Tuesday, August 18, 2020

2. दृष्टिकोन आणि भूमिका

 दृष्टिकोन:

तर एक जपानी चित्रपट आहे. रोशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा.  हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक अकुरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.
एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कशी दिसू शकते याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हा चित्रपट. वाटल्यास इथेच थांबा, आणि तो चित्रपट बघून या, जेमतेम दिड तासाचा हा चित्रपट. पण आपली विचारप्रक्रिया उलटपुलट करून टाकणारा! 
आता अशी एखादी घटना आठवा, की जी तुम्ही प्रत्यक्ष बघितली/ अनुभवली होतीत आणि तीच घटना नंतर कोणीतरी तुम्हाला सांगितली/ वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलत. आठवली?
माझी एक आठवण सांगते. 1974 चा काळ. माझी मोठी बहिण भोसला मिलिट्री स्कुलच्या कोर्सला गेलेली. खास मुलींना सैनिकी शिक्षणाचा अनुभव मिळावा म्हणून दिड महिन्याचे अतिशय व्हिगरस ट्रेनिंग यात दिले गेले. अगदी शारीरिक मेहनत, तलवारबाजी, रायफल शुटिंग, स्विमिंग, घोडसवारी, लढाईसाठीची स्ट्रॅटेजिक माहिती, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होता. अतिशय सुरेख अनुभव होता तो. तर त्याच्या निरोप समारंभात तेव्हाचे .... मंत्री आलेले. त्यांच्या हस्ते बक्षिस समारंभ झाला अन नंतर त्यांनी अध्यक्षीय भाषण केलं.
आम्ही सगळ्यांनी ते भाषण प्रत्यक्ष एेकलेलं.
या भाषणात मुलींना हे सैनिकी शिक्षण कशाला द्यायला हवं, त्यांना याचा काय उपयोग? नवऱ्याशी युद्ध करणार का, अशा धर्तीची अतिशय विचित्र विधानं महोदयांनी केलेली. सगळे पालक भयंकर चिडलेले. कारण एका अर्थाने या सजग पालकांचे वागणे कसे चुकीचे होते असच ते बोलत होते.
दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमान पत्रांमधे सदर मंत्री कसे दूरदृष्टी असणारे आहेत, सैन्यातही महिला दल असलं पाहिजे, .... असे मांडले होते. आम्ही त्या बातम्या वाचून खरोखर चकित झालो. नराचा नारायण कसा केला जातो याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला.
आता तुम्ही म्हणील. ओके ठिके. मुद्दा कळला की एकाच घटनेला अनेक बाजू असतात, किंवा एकच घटना कशीही मांडली जाऊ शकते. याचा इतिहासाशी काय संबंध???
यस, इथेच तर खरा इतिहासाशी संबंध येतो. काल काय घडले किंवा 100 वर्षांपूर्वी काय घडले किंवा 1000 वर्षांपूर्वी काय घडले हे इतिहासात आपण अभ्यासतो. पण अभ्यासतो म्हणजे काय? तर एखाद्या इतिहास काराने त्या घटनेवर काय लिहिलय ते आपण अभ्यासतो. नाही पटत?
दोन उदाहरणं घेते. ब्रिटिश काळात 1857 च्या घटनेला सैनिकी असंतोष म्हटलं गेलं, स्वातंत्र्य लढ्यात याच घटनेला स्वातंत्र लढा म्हटलं गेलं तर आज या कडे उठाव म्हणून पाहिलं जातं. हे नुसते शब्दाला प्रतिशब्द नाहीत तर त्यामागे त्या त्या काळातील विचारप्रवाह स्पष्ट होतात.
दुसरी घटना. मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना 2010 पर्यंत दादोबा कोंडदेवांना शिवाजीच्या कारकिर्दित दिले गेलेले महत्व आणि 2010 पासून बदललेली परिस्थिती.
या दोन्ही घटना मी फक्त उदाहरणांसाठी घेतल्यात. याच चांगले/ वाईट, योग्य / अयोग्य, अशी कोणतीच भूमिका मी घेत नाहीये. इतिहासकाराने ती कधीच घ्यायचीपण नसते. मला सांगायचय ते इतकच की एकच घटना, पण तिचे अर्थ कसे वेगवेगळे लावले जाऊ शकतात. काळ, परिस्थिती, लोकांची मतं, लोकांचे विचार, नवीन पुढे आलेले पुरावे, इतर गोष्टी,.... अनेक कारणांमधून एकच एक घटना वेगळी वाटू शकते, दिसू शकते, अगदी असूही शकते.
रोशोमानची पुन्हा आठवण करून देते.
तर हे असं आहे.

भूमिका:
नुसते पुरावे म्हणजे इतिहास नाही. त्या पुराव्यांचा अर्थ लावणे काळ, परिस्थिती, इतर पुरावे, अर्थ लावणारी व्यक्ती अशा सगळ्यांचा प्रभाव या अर्थ लावण्यावर पडणार. मग खरा इतिहास? प्रत्यक्षात काय घडलं हे कसं कळणार? खरं तर प्रत्येक इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा त्याच्या नजरेतून पाहिलेला इतिहासच असतो.
सो इथे मी जे लिहिणार आहे ते सगळं माझ्या नजरेतून बघितलेला, मला जाणवलेला, मला समजलेला इतिहास असेल. हे एकदा स्पष्ट असले की वादंगांना इथे स्थान असणार नाही. ज्यांना हे लिखाण पटले नाही, त्यांनी हे सगळे सरळ ओलांडून पुढे जावे, आणि स्वत: त्यांना पटलेला, वाटलेला, समजलेला इतिहास लिहावा, वाचावा.
परत सांगते, याचा असाही अर्थ नाही, की मी जे लिहेन त्याला पुरावे नाहीत  माझे सगळे लिखाण अगदी " बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल " या उक्ती प्रमाणेच असेल . फक्त त्या पुराव्यांचा लावलेला अर्थ माझा असेल. उगाच पुराणातली सांगोवांगी गोष्टी मी लिहिणार नाही. पण त्याच बरोबर उगाच माझा मुद्दा पटवायला वादही घालणार नाहीये.
सो इतिहास! असे असे घडले ! हे माझ्या दृष्टीने, माझ्याकडे असलेल्या पुराव्यांवरून लिहिण्याचा हा प्रयत्न!
कधी एखादीच घटना लिहेन, कधी एकादा मागोवा घेईन, कधी पूर्णच आढावा घेईन, कधी एखाद्या व्यक्ती बद्दल लिहेन, कधी एखाद्या तत्वप्रणालीबद्दल.. हे मी जसं मनात येईल तसं लिहेन. जसजसे लिखाण होत जाईल तसतसे त्यांची रचना करत जाईन. खरे तर हे सगळं आधी लिहून, मग नीट संकलित करून इथे टाकायला हवं. पण त्याला मी खूप वेळ लावेन. आणि एखाद वेळेस माझ्याकडून कंटाळा केला जाईल. आताच इथे नोंदवले की हे सगळं लिहायचा तगादा माझा मलाच राहील. आणि मी उशीर केला तर तुम्हीही मला ढोसत रहाल biggrin
कधी एखादी माहिती तुम्हाला हवी वाटली तर कळवा, मी अभ्यास करून लिहायचा प्रयत्न करेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मीही इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे काही गोष्टी मला माहित नसण्याचीही शक्यता आहे. पण मी त्या माहिती करून घेईन आणि मांडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तिथे योग्य त्या पुस्तकांचा उल्लेख करेन, माहिती देईन.
या संपूर्ण लिखाणाची भाषा शक्य तेव्हढी साधी सोपी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. इतिहास म्हणजे क्लिष्ट, कंटाळवाणा हा समज बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच मुळे हे काही संशोधनपर( रिसर्च लेव्हलचे) लिखाण असणार नाही. तसे लिखाण लिहिण्याचे हे व्यासपीठही नाही याची जाणीव मला आहे.
माझ्यातल्या गंजलेल्या इतिहास अभ्यासकाला जरा बाहेर ओढून काढण्याची ही धडपड आहे. 

