Tuesday, May 23, 2017

5.सृजन: शेतीची सुरुवात


( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात  आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
कधी सकाळीच डोंगरामागच्या छोट्या झालेल्या नदीत पाय सोडून बसावं अन ऊन अंगाला अगदी भाजू लागलं तर मनसोक्त नदीमधे डुंबत रहावं, पाण्यापासून जराही दूर होऊ नये असं वाटू लागलं तिला. पण मग ऊन फारच तळपायला लागलं की राम तिला ओढून जवळच्या झाडांच्या सावलीत नेई. मग तिथे बसल्या बसल्या फळांच्या खाली पडलेल्या इवल्या इवल्या बिया ती गोळा करत बसे. राम शेजारी पडलेल्या वाळलेल्या फांद्या गोळा करी अन वाळक्या वेलींनी बांधून त्याची मोळी करे. मग ऊन्हाचा मारा अगदीच असह्य झाला की दोघे गुहेत परत येत.
अजून काही दिवस उलटले. अन एक दिवस, दिवस उगवलाच नाही. रात्रभर कसले कसले आवाज येत राहिले. अन मधेच लख्ख उजेड होई, जंगलातला काळाकुट्ट अंधार क्षणात उजळून निघे. अन मग जोरात सुरु झाला पाऊस!

साऱ्या आकाशातून जणू मोठी नदीच वाहू लागली साऱ्या जंगलावर. सगळे अतिशय आनंदले. गुहेच्या बाहेर आले. आणि आकाशातून पडणाऱ्या या नदीखाली चिंब भिजू लागले. मधेच उजेडाचा लखलखाट होई आणि पुन्हा कडकडाट असा आवाज. लहानमुलं घाबरून आपल्या आयांच्या कुशीत लपत. सीतेलाही या आवाजाची भिती वाटे. पण आता आईपासून ती खूप दूर आलेली. मग ती चटकन रामाचा हात घट्ट पकडे. लखलख होई तशी ती चटकन रामाजवळ सरके. रामही तिला जवळ घेई अन हसून म्हणे, " अग किती घाबरतेस? आता काही दिवस हे असंच चालायचं."
" मग काही दिवस तू माझ्या अगदी जवळ रहा बरं सतत" ती हळूच म्हणायची. त्या दोघांच्या वागण्याकडे वडिलधारी मंडळी जरा दुर्लक्षच करत पण सहान मुलं बघून खुखु खिखि करत.
हळूहळू सगळेच चिंब भिजले. आता गार वाराही जोरात सुटला. सगळेच आता गारठू लागले. आणि एक एक करत सगळे गुहेच्या आत आले. मोठ्या बाबांनी शेकोटीत अजून लाकडं घातली, जाळ मोठा केला. सगळे त्या शेकोटी भोवती उब घेत बसून राहिले.

सीतेला माहिती होतं. आता हा पाऊस असाच खूप दिवस पडत राहील. ती लहान होती तेव्हापासून हा पाऊस तिला खूप आवडत असे. त्याहून जास्त आवडे, ते पाऊस आल्यानंतर आजुबाजूचे सगळे जंगल कसे नवे, ताजे, हिरवेगार होई, ते!  पावसाचे आणि या जंगलाच्या हिरवेपणाचे नाते तिने कधीचेच ओळखले होते. राम भेटल्यापासून तिला, तिचे आणि रामचे नातेही असेच काहीसे वाटायचे.
हा, त्या दोघांचा एकत्र असा दुसरा पाऊस! या आधीचा पाऊस झाला तेव्हा सीता नुकती रामच्या गुहेत रहायला आलेली. पण तेव्हा ती मनातल्या दु:खात इतकी बुडालेली की तो पाऊस तिला फारसा कळलाच नव्हता. आईबाबांना सोडून पहिल्यांदाच इतकी दूर आलेली ती. नवीन लोकं, नवीन गुहा, नवीन जंगल... ती खूप बावरली होती, गोंधळली होती. पण मग तिला हे सगळं ओळखीचं होत गेलं. रामच्या साथीत याही जंगलाचे हिरवे होणे ती अनुभवत गेली. पावसासारखाच राम तिचा सखा होत गेला.

खूप दिवस पाऊस सतत पडत राहिला. हळूहळू जमीन, माती-पाणी यांनी नरम, मऊ, उपजाऊ झाली. गेले काही दिवस सीतेने एक वेगळाच खेळ शोधून काढलेला. गुहेच्या एका बाजुला ती गोळा केलेल्या फळांच्या इवल्या इवल्या बिया मऊ झालेल्या मातीत ठेऊ लागली. कधी गोल आकारात, कधी एका एका रेषेत. कधी डोंगराच्या आकारात तर कधी झाडांच्या फांद्यासारख्या. मऊ मातीत काही वेळाने या बिया हळूच आत जात, नाहीशा होत.  असं करत तिने जमवलेल्या सगळ्या बिया त्या मऊ मातीत झोपून गेल्या, लपून गेल्या...

अन मग एके दिवशी सुर्याचे सोनेरी ऊन जंगलावरती पसरले. गुहे बाहेरचा पाऊस थांबला होता. सगळे आनंदाने बाहेर आले.  सीताही बाहेर आली. आणि चकितच झाली. तिने जिथे जिथे फळांच्या बिया ठेवल्या होत्या, तिथे काही काही छोटी छोटी पाने जमिनीतून वर डोकं करत होती. तिने उत्सुकतेने त्यातल्या एकाला हात लावला. तशी ती पानं हळूच तिच्या हातात आली. माती अजूनही खूप ओली, मऊ होती. त्यातून ही पानं सहज मातीतून सुटून तिच्या हातात आली. तिने नीट पाहिले. तर पानांच्या खाली तिला फळांची बी दिसली. हो हो, तीच बी, जी तिने गोळा केलेली, मऊ मातीत ठेवलेली. अन मातीत लपून गेलेली बी! पण त्या बी मधून ही पानं कशी बाहेर आली? तिला काहीच कळेना. तिने अजून 2-3 पानं काढून बघितली. एकाखाली होती तशीच बी. तर काहींच्या खाली नव्हती. तेव्हढ्यात तिला रामने हाक मारली. खाली नदीकडे चल म्हणून. सीता मग सगळे विसरली. आणि दोघे नदीकडे निघाले.

इतक्यात नदी किती मोठी झालेली! पाणी लालकाळे दिसत होते. नदी नुसती धो धो धावत होती. आता त्या नदीत उतरायची सीतेला भीती वाटली. ती परत फिरली. तिला काही गोष्टी आता अगदी नको वाटायला लागलेल्या. मोठे आवाज नकोत, फार माणसं नकोत, गुहेच्या एका कोपऱ्यात बसून रहायची.

अजून असेच काही दिवस गेले. सीता खूप दिवसांनी गुहे बाहेर आली. तिचे लक्ष गेले तर तिने ठेवलेल्या बियांमधून आलेली छोटी छोटी पानं आता दिसत नव्हती. ती थोडी पुढे झाली तर तिथे मात्र दोन छोटी झुडुपं  उभी होती अजूनही. तिला फार आवडली ती झुडुपं. आता सीता त्या झुडुपांपाशीच बराच वेळ असे. तसंही तिला आता फार हालचाल झेपत नव्हती. ती मग गुहेत नाहीतर त्या झुडुपांपाशीच बसायची. तिच्या हळूहळू दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर ही दोन छोटी झुडुपं अगदी नदीकाठच्या मोठ्या झाडांसारखी होती. त्यांची पानं, त्यांचा रंग, वास सगळं त्या झाडांसारखं होतं. आणि दुसरं, तिच्या पोटात मधेच काहीतरी जोरात हलत असे.

असेच अजून काही दिवस गेले... आता पाऊस अगदीच थांबलेला. सारे जंगल हिरवेगार झालेले. नेहमीप्रमाणे बायका, पुरुष धान्य गोळा करायला, शिकार करायला बाहेर पडली. सीतेला मात्र आता हे अगदीच जमेना. तिच्या पोटाचा घेरही खूप वाढलेला. खाली वाकताना त्रास होई. मोठ्या बायका आता तिची जास्त काळजी घेत होत्या. जास्त बाहेर जाऊ देत नव्हत्या. सीतेलाही गुहेबाहेरच्या त्या दोन झाडांजवळच बसावसं वाटे. आता ती दोन्ही झाडं चांगलीच मोठी झाली होती.

अजून काही दिवस असेच गेले. हवेतला गारठा आता खूपच वाढला होता. सीता आता अजूनच थकली होती. जेमतेम गुहेबाहेर येऊन बसे. ती दोन झाडं आता अगदी नदी जवळच्या झाडांसारखी दिसू लागली होती. 



सीता मनात म्हणाली " ही त्यांच्याहून लहान पण थेट त्यांच्यासारखीच. जणूकाही त्यांची बाळंच! ..." अन अचानक सीतेच्या मनात काही चमकलं. अन तेव्हाच तिच्या पोटातही जोरात काही हललं. ती जोरात ओरडली. पुन्हा पोटात एक कळ उमटली. ती पुन्हा कळवळली. तशी मोठ्या बायका धावत आल्या. त्यांनी तिला आधार देत गुहेत आणलं.

" आई, रामच्या आई,..." सीता कळवळत म्हणाली
" हो ग, हो पोरी कळतय मला. खुप दुखतय ना? थोडं सहन कर. " रामच्या आई तिला थोपटत म्हणाल्या.
" आई,  ती बाहेरची दोन झाडं.... आईग...."
" हा, हा, दमानं जरा. बोलू नको आता काही"
" आई, अहो ती नदी जवळच्या... झाडांची... आईग.... बाळं आहेत..."
" हो हो, बाळच होतय तुला. दम धर. थोडी कळ सोस, बोलू नको बाळा आता काही..."
" आई... आईग... अहो माझ्या बाळाबद्दल नाही, झाडाची बाळं.... आईग..."

अन मग अजून कितीतरी वेळा तिने कळा दिल्या... अन मग एका मोठ्या आई...ग... बरोबर एक नाजूक, छोटासा टॅह्यॉ एेकू आला. अन मग थोड्या वेळाने पुन्हा एका मोठ्या आई...ग बरोबर अजून एक टॅह्यॉ ...
" अगबाई दोन दोन झाडांचं काहीतरी बोलत होती न सीता? बघा दोन बाळं जन्माला आली" रामची आई आनंदाने बोलली. सीतामात्र अगदी थकून गेली होती. पण ती जास्त थकली होती यासाठी, कि जे ती सांगत होती, ते समजलच नव्हतं अजून कोणाला...

झाडांनापण बाळं होतात आणि ती आपण लावू शकतो हे सीतेला मात्र अगदी स्पष्ट कळलं होतं!

हिच ती शेतीची सुरुवीत होती! एका सृजनातून दुसरे सृजन समजले होते सीतेला. अन पुढे समजणार होते साऱ्या मानवजातीला! सृजन, मानवाला मिळालेले एक वरदान!

( अधिक माहिती : ही कथा असली तरी त्यामागची परिस्थिती खरी आहे. इतिहासात पुरावे असं सांगतात की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. अर्थातच तत्कालिन भाषा कशी असेल, संवाद कसे असतील , इतर तपशील यांबाबत तार्किक अंदाजच बांधला आहे.  नावंही अर्थातच काल्पनिक पण परंपरेशी नाळ जोडणारी.)








Thursday, April 6, 2017

4. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
(डिसक्लेमर : कथा सांगताना थोडी लेखकाची स्वयत्तता वापरली आहे; जाता जाता मुलामुलींना पाळीबद्दल सोपी माहिती देता येईल या कारणास्तव)

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.



