाणीव युरोपीय समाजाला होऊ लागली. यामुळे धर्माबाबत नवीन विचार मांडले जाऊ लागले. 

या सर्व घडामोडींमुळे आजवर जे जे मानले ते ते पुन्हा तपासून बघायची प्रेरणा युरोपमध्ये निर्माण झाली. यातूनच मग अनेक नवनवे विचार, तत्वज्ञान, नवनव्या पद्धती युरोपमध्ये मांडलया जाऊ लागल्या. आपली आजवरची सर्व जीवनपद्धती पुन्हा तपासून पाहिली जाऊ लागली. यालाच रेनासान्स किंवा प्रबोधन असे म्हटले जाते. प्र -बोधन म्हणजे प्रकर्षाने बोध होणे - समजणे. दिसणे आणि पाहणे, माहिती आणि ज्ञान. यात जो फरक आहे तो यात  अपेक्षित आहे. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण तरी ती आपल्याला जाणवत नाही वा आपले लक्ष जात नाही, हे पाहणे वा माहिती.  पण जेव्हा त्या गोष्टी बद्दल आपल्या नीट जाणीव होते , आपल्या मनात त्या  गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद होते तेव्हा ते दिसणे असते, ते ज्ञान असते.  चवदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये हे असे  प्रत्येक गोष्टीबाबत जाणीवपूर्वक ज्ञान होणे घडू लागले. आणि म्हणून या काळाला युरोपचा प्रबोधन काळ असे म्हटले जाते. या प्रबोधन काळात काय काय बदल झाले ते आपण पुढे पाहू.