7. स्थिर समाज आणि टोळ्यांचे राज्य

शेतीचा शोध लागला आणि मानवाचे जीवन पालटूनच गेले. जिथे सपाट जमीन आहे, मऊ माती आहे आणि आसपास पाणी आहे आशा ठिकाणी शेती करता येते हे एव्हाना मानवाला कळले होते. त्याच मुळे आता डोंगरावरच्या  गुहेत न राहाता तो डोंगराखालच्या माळरानावर आला. जमीन सपाट करणे, ती उकरून मोकळी करणे, त्यात बिया टाकणे, पाऊस आला तर ठीकच नाहीतर नदीतून पाणी आणून घालणे, रोपांची काळजी घेणे, तयार कणसं तोडून ती नीट जपून ठेवणं यात मानवाचे वर्ष सरू लागले.

गुहेत असताना त्याला एक नैसर्गिक संरक्षण होते. गुहेची जागा पावसा उनापासून मानवाला वाचवत होती. इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करायलाही ही गुहा उपयोगी पडत होती. गुहेच्या तोंडावर दगड सरकवला की  आतले सगळे सुरक्षित रहात. आता माळरानावर आल्यावर मात्र सुरक्षितता हा एक मोठाच प्रश्न उभा राहिला. ऊन पाऊस आणि हिंस्त्र प्राणी या तीनही गोष्टींपासून वाचायच होतं. 

यावरही मानवाने आपल्या बुद्धीचातुर्‍याने मात केली. जमिनीत खळगा करून जमिनीच्या खाली गुहा केली. त्यावरून गवत पसरलं. पण पावसात आजूबाजूचे पाणी आत वाहून येऊ लागलं. तशी मग त्याने खळग्याच्या भोवती दगड रचले, फटींमध्ये ओली माती भरली. वरून गवत टाकले. आता जमिनी खालची गुहा सुरक्षित झाली. हळूहळू त्याच्या लक्षात आले की अरेच्या खळगा कराची गरज नाही आपण दगड एकावर एक ठेवत उंच भिंत केली अन मातीने ती घट्ट केली अन वरून गवत टाकले की छान जमिनीवरची गुहा तयार होते. आशा रीतीने घराची निर्मिती झाली . काळानुरूप, त्या त्या जागेत उपलब्ध असणा-या वस्तूंनुरूप घरांची बांधणी बदलत गेली. आधी दगडांची मग त्या सह मातीची. पुढे  नुसती मातीची. कधी मातीसोबत गवत वापरले जाई. कधी जावळया. कधी झाडांच्या फांद्या, खोड... 

जमिनीवरच्या वास्तव्यात अजून एक मोठी भीती होती ती हिंस्त्र प्राण्यांची.  मानवाला अग्नी कसा वापरायचा आणि तो कसा तयार करायचा याची माहिती एव्हाना माहिती झाली होती. इतकेच नव्हे तर प्राणी या अग्नीला घाबरतात हेही माहिती झाले होते. याचाच उपयोग करून रात्री वसतीमध्ये अग्नी प्रजवलीत ठेवायची प्रथा सुरू झाली. शिवाय अग्नी सत्ता जागता ठेवला की तो पटकन हाताशी असणार होता. त्यामुळे अग्नी निर्माण करण्याचा खटाटोपही वाचणार होता. यातूनच वस्ती मध्ये एक तरी अग्नी सत्ता प्रज्वलित ठेवला जाऊ लागला. 

या बरोबरीने प्राण्यांना अटकाव व्हावा यासाठी वस्तीच्या सभोवताली काटेरी झाडांचे कुंपणही मानव घालू लागला. 

आशा रीतीने मानवाने शेती हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानून घेतला. शेती भोवतीच मानवी समाज विकसित होत गेली. 

अनेक ठिकाणी  हे घडत होते. जसा जशी स्थिरता येत गेली तसतशी मानवी वसाहत मोठी होत गेली. मग आपआपल्या वस्तीची कुंपणं वाढवली गेली. मानवांचा मोठा समूह तयार होत गेली. त्यांच्यातल्या शहाण्या सुरत्या / वयाने अनुभवी व्यक्ती यांच्या मताने त्या त्या समूहात कामकाज चाले. एक सुनियंत्रित अशी समाज रचना असणारी एक टोळी तयार होत असे. 

कधी कधी एखाद्या ठिकाणचे पाणी संपले किंवा तिथे प्राण्यांचा जास्त उपद्रव सुरू झाला तर ती टोळी  उठून वेगळी जागा शोधत असे. अशात एखाद्या ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या टोळ्या  येत. त्यांतल्या कोणी आपली वसाहत बांधायाची यावरून वाद होऊ लागले. कधी ते सामंजस्याने सोडवले गेले तर कधी कधी त्यांच्यात सरळ मारामारी होत असे. अन जी टोळी या मारामारीत  बलवान ठरे ती टोळी त्या ठिकाणावर आपला हक्क सांगत असे. यातून मग शस्त्र, लढण्याचे कौशल्य, लढाऊ योद्धे आणि सैन्य अशा संकल्पना पुढे आल्या. 

जसजसा टोळीतील लोकसंख्या वाढू लागली तसतशी कोणताही निर्णय घेणं अवघड होऊ लागलं. मग काही टोळ्यांमध्ये शहाण्यासुरत्या लोकांचे एक मंडळ तयार झालं, तर काही टोळ्यांमध्ये वयस्कर व्यक्तीच्या हाती सगळे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवले गेले, तर काही टोळ्यांमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगात जास्त ताकद होती त्याच्या हाती सगळे अधिकार आले. यातूनच हळूहळू राजकीय सत्ता ही संकल्पना तयार झाली. यातूनच राजा तयार झाला; राजेशाही सुरु झाली. 
अन मग या अशा वसाहती मोठ्या मोठ्या होत गेल्या. त्यांचे सैन्य उभे राहू लागले. स्वाभाविकच सुरक्षितता आली. अन मग ह्या वसाहती वाढत गेल्या, एका ठिकाणी स्थिरावत गेल्या. अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहात असताना त्यांची म्हणून जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धती तयार झाली; म्हणजेच संस्कृती तयार झाली. 

जगात विविध ठिकाणी, प्रामुख्याने नाद्यांच्या काठावर, दोआबात, खोऱ्यात अशा अनेक संस्कृती आपल्याला दिसतात. याच त्या प्राचीन संस्कृती ! मेसोपोटेमियातील विविध संस्कृती,  इजिप्तची संस्कृती, सिंधु संस्कृती, चिनी संस्कृती,  माया संस्कृती, इंका संस्कृती, ॲझटेक संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या काही महत्वाच्या प्राचीन संस्कृती होत. 





Monday, August 17, 2020

10. असं होतं एक आटपाट जग

(आज अनेक ठिकाणच्या उत्खननांना समर्पक अशी उत्तरं सापडतातच असं नाही। म्हणून मग लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन ही कथा रचली आहे। खरं खोटं काळच ठरवेल। खऱ्या अर्थाने हा इतिहास ठरेल का हेही मला नाही माहिती। पण मनात आलं ती गोष्ट लिहिली.) 

एक आटपाट जग होतं. हो हो जग होतं. नगर नाही तर चक्क जग होतं. खुप मोठ्ठं होतं. त्याला इतिहासही मोठा होता. दहा हजार वर्षांचा. चकीत झालात ना ?
तर आज मी ही अशी वेगळीच गोष्ट सांगणार आहे, ऐकणार ना?

तर एक होतं आटपाट जग ! खुप मोठमोठी शहरं, खुप मोठमोठ्या इमारती, कितीतरी यंत्र, वाहनं, कितीतरी प्रगती केली होती त्या जगाने. त्यांच्या इमारती तर फार वेगळ्या, अतिशय भक्कम होत्या. कारण माहितीय का? त्या होत्या चक्क दगडांच्या, खरं तर खडकांच्या !

तुम्ही म्हणाल; हात्तीच्या ही तर आज गुहेत राहणा-या माणसाची गोष्ट सांगतेय.

नाही नाही, खरच; खुप प्रगती केलेल्या जगाचीच गोष्ट सांगतेय. पण त्यांच्या इमारती होत्या खडकांच्या. हे कसं शक्य आहे ना? तर ऐका हं ।

त्या जगात अनेक वर्षांपूर्वी एका शात्रज्ञाने एक फार वेगळा शोध लावला. निसर्गातील विविध गोष्टींचा अभ्यास करताना त्याच्या मनात आलं की आपण दगडाचा अभ्यास का बरं करत नाही? वेगवेगळे धातू आपण शोधले, त्याचा वापर आपण करतो तर दगडाचा का नाही? आणि मग त्याने प्रयोगशाळेत खुप प्रयत्न केले आणि निसर्गात असतो तसाच दगड प्रयोगशाळेत त्याने तयार केला. त्या दगडाचा रंग जरा वेगळा, जरा लालसर होता. पण अतिशय मजबूत दगड त्याने निर्माण केला. महत्वाच हे की हा दगड विशिष्ट पद्धतीने वितळवता येत असे आणि त्याला विशिष्ठ पद्धतीने गार केला की तो हव्या त्या आकारात तयार होत असे.

या शोधामुळे झालं असं की जसं लोखंड वितळवून ते हव्या त्या साच्यात ओतून गार करून हवा तो आकार करता येतो; तशाच दगडाच्याही हव्या त्या वस्तू बनवता येऊ लागल्या. अन मग त्या काळात अनेक उत्तम उत्तम दगडी इमारती तयार झाल्या. अतिशय सुबक, सुंदर आणि अतिशय भक्कम ! शिवाय स्वतःचा लालसर छान रंगाच्या बरं का!

आता दगड कोरून शिल्प करण्याची गरजच नाही उरली. दगड वितळवायचा, हव्या त्या साच्यात ओतायचा. गार झाला की अप्रतिम सुंदर शिल्प तयार.

अशीच अनेक बाबतीत या जगाने प्रगती केली होती. त्या त्या प्रगतीची माहितीही त्याने लिहून ठेवली होती. असं सगळं छान चालू होतं. कधी कधी तिथल्या लोकांच्यामधे काही वाद होत असत. पण ते सोडवलेही जात. म्हणतात ना रामराज्य तसं अगदी आलबेल चाललेलं त्या जगात !

पण प्रत्येक गोष्टीत जसं काही संकट येतं तसच याही जगात झालं. नक्की कशामुळे कळलं नाही पण अचानक हवामान तापू लागलं. नदी नाले आटू लागले. जी जमीन अतिशय सुपीक होती ती कोरडी होऊ लागली. हळुहळू सगळीकडे वाळवंट तयार होऊ लागले. सगळे हवालदिल झाले. निसर्गाचा हा कोप का याचा शोध घेऊ लागले. पण काहीच कारण कळेना. तशात शास्त्रज्ञांनी शोध लावला की उत्तर आणि दक्षिण धृवांवरचे बर्फाचे डोंगर उष्णतेने वितळू लागले आहेत. आणि त्यामुळे समुद्राची पातळी उंचावते आहे.

जगामध्ये एकच भीतीची लाट उसळली. खुप जुन्या काळात त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधे कधी काळी लिहून ठेवले होते की फार फार पूर्वी जगबुडी झाली होती. समुद्र उंचावला होता आणि सगळी शहरं, सगळ्या वसाहती त्यात बुडून गेल्या होत्या. पण आजवर ही एक गोष्ट म्हणुन तीही सांगोवांगी गोष्ट म्हणुन मजेत उडवून लावलेली सगळ्यांनी. पण आता हे भावी वास्तव म्हणुन समोर उभं राहिलं होतं. सगळी मानवी जमात धोक्यात आली होती. आजवर केलेली सगळी प्रगती पाण्यात वाहून जाणार होती.

पण आता हाती फार काळ नव्ह्ता. शक्य तितक्या उंच डोंगरावर जाण्याचा विचार सगळे करू लगले. त्यातून अनेक संघर्ष घडू लागले. सगळ्यांनाच उंच डोंगरावर जायच होतं. पण हे शक्य नव्हतं. शेवटी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ठरवलं की यावर काही उपाय केला पाहिजे, काही निर्णय घेतला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे लिहून, काही अती महत्वाच्या गोष्टी घेऊन, काही लोकं जगातील सर्वात उंच पर्वतावर जातील. बाकी सर्वांनी आपल्या जवळच्या उंच डोंगरावर आसरा घ्यायचा.

शेवटी काहीच लोकं जिवंत रहाणार हे आता सर्वांना पटले होते. किमान तितपत शहाणपण, सामंजस्या त्या जगात अस्तित्वात होते. आणि मग म्हणूनच सर्व प्रगतीचे तपशील, महत्वाची यंत्र, काही हुषार माणसं आणि काही शहाणी माणसं, काही बलवान माणसं या ऊंच पर्वतावर जायला निघाले. यांमध्ये स्त्रिया, पुरुष, काही तरुण मुलंमुली यांचा समावेश होता.

बर्फ आता फारच भराभर वितळत होता. आधी समुद्रकिनार्‍यावरच्या शहरांचा त्याने घास घेतला. हळू हळू करत सर्वच सपाट प्रदेशात समुद्राच पाणी पसरलं. अन मग एक दिवस आकाश झाकाळून गेलं. वातावरणात एक भयाण शांतता आली. श्वासही घेता येणार नाही इतकी हवा विरळ झाली. अन जेमतेम काही तासातच पाण्याची एक प्रचंड राक्षसी लाट जमिनीवर धाऊन आली. सपाट जमीन, उंचवटे, छोटे छोटे डोंगर, मोठे डोंगर, अगदी उंच पर्वतही या लाटेने गिळंकृत केले. जगातला सर्वात मोठा पर्वत; जिथे महान लोक आश्रय घेऊन होते तिथेही या लाटेने तडाखा दिला.

