Thursday, April 18, 2024

2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे पहिले पाक्षिक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून (काळबादेवी) सुरू केले. तसेच त्यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्याच वेळी, मे 1840 पासून सुरू केले. 

जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता सुरू केली तो काळ पेशवाईच्या अस्तानंतरचा (1818) होता. महाराष्ट्रातील पेशव्यांचे राज्य गेल्यानंतर मराठी माणसांचे मन, मेंदू, मनगट बधिर झाले होते. ते पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचे प्रतिबिंब! दर्पण सुरु केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे वीस वर्षे. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील ‘ज्ञानेश्‍वरी’नंतरचे महत्त्वाचे संक्रमण मानले जाते. त्या पाक्षिकात प्रत्येक पानावर अर्ध्या पानाचा मराठी मजकूर व त्यापुढेच त्याचे इंग्रजीत भाषांतर अशी छपाई असे. मराठी जनतेला काय म्हणायचे आहे ते मराठी भाषेत व ते इंग्रज प्रशासनास कळावे यासाठी इंग्रजीत अशी त्या मजकुराची कल्पक रचना होती. वाचकांना विचारप्रवृत्त करणे हा त्यांचा हेतू होता. मराठी भाषा व साहित्य-संस्कृती यांवर इंग्रजांच्या राजवटीमुळे काही संक्रमण होऊ लागले होते. त्याला पर्याय म्हणजे विकासाचा मार्ग म्हणून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे हा विचार जांभेकर यांचा होता. वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम शिक्षण, लोकशिक्षण, मराठी साहित्य व पाश्चिमात्य सुधारणावादी ज्ञानविज्ञान यांच्या प्रसारासाठी आहे अशी त्यांची धारणा झाली. 

पोंभुर्ले, ता. देवगड,  रत्नागिरी येथील गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा धाकटा मुलगा बाळ जांभेकर. वयाच्या तेराव्या वर्षी, 1826 च्या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी व अन्य विषयांच्या शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये दाखल झाला. बाळ जांभेकर बुद्धिमान होते. त्यांनी अवघ्या दोन वर्षांत इंग्रजी, गणित व अन्य नऊ भाषा यांत प्राविण्य मिळवले. त्यांची ती तडफ लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थिदशेतच उपएतद्देशीय सचिव म्हणून नियुक्ती प्रथम मिळाली. तो मराठी माणसासाठी फार मोठा गौरव होय !

गर्व्हनर एल्फिन्स्टन यांनी बाळ जांभेकर यांची विद्वत्ता ओळखून त्यांना आणखी पुढे संधी दिली; मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकाशी संबंधित ग्रंथ तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर पुढे, मार्च 1830 पासून त्याच शिक्षण संस्थेत (बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी) उप एतद्देशीय सचिव (डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी) म्हणून दरमहा पन्नास रुपयांवर नियुक्ती केली. बाळशास्त्री यांनी त्या काळात मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, हिंदी, फारसी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच अशा विविध भाषांत प्राविण्य मिळवले. तसेच अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, अंकशास्त्र, शून्य उपलब्धी गणित या विषयांतही विशेष प्राविण्य मिळवले. त्यांचे उत्तम अध्यापन, संस्थेबद्दल निष्ठा, सद्वर्तन आणि मुलांच्यातील व सहाध्यायींमधील लोकप्रियता हे गुण लक्षात घेऊन त्यांची त्याच संस्थेत पूर्ण वेळ एतद्देशीय सचिव म्हणून मार्च 1832 पासून सन्मानाने दरमहा शंभर रुपये पगारावर नियुक्ती झाली. 

तसेच 1831 मध्ये लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील पौर्वात्य भाषांतर समितीचे एतद्देशीय भाषा सचिव म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. पुढे 1842 मधे एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कार्यकारी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय  एप्रिल 1845 मध्ये मुंबई येथे सुरू केले. 

त्यांनी मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने 1845 मध्ये सुरू केले. 

लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’1845 मध्ये स्थापन केली. सार्वजनिक प्रश्नावर निबंध वाचन व त्यावर चर्चा असे सोसायटीमधील कार्यक्रमांचे अभिनव स्वरूप होते. 

काळबादेवी भागात वाडा भाड्याने घेऊन त्यात पहिले वसतिगृह 1845 मध्ये सुरू केले. 

तसेच मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही वर्षभर काम केले.

लंडन येथील जिऑग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेत कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून 1842 ते 1846 पर्यंत होते. 