अगदी थोडं खाली उतरलं की लगेच मोठं रान होतं. मोठं गवत तिथे असे. आधी हिरवं गार अन आता पिवळं धमक.
आज ते कापायला जायचं असं आई म्हणत होती. आता त्यातून धान्याचे दाणे मिळणार होते.  खूप लहान पणापासून आई बरोबर इथे येत होते, त्यामुळे आज मला काही वेगळं वाटलं नाही. या रानात लाल बेरीची काही झाडंही होती. आम्ही मुली त्या बेरी गोळा करत असू. आजही आईला सांगून आम्ही मुली बेरीच्या झाडाजवळ आलो.
 


एकमेकींना मदत करत आम्ही झाडावर चढलो. मस्त लालचुटूक्क बेरी लगडल्या होत्या. मग आम्ही थोड्या तोंडात टाकत, थोड्या खांद्यावरच्या झोळीत टाकत होतो. झाडावरून खाली बघितलं तर, सगळ्या आया खाली गवत कापत होत्या. कसा सरसर हात चालवत होत्या. त्याच्या हातातले दगडी विणे सपासप गवतावर चालत होते.


मध्येच मला हुक्की आली, आपणही कापुयात का गवत? मग मी झाडावरून खाली आले. आई जवळ गेले आणि म्हटलं, " आई मला पण शिकव ना, गवत कापायला. " आई हसली, म्हणाली " अगं थोडी मोठी हो, मग शिकवेन हं " मी नाराज झाले. तिला म्हटलं, " बघ मोठी झालेय की, तुझ्या खांद्या पर्यंत आलेय की " आई हसली, " तशी नाही वेडाबाई, कळेल तुला काही दिवसातच. जा आता सगळ्यांना गोळा कर. गुहेत परतायचय. "

मला काही कळलं नाही, मी अगदीच हिरमुसले आणि परत बेरीच्या झाडापाशी आले. " चला ग सगळ्या परत जायचय. " मी जारा घुश्यातच म्हटलं. मग आमची सगळी वरात परत आली. परत आलो तर दारातच मोठी आई हातात छोटसं गाठोडं घेऊन उभी होती. आई लगबगीने पुढे झाली. " अगबाई आला का नवीन पाहुणा? की पाहुणी? " आजी हसत म्हणाली " पाहुणी आहे हो, छोटीशी "

अरे हां, आई थोड्या दिवसांपूर्वी म्हणालेली, छोट्या आईला बाळ होणारे ! मग काय सगळे ओरडायला लागले, " नवीन बाळ, नवीन बाळ " मग मोठी आई रागावली, " हळु की जरा, बाळ घाबरेल." मग सगळ्यांनी हळूच बाळाला लांबूनच पाहिलं. छोटी आई आत झोपली होती. खूप दमलेली दिसली ती. "आई, छोटी आई तर आली नव्ह्ती आपल्या बरोबर गवत काढायला. मग ती इतकी का दमली ? " मी विचारलं. तशी हसून आई म्हणाली, " कळेल, मोठी झालीस न की कळेल आपोआप ! "
मी पुन्हा विचार करू लागले, कधी मोठी होणार मी? मग बाबा मंडळीही आली. सगळ्यांनी बाळाला बघितलं. सगळेच आनंदात होते.



तेव्हढ्यात बाळ रडायला लागले. इतकुसा आवाज त्याचा. मग मोठ्या आईने त्याला छोट्या आईकडे सोपवले. अन त्या दोघी आत गेल्या.

रात्री सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं यावर खल केला. मी म्हटलं , " बाळ, पिटुकल्या लाल लाल बेरी सारखं आहे, त्याला बेरीच म्ह्णूयात? " सगळेच हसायला लागले. मग छोटी आई म्हणाली, "  पिटुकली लाल म्हणुन लीला म्हणुयात तिला. " आणि मग सगळ्यांनाच ते नाव आवडलं.

रात्री मला सारखी गवत कापायची आणि छोट्या बाळांची स्वप्न पडत होती. एकदा तर गवत कापतना हातातला विळा चुकून पोटाला लागला असा भासही झाला. पोटात एकदम खूप दुखलं ही... अगदी दचकून जाग आली. शेजारी आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपले, तेव्हा जरा बरं वाटलं.



सकाळी आईने उठवलं. तर पुन्हा पोटात खूप दुखलं. माझा कळवळलेला चेहरा पाहून आईने काळजीने विचारले, " काय ग, काय झालं ? काही दुखतय का? "
 " आई पोटात खूप दुखतय.." मी रडतच  म्हटलं. "बरं मग तू पडून रहा आता. मी येते थोड्या वेळाने" आई म्हणाली. आणि भरभर चालत मोठ्या आईपाशी गेली. त्या दोघींचे काही तरी खुसूर-फुसूर झाले. तशी मोठी आई माझ्या जवळ आली. माझ्या जवळ बसून माझी तपासणी सुरू केली. नंतर माझ्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत बसून राहिली.




मग पुन्हा उठली आणि आईला काही तरी सांगितलं. मग आईने बाकीच्या सगळ्यांना नेहमीच्या कामांसाठी पाठवलं.

" आई मलाही जायचय बेरी काढायला " मी उठायचा प्रयत्न करत म्हटलं. तशी मोठी आई चटकन माझ्या जवळ आली. म्हणाली, " थांब इतक्यात नको उठूस. " मला काही कळेच ना? मोठी आई एरवी मला लवकर उठ, लवकर उठ म्हणायची. आज उलटं का म्हणतेय?

सगळे बाहेर, जंगलात, रानात गेले.  तशी आई माझ्या जवळ आली. मोठी आई आता काही महत्वाचे सांगणार याची जाणीव झाली मला. मी थोडी घाबरलेली. काय झालय मला? आता पोटात अजूनच कसं तरी होत होतं. उलटी होईल असंही वाटत होतं. अंगात अगदी ताकदच नाही असं वाटत होतं. आणी पोटात काहीतरी तुटत होतं, काही तरी सुटत होतं...

"सीता, मला वाटतं तू आता मोठी होतेयस." आई.
" म्हणजे आता मी गवत कापू शकेन ? " - मी
मोठी आई हसत म्हणाली. " अग हो , हो, किती घाई तुला? तशी तर मोठी होशीलच. पण त्याहून एक खूप छान मोठेपण येणारे तुला. "
" घाबरू नको बाळा. हे असं सगळ्या मुलींना होतं " - आई
" म्हणजे, असं पोटात दुखण? " - मी
" हो ग, प्रत्येक मुलीला मोठं झाल की दर काही दिवसांनी  पोट थोडं दुखतं. आणि पोटात साचलेली बाळासाठीची गादी साफही होते"
" म्हणजे? मला बाळ होणारे? मला नाही, मला नको बाळ... " मी जोरात रडत म्हतलं.
" अगं , इतक्यात नाही ग होणार तुला बाळ, नको घाबरू. आता फक्त बाळासाठी पोटात मऊ मऊ रक्ताची गादी तयार होते दर महिन्यात. आणि इतक्यात बाळ होणार नाही म्हणुन मग ती पोटातून बाहेर टाकली जाते. तेव्हा थोडं दुखतं सुरुवातीला. पण मग एकदा सवय झाली की नाही दुखत काही. " - मोठी आई.

" मऊ रक्ताची गादी? पण माझं पोट तर इतकुसं आहे, त्यात गादी कशी मावणार? आणि गादी तर मऊ गवताची असते, रक्ताची कशी?" - मी
" अग, पोटाच्या आत गवत कसं रहाणार? तुलाच टोचेल नं? म्हणुन आपल्या रक्ताचीच गादी असते पोटात. अगदी छोटीशी. बाळ पोटात आलं तर ती गादी मोठी होते अन मग बाळही त्यात मोठं होतं. आणि बाळ पोटात नाही आलं तर दर महिन्याला पोटातली रक्ताची गादी हळुहळु चार दिवसात बाहेर पडते. शू बाहेर पडते न तशी. पण शू कशी दिवसातून ७-८ वेळा बाहेर पडते तसं नाही होत."- आई
" ती गादी चार दिवस थोडी थोडी सारखी बाहेर येते.म्हणुन मग आपण कमरेला वेगळी पिशवी लावतो. आणि मग ती सकाळी पलीकडच्या छोट्या ओहळात धूवून टाकून पुन्हा वापरतो. घाबरू नको. मी आणि आई मदत करतो तुला सवय होई पर्यंत." - मोठी आई
" पण मग बाळ कधी येणार पोटात? मला नको इतक्यात बाळ बिळ. ते सारखं रडतं. " मी अगदीच बावचळले होते.
आई हसून म्हनाली. " नाही हं इतक्यात नाही येणार बाळ. तुला हवं तेव्हाच होईल हं. आणि त्यासाठी तुला आधी मित्र शोधावा लागेल. तो तुला आवडावा लागेल. मग बाळबीळ. हं "
मनात काही तरी हुळहुळलं, काय कळलं नाही .. मग म्हटलं, " हा मग ठिक. बरं आता मी जाऊ बेरी गोळा करायला? "
" नाही बाळा, आता हे चार दिवस थोडे सांभाळायचे. आपली ताकद थोडी कमी होते, पोट, पाय दुखू शकतात. म्हणुन हे चार दिवस गुहेतलीच कामं करायची, फारतर खाली फिरून यायचं. पण ही आपली हक्काची विश्रांती बरं " आई डोळे मिचकावत बोलली .
" आणि गवत कापणं? माझ्या विळा? " - मी
" हो ग बाई, आता तुला गवत कापणंही शिकवायचं. तुझ्यासाठी वेगळा विळा तयार करायचा. इतकच नाही तर गुहेतली चित्र कशी काढायची हेही शिकवेल मोठी आई. होना आई ? "-आई
" वॉव, मी मोठी झाले? गवत कापणार आता मी! आणि ती रंगीत मस्त चित्रही काढणार ! आई मला न छान नाच करावासा वाटतोय ! " - मी
" हो , हो, तू मोठी झालीस आता. सगळं शिकायचं आता. पण हळूहळू. गडबड नको हा. आधी आपण नवीन पिशवी कशी बांधायची शिकायचय, हो ना? " - मोठी आई
" हो, हो. चला आता आपण पलिकडच्या ओहळा कडे जाऊ. " - आई.

आम्ही बाहेर पडलो. मला आता खूप छान वाटत होतं. मी मोठी झाले होते. मला गवत कापता येणार, चित्रं काढता येणार, आणि नंतर मित्रही शोधायचाय अन बाळही... आईला मी नाही म्हटलं पण आत मनाच्या एका कोपर्‍यात मित्र, बाळ म्हटल्यावर लक्कन काहीतरी हललं होतं.

हो, मी मोठी झाले होते !

___

( ते बेरीचे झाड सोडता बाकीची चित्र मीच काढली आहेत फोटोशॉपमध्ये. बेरीचे झाड मीच काढलेल्या फोटोला बेर्‍या चिकटवल्यात अन जरा फोशॉ इफेक्ट दिलेत ;)  हे लिखाण पूर्णतः माझी कल्पनाशक्ती आणि तर्कशास्त्र यावर आधारित आहे. सो "पुरावे द्या" ह्याला यावेळी पास )

Tuesday, April 4, 2017

3. आणि मी मोठा झालो.

(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )


रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !
सगळी मुलं गप्प बसून ऐकू लागली. छोटी मुलं आपापल्या आयांच्या मांडित जाऊन बसली.

" आज आम्ही डोंगरापलीकडच्या जंगलात गेलो होतो. आज तुम्ही जे लाल मुळे खाल्ले ना; ते त्या जंगलात खुप उगवतात. तुम्हाला ते जसे आवडतात तसे ते सशांनाही खुप आवडतात. त्यामुळे त्या जंगलात ससेपण खुप असतात. " बाबा सांगू लागले.

" रामचे बाबा ससे म्हणजे काय? " आमच्यातला नुकताच मोठा होउ लागणार्‍या बंटीने विचारले.

मोठे बाबा उठले आणि दिव्याजवळ गेले. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. दिव्यापलिकडच्या भिंतीवर आता मोठे बाबा मजेची चित्र दाखवणार म्हणून सगळे खुष झाले होते.

मोठ्या बाबांनी दिव्याची वात मोठी केली. आणि ते दिव्याच्या पलिकडे जाऊन उभे राहिले.
मग त्यांनी एक हात आडवा केला. दुसर्‍या हाताची बोटं त्या हातावर ठेवली.
आणि एका तालात दोन्ही हात उड्या मारत पुढे नेऊ लागले.
त्याबरोब्बर मागच्या भिंतीवर ससा आला अन उड्या मारू लागला.
मध्येच त्याने कान हलवले. मग तोंड हलवले.


पुन्हा उड्या मारत तो अंधारात पळून गेला.
मग मोठ्या आजोबांनी विचारलं, " कळला का ससा? "
"हां हां, म्हणजे मीनाच्या डोक्यावर भिंतीवर जे चित्र काढलय ते ? " बंटी म्हणाला.
आता बंटीला ससा म्हणजे काय ते बरोब्बर समजलं होतं.

तेव्हढ्यात सखादादा पुढे आला.
त्याने डोक्यापाशी हाताची दोन - दोन बोटं वर करून सश्यासारख्या उड्या मारायला सुरूवात केली.
मग काय आम्ही सगळेच सश्यासारख्या उड्या मारू लागलो.

बाबांची गोष्ट तशीच राहिली.
थोड्या वेळाने मोठे बाबा म्हणाले, "चला आता मुलांनी झोपायला जा. आम्हाला थोडं बोलायचयं आहे. " आम्ही सगळी छोटी मुलं उठलो आणि आईंबरोबर आत गेलो.

बाहेर सगळे बाबा थोडावेळ बोलले. मग तेही आले झोपायला.
माझे बाबा आले अन म्हणाले, " बरं का, मोठ्या बाबांनी सांगितलय; उद्यापासून रामलाही बाहेर घेऊन जायचय. तो आता मोठा होतोय. जंगलचे कायदे त्याने शिकायला हवेत. "
आई काळजी करत म्हणाली, " अहो, अजून लहानच आहे तो. इतक्यात कशाला? "

पण मला मात्र खुप आनंद झाला. मी मोठा झालोय अन उद्या मला जंगलात जायला मिळणार , अरे वा !
बाबा हसून म्हणाले, " अगं तुला तो कितीही मोठा झाला तरी तसच वाटेल. पण ते काही नाही. उद्या राम येईल आमच्याबरोबर. काय राम येणार ना? "
मी जोरजोरात हो म्हणून मान हलवली.

आता मला झोपच येईना. बाहेरचे रातकिड्यांचे, माकडांचे इतर प्राण्यांचे, खालच्या नदीच्या पाण्याचे आवाज ऐकत; त्यांना मनातल्या मनात सांगत बसलो; ' उद्या भेटूच!'

"राम, ए राम! अरे ऊठ ! तुला आज जंगलात ना जायचय? चल ऊठ ! " आई हाका मारत होती.
मी डोळे उघडले. बघतो तर काय अजून रात्रच होती.
"आई, झोपू दे ना थोडं अजून. आम्हाला सकाळी जायचय. अजून तर बाहेर अंधारच आहे."
"ऊठ राम," बाबांचा आवाज आला. " अरे आत्ता होईल पहाट ! आपल्याला खुप दूरवर जायचय. चल उशीर होईल. सगळे तयार झाले बघ !"

मग मात्र मी लगेच ऊठलो. पटकन तोंड धुतले, आईने दिलेले पाणी प्यायलो. आणि बाबांसमोर जाऊन उभा राहिलो.
"राम हा टोकेरी दगड धर हातात. पाडायचा नाही बरं का ! जंगलात टोकेरी दगड जवळ असलेला बरा. काल रात्री हा मी खास तुझ्यासाठी ठोकून, घासून तयार केलाय बरं का ! " बाबांनी बोलत बोलत हात पुढे केला.
त्यांच्या हाततला तो टोकेरी दगड घेताना कसलं भारी वाटलं, सांगू !






आईने माझ्या कमरेला एक वेल बांधली. मी त्या वेलीत तो दगड पोटाशी खोचून ठेवला. आईने एक मुळाही त्या वेलीत बांधला. म्हणाली, " भूक लागली तर खा बरं का ! "

हळूहळू गुहेच्या तोंडाशी सगळे बाबा अन मोठी मुलं जमली.
मोठ्या बाबांनी मला हाक मारली.
म्हणाले, " हं राम, आज तुझा पहिला दिवस ! सगळ्या मोठ्यांना नमस्कार करा ! "
मी लगेच सगळ्यांना वाकून नमस्कार केला.

"हं. शाब्बास! आता महत्वाचे ऐक !" मोठे बाबा सांगू लागले. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो.
" जंगलात जाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे एकट्याने कोठेही जायचं नाही. टोळीच्या शेवटी राहायचं नाही. सुरूवातीला काही दिवस टोळीच्या मध्यातच तू चालायचं. जंगलात आपले कान, डोळे, नाक उघडे ठेवायचे. पण तोंड मात्र अगदी बंद ठेवायचे. चालतानाही खाली बघून नीट चालायचं. बाकी सर्व गोष्टी तू हळूहळू शिकशीलच. "

आता मोठी आई पुढे आली.
मला जवळ घेऊन म्हणाली, " बरं का मुला, ही आपली टेकडी आणि गुहा लक्षात ठेव. आपल्या टेकडीची खूण म्हणजे हे मोठं झाड बरं का ! खुप लांबूनही लक्षात येतं हे झाड. त्याच्यावरच्या आगीच्या रंगाच्या फुलांचाही रंग लक्षात ठेव. त्याच्या मागच्या झाडांच्या पानांचा रंग लक्षात ठेव. इतर झाडांपेक्षा गडद रंगाची ही झाडं वेगळी दिसतं बघ !
आणि हो, एकटा कुठे जावू नको. मोठ्यांचे ऐक. गुहेच्या बाहेरच्या जगात खुप वाईट गोष्टी आहेत. काळजी घे. स्वतःला जप ! नीट जा हो." मोठ्या आईने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मला जरासं रडूच आलं. मग सगळे हसू लागले.

आई चटकन पुढे झाली माझे डोळे पुसले. अन म्हणाली " मोठा होतोय माझा सोन्या! "

" चला तर. सगळे आले ना? " मोठे बाबा म्हणाले.
आता मलाही घाई झाली होती जंगलात जाण्याची !
तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी एक लांब वेल तोडली. तिचे एक टोक माझ्या हाताला बांधले अन दुसरे टोक माझ्या बाबांच्या हातात दिले. आता मी हरवण्याचा प्रश्नच नव्हता.

आणि मग आम्ही सगळे गुहेच्या बाहेर पडलो.

मग आम्ही सगळे टेकडी उतरू लागलो. हळूहळू उजेड होत होता. सूर्यदेव आकाशात आला. सगळीकडे चकचकीत उजेड झाला. आम्ही आता नदीच्या जवळ आलो. नदीत सगळ्यांनी स्वच्छ होऊन घेतलं. मला तर नदीत डुंबायला खुप मज्जा आली. मग बाहेर आलो.

तेव्हढ्यात मोठे बाबा ओरडले, " राम! हातातला वेल कुठे आहे? का काढलास ? "
मी घाबरलो, रडू लागलो. नदीत पाण्यात खेळताना तो कधी गळून पडला, हे कळलंच नव्हतं.
बाबाही मला हाका मारत धावत पुढे आले. ती वेल त्यांनी पुन्हा माझ्या हाताला बांधली, यावेळेस जरा जास्तच घट्ट !

मग आम्ही नदीच्या कडे कडेने थोडे वर जाऊ लागलो.
"बाबा, जंगल तर तिकडे खाली आहे. आपण वर का जातोय? " मी जरा जोरातच विचारलं.
"शूsss! राम हळू बोल बरं. बघ तो ससा घाबरून पळून गेला बघ. अशाने आपण शिकार कशी करणार? आणि दुसरं म्हणजे, आपल्याला जंगलात जायचं तर नदी ओलांडावी लागते. अन वरच्या अंगाला नदी छोटी असते. शिवाय तिथे मोठे मोठे दगड असल्याने त्यांच्यावरून नदीच्या पलिकडे जाणं सोपं जातं.

चल आता लवकर लवकर. आपल्याला टोळीच्या मध्ये राहायला सांगितलय ना मोठ्या बाबांनी ? " बाबांनी समजावलं.

जंगलातल्या माझ्या शिक्षणाची अशी सुरुवात झाली. जंगलात हळू का बोलायचं आणि नदी कोठून ओलांडायची याची माहिती आता मला मिळाली होती.

हळूहळू आजूबाजूची झाडं गच्च व्हायला लागली. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. मध्येच माकडं ओरडत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. बाबांनी हळुच सांगितलं, " आपण आलोय हे माकडांना समजलं की ते हे असं ओरडून म्हणजे हूल देऊन, सांगतात बरं का इतर प्राण्यांना ! "

तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी हात वर केला अन ते थांबले. त्याबरोब्बर सगळे थांबले. मला आपोआप कळले, आता अजिबात आवाज करायचा नाही. मोठ्या बाबांनी बोटानी खूण केली. पुढे उजवीकडे थोडी मोकळी जागा होती. अन मध्ये गवताचे रान उगवले होते. सकाळच्या उन्हात खुप ससे छोटी झुडुपं उकरून त्या खालची गाजरं खात होते.

अरे वा ! आज पहिल्यांदा मी शिकार पाहणार होतो, नाही-नाही करणार होतो. बाबा, मोठे बाबा यांनी सांगितलेल्या कितीतरी शिकारीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण आता मी ती शिकार प्रत्यक्ष पाहणार होतो. अनुभवणार होतो.

हळुहळु सगळे लांब लांब झाले. लांबूनच सगळ्यांनी त्या सशांभोवती गोल केला.


आणि खाली वाकून, हळुहळू, आवाज न करता सगळे जवळ येउ लागले. आता ससे आमच्या अगदी दोन हातांवर होते. मला तर त्यांना उडी मारून पकडावे वाटत होते. तेव्हढात एका माकडाला आमची चाहूल लागली अन त्याने हूल दिली. म्हणजे वेगळाच आवाज काढून सशांना सांगितलं, "माणसं आलीत."

माकडाच्या त्या आवाजासरशी सगळे ससे सुसाट पळत सुटले. मग आम्हीपण जलदी केली. पटापट त्या सशांवर आपले टोकेरी दगड मारले. काहींनी सशांवर उड्या मारल्या अन त्यांना हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात मी पण एका सशाला पकडण्यासाठी धावलो. पण माझ्यापेक्षा तो ससा जास्ती अनुभवी होता ना ! तो माझ्या पायांतून उडी मारून पळून गेला. मध्येच काहींचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. सशांचेही ओरडणे ऐकू आले. मग थोड्यावेळाने सगळे शांत झाले.

प्रत्येकाने आपापले टोकेरी दगड शोधून काढले. आणि मग आम्ही सगळे एकत्र आलो. सगळ्यांनी मिळून हाताच्या बोटांइतके ससे पकडले होते. त्यातले काही जिवंत होते. मग मोठ्या बाबांनी बंटीच्या बाबांना हाक मारली. त्यांच्याकडे जुनी मोठी वेल होती. त्या वेलीने सगळे ससे एका वाळक्या फांदीला बांधून घेतले.

" चला आता आपण रताळी गोळा करूयात." मोठे बाबा म्हणाले.
मग मला बाबांनी रताळ्याचे झाड कसे ओळखायचे ते शिकवले. लांब, थोडीशी खरखरीत हिरवी पानं पाहून मी ते झाड जोरात ओढले. तशी फक्त काही पानं तुटून माझ्या हातात आली, अन मी मागे धाडकन पडलो. सगळी हसू लागली.

बाबांनी मला उठवले, म्हणाले, " अरे घाई करू नको. आधी सगळे समजून घे. मग कर. बरं का रताळे असे उपटू नको. हातात काहीच येत नाही. इतकं सोपं नसतं कोणतही काम ! " बाबा सांगू लागले. " हे बघ तुझ्याकडे तो टोकेरी दगड आहे ना? त्याने आधी या झाडाच्या खालची माती बाजूला करायची, ही अशी बघ." बाबा दाखवू लागले.


झाडाची मूळं अन त्याच्या खालचे रताळे मोकळे करून घायचे. मग ते ओढायचा. कळलं ? "

मी लाजलो. " बरं, बरं. " म्हणत कमरेशी खोचलेला टोकेरी दगड बाहेर काढला.
आता घाई न करता, बाबा कसं करताहेत ते बघत बघत, तसे करत मी हळूहळू रताळे बाहेर काढले. मला इतका आनंद झाला. मी मोठ्यांदा ओरडलो, "माझे रताळे, माझे रताळे ! " सगळ्यांनी मला शाब्बासकी दिली.


मोठ्या बाबांनी मला जवळ घेतलं. मला खुप अभिमान वाटला. रताळे माझ्या कमरेशी लटकवत मोठे बाबा म्हणाले, " आज जे जे रताळे तू काढशील ते सगळे तुझ्याजवळ ठेव. गुहेत गेल्यावर ते सगळी रताळी मोठ्या आईला दे आणि नमस्कार कर. ती सगळ्यांना तुझी रताळी वाटेल. आजची ही तुझी पहिली कमाई ! शाब्बास ! असेच कष्ट कर. आपल्या कुटुंबाला वाढव, सांभाळ ! शाब्बास पोरा ! "

मला खुप आनंद झाला होता. पहिल्यांदा वाटलं, 'नाही नाही , हे माझे रताळे आहे. तो मीच खाणार !' पण मग मला मोठ्या बाबांचं म्हणणं पटलं. मी आता मोठा होतोय. माझ्या आधी माझ्या कुटुंबाला मी दिलं पाहिजे. त्यामुळे सगळी रताळी मोठ्या आईलाच दिली पाहिजेत.

मी उत्साहाने नवीन झाडं शोधू लागलो. पुन्हा हळूहळू माती बाजूला करून रताळी बाहेर काढू लागलो. मी आता नक्कीच मोठा झालो होतो. मी भराभर काम करू लागलो. काढलेली रताळी माझ्या कमरेतल्या वेलीत खोचू लागलो.

"राम, राम. आता पुरे."बाबा म्हणाले. " पहिल्याच दिवशी एकदम फार जोर करू नकोस. हात सोलून निघतील."
मी थांबलो. हातांकडे बघितलं तर सगळे लाल लाल झाले होते. हातावरची माती झटकत मी उभा राहिलो. पाठ दुखत होती अन हातही चुरचुरत होते.

मी आजूबाजूला बघितलं. बाकीच्यांनी खुप रताळी गोळा केली होती. त्यांच्या छोट्या छोट्या जुड्या त्यांनी वेलींनी बांधल्या.

आता आम्ही परत नदीकडे निघालो. नदीवर आल्यावर सगळे थांबले. सगळ्यांनी आपापले हात, पाय, तोंड नदीच्या पाण्यात धुतले. मलातर नदीच्या गार पाण्यातून हात बाहेर काढवतच नव्हते. बाबा म्हणाले तसे खरोखर हात सोलून निघाले होते. नखांत माती साचली होती. डोक्यावर माती उडाली होती. मग बाबांनी मला सरळ आंघोळच घातली

 :heehee: आता उन चढू लागलं होतं. सगळ्यांना भूकाही लागल्या होत्या. आम्ही भराभर गुहेच्या दिशेने चढू लागलो. लांबूनच आम्हाला पाहून लहान मुलं धावत पुढे आली. मला आठवलं , पूर्वी मीही असाच धावत येत असे. मुलांच्या मागोमाग आई होती. तिला बघताच मी धावत सुटलो. तिच्या कुशीत शिरलो. आईपासून इतका वेळ लांब मी पहिल्यांदाच राहिलो होतो.

तेव्हढ्यात आईचे लक्ष माझ्या हातांकडे गेलं. तिला तर रडूच फुटले. मी म्हटलं, " अगं आई, इतकं काही नाही दुखते." बाबाही रागवले, " अगं मोठा होतोय तो. थोडं लागणारच. त्याने जरा घट्ट्मुट्ट व्हायलाच हवय. आणि त्यापेक्षा त्याची कमाई बघ :) अरे राम, दाखव ना तुझे रताळे, तिला !"

मी आनंदाने कमरेला खोचलेले रताळे तिला दाखवले. तिने आनंदाने माझे मुके घेतले.
 "राम" मोठ्य बाबांनी हाक मारली. " राम , अरे तुझी पहिली कमाई मोठ्या आईला दे. " मी पुढे झालो. मोठ्या आईला नमस्कार केला. आणि हातातले रताळे तिला दिले. मोठ्या आईने खूप महत्वाच असल्यासारखे ते हातात घेतले. अन माझ्या आईला हाक मारली. " कौसल्या, यावर तुझा अधिकार बरं !"

आईनेही हसत ते हातात घेतले. "राम, सगळ्यांना नमस्कार कर बरं. आज तू मोठा झालास. कुटुंबाची जबाबदारी हळुहळू उचलायला लागलास. शब्बास ! " आईने मला जवळ घेत म्हटलं.

मग आम्ही सगळे जेवायला बसलो. मुळे, फळं आणि हो, मी काढलेल्या रताळ्याचा एक एक तुकडाही ! प्रत्येकाला मोठी आई वाढत होती. छोटी मुलं माझ्याकडे आदराने बघत होती. अन सगळे मोठे दादा आता माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्याशी जंगलातल्या गप्पा मारू लागले.

 खरच, एका दिवसात मी मोठा झालो होतो.

Sunday, April 2, 2017

20. मध्य युगाचा शेवट आणि प्रबोधन काळाची सुरुवात

निसर्गाच्या घडामोडीतील मानवची निर्मिती काही  लाख वर्षांपूर्वीची .  त्यातही आजच्या मानवाचा इतिहास  गेल्या एक लाख  वर्षांपासूनचा.
या संपूर्ण इतिहासाचे दोन प्रमुख भाग पडतात. इतिहासपूर्व  काळ आणि ऐतिहासिक काळ .
ऐतिहासिक कालखंडाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन मुख्य भाग पडतात.  प्राचिन प्रगत संस्कृतीचा काळ साधारण इ.स.पू. ५००० ते इ.स. ५०० पर्यंत मानला जातो. सुमेरियन, चिनी, इजिप्त, सिंधु, ग्रीक, रोमन या काही महत्वाच्या संस्कृती. शेती, व्यापार, शासनव्यवस्था, विज्ञान, कला, साहित्य अश विविध अंगांनी या संस्कृत्यानी आपली प्रगती साध्य केली.

कालांतराने या संस्कृती काही कारणांनी एकतर नामशेष झाल्या अथवा तेथील राज्यकर्ते दुर्बळ बनले.  त्यामुळे या संस्कृतीं मधली प्रगती थंडावली.  येथून  पुढील  काळात त्या त्या मानवी समाजामध्ये शिथिलता, धर्माचे प्राबल्य, कर्मकांडांचे महत्व आणि एकूणच आहे त्या परिस्थितीत राहण्याचा कल निर्माण झाला.  स्वाभाविकच प्रगती नाही, नवे विचार नाहीत, नवीन शोध नाहीत अशी काहीशी स्थितिशील जीवनपद्धती या मानवी समुहांनी स्विकारली.  म्हणूनच या कालखंडाला अंधकाराचे युग, तमोयुग असे म्हटले गेले.  हेच ते मध्ययुग!
प्रदेश परत्वे या मध्ययुगाचा कालखंड वेगवेगळा होता. युरोपमध्ये साधारण सहावे ते तेरावे शतक, आशिया खंडात नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका पर्यंत तमोयुग मानले जाते.
साचेबंदपणा, अराजकता, अंधश्रद्धा, अस्मानता, काम आणि मोबदला याचे विषम वाटप ही या मध्ययुगाची काही ठळक वैशिष्ठ्ये !
कालांतराने याही परिस्थितीमधे बदल होऊ लागला. समाजातील सरंजामदार, धर्मगुरु यांचे महत्व कमी होऊ लागले. राजा, व्यापारीवर्ग, मध्यमवर्ग यांचे स्थान महत्वाचे बनू लागले. ख्रिश्चन मुस्लिम धर्मीयांमधे संघर्ष होऊ लागला. युरोपमधील लोकांचा इतर खंडातील लोकांशी संपर्क वाढू लागला. भौगोलिक शोध, राजसत्तेचा वाढता प्रभाव, नवीन शास्त्रीय शोध, कलेच्या क्षेत्रातील नवीन विचार-प्रयोग सुरु झाले. धर्माबाबत विचार सुरु झाला.
समाजातील ह्या नवीन वैशिष्ठांनी युक्त अशा काळाला प्रबोधन कालखंड ( रेनेसाँ पिरियड) असे संबोधले जातेे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद इ. नवीन आधुनिकतेची मुल्ये या प्रबोधन काळाची देन आहेत.  

या सर्व घडामोडींची सुरुवात झाली ती एका वेगळ्याच घटनेमुळे ! त्याकाळातही युरोपमधील देशांचा  आशिया खंडातील देशांशी  यांचा व्यापार  चालत असे, हा व्यापार  प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने- जमिनीवरील रस्त्यामार्फत. या व्यापारीमार्गावरती एक महत्वाचे ठिकाण होते ते म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल! 
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांची ताकद वाढत गेली. अरबस्थानातील तेव्हाची प्रगतीहि  आपण पाहिली . या त्यांच्या प्रगतीमुळे त्यांची ताकद वाढत गेली. आणि १४५३ मधे या अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांनी कॉन्टंटिनेपल जिंकून घेतले. तसं बघायला गेले तर त्या काळात एखादे शहर, एखादा देश जिंकण हरणं सतत होत होतं, कारण या काळात सतत लढाया होतच असत. पण कॉन्टंटिनपलची गोष्टच वेगळी होती. ज्याचा कॉन्टंटिनपलवर कब्जा त्याचा युरोप व आशियाच्या व्यापारावर ताबा. अशी परिस्थिती होती. 

आता पर्यंत या व्यापारावर युरोपीय ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा मक्ता होता. पण व्यापारी मार्गावरचे मोक्याचे ठिकाण,  कॉन्स्टॅन्टिनोपल मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाती गेले. अन सगळा खेळ पालटला. पूर्वी व्यापारी ख्रिश्चन अन राज्यकर्तेही ख्रिश्चन. त्यामुळे या व्यापाराला चालना मिळावी म्हणून ख माफक असत. पण आता राज्यकर्ते मुस्लिम अन व्यापारी ख्रिश्चन. स्वाभाविक राज्यकर्त्यांनी कर वाढवले. जो व्यापार पूर्वी अतिशय फायद्याचा होता; आता तो इतका फायद्याचा राहील नाही. स्वाभाविकच आता काय करता येईल? ज्यान्वये पूर्वी सारखा व्यापार फायदेशीर होईल असा विचार करणे भाग पडले. 
अन मग त्यातून कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ऐवजी दुसरा कोणता मार्ग आपल्याला सापडू शकतो का याचा प्रयत्न सुरु झाला. अनेक खलाशी पुढे झाले. अनेक ख्रिश्चन, युरोपीय राजांनी आर्थिक मदत या खलाशांना देऊ केली. एकुणात व्यापार पुन्हा फायद्याचा व्हावा हि सर्वच युरोपियन लोकांची गरज होती. अन जसे प्रयत्न सुरु झाले; नवे मार्ग सापडत गेले. कोलंबस हा खलाशी नवा मार्ग शोधता शोधता चुकून नवीन भूमीवर  अमेरिकेच्या बेटांवर गेला. तर वास्को ग गामा हा संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून थेट भारतात पोहोचला. तर मॅगेलन याने पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणाच केली. 

एकदा का माणूस विचार करू लागला कि हे विचार करणे सर्वच बाबतीत करू लागतो. या नवीन व्यापारी मार्गांबाबतही तसाच झाले. जर व्यापारासाठी नवीन मार्ग सापडू  शकतो तर इतर बाबतीतही काही वेगळे मार्ग असू शकतील का याचा विचार मध्ययुगीन माणूस करू लागला. मग यातूनच विविध कला- चित्र कला, शिल्पकला, संगीत यांत काही नवीन विचार, प्रयोग सुरु झाले. इतकेच नाही तर एकुणातच आपल्या जीवनपद्धतीबाबत माणूस नवीन विचार करू लागला. मग राजा, देव, धर्म, मूल्य, तत्त्वज्ञान या सर्वांबाबत विचार सुरु झाले. 

तशात आता पर्यंत ख्रिश्चन धर्म हाच श्रेष्ठ धर्म असे युरोपीय जगात मानत होते. पण असे असूनही ख्रिश्चन आणि मी इस्लाम धर्मीय यांच्यातील युद्धात आता फक्त ख्रिश्चनांचाच विजय अशी परिस्थिती राहिली नाही. आपण समजतो त्यापेक्षा प्रत्यक्षात काही वेगळे घडू शकते, वेगळे असू शकते. आपण आजपर्यंत मानत होतो त्यापेक्षा वेगेळे वास्तव असू शकते याची सुस्पष्ट जाणीव युरोपीय समाजाला होऊ लागली. यामुळे धर्माबाबत नवीन विचार मांडले जाऊ लागले. 

या सर्व घडामोडींमुळे आजवर जे जे मानले ते ते पुन्हा तपासून बघायची प्रेरणा युरोपमध्ये निर्माण झाली. यातूनच मग अनेक नवनवे विचार, तत्वज्ञान, नवनव्या पद्धती युरोपमध्ये मांडलया जाऊ लागल्या. आपली आजवरची सर्व जीवनपद्धती पुन्हा तपासून पाहिली जाऊ लागली. यालाच रेनासान्स किंवा प्रबोधन असे म्हटले जाते. प्र -बोधन म्हणजे प्रकर्षाने बोध होणे - समजणे. दिसणे आणि पाहणे, माहिती आणि ज्ञान. यात जो फरक आहे तो यात  अपेक्षित आहे. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण तरी ती आपल्याला जाणवत नाही वा आपले लक्ष जात नाही, हे पाहणे वा माहिती.  पण जेव्हा त्या गोष्टी बद्दल आपल्या नीट जाणीव होते , आपल्या मनात त्या  गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद होते तेव्हा ते दिसणे असते, ते ज्ञान असते.  चवदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये हे असे  प्रत्येक गोष्टीबाबत जाणीवपूर्वक ज्ञान होणे घडू लागले. आणि म्हणून या काळाला युरोपचा प्रबोधन काळ असे म्हटले जाते. या प्रबोधन काळात काय काय बदल झाले ते आपण पुढे पाहू. 


Thursday, March 2, 2017

न्या. महादेव गोविंद रानडे


भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.
राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.
सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.
इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.
भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.
न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.
भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.
समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.
समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.
भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.
कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.
येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.
राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.
न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.
न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.
एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.
ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.
तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.
एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

18. मध्ययुग आणि महाराष्ट्र


( डिसक्लेमर : शिवाजी इतका हृदयाच्या जवळचा आहे की त्याला अहोजाहो म्हणताच येत नाही. तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे जाऊ नयेत हिच इच्छा!
आदरार्थी बहुवचन! मराठी भाषेचं हे वेगळेपण कधी कधी भयंकर त्रासाचं ठरतं. माझ्यापुरता मध्यम मार्ग मी सर्वच वैचारिक लिखाणांपुरता काढला. तो म्हणजे आधुनिक कालखंडातील प्रत्येकाला आदरार्थी बहुवचन लावेन. प्राचीन, मध्ययुगीन काळातली व्यक्ती कितीही आदरणीय असली तरी तो आदर मी लिखाणात केवळ आदरार्थी बहुवचन वापरून करण्याएेवजी त्या व्यक्तीचे मोठेपण मांडून व्यक्त करेन.
आधुनिक कालखंड हा जास्त जवळचा असल्याने ह्या कालखंडातल्या व्यक्ती, अगदी जिवंत असण्याचीही शक्यता अाहे. तेव्हा या कालखंडातील सर्व, अगदी सर्व व्यक्तींना मात्र मी हे आदरार्थी बहुवचन वापरेन. काहींना हे खटकण्याची खूप शक्यता आहे. पण यात केवळ एक सोय अभिप्रेत आहे.)
____________

फाल्गुन वद्य तृतिया नुकतीच होऊन गेली. शिवजयंतीचा उत्सव पार पडला. मध्ययुगात होऊन गेलेला एक आगळावेगळा राजा! आज त्याच्या बद्दल बोलणार आहे.
लक्षात आलं ना मी का मध्ययुग निवडलं. शिवाजी म्हटलं प्रत्येक मराठी माणसाला भरून येतं, अभिमानाने मान ताठ होते. राजा असावा तर असा, अशी भावना मनात येते.
या शिवाजी बद्दल इतकं लिहिलं गेलय, जातय की मी नवीन काय सांगणार?
आजकाल व्हॉट्स अपच्या माध्यमातून तर महापूर लोटतो ज्ञानसागराचा. तिथे काही विरोध केला, पुरावे मागितले की लगेच मानभंग वगैरे होतात. त्यामुळे अशा कोणत्याच गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.
मी बोलणार आहे ते फक्त आणि फक्त मध्ययुगातील एक वेगळी दृष्टी असणार्‍या , स्वत:चा वेगळा ठसा पाडणार्‍या, त्याकाळाची बंधने ओलांडून पुढे जाणार्‍या एक दूरदृष्टी असलेल्या , समंजस, सहृदय, कर्तव्यकठोर अशा शहाजी आणि शिवाजी या पितापुत्रांविषयी ! शहाजी, शिवाजी कसे घडले , कोणत्या परिस्थितीत घडले , त्यांचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न करते. खूप मोठा विषय, पण थोडक्यात मांडणार आहे.
तर मध्ययुगात महाष्ट्रात यादवांचे राज्य मोडून बहामनी राज्य आलेलं. पण त्याचीही विभागून पाच वेगवेगळी शकलं झालेली. पैकी महाराष्ट्रात उत्तरेकडची मुघल सत्ता, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आशा तीन वेगवेगळ्या सत्तांचे आलटून पालटून नियंत्रण होते. सतत कोणाचा न कोणाचा सत्ता संघर्ष , युद्ध चालत होती. शिवाय स्थानिक वतनदारांचे एकमेकांशी असणारे संघर्षही चालूच असत. जोडीने वेळोवेळी पडणारे दुष्काळ, कोणीच वाली नसल्याने न मिळणारी मदत, यामुळे महाराष्ट्रातील जनता अगदीच हवालदिल झाली होती. अनेक गावे ओस पडली होती. अनेक कुटुंबे आपली वहिवाटीची जमीन सोडून परागंदा झालेली. एकंदरच कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नाही; अंदाधुंदी, कोणी वाली नाही, युद्ध, अस्थिरता, असा अतिशय असंतोषाचा काल महाराष्ट्र अनुभवत होता.
इतिहासातील गुप्त साम्राज्य, यादव राजवट, वाकाटक राजवट, विजयानगराचे साम्राज्य अशा अनेक उत्तम राजपदांचा अनुभव असल्यामुळे मध्ययुगातील जनतेला अन्याय, असुरक्षितता खूपच जास्त जाणवत होती.
या परिस्थितीत वेरुळच्या एका घराण्याने पुढाकार घेतला. मालोजी आणि विठोजी भोसले या भावंडांनी आपले लष्करी कर्तृत्व निजामशाही मध्ये राहून दाखवले. मालोजीचा पुत्र शहाजी यानेही आपले लष्करी कर्तृत्व सिद्ध केले.
शहाजीचा काळ तर अजूनच अंदाधुंदीचा होता. सतत कटकारस्थाने, युद्धे चालू होती. तत्कालिन सर्व राज्यकर्ते; मुघल सम्राट , निजामशहा, आदिलशहा हे आपापल्या वर्चस्वाखाली जास्तीत जास्त प्रदेश आणण्यासाठी कोणतेही विधीनिवेश पाळत नव्हते. स्वाभाविकच प्रत्येक सरदार, वतनदार सतत सत्ताबदल करत. शहाजीचीही परिस्थिती अशीच होती. कधी निजामशाही; तिथे दगाफटका झाला कि आदिलशाहीकडे . तिथे कमी महत्व मिळाले कि पुन्हा निजामशाही. तिथे कारस्थाने झाली कि मुघलांकडे. तिथे दगाफटका झाला कि पुन्हा आदिलशाही, तिथे अंदाधुंदी कि पुन्हा निजामशाही. अशी त्रिस्थळी यात्रा सतत सुरु होती.
या सगळ्यात शहाजीच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.
१. मुगलांचा दक्षिणेत शिरकाव होता कामा नये.
२. स्वत:च्या अधिकारातला काही परगणा- प्रांत हवा.
३. स्थानिक लोकांचे राज्य असायला हवे.
४. त्यासाठी काही हुशार, जिवाला जीव देणार्‍या आणि निष्ठावान व्यक्ती शोधून त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजेत.
यादृष्टीने शहाजीने हालचाली सुरु केल्या.
१. पुणे, सुपे, चाकण येथील वतनदारी आपल्या नावावर करून घेतली. निजामशाही, आदिलशाही इतकेच नव्हे तर मुघलांकडूनही त्या वेगवेगळ्या वेळी मान्य करून घेतले.
२. महाराष्ट्रात निजामशाही वा आदिलशाही बलवान व्हावी यासाठी प्रयत्न केले.
३. शिवाजीची रवानगी पुण्याला केली.
४. शिवाजी बरोबर अत्यंत हुशार, निष्ठावान, विश्वासू अशा व्यक्तींचे "प्रधान मंडळ" सोबत दिले.
५. वेळोवेळी शिवाजीच्या आक्रमक हालचालींची पाठराखण निजामशाही-आदिलशाहीमधे केली.
शहाजीचा हा सगळा विचार, कृती निश्चितच मध्ययुगाचा विचार करता फार वेगळी होती. मध्ययुगातून महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळालेली दिसते ती शहाजीच्या कारकिर्दीपासून! शहाजीने हे सगळे अतिशय विचारपूर्वक, नियोजनबद्ध केलेले दिसते. हीच दूरदृष्टी , नियोजन पुढे शिवाजीनेही दाखवलेले दिसते.
शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१; इंग्रजी कॅलेंडर नुसार स.न. १९ फेब्रुवारी १६३० . अत्यंत धामधुमीचा - मुघलांच्या आक्रमणाचा काल. सुरुवातीची, बालपणीची सहा वर्षे शिवाजी सह्याद्रीच्या गडकोटांवर होता. पुढे सहा वर्षे बंगळूरला शहाजीच्या बरोबर होता. १६४१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शिवाजीला शहाजीने जिजाबाई,दादोबा कोंडदेव यांच्या बरोबर पुण्याला पाठवले. पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस असे स्वतंत्र अधिकारी; सोबत घोडदळ, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य, अध्यापक, उंच ध्वज, विपुल द्रव्य असे सगळे सोबत पाठवले. शिवाय शहाजीने आपल्या मावळ वतनातील पोट मोकासा म्हणून ३६ गावेही शिवाजीच्या नावे केली.
एका अर्थाने स्वतंत्र, स्वायत्त असा छोटा राजा म्हणूनच शिवाजीची पाठवणी शहाजीने केली. पुढे आपल्या दोन सरदारांना "राजश्री शिवाजी पुणे येथे आहेत, तिथे इमाने सेवा करा" असेही सांगितले. या सर्वातून शहाजीने नियोजनबद्ध, परिस्थितीचा साधकबाधक विचार करून प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल केलेली दिसते.
शिवाजीला या सर्वाची खूप लहानपणापासून जाणीव असावी. पहिल्या बारा वर्षात वडिलांची धडपड, मते, कर्तृत्व आणि त्यांनी पाहिलेले स्वायत्त-स्वराज्याचे स्वप्न निश्चितच शिवाजीला माहिती होते. याचेच पडसाद आपल्याला शिवाजीच्या कारकिर्दीत दिसतात. पुण्यात आल्या नंतर पहिल्या चार वर्षातच आसपासच्या परिसरात - बारा मावळ प्रांतात आपला दबदबा शिवाजीने निर्माण केला. १६४२-४७ या काळात शिवाजी, दादोबा कोंडदेव, आणि सहकार्यांनी एक फार मोठे कार्य केले. कौल देऊन गावं वसवण्याचे. अनेक वर्षांच्या अंदाधुंदी मुळे जमीन, गावं उजाड झाली होती. ही जमीन लागवडी खाली आणणे, गावं वसवणे, ती स्थिर करणे, लोकांना अभय देणे-आश्वस्थ करणे, जमीन लागवाडीसाठी हत्यारे-पैसा-बीबियाणं पुरवणं. पेरणीपासून धान्य हाती येईपर्यंतचा ६-७ महिन्यांच्या काळात युद्ध-नासाडी होणार नाही याचे विश्वास देणे आणि टिकवणे. भावी काळात या सर्वातून निर्माण झालेल्या धनधान्यावर कर लावून तो वसूल करणं. ही सगळी व्यवस्था या पहिल्या ४-५ वर्षाय मावळ प्रांतात शिवाजी आणि सहकार्यांनी प्रत्यक्षात आणली. जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेचे जीवन सुरक्षित, मूळपदावर आणले. त्यासाठी वेळप्रसंगी स्थानिक बलवान वतनदारांना दंड - शासन केले.
हे सर्व करत असताना शिवाजीने सर्वात जास्त कमावला तो म्हणजे " लोकांचा विश्वास" ! या कालखंडा मध्येच त्याने आपले अतिशय निष्ठावान सहकारी मिळवले. येसाजी कंक, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, तानाजी मालुसरे, हंबीरराव असे अनेक सच्चे, कर्तृत्ववान, आणि आपापल्या क्षेत्रातले श्रेष्ठ सहकारी शिवाजीने मिळवले.
पुढे जावळीच्या चंद्रराव मोरेंपासून अफजलखान, शाहिस्तेखान, आग्राभेट, दक्षिण मोहिम, राज्याभिषेक पर्यंतचे सगळे तपशील सर्वांना माहितीच आहेत. अगदी शालेय पातळीवर याचा अभ्यास आपण केलाय. तेव्हा, मध्ययुगाचा विचार करताना शिवाजीचे जाणवलेले वेगळेपण फक्त मांडायचा प्रयत्न आता करणार आहे. ( मागचा लेख डोळ्यासमोर ठेवलात तर हे वेगळेपण जास्त ठळक होईल)
शिवाजीने आपल्या अधिपत्याखाली अनेक छोट्या- मोठ्या वतनदारांना एकत्र आणले. बारा मावळ, जावळी, महाराष्ट्रातील अनेक वतनदार, या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभे केले. चाळीस हजार होन इतक्या वतनापासून एक कोटी होन वतनापर्यंत हे राज्य वाढवले.
राजकीय स्तरावर मुघलांचा दक्षिण शिरकाव शिवाजीने थोपवून ठेवला. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांना महाराष्ट्रापासून दूर ठेवण्याचे कामही शिवाजीने केले. महाराष्ट्राची सीमा थेट कर्नाटका पर्यंत वाढवली.
हे स्वराज्य उभे करत असतानी वडील शहाजी यांचे पूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंबा शिवाजीला होता. किंबहुना शहाजीने तयार केलेल्या पार्श्वभूमीवरच शिवाजीने स्वराज्य उभे केले. आणि वेळोवेळी शहाजीचा सल्ला, पाठिंबा त्याने मिळवला. तसेच आपल्या मुलाला- संभाजीलाही त्याच दृष्टीने घडवले. अगदी गरज भासली तेव्हा संघर्षापेक्षा समन्वय आणि सामंजस्याने प्रश्न सोडवला.
कोणत्याही वर्चस्वाखाली न जाता स्वत:चे राज्य उभे केल्यामुळे शिवाजीने "सतत बाजू बदलणे" हे मध्ययुगाचे धोरणही स्वीकारले नाही. उलट आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक वतनदार, सैनिक, अधिकारी , जनता यांच्या मध्ये त्याने निष्ठा निर्माण केली. शिवाजी बद्दलचा आदर, विश्वास वाढीस लागला. आणि त्याचे कर्तृत्व पाहून मध्ययुगात हरवत चाललेली निष्ठा पुन्हा प्रस्थापित झाली.
आर्थिक बाबतीत शिवाजीने अनेक नवीन पावलं उचलली. शेतीचे मोजमाप योग्य करण्यासाठी, त्यात सारखेपण आणण्यासाठी शिवकाठी वापरली जाऊ लागली. जमिनीची प्रतवारी ठरवली गेली. त्यानुसार कर आखणी , आकारणी सुरु झाली. करव्यवस्थेत समानता आली. सततच्या युद्धांपासून सुटका झाल्यामुळे आणि संरक्षणामुळे शेतीची घडी बसू लागली. त्यातून उत्पन्न आणि त्यातून ठराविक कर राज्याकडे जमा होऊ लागला. या राज्याकडे येणाऱ्या कराचा अतिशय काटेकोर हिशोब ठेवला जाऊ लागला. स्वाभाविकच राज्याची आर्थिक बाजू बळकट होऊ लागली. याचा उपयोग व्यापार, सैन्य, आरमार आणि किल्ले उभारणीसाठी झाला.
लष्कराची बाजूही शिवाजीने बळकट केली. राज्याच्या रक्षणासाठी लष्कर किती महत्वाचे आहे हे त्याने जाणले. त्यानुसार लष्कराची बांधणी केली. त्यांना योग्य आणि पुरेसा दारुगोळा, हत्यारं मिळतील अशी व्यवस्था केली. कमी सैनिकांमध्ये मोहिम यशस्वी करण्यासाठी गनिमी कावा ही पद्धती विकसित केली. सैनिकांशी अतिशय चांगले संबंध आणि युद्धातील प्रत्यक्ष सहभाग यातून शिवाजी बद्दलचा आदर, त्याच्या प्रति असणाऱ्या निष्ठा वाढीस लागल्या. यातून शिवाजीचे मावळे हे एक अभूतपूर्व रसायन बनले. जिवाला जीव देणारे सैनिक, अधिकारी याची उदाहरणे म्हणून बाजी प्रभू देशपांडे आणि जीवा महाला ही नावे पुरावीत.
शिवाजीने महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या राज्याला बाह्य आक्रमणांपासून सतत सुरक्षित केले. आदिलशाही, निजामशाही, मुघल इतकेच नव्हे तर पाश्चात्य सत्तांनाही योग्य ते बंध घातले. मध्ययुगीन त्रस्त जनतेला आश्वस्त केले.
राज्यांतर्गत सुरक्षितता, स्वास्थ्य आणले. जनतेचा मनातली भीती, असुरक्षितता पूर्णत: दूर केली. तत्कालिन राजांचे जनतेप्रति असणारे दुर्लक्ष ही परिस्थिती शिवाजीने बदलली. तो लोककल्याणकारी राजा बनला. सामान्य, स्थानिक लोकांचे हित जपणारा राजा, एक उत्तम शासनकर्ता म्हणून शिवाजी मध्ययुगात वेगळा उठून दिसतो. शासनासमोर सर्व सारखे ही आधुनिक काळातली संकल्पना शिवाजीने काही अंशी मध्ययुगातच स्वीकारलेली दिसते.स्त्रियांना मानाची वागणूक ही देखिल तत्कालिन परिस्थितील वेगळी उठून दिसणारी.
राज्यकारभाराच्या स्तरावर योग्य, अनुभवी व्यक्तींची अतिशय नेमकी पारख शिवाजीने केली. करवसूली, हिशोब तपासणी आणि विनियोगावरील योग्य पकड, यातून मराठी राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम केली. शेतजमिनीची प्रतवार मोजणी, योग्य कर आकारणी, वसुली आणि अतिशय स्वच्छ , पारदर्शी अर्थव्यवस्था शिवाजीने निर्माण केली. जोडीने न्यायव्यवस्थेतील निरपेक्षपणाही जपला . जात, धर्म, नातेवाईक कसलाही भेदभाव या न्यायव्यवस्थेत ठेवला नाही.
एकुणातच मध्ययुगातील सर्व अंधःकारमय बाजू दूर करणारी अशी ही शिवाजीची कारकिर्द! आणि म्हणूनच वेगळी, मानाची, अभिमानाची !
आज या निमित्ताने शहाजी आणि शिवाजीला एक कडक सलाम ____/\____

Wednesday, March 1, 2017

17. मध्ययुग


इतिहासात प्राचिन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तीन प्रमुख कालखंड.
प्राचीन आणि आधुनिक युगांच्या मधले हे युग  म्हणून मध्य युग. यालाच अंध: काराचे युगही म्हटले जाते.

कसे होते हे मध्य युग, का होते अध:काराचे?

प्राचीन काळी राजेशाही अस्तित्वात होती. मोठी मोठी साम्राज्ये होती. कालांतराने एव्हढी मोठी साम्राज्ये चालवणे अवघड होत गेले. काही राजांची पुढची पिढी तितकी बलवान राहिली नाही. राज्य कारभारासाठी वेगवेगळ्या प्रदेशात राजाने आपले अधिकारी- सरदार- सरंजामदार नेमले होतेे. त्या त्या प्रदेशातले ते अधिकारी बनले.  हळूहळू हेच राजाचे सरदार बलवान होऊ लागले. एका अर्थाने आपापल्या विभागात ते सत्ताधिश बनू लागले. आणि राजाचे साम्राज्यावरचे  नियंत्रण सुटू लागले. राजा नाममात्र होऊ लागला.

जगभर बहुतांशी ठिकाणी साधारण अशीच परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू मोठ्या साम्राज्याची छोटी छोटी राज्ये तयार झाली. यालाच सरंजामशाही ही म्हटले जाते.  इंग्रजीत यालाच फ्युडॅलिझम म्हटले जाते. आणि सरंजामदारांना फ्युडल लॉर्ड्स.

य़ा युगाला अंध:काराचे, ब्लॅक एज असेही म्हटले गेले. त्याची कारणे बघताना आपोआपच या काळाची ओळख आपल्याला होऊन जाऊन जाईल.

राजकीय परिस्थिती तर आपण पाहिली. एका बलवान राजाकडून छोट्या छोट्या अनेक सरदार, सरंजामदारांकडे सत्ता गेली. कधी कधी तर सत्ता नेमकी कोणाची याचा पत्ताही लागेनासा झाला. आपला राजा कोण या बाबत प्रजा आंधळी झाली म्हणून हे अंध: काराचे युग.

तशात सत्ता मिळवण्यासाठी सतत संघर्ष झाले. अगदी वडिल- मुलगा, दोन सख्खी भावंडं, भावजय- दिर, काका-पुतण्या अशा विविध नात्यांमधे अगदी जिवावर उठण्या इतका संघर्ष सतेसाठी झाला या काळात.
आणि हे अत्यंत स्वाभाविक म्हणून मानले गेले. राजाच्या मुलाने राजा विरुद्ध केलेले बंड हा जणुकाही पायंडा पडून गेला.

त्याच बरोबर सतत बाजू बदलणे, आज एका राजाचा सेनापती तर पुढील काळात दुसऱ्याचीच नोकरी स्विकारणे हेही घडत होते. आज एकाची मनसब उद्या दुसऱ्याची. हे सहज होत होते.

सामान्य जनताही कधी एका राजाच्या वर्चस्वाखाली तर पुढे दुसऱ्याच राजाचे नागरिक होऊ लागली. एकाच व्यक्तीला दोन दोन विरुद्ध राजांना कर द्यावा लागत असे.  एव्हढेच नाही तर वर्षातला आठ महिने व्यक्ती शेतकरी असे तर उरलेले चार महिने तीच व्यक्ती सैनिक असे.

एकुणातच निष्ठा हा प्रकार बदलता राहिला. कशाचीच शाश्वती राहिली नव्हती.

सामाजिक बाबतीत या काळात अनेक बंधने, नियम आले. त्या त्या प्रदेशापुरतीच गरज भागवणे, इतर प्रदेशांशी संबंध न ठेवणे होऊ लागले. आपला वावराचा परिघ लहान झाला की आपली दृष्टी, दृष्टिकोनही संकुचित होत जातो, तसंच या काळात झालं. धार्मिक बंधने वाढली. रुढी परंपरा यांची जाचक बंधने आली. विचारांची कवाडं मिटली गेली.  एका अर्थाने समाजाने स्वत:ला बंदिस्त अंधारात कोंडून ठेवले. म्हणून हे अंध:काराचे युग.

आर्थिक बाबतीतही संकुचितता आली. आधी राजेशाहीत मोठा पैसा राजाच्या हाती केंद्रित होता. स्वाभाविकच राजदरबार श्रीमंत होता. व्यापारासाठी लागणारा, गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा उपलब्ध होता. शिवाय जहाजबांधणी, भांडवल यासाठीही हे उपयुक्त होते. पण आता राजेशाहीची जागा सरंजामशाहीने घेतली. स्वाभाविकच आर्थिक सत्ताही विभागली गेली. अनेक छोटे छोटे सरदार, सरंजामदार झाले आणि एकसंध मोठी आर्थिक सत्ताही विकेंद्रित झाली. व्यापार, जहाजबांधणी, भांडवल यासाठी मोठा, खेळता पैसा राहिला नाही. यामुळे समाजाचा आर्थिक विकास थांबला म्हणून हे अंध:काराचे युग.

लष्करी आघाडीवर ही याचा परिणाम झाला. पूर्वी एक मोठे सैन्य राजाच्या नेतृत्वाखाली होते. आता त्याचीही विभागणी झाली. सरदार सरंजामदार आपल्या प्रदेशापुरते सैन्य ठेऊ लागले. शिवाय या सरदार- सरंजामगारांचे आपापसात वाद, भांडणं, युद्ध होऊ लागली. छोट्या छोट्या पण सततच्या कुरबुरी चालूच राहिल्या.

याच सुमारास इतर धर्मीयांची आक्रमणे, संपर्क, प्रभावही होऊ लागला. यातून आपला धर्म टिकवण्यासाठी धर्माची बंधने, नियम अजून कठोर केली गेली.

एकुणातच प्रजेला कोणाचाच भरवसा राहिला नाही. आपला तारणकर्ता कोण याबाबत एक संदिग्धता समाजात निर्माण झाली. सततची युद्धे, खालावलेले जीवनमान, आर्थिक उतरती कळा, धार्मिक छळ आणि धर्मांधता, पडलेल्या दुष्काळांतून वर येण्यासाठी राजाची मदत नाही,.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे या युगातला अंध:काराचे युग मानले जाते.

भारतात मध्ययुग कधी सुरु झाले याबद्दल मतभिन्नता आहे. काहींच्यामते  गुप्त साम्राज्यानंतरचा काळ म्हणजे साधारण इ.स. 650 पासून मध्ययुगाचा काळ धरला जातो. तर काहींच्यामते  इ.स. 1000 मधल्या तुर्कांच्या आक्रमणापासून मध्ययुग; तर काहींच्या मते   इ.स.1206 पासून सुरु झालेल्या गुलाम वंशाच्या दिल्ली सल्तनत पासून.
पण ते असो.

आता आपल्याला लक्षात घ्यायचय ते इतकच की मोठी मोठी साम्राज्य मोडून पडली आणि त्याची छोटी छोटी छकलं तयार झाली. अन या छोट्या प्रदेशापुरते स्थानिक राज्यकर्ते आले. समाजात रुढीपरंपरांचा पगडा वाढला. सततची छोटी युद्ध सुरु झाली. विज्ञाना पेक्षा मान्यतांना स्विकारले जाऊ लागले. समाज अधिकाधिक शेतीवर अवलंबून राहू लागला. व्यापार, इतर जगाशी संपर्क कमी होऊ लागला. आपापसातला संशय, अविश्वास वाढू लागला. सामान्य जनतेला वाली उरला नाही.....
हे सगळे घडले तो काळ म्हणजे मध्ययुग, अंध:काराचे युग!




Saturday, February 25, 2017

2. दृष्टिकोन आणि भूमिका

दृष्टिकोन:
तर एक जपानी चित्रपट आहे. रोशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा.  हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक अकुरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.
एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कशी दिसू शकते याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हा चित्रपट. वाटल्यास इथेच थांबा, आणि तो चित्रपट बघून या, जेमतेम दिड तासाचा हा चित्रपट. पण आपली विचारप्रक्रिया उलटपुलट करून टाकणारा! 
आता अशी एखादी घटना आठवा, की जी तुम्ही प्रत्यक्ष बघितली/ अनुभवली होतीत आणि तीच घटना नंतर कोणीतरी तुम्हाला सांगितली/ वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलत. आठवली?
माझी एक आठवण सांगते. 1974 चा काळ. माझी मोठी बहिण भोसला मिलिट्री स्कुलच्या कोर्सला गेलेली. खास मुलींना सैनिकी शिक्षणाचा अनुभव मिळावा म्हणून दिड महिन्याचे अतिशय व्हिगरस ट्रेनिंग यात दिले गेले. अगदी शारीरिक मेहनत, तलवारबाजी, रायफल शुटिंग, स्विमिंग, घोडसवारी, लढाईसाठीची स्ट्रॅटेजिक माहिती, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होता. अतिशय सुरेख अनुभव होता तो. तर त्याच्या निरोप समारंभात तेव्हाचे .... मंत्री आलेले. त्यांच्या हस्ते बक्षिस समारंभ झाला अन नंतर त्यांनी अध्यक्षीय भाषण केलं.
आम्ही सगळ्यांनी ते भाषण प्रत्यक्ष एेकलेलं.
या भाषणात मुलींना हे सैनिकी शिक्षण कशाला द्यायला हवं, त्यांना याचा काय उपयोग? नवऱ्याशी युद्ध करणार का, अशा धर्तीची अतिशय विचित्र विधानं महोदयांनी केलेली. सगळे पालक भयंकर चिडलेले. कारण एका अर्थाने या सजग पालकांचे वागणे कसे चुकीचे होते असच ते बोलत होते.
दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमान पत्रांमधे सदर मंत्री कसे दूरदृष्टी असणारे आहेत, सैन्यातही महिला दल असलं पाहिजे, .... असे मांडले होते. आम्ही त्या बातम्या वाचून खरोखर चकित झालो. नराचा नारायण कसा केला जातो याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला.
आता तुम्ही म्हणील. ओके ठिके. मुद्दा कळला की एकाच घटनेला अनेक बाजू असतात, किंवा एकच घटना कशीही मांडली जाऊ शकते. याचा इतिहासाशी काय संबंध???
यस, इथेच तर खरा इतिहासाशी संबंध येतो. काल काय घडले किंवा 100 वर्षांपूर्वी काय घडले किंवा 1000 वर्षांपूर्वी काय घडले हे इतिहासात आपण अभ्यासतो. पण अभ्यासतो म्हणजे काय? तर एखाद्या इतिहास काराने त्या घटनेवर काय लिहिलय ते आपण अभ्यासतो. नाही पटत?
दोन उदाहरणं घेते. ब्रिटिश काळात 1857 च्या घटनेला सैनिकी असंतोष म्हटलं गेलं, स्वातंत्र्य लढ्यात याच घटनेला स्वातंत्र लढा म्हटलं गेलं तर आज या कडे उठाव म्हणून पाहिलं जातं. हे नुसते शब्दाला प्रतिशब्द नाहीत तर त्यामागे त्या त्या काळातील विचारप्रवाह स्पष्ट होतात.
दुसरी घटना. मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना 2010 पर्यंत दादोबा कोंडदेवांना शिवाजीच्या कारकिर्दित दिले गेलेले महत्व आणि 2010 पासून बदललेली परिस्थिती.
या दोन्ही घटना मी फक्त उदाहरणांसाठी घेतल्यात. याच चांगले/ वाईट, योग्य / अयोग्य, अशी कोणतीच भूमिका मी घेत नाहीये. इतिहासकाराने ती कधीच घ्यायचीपण नसते. मला सांगायचय ते इतकच की एकच घटना, पण तिचे अर्थ कसे वेगवेगळे लावले जाऊ शकतात. काळ, परिस्थिती, लोकांची मतं, लोकांचे विचार, नवीन पुढे आलेले पुरावे, इतर गोष्टी,.... अनेक कारणांमधून एकच एक घटना वेगळी वाटू शकते, दिसू शकते, अगदी असूही शकते.
रोशोमानची पुन्हा आठवण करून देते.
तर हे असं आहे.

भूमिका:
नुसते पुरावे म्हणजे इतिहास नाही. त्या पुराव्यांचा अर्थ लावणे काळ, परिस्थिती, इतर पुरावे, अर्थ लावणारी व्यक्ती अशा सगळ्यांचा प्रभाव या अर्थ लावण्यावर पडणार. मग खरा इतिहास? प्रत्यक्षात काय घडलं हे कसं कळणार? खरं तर प्रत्येक इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा त्याच्या नजरेतून पाहिलेला इतिहासच असतो.
सो इथे मी जे लिहिणार आहे ते सगळं माझ्या नजरेतून बघितलेला, मला जाणवलेला, मला समजलेला इतिहास असेल. हे एकदा स्पष्ट असले की वादंगांना इथे स्थान असणार नाही. ज्यांना हे लिखाण पटले नाही, त्यांनी हे सगळे सरळ ओलांडून पुढे जावे, आणि स्वत: त्यांना पटलेला, वाटलेला, समजलेला इतिहास लिहावा, वाचावा.
परत सांगते, याचा असाही अर्थ नाही, की मी जे लिहेन त्याला पुरावे नाहीत nono माझे सगळे लिखाण अगदी " बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल " या उक्ती प्रमाणेच असेलbiggrin . फक्त त्या पुराव्यांचा लावलेला अर्थ माझा असेल. उगाच पुराणातली सांगोवांगी गोष्टी मी लिहिणार नाही. पण त्याच बरोबर उगाच माझा मुद्दा पटवायला वादही घालणार नाहीये.
सो इतिहास! असे असे घडले ! हे माझ्या दृष्टीने, माझ्याकडे असलेल्या पुराव्यांवरून लिहिण्याचा हा प्रयत्न!
कधी एखादीच घटना लिहेन, कधी एकादा मागोवा घेईन, कधी पूर्णच आढावा घेईन, कधी एखाद्या व्यक्ती बद्दल लिहेन, कधी एखाद्या तत्वप्रणालीबद्दल.. हे मी जसं मनात येईल तसं लिहेन. जसजसे लिखाण होत जाईल तसतसे त्यांची रचना करत जाईन. खरे तर हे सगळं आधी लिहून, मग नीट संकलित करून इथे टाकायला हवं. पण त्याला मी खूप वेळ लावेन. आणि एखाद वेळेस माझ्याकडून कंटाळा केला जाईल. आताच इथे नोंदवले की हे सगळं लिहायचा तगादा माझा मलाच राहील. आणि मी उशीर केला तर तुम्हीही मला ढोसत रहाल biggrin
कधी एखादी माहिती तुम्हाला हवी वाटली तर कळवा, मी अभ्यास करून लिहायचा प्रयत्न करेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मीही इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे काही गोष्टी मला माहित नसण्याचीही शक्यता आहे. पण मी त्या माहिती करून घेईन आणि मांडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तिथे योग्य त्या पुस्तकांचा उल्लेख करेन, माहिती देईन.
या संपूर्ण लिखाणाची भाषा शक्य तेव्हढी साधी सोपी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. इतिहास म्हणजे क्लिष्ट, कंटाळवाणा हा समज बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच मुळे हे काही संशोधनपर( रिसर्च लेव्हलचे) लिखाण असणार नाही. तसे लिखाण लिहिण्याचे हे व्यासपीठही नाही याची जाणीव मला आहे.
माझ्यातल्या गंजलेल्या इतिहास अभ्यासकाला जरा बाहेर ओढून काढण्याची ही धडपड आहे. 

Monday, February 20, 2017

1. सुरुवात

प्रथमत: हे  स्पष्ट करते की या लेखमालिकेत अभ्यासपूर्ण वैचारिक लेख असले तरी संशोधनपर नसतील.  त्यामुळे माझी मतं इतकच यात अपेक्षित आहे. अर्थातच ही मतं अशीच उठली आणि मांडली अशी नाहीत, तर त्यांना पुरावे देत, स्पष्टिकरणं देत, इतिहासकारांची मतं सांगत मी काही लिहावं असं ठरवलय. कोणत्याही वादासाठी वाद अशाना माझा आधीच नमस्कार. आणि प्रत्येक गोष्टीचे मी स्पष्टिकरण, विवेचन केलच पाहिजे असे माझ्यावर बंधनही घालून घेत नाहीये. वुई अॅग्री टू डिफर हा मुख्य स्टँड असेल माझा.

तर इतिहास! नक्की काय म्हणजे इतिहास? अनेक काळ चर्चिला गेलेला हा विषय. त्याच्या सैद्धान्तिक चर्चेत मी इथे घुसणार नाही, आधीच म्हटलय की हा संशोधनपर लेख नाही. पण सर्वसामान्य जनतेत इतिहासाबद्दल असणाऱ्या समजांबद्दल, नावडीबद्दल, अतिरेकी आवडी बद्दल मला जरा बोलावसं वाटतय.
तर,
1.  इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे गाडलेली मढी उकरून काढणं, इतिहास म्हणजे राजांच्या गोष्टी, .....
2.इतिहास का शिकायचा? तर भूतकाळावरून काही शिकायचं, भविष्यकाळाचा अंदाज घ्यायचा, वर्तमान काळ जगताना मागील चुका न करण्याची खबरदारी घ्यायची, इतिहास म्हणजे शास्त्र/ कला/ गोष्टी,....
3. इतिहास कोणाचा? जेत्यांचा( जे विजयी झाले त्यांचा), संघर्षांचा,  समाजांचा, समाजाने नाकारले त्यांचा, देशांचा, जगाचा, विचारप्रणालींचा,.....
4. इतिहास कसा लिहावा? देशप्रेमातून, विशिष्ठ समाजाच्या भूमिकेतून, विशिष्ठ विचारप्रणालीतून, एखाद्या व्यक्तिमहात्म्यातून....
....
बापरे किती ते प्रश्न, किती त्या चर्चा, किती ती मतांतरे! बिचारा इतिहास गुदमरून मरेल की हो  :)
तर ही सगळी चर्चा देऊ बासनात गुंडाळून. आपण साधं, सोेपं काहीतरी बोलुयात, कसं?

इतिहास या शब्दाचा अर्थ इति + ह + आस - असं असं घडलं.   History = His + story
आता काय घडलं कसं बरं सांगणार? काल मी पंतप्रधानांना भेटले असं मी म्हटलं तर समोरची व्यक्ती सहज थोडाच विश्वास ठेवणारे? माझ्या सांगण्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा तर मला त्यासाठी पुरावे दिले पाहिजेत. मग मला फोटो दाखवावे लागतील, वृत्तपत्रातली कात्रणं दाखवावी लागतील, पंतप्रधानांनी केलेली स्वाक्षरी असलेलं पुस्तक दाखवावं लागेल,.... मगच लोकं यावर विश्वास ठेवतील, हो न?

तसच काल, 10 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी काय घडलं सांगायचं तर त्यासाठी तसेच पुरावे हवेत. मग 30000 वर्षांपूर्वीची भिमबेटका येथील गुहेतली चित्र असतील. 4500 वर्षांपूर्वीची सिंधुसंस्कृतीतली वीट असेल, 1000 वर्षांपूर्वीचा विजयनगरचा किल्ला असेल,  400 वर्षांपूर्वीचा होन असेल नाहीतर 100 वर्षांपूर्वीचा कागदी दस्ताऐवज असेल.
ह्या पुराव्यांच्या आधारे मी त्या काळात काय घडले हे सांगू शकते.

पण माझा पंतप्रधानांबरोबर असलेला फोटो म्हणजे माझी त्यांची घनिष्ट मैत्री आहे हे स्पष्ट करत नाही. किंवा त्यांची स्वाक्षरी माझ्याजवळ असणं ही फार काही  सांगू शकत नाही. फोटो, स्वाक्षरी, ती स्वाक्षरी असलेल्या कागदातला मजकूर, वृत्तपत्रे अशा शक्य त्या सगळ्या पुराव्यांचा नीट अर्थ लावला तरच खरं काय ते कळेल.

म्हणजेच ऐतिहासिक पुरावे म्हणजे इतिहास नाही.  प्रसिद्ध इतिहासकार इ एच कार म्हणतात,  " इतिहास केवळ असा प्रकारच्या बाबींसाठी (पुरावे) इतिहासाच्या  सहाय्यक समजल्या जाणाऱ्या पुरातत्वविद्या, पुराभिलेखशास्त्र, नाणकशास्त्र, कालनिर्णयशास्त्र इ. शास्त्रांवर अवलंबून असतो. पण यातून मिळणारी तथ्ये म्हणजे इतिहासकारांचा जणू कच्चामाल, तो इतिहास नव्हे"
केवळ दस्तऐवज  आणि पुरावे म्हणजे इतिहास नव्हे तर  " समोर असलेल्या सर्व पुराव्यांचा नीट अभ्यास करून,  त्यातून ध्वनित होणाऱ्या विविध अर्थपूर्ण घडामोडींची सुसूत्र कहाणी मांडणं म्हणजे इतिहास"

तर अशीच कहाणी सांगण्याचा माझा प्रयत्न राहील. कधी गोष्टीरुप, कधी माहिती स्वरुप. पण तपशिलांचा मारा नाही करणार, सनावळ्यांच्या जाळ्यात नाही गुंतणार. मानवी समाजामधे "असं असं घडलं" ही "कहाणी" सांगेन, संशोधन निबंध संशोधकांसाठी; सामान्य माणूस रमतो तो गोष्टींमधे, कहाण्यांमधे! 
पण याचा अर्थ असा नाही की मी मनात येईन ते लिहेन.  नाही; लिहेन ते सगळं शक्य त्या सर्वपुराव्याना साक्षी मानूनच. हो ते लिहिण्याची पद्धत मात्र क्लिष्ट, पुराव्यांची यादी, सनावळ्या, कोणतीही अभिनिवेष, जाज्वल्य अभिमान वगैरे सगळं  दूर ठेऊन.  एक साधा सरळ आलेख, घडलेल्या इतिहासाचा; मानवी वाटचालीचा! 






Thursday, January 26, 2017

14. मला भावलेले लोथल

 (आधी अगदी थोडक्यात  माहिती देते आणि ही माहिती एक इतिहासाची अभ्यासक म्हणून देतेय.

अधिक तपशीलवार माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच)
सिंधु संस्कृती :  इ. स. पूर्व 3200 ते इ. स. पूर्व 1600 या कालखंडामधे सिंधु- सरस्वती नद्यांच्या खोऱ्यामधे ही संस्कृती विकसित झाली. 1920-21 मधे या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी, डॉ. देवदत्त भांडारकर, राखालदास बॅनर्जी, जॉन मार्शल, सर मॉर्टिमर व्हीलर अशा विविध संशोधकांनी या संस्कृतीची जगाला ओळख करून दिली. मोहेंजोदारो, हराप्पा, मेहेर गढ, कोट दिजी, राखी गढ, कालीबंगन, चन्दुदारो, देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, रंगपूर, रोजडी,लोथल, अशी जवळजवळ 1500 साईट्स सापडल्या आहेत.


नियोजनबद्ध नगर बांधणी, चौरस आकाराची शहरे, सार्वजनिक स्नानगृहे, बंदिस्त बांधलेली सांडपाण्याची व्यवस्था, वर्गानुरुप गावरचना, काटकोनात छेदणारे रस्ते, पक्क्या विटांचा वापर, 4 : 2 : 1 अशा प्रमाणातल्याच विटांचा वापर, बालेकिल्ला, कोठारं, अग्निकुंडे, बांधीव विहिरी, बांधीव गोदी( डॉकयार्ड), मुद्रा,  गोमेद, अकिका दगडाच्या मण्यांचे अलंकार, स्टिएटाईट या मऊ दगडाचे अतिसुक्ष्म मणी आणि त्यांचे अलंकार, मातीची पक्की भांडी, परदेशांशी व्यापार, जलमार्गाने व्यापार, लेखन कला, वजने, शेती, शेतीसिंचन,  खतांचा वापर, तांब्याचा वापर आणि व्यापार, शंखांचे दागिने, कापड, मातीची पक्की खेळणी, सप्तमातृका, ब्रान्झची नर्तकी ही या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये.
भूकंप, नद्यांचे पूर, बदललेली नैसर्गीक परिस्थिती, आक्रमणं यापैकी काही कारणांनी ही संस्कृती लयाला गेली. या बद्दल नक्की पुरावे नाहीत. पण एक अत्यंत प्रगत संस्कृती इथे नांदत होती.)