जगाचा महाप्रलय ! संपूर्ण जग या प्रलयात पाण्याखाली बुडालं. आणि मग आली ठंडीची एक महाभयंकर मोठी लाट! अन मग अनेक वर्ष जगभर बर्फाचे राज्य सुरुच राहिले.

काय झालं त्या जगाचं? तिथल्या माणसांचं? तिथल्या प्रगतीच??????

अनेक प्रश्न प्रश्न प्रश्न !!!

उत्तरं कशाचीच नाहीत. मी म्हटलं ना सुरुवातीला; वेगळीच गोष्ट सांगणार आहे म्हणून !
कधी कधी या हरवलेल्या जगाचे काही पुरावे सापडतात कुठे कुठे. कधी एखाद्या उंच पर्वतावर एखाद्या प्रार्थना स्थळात काही अगम्य लिपीतली भुर्जपत्रे सापडतात. कधी एखाद्या उंच वाळवंटी पर्वतावरच्या गुहेतली पत्र, वस्तु. कधी एखाद्या पर्वतावरची अनाकलनीय बांधकामं. प्रचंड मोठी दगडी बांधकामं. जमिनी खालच्या नऊ स्तरावरच्या गुहा. एकाच खडाकात उलटे कोरलेले प्रार्थनास्थळ. तर कधी खोल समुद्रात मोठमोठ्या दगडी इमारती ....

कितीतरी मोठी यादी आहे, न संपणारी. पण त्याचा अर्थ लावणं हे मात्र हातात नाही, काही पुरावे नाही, काही क्लुज नाहीत! काही नाही...

ना कोणी राजपुत्र आला संकटावर मात करायला. ना उत्तरं सांगायला कोणी ऋषी आले. ना जादुची कांडी फिरली. ना झोपलेल्या राजकन्येला कोणी उठवायला आलं.

काहीच घडलं नाही या आटपाटच्या जगात. पण म्हटलं नं, वेगळीच गोष्ट सांगणार आहे आज...

तर असं होतं एक आटपाट जग!

---

नुकतीच एक चर्चा ऐकली. जिऑलॉजिसिटची मुलाखत आहे. जरूर पहा, ऐका https://youtu.be/zSjnvlDWwrE

Thursday, August 13, 2020

6. अश्मयुग : सामान्य माहिती

अश्मयुग ! अश्म म्हणजे दगड ! म्हणजे दगडांचे युग ? नक्की काय असावं  अश्मयुग म्हणजे ? अगदी  प्रथम ( स्टोन एज ) हा शब्द वापरला गेला तो दॅनिश स्कॉलर ख्रिस्टिन जे. थॉम्सन यांनी, एकोणिसाव्या शतकात.  त्यांनी अगदी सुरुवातीच्या मानवी इतिहासाचे तीन प्रमुख टप्पे मांडले. अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग ( स्टोन एज, ब्रान्झ एज आणि आयर्न एज ) प्रामुख्याने विशिष्ठ काळात मानवाची हत्यारे ज्या वस्तूंपासून तयार झालेली सापडली; त्यांचे नाव त्या काळाल त्यांनी दिले.  ज्या काळात प्रामुख्याने दगडाचा वापर करून हत्यारे बनवली गेली त्या काळाला त्यांनी अश्मयुग हे नाव दिले.

दगडी हत्यारे कोठे कधी वापरली गेली हे ठरणार असल्याने त्यानुसार प्रत्येक प्रदेशात हा काळ बदलतो. पण सर्वसाधारणपणे पणे सुमारे अडिच मिलियन वर्षापूर्वीपासून आफ्रिकेमध्ये अश्मयुगीन मानव रहात होता. तर काही प्रदेशात इ. स. पूर्व  ३०००  वर्षामध्येही अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सापडते. प्रामुख्याने दगडी हत्यारे  वापरणारा मानव म्हनजे अश्मयुगीन मानव !

त्यातूनही अश्मयुग म्हणजे फक्त दगडी हत्यारे असे नव्हे तर नैसर्गिक साधनांचा हत्यारासाठी उपयोग करणारा मानव यात अपेक्षित आहे. दगड, लाकूड, प्राण्यांची हाडं - दात यांपासून हत्यारे तयार करणारा मानव म्हणजे अश्मयुगीन मानव !

अश्मयुगाचा काळ खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचे काही  टप्पेही मानले जातात.  पॅलिओलिथिक एज किंवा जुने अश्मयुग, मेसोलिथिक किंवा मध्य अश्मयुग आणि निओलिथिक म्हणजे नव अश्मयुग ! या काळात अतिशय कमी लोकसंख्या, तीही अतिशय विखुरलेली अशी होती. या काळातील मानव हा प्रामुख्याने हंटर अँड गॅदरर म्हण्जे शिकारी आणि निसर्गातील फळ फळावल, धान्य  जमवून आपली उपजिवीका जगत होता.

शिकार केलेल्या प्राण्याचा अन्न आणि हत्यारं, वस्त्र यासाठी वापर केला जाई. मांस खाण्यासाठी, कातडी वस्त्र म्हणून तर हाडं-दात यांचा वापर हत्यारांमध्ये केला जाई.
जंगलातील जंगली बेरी- छोटी फळं, जंगलात उगवणारे जंगली पण खाण्या योग्य धान्य आणि फळं हेही त्याच्या आहारात होते.
प्राणी आणि ही जंगलसंपत्ती स्वाभाविकच एका ठिकाणची खाऊन संपत असे, त्यामुळे हा मानव सतत स्थलांतर करत राही. शिवाय या काळात वातावरणातही सतत बदल होत असल्याने हा मानव एका ठिकाणी वस्ती करून फार काळ रहात नसे.

जुने अश्मयुग साधारण अडिच मिलियन वर्षांपासून पहिल्या हिमयुगापर्यंत म्हणजे इ. स. पू ९६०० पर्यंतचे मानले जाते. हत्यारांबरोबरच दागिने, गुहेतील भित्ती चित्र यांतून या काळातील मानवाची थोडी माहिती मिळते.
मध्य अश्मयुग हे इ.स. पू. ९६००  पासून मानवाने शेती करायला सुरुवात करे पर्यंतचा काळ म्हणजे साधारण इ. स. पू  ७००० ते इ.स.पू. ४००० हा मानला जातो. याकाळात पृथ्वीवरचे वातावरण प्रचंड थंड ऐवजी हळूहळु गरम होत गेले. उत्तर धृवावरचा बर्फ वितळू लागला. स्वाभाविकच समुद्राची पातळी वर आली. त्यातून भूभागातही बरेच बदल झाले. साधारण इ. स. पू. ५००० पर्यंत आज जसा भूभाग आहे, खंड आहेत तशी विभागणी तयार झाली.
नव अश्मयुग हे मानवाने शेती करणे सुरू केले तेव्हापासून  ते तांब्याचा वापर सुरू केला इथपर्यंत मानले जाते.






Saturday, January 18, 2020

उजवी आणि डावी विचारसरणी

परंपरावादी  आणि सुधारणावादी अशा विचारसरणीच्या लोकांसाठी ह्या संज्ञा प्रामुख्याने वापरल्या जातात.याची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. तेथील लोकसभेतील बैठक व्यवस्थेवरून हि नावे पडली. परंपरावादी नेते उजव्या बाजूला बसत असत. तर नव्या विचारांचे सुधारणावादी नेते डावीकडे बसत असत. यावरून हे नावे पडली.

प्रत्यक्षात खुप वैचारिक वैविध्य या दोन प्रणालीत आहेत. इतकेच नव्हे तर या दोन मुख्य विचारसरणीच्या अंतर्गतही अनेक वेगवेगळे विचारप्रवाह वाहतात. प्रामुख्याने जरी राजकारणात या संज्ञा वापरल्या जात असल्या तरी मुळातून या तत्त्वप्रणाली आहेत. 
यातील काही मुद्द्यांची सरमिसळही काही वेळेस झालेली दिसते. तर काही वेळेस काही मुद्दे वगळले वा नवीन समाविष्टही केलेले आढळतात. कोणत्या मुद्यांचा अधिकाधिक समावेश आहे यावर मग उजवी वा डावी विचारसरणी आहे हे ठरवले जाते.


उजवी विचारसरणी हि अधिकारशाही, वर्गीकरण, श्रेणिबद्धता, उतरंड , कर्तव्य, परंपरा,राष्ट्रवाद या विचारांना प्राधान्य देते. उजव्या विचारसरणीचे लोक हे; परंपरावादी, भांडवलशाहिला प्रोत्साहन देणारे, साम्राज्यवादी, एकाधिकारशाही , फॅसिस्ट ( सर्वंकष सत्तावादी ), प्रतिगामी विचारांचे, पुराणमतवादी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. अधिकारशाही : समाज / राज्याचे सगळे अधिकार एका व्यक्तीच्या हाती असतील.
२. वर्गीकरण : समाजातील सर्व लोकांचे वर्गानुरूप विभाजन केले असेल.
३. श्रेणीबद्धता : समाजातील हे वर्गीकरण पायऱ्यापायऱ्यांच्या स्वरुपात असेल.
४. उतरंड : या पायऱ्यांची एक न बदलणारी उतरंड  असेल
५. परंपरा : समाजातील वर्षानुवर्षे चालता आलेल्या परंपरांंना जपले जाईल.
६. राष्ट्रवाद : आपल्या देशाबद्दल आत्यंतिक प्रेम अणि आदर असेल.
७. भांडवलशाही : समाजातील उत्पादनाची साधने, त्यांची मालकी अणि सर्व अधिकार समाजातील काहीच व्यक्तींच्या होती असतील.
८. साम्राज्यवाद : आपल्या देशाच्या उन्नत्तीसाठी इतर देशांवर अधिकार गाजवून, त्यांचे स्वातंत्र्य झिडकारुन त्यांच्यावर राज्य करणे .
९. एकाधिकारशाही : देशाचे सर्व राजकीय अधिकार एका व्यक्तीच्या हाती असणे .
१०. सर्वंकष सत्तावादी : देशातील सर्वच्या सर्व अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असावी असे मानणारे.
११. प्रतिगामी विचार : जुन्या काळाप्रमाणेच विचार, काळाप्रमाणे न बदलणारे विचार.
१२. पुराणमतवादी : परंपरेने चालत आलेले/ लिहून ठेवलेलेच नियम पाळणारे.

डावी विचारसरणी हि स्वातंत्र्य, समानता, बंधुता,अधिकार, प्रगती, आणि आंतरराष्ट्रीयता (संस्कृतमध्ये म्हणतो तसे वसुधैैव कुटुुंबकम) मानणारी विचारसरणी होय. अणि डावे विचारवंत हे, अराजकतावादी, साम्यवादी, लोकशाही समाजवादी, प्रगतिशील, उदारमतवादी, पुरोगामी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. स्वातंत्र्य : व्यक्तीला काहीही करण्यासाठी मुभा असणे.  कोणाच्याही परवानगीची गरज नसणे
२. समानता : समाजातील सर्व व्यक्ती समान असणे.
३. बंधुता : समाजातील सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रेमाच्या भावनेने जोडलेल्या असतील.
४. अधिकार : प्रत्येक व्यक्तीला आपले आचार, विचार, कृती निवडण्याचे परवानगी असणे .
५. प्रगती : समाजात नवीन विचारांना परवानगी असेल आणि त्याआधारे नवीन आयाम शोधले जातील.
६. आंतरराष्ट्रीयता : एका विशिष्ट देशापुरतेच आपले कर्तव्य न ठेवता, संपूर्ण जगाच्या भल्याचा विचार करणे.
७. अराजकतावादी :  समाजावरती राजकीय सत्तेचा अंकुश अमान्य असणे. किंवा समाजाच्या जीवनपद्धतीत  राजकीय सत्तेचा कमीत कमी प्रभाव असेल.
८. साम्यवादी :  अशी राज्यव्यवस्था जिथे कामगारांचे राज्यसंस्थेवर नियंत्रण असेल.
९. लोकशाही समाजवाद : अशी राज्यव्यवस्था जिथे समाजाच्या उत्पादनांच्या साधनांवर लोकनियुक्त सरकारचे नियंत्रण असेल.
१०. उदारमतवादी : समाजामध्ये विविध विचार, आचार, कृतींना सामान पातळीवर मानले जाईल.
११. पुरोगामी : काळ आणि परिस्थितीनुरूप बदलांना मान्यता देणारे.






       

Thursday, January 16, 2020

काश्मिरचा इतिहास भाग 1,2,3

( डिसक्लेमर : इथे शक्य तितका निरपेक्ष इतिहास लिहिते आहे. फॅक्टस काय आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचावं हा उद्देश.सध्या अर्धवट माहिती आणि सरसकट विधानं अशी परिस्थिती आसपास आहे. म्हणूनच  इथे या लेखनात कोणतेही मूल्यमापन, चूकबरोबर असं पूर्णत: टाळले आहे. आशा आहे त्याच दृष्टिकोनातून वाचले जाईल. इथल्या अनेक जणी अभ्यासू आहेत. माझ्या लिखाणात काही सुधारणा असतील तर जरूर कळवा, शक्यतो संदर्भासकट. सो मला माझं लिखाण तपासून पहाता येईल. धन्यवाद!)

भाग १.

“Paradise is a promise no god bother to keep. There’s only now, and tomorrow nothing will be the same, whether we like it or not.

- Heidi Heilig


प्राचीन काळात काश्मीर हा प्रदेश नेहमीच स्वतंत्र, सार्वभौम होता. अनेक आक्रमक आले, गेले. अनेकदा हा प्रदेश आक्रमकांच्या नियंत्रणाखाली आला, कालांतराने पुन्हा स्वतंत्र झाला.

काश्मीरचा पहिली ओळख सापडते तो कश्यप ऋषींच्या संदर्भात. कश्यप ऋषींनी त्यांच्या बरोबरच्या लोकांच्या साठी काश्मीर मधील तळे कोरडे केले आणि वसती साठी जागा तयार केली. यावरून कश्याप + मीर = काश्मीर असे नाव पडले असे मानले जाते.

आणखीन एक कथा आहे ती राजा जंबू याची. हा राजा शिकारी साठी तावी नदी किनारी फिरत फिरत आला. आणि या प्रदेशाच्या तो प्रेमात पडला. त्याने इथे आपले गाव वसवले. त्याच्या नावावरून जम्मू हे नाव पडले असे मानले जाते.

पहिले मोठे झाले आक्रमण झाले ते इ. स पू. ३२६च्या दरम्यान, अलेक्झांडर द ग्रेट याचे. काश्मीर मधले एक गाव अजूनही त्याची आठवण ठेऊन आहे. अलेक्झंडरच्या घोड्याच्या नावावरून बुफिया हे गाव ओळखले जाते. तिथे त्याची समाधी आहे.

काश्मीर मध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना, धर्मांना सामावून घेतेले गेले. अगदी सुरूवातीला हिंदू धर्मातील शैव पंथाचा इथे प्रसार झाला. अमरनाथ हे त्यांचे प्रसिद्ध दैवत! पुढे इ. स.२५० आसपास बौद्ध धर्माचाही इथे प्रसार झाला. खैबर खिंडीतून आलेल्या मुस्लिम आक्रमकांबरोबर मुस्लिम धर्माचाही इथे प्रसार झाला. पुढे नंद ऋषींनी इथे सूफी संप्रदाय वाढवला. हे सर्व धर्मीय एकोप्याने काश्मीर मध्ये रहात होते. त्यांची म्हणून एक वेगळी जीवनसरणी हळूहळू तयार होत गेली. जेवणाची विशिष्ट पद्धत – वाजवान. वेशभूषा. राहणीमान. कला.

जम्मूतील हिंदू संस्कृती, तिबेट मधली बौद्ध संस्कृती आणि मध्य आशियातील मुस्लिम संस्कृती यांचा मिलाफ बनून सर्वच बाबतीत एक वेगळी, स्वतंत्र संस्कृती काश्मीरमध्ये तयार होत गेली.

चवदाव्या शतकात , सुलतानी राजवटीमध्ये मुस्लिम जनतेमध्ये वाढ होत गेली. परंतु अल्पसंख्यांक हिंदूंनी राजदरबारातील प्रशाकीय जागा मिळवल्या. जोडीने व्यापार, शिक्षण यातही हिंदूंनी आपला जम बसवला. समाजातील सधन समाजात त्यांचा समावेश होता. मात्र मुस्लिम जनता प्रामुख्याने शेती आणि कलाकारी मध्ये काम करत राहिली.

सोळाव्या शतकात सुलतानशाही संपवून मुघल सत्ता उत्तर हिंदुस्थानात आली, काश्मिर मध्येही. परंतु  इ. स. १७७५ मध्ये अफगाणी टोळ्यांनी काश्मीर जिंकून घेतला. इ. स. १८१९ पर्यन्त अतिशय जुलमी अशी ही राजवट काश्मीरवर आपली सत्ता टिकवून होती.

इ. स. १८०० पासून शिखांनी आपला प्रभाव वाढवला. काश्मीर पर्यन्त त्यांनी आपले राज्य वाढवले. राजा रणजीत सिंग या अतिशय बलाढ्य राजाच्या नेतृत्वाखाली सर्वच उत्तर हिंदुस्थानात शिखांनी आपले बस्तान बसवले. रणजीत सिंग यांनी गुलाबा सिंग या डोगरा जमाती मधल्या नेत्याला काश्मीर मध्ये पाठवले. जोरावर सिंग या सेनानीच्या मदतीले गुलाब सिंग यांनी काश्मीर वरती आपले राजी प्रस्थापित केले काश्मीर व्हॅली, जम्मू आणि लडाख हे सर्व प्रांत गुलाबासिंग ने आपल्या अधिपत्याखाली आणले. एका अर्थाने आज जो काश्मीर आपण पहातो, तो गुलाबसिग यांनी प्रथम निर्माण केला. (इ. स. १८३४) इतकेच नव्हे तर लडाख, गिलगीट, बल्टिस्थान, गारटोक ( मान सरोवरा पर्यंत ) असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि तिबेट पर्यंत ताणल्या.


आज आपण जो काश्मीर ओळखतो तो काश्मीर गुलाब सिंग यांनी निर्माण केला. यात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन महत्वाच्या राजकीय मुत्सद्देगिरी गुलाब सिंगाने केल्या.

उत्तरेकडे आधी बघितल्याप्रमाणे लडाख, गिलगिट,बाल्टीस्थान, गारटोक  असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा वाढवल्या. शिवाय त्यांना मान्यताही मिळवली.

१८४१ मध्ये गुलाब सिंगाचा सेनापती जोरावर सिंग  आपल्या सैन्यासह तिबेटमध्ये धार्मिक पर्यटनासाठीगेला होता. तेव्हा टोयो या ठिकाणी चीन आणि तिबेट या दोघांनीं मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. जोरावर सिंग आणि त्याचे सैनिक अतिशय  शौर्याने लढले. परंतु  चीन आणि तिबेट यांच्या एकत्रित आणि अचानक झालेल्या आक्रमणात ते टिकू शकले नाहीत.  या युद्धात जोरावर सिंह आणि त्याचे ४००० सैनिक यात मारले गेले. त्यांचे शौर्य इतके वाखाणण्याजोगे होते कि शत्रूने जोरावर सिंग याची समाधी टोयो येथे बांधली. आजही अनेक पर्यटक त्याला भेट देतात.

या पराभवांनंतर चीन, तिबेट आणि काश्मीरचा राजा गुलाबसिंग यांच्यात चुशुल चा करार केला गेला (१८४२) हा तह अतिशय महत्वाचा ठरला. आणि अनेक वर्ष हा पाळला गेला. या तहानुसार प्राचीन काळापासून चालत आलेल्या सीमा तिघांनींहि मान्य केल्या. याशिवाय पूर्वापार चालत असलेला तीनही प्रदेशातील व्यापार तसाच चालू ठेऊ असेही ठरले. याशिवाय युद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी,  गुलाबसिंग यांना मान सरोवरा जवळील तीन गावानं जहागीर म्हणूनही देण्यात आली . एका अर्थाने गुलाब सिंगाचे काश्मीर मधले ( प्रामुख्याने लडाख मधले ) प्राबल्य चीन, तिबेट दोघांनीं मान्य केले.
आधी म्हटल्याप्रमाणे हा करार अतिशय सामंजस्याने  तिघांनीं स्वीकारला आणि मोठ्या काळासाठी अवलंबलाही ! अशा रीतीने गुलाब सिंगांनी उत्तरेकडच्या काश्मीरच्या सीमा निश्चित केल्या.

पुढे राजा रणजित सिंहाच्या मृत्यू नंतर अनेक शीख राज्ये कमकुवत होऊ लागली. काळाची पावले ओळखून गुलाब सिंगाने नव्याने प्रस्थापित होत असलेली सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीशी संपर्क वाढवला. कंपनीच्या कर्नल हेनरी लॉरेन्स यांच्याशी दोस्ती केली.

पहिल्या शीख ब्रिटिश युद्धापासून  गुलाब सिंग लांब राहिला (१८४५-४६). ब्रिटिशांनी पंजाब प्रांत जिंकून घेतला. रणजित सिंगांच्या वंशज दुलीप सिंग याचा पराभव झाला. त्याच्याशी ब्रिटिशांनी लाहोर करार केला आणि त्याची सत्ता संपुष्टात आली.  इतकेच नव्हे तर, त्याचा आता काश्मीरवरचा तथाकथित अधिकारही संपला. आणि गुलाब सिंग आता  स्वतंत्र राजा बनला. यावर शिक्कामोर्तब झाले ते अमृतसरच्या कराराने. ब्रिटिशांनी या करारान्वये गुलाब सिंग हा काश्मीरचा सार्वभौम राजा आहे हे मान्य केले. आणि वेळप्रसंगी गुलाब सिंग ब्रिटिशांकडून जमीन विकत घेऊ शकेल हेही मान्य केले. ( भावी काळात हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरला.) हे घडून आले याचे कारण होते ते म्हणजे  गुलाब सिंग आणि हेनरी लॉरेन्स यांची मैत्री.
यान्वये १८४६ मध्ये गुलाब सिंग यांनी शीख साम्राज्याचा भाग ब्रिटिशांकडून तेव्हाच्या ७५ लाख नाणकशाही रुपये देऊन विकत घेतला. शीख ब्रिटिश युद्धांचा झालेला खर्च ब्रिटिशांनी वसून केला.

अशा रीतीने दक्षिणेकडील काश्मीरच्या सीमाही गुलाब सिंगांनी निश्चित केल्या. एका अर्थाने जुलै २०१९ पर्यंत जों  काश्मीर आपण ओळखत होतो, त्याची पूर्ण निर्मिती गुलाब सिंग यांच्या मुत्सद्देगिरीचे फळ होते.

१८४६ ते १९४७ या काळात डोगरा घराण्याकडे काश्मीरची सत्ता होती. संरक्षण व्यवस्था, परराष्ट्र खाते, आणि दळणवळण हे मात्र ब्रिटिशांनी आपल्याकडेच ठेवले.

भाग २.

आता पर्यंत  पण काश्मीरमधली परिस्थिती काय होती ते पाहिले. काश्मीरमध्ये गुलाब सिंगांचे राज्य तयार करण्यासाठी ब्रिटिशांनीही मदत केली. एक मोठा भूभाग ब्रिटिशांनी गुलाब सिंग यांना विकला. यामागे ब्रिटिशांची कुटनिती होती. ती समजण्यासाठी आता आपल्याला थोडी आंतरराष्ट्रीय राजकारणाची, त्यातही युरोपची  माहिती घ्यावी लागेल.

प्राचीन काळापासून युरोप मध्ये काही साम्राज्ये फार महत्वाची होतो. काही देशांतील राज्यांनी आपला प्रभाव युरोपवर पाडला होता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि रशिया हे ते देश. रशिया हा देश  युरोप, आशिया दोन्ही खंडात पसरलेला, भला मोठा देश. उत्तरेकडे प्रचंड मोठी सागरी किनारपट्टी असलेला देश. परंतु तिचा काहीही फायदा नव्हता. कारण वर्षातले आठ महिने तिथे बर्फ असे. स्वाभाविकच   दुसरीकडची सागरीकिनार पट्टी रशियाला हवी होती. त्याचे कारण अर्थातच व्यापार हे होते. आणि हि किनारपट्टी रशियाला  भूमध्य समुद्रामध्ये ( मेडिटरेनियन समुद्र) हवी होती. त्यामुळे युरोप, आफ्रिका दोन्ही कडे व्यापार करणे सोपे जाणार होते. तर भारतातून दक्षिणेला इतर आशियातील देशांशी व्यापार करणे रशियाला सोपे जाणार होते.

आता थोडा नकाशाही पाहावा लागेल.

निळी रेषा बर्फ़ाळ किनारा दाखवतेय. तर हिरवी रेषा व्यापारासाठी रशियाला हवा असलेला मार्ग दाखवतेय.

इंग्लंडच्या दृष्टीने भारतातले त्यांचे साम्राज्य अतिशय महत्वाचे होते. आणि इंग्लंड- भारत  व्यापार प्रामुख्याने भूमध्य समुद्र (मेडिटरेनियन सी ) मधूनच असे. याच मार्गावर रशिया येऊ पाहात होता. त्यामुळे इंग्लंड आणि रशिया यांच्यात तणाव होता. काश्मीर प्रश्नामध्येही हेच घडले.  शिवाय इंग्लंड हा भांडवलशाही देश तर त्या विरुद्ध रशिया हा साम्यवादी देश होता. (साम्यवाद हे तत्वज्ञान भांडवलशाही तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. ) रशिया आणि  तत्कालीन हिंदुस्तान यांची उत्तरेला सीमा समान होती.





इ.स. १९३० मध्ये चीनने सिकयांग प्रांत अफगाणिस्तान कडून जिंकून घेतला. आणि चीनही तत्कालीन हिंदुस्तानच्या सीमेवर येऊन ठेपला.

रशिया आणि चीन या दोन्ही सत्तांपासून हिंदुस्तानातील सत्ता सुऱक्षित ठेवायची तर काश्मीर हे राज्य स्वतंत्र राहिलं तर उपयोगी पडेल असं ब्रिटिशांना वाटत होतं. (इंग्रजी मध्ये याला बफर स्टेट म्हणतात तर मराठीत उंट राज्य)
यासर्व दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी  गुलाब सिंगांच्या काश्मीर उभारणीला हातभारच लावला.

तर १९४७ मध्ये काश्मीरमध्ये हि परिस्थिती होती. माउंटबॅटन योजनेनुसार हिंदुस्तानची फाळणी होणार हे तत्कालीन सर्व पक्षांनी मान्य केले. या योजनेनुसार मुस्लिम बहुसंख्य असलेले दोन प्रदेश, म्हणजे काश्मीरच्या पश्चिमेकडचा प्रदेश आणि पूर्व बंगाल हे मिळून पाकिस्तान हा देश आणि बाकीचा भारत  असे दोन स्वतंत्र देश निर्माण होणार होते. बाकी रियासतींना (प्रिंसली स्टेट्स ) तीन पर्याय होते. एक तर भारतात सामील व्हायचे , पाकिस्तानात सामील व्हायचे अथवा स्वतंत्र राहायचे. अनेक रियासतींनी भारत वा पाकिस्तान मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु काहींनी स्वतंत्र राहणे स्वीकारले.

काश्मीरमध्ये राजा हरी सिंग हा डोगरा राजा  त्यावेळेस सत्तेवर होता. त्याला असे वाटत होते कि काश्मीर एक स्वतंत्र देश म्हणून राहावा. (कारण अनेक वर्ष -शंभर वर्षे, स्वतंत्रच असण्याची सवय काश्मीरला होती . ) किमान विचार करायला काही वेळ घेऊन मगच भारत वा पाकिस्तान मध्ये सामील व्हायचे हे काश्मीर ठरवेल; तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी काश्मीर बाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी असे राजा हरी सिंग यांचे मत होते.

पाकिस्तानाला काश्मीर प्रामुख्याने दोन कारणांसाठी हवा होता. १. काश्मीर हा बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रदेश होता. आणि त्याहूनही महत्वाचे; २. पाकिस्तानात येणाऱ्या सहाही  नद्यांचे स्रोत काश्मीर मध्ये होते. एका अर्थाने पूर्ण पाकिस्तानच्या पाण्याच्या सगळ्या नाड्या काश्मीरकडे होत्या. सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, रावी आणि  सहा नद्या म्हणजे पाकिस्तानचा जीवनस्रोत होत्या. तो स्रोत परकीय देशाकडे न राहाता आपल्याच देशात यावा असा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

दरम्यान काश्मीरमध्येही स्वातंत्र चळवळ सुरु झालेली होती. तेथील राजेशाही संपून लोकांचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी १९३२ पासून प्रयत्न सुरु झाले होते. सुरुवातीला मुस्लिम कॉन्फरन्स स्थापन झाली. पुढे हिचे नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स असे या पक्षाचे नाव ठेवले गेले. १९४७ पर्यंत काश्मीरमधली लोकशाही चळवळही जोर धरू लागली होती.

तर काश्मीर मध्ये हि अशी  परिस्थिती १९४७ च्या सुमारास होती. शंभर वर्ष स्वतंत्र असणारा काश्मीर आता एका मोठ्या स्थलांतराकडे वाटचाल करत होता.

( लिहिण्याच्या ओघात कधी ब्रिटन / इंग्लंड, ब्रिटिश / इंग्रज असे लिहिले गेले आहे. दोन्हीचा अर्थ एकाच अपेक्षित आहे याची कृपया नोंद घ्यावी )

भाग ३.

आधी बघितल्याप्रमाणे १९३२ मध्ये काश्मीरमध्ये राजेशाही विरुद्ध जनतेची चळवळ उभी राहू लागली. मुस्लिम कॉन्फरन्स आणि पुढे नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष जोर धरू लागले. शेख महंमद अब्दुल्ला हे या चळवळीचे प्रमुख नेते होते. चळवळीचा वाढता जोर पहाता ती दडपण्यासाठी राजा हरी सिंग यांनी १९४६ मध्ये शेख अब्दुल्लाआणि अनेक नेत्यांना अटकेत टाकले.

काश्मीरमधली हि लोकशाही चळवळ तत्कालीन काँग्रेसला योग्य वाटत होती. शिवाय पंडित नेहरू हे स्व:ता काश्मिरी असल्याने त्यांनी या चळवळीला पाठींबा दिला. शेख अब्दुल्ला आणि त्यांची खास मैत्री होती. अब्दुल्लाच्या सुटकेची मागणी करण्यासाठी नेहरू मे १९४६ मध्ये काश्मीर मध्ये गेले. परंतु राजा हरी सिंगांनी नेहरूंना अटक करून त्यांची रवानगी काश्मीर बाहेर केली.
जुलै १९४७ मध्ये म . गांधी काश्मीरमध्ये आले. म. गांधींच्या या सभेत काश्मीरमधील जनतेने दिलेल्या घोषणा फार महत्वाच्या होत्या. भारत/ पाकिस्तान किंवा म . गांधी / ब . जिना यांच्या बद्दल त्या नव्हत्या, तर " बागी अब्दुला कि जय !" अशा होत्या. या सभेत म . गांधींनीहि फार आग्रह धरला नाही. " राजाने न घाबरता आपल्याला हवा तो निर्णय घ्यावा परंतु शेख अब्दुल्लाना मोकळं करावं" असं  म. गांधींनी सांगितले.

ऑगस्ट १९४७ मध्ये  भारत, पाकिस्तान स्वतंत्र झाले. काश्मीर बाबत राजा हरी सिंगाच मत होतं कि "जैसे थे परिस्थितीच राहावी, म्हणजेच काश्मीर हा स्वतंत्र राहील" असे मत त्यांनी मांडले. अधिक विचार करण्यासाठी त्यांना वेळही हवा होता. पाकिस्तान काश्मीरला सामील करून घेण्यास उत्सुक होता.( याची दोन कारणे आपण आधी बघितली आहेतच, -बहुसंख्य  मुस्लिम जनता आणि नद्यांचे स्रोत)

राजा हरी सिंगाकडून कोणतेच उत्तर येत नाही बघून पाकिस्तानने  ऑपरेशन गुलमर्ग सुरु केले. या ऑपरेशन मार्फत पख्तुनी पठाणी टोळ्या काश्मीरमधे पाठवल्या गेल्या. (या टोळ्या म्हणजे पाकिस्तानी सैन्य नव्हते.) या पख्तुनी पठाणी टोळ्यांनी  काश्मीरच्या उत्तर सीमेवरून घुसून अल्पसंख्य हिंदूंची कत्तल सुरु केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून जम्मूमध्ये हिंदूंनी मुस्लिमांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि पूर्ण काश्मीरमध्ये जातीय दंगली उसळल्या.

भारत सरकारने राजा हरी सिंग यांना विनंती केली कि हा क्षोभ कमी करायचा तर शेख अब्दुल्ला यांची सुटका करा. राजा हरी सिंग यांनाही लक्षात आले कि चिघळणारी परिस्थिती काबूत आणायची तर आता शेख अब्दुल्लाना सोडणे आवश्यक आहे. परंतु यामुळे पाकिस्तानचा असा समाज झाला कि आता काश्मीरवरती भारताचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानने शेख अब्दुल्ला आणि इतर काश्मिरी नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अब्दुल्ला यांचे मत अजून नक्की ठरत नव्हते. त्यांचे मत - "आधी राजेशाही बरखास्त करू. लोकांचे स्वातंत्र्य मिळवू  आणि नंतर इतर विचार करु. आणि भारत/ पाकिस्तान जे आपल्या अटी मान्य करतील तिथे सामील  होऊ. " असे होते.

दरम्यान ऑक्टॉबर १९४७ मध्ये पख्तुनी पठाणी टोळ्यांनी अचानक मोठे आक्रमण केले. आता त्यांचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडियर अकबर खान आणि स्थानिक पंजाबी नेता सरदार शौकत हयात यांच्याकडे होते.  उरी, बारामुल्ला, इथे प्रचंड लुटालूट झाली.

याच सुमारास सरदार इब्राहिम या पेशाने वकील असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुझफराबाद, पूंच , मीरपूर या उत्तर सीमेवरच्या  प्रांतांनी स्वतः: ला स्वतंत्र घोषित केले. ( जो आज पाक व्याप्त काश्मीरचा भाग आहे. )

सगळीकडून हल्ले होऊ लागले तसे राजा हरी सिंगाने भारताकडे मदत मागितली.

१९४७ च्या सुरुवातीसच. भारत आणि पाकिस्तान फाळणी होणार हे निश्चित झाले होते. काश्मीरमधील उत्तरेचा गिलगिट हा प्रदेश जो १९३५ मध्येच राजा हरीसिंगांकडून ब्रिटिश सरकारने ६० वर्षांसाठी  भाड्याने घेतला होता, आणि जिथे कॅप्टन विल्यम ब्राऊन याची पोलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली होती. फाळणीनंतर हा प्रांत पाकिस्तानात जावा अशी ब्रिटिशांची इच्छा होती. याचे कारण म्हणजे भावी भारत हा समाजवादी विचारांचा असण्याची शक्यता जास्ती होती. आणि अशा परिस्थितीत स्वतंत्र भारत हा रशियाचा मित्र म्हणून उभा राहण्याची शक्यता होती. तर पाकिस्तान मात्र रशियाशी मैत्री करण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे जा गिलगिट प्रांत पाकिस्तानकडे राहाता तर रशियाला भूमध्य समुद्रात येण्यासाठी आडकाठी करता आली असती.

राजा हरीसिंगांचे पंतप्रधान रामचंद्र काक हे होते. त्यांना  काँग्रेसचे अजिबात प्रेम नव्हते, उलट जीनांशी मात्र त्यांची दोस्ती होती. स्वाभाविकच पंतप्रधान काक यांचा सल्ला मानून काश्मीर पाकिस्तानात सामील होईल अशी शक्यता जास्त होती.  हे ओळखून सत्तांतराच्