प्रा. बाळशास्त्री जांभेकर पुरातत्त्व व इतिहास संशोधन असे काम लंडन येथील दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई येथील शाखेत (1830 पासून) करत असत. त्या शाखेने 1841 पासून ‘जर्नल ऑफ दि बॉम्बे ब्रँच एशियाटिक सोसायटी’ सुरू केले.

त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा सन्मान 1840 मध्ये मिळाला होता. तो त्या काळातील बहुमान समजला जात असे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ‘ग्रँड ज्युरी’मध्ये बसू शकत होते. 

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मधून साहित्यलेखनाचा आरंभ केला होता. त्यांचे लेखन भाषांतराच्या माध्यमातून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कॅप्टन जर्व्हिस यांचे लॉर्ड ब्रॉग्हम यांच्या ‘ट्रेएटाईज ऑन द ऑब्जेक्ट्स – अ‍ॅडव्हांटेज अँड प्लेजर्स ऑफ नॉलेज’ नावाच्या प्रसिद्ध शास्त्रीय पुस्तकाचे ‘विद्येचे लाभ, उद्देश आणि संतोष’ या नावाने भाषांतर केले. ते 1829 मध्ये छापले गेले. त्यांनीच पहिला मराठी शब्दकोष आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकासाठी संपादन व भाषांतर केले होते.

जांभेकर यांनी त्यांच्या ‘दर्पण’ व नंतर ‘दिग्दर्शन’मधून बरेच निबंध व लेख लिहिले आहेत. जांभेकर हे आद्य निबंधकार व आद्य गद्य लेखक होत. त्यांचे निबंध व लेख यांचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यातून धार्मिक व सामाजिक सुधारणा, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी-परंपरा यांचा त्याग, ज्ञान व विज्ञान यांची माहिती, स्त्रियांचे शिक्षण, शालेय शिक्षण ह्यांचे दर्शन होते.

त्यांनी ‘दर्पण’मधून हिंदुधर्म आणि सती, जातिभेदाचा प्रश्‍न , स्त्रियांस वेदाभ्यास, स्त्री शिक्षणाची दिशा , स्त्री-पुरुषांना समान हक्क 1 व 2 , ग्रंथपरीक्षणाचा नमुना , मुंज मुलींची का नाही?, सरकारी नोकरीत जातीयता , नाटकशालेस प्रोत्साहन  असे पुरोगामी विचारांचे लेख प्रसिद्ध केले होते. आणि ‘दिग्दर्शन’ या मासिकातूनही रसायनशास्त्र, इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोडी व बाळबोध अक्षरांचे ताम्रपट, वाफयंत्रे, ज्योतिष शास्त्र, सिद्ध पदार्थ विज्ञान असे अनेक विषय हाताळले.

भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन नाणी, चित्रलिपी, गूढ लिपी यांवर संशोधन करून इंग्रजीतून लेखन प्रसिद्ध केले

त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळाप्रेसवर मुद्रण सर्वात प्रथम 1845 मध्ये केले. 

त्यांच्यामुळेच ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत शक्य झाली.

त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नुसती नावे वाचूनही थक्क व्हायला होते. 

1. नीतिकथा

2. सारसंग्रह 

3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 व 2, 4. भूगोलविद्येची मूलतत्त्वे, 

5. भूगोलविद्या गणितभाग, 

6. बालव्याकरण (यांतील क्रमांक 4 व 6 ही पुस्तके मुंबई इलाख्याच्या प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासली जात होती), 

7. मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, 

8. शब्दसिद्धी निबंध, 

9. समीकरणाविषयी टिपणे, 

10. शून्यलब्धी गणित व मूलपरिणती, 

11. हिंदुस्थानचा इतिहास, 

12. हिंदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, 

13. मानसशक्ती विषयीचे शोध (अपूर्ण). 

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात.  बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात

विचार, लेखन आणि प्रत्यक्ष कृती अशा तीनही स्तरांवर मोठे काम केले. 

 त्यांचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरण.  शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या काळात त्यांनी लढा दिला.  सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना सामाजिक व धार्मिक रोषाला सामोरे जावे लागले; धार्मिक बहिष्कारही सहन करावा लागला. परंतु कायदेशीर आणि संमत मार्गाने लढा देता येऊ शकतो आणि न्याय मिळवता येतो याचा पाया त्यांनी भारतात घातला.

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी 17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचा मुंबईमधे मृत्यू झाला.

---

No comments:

Post a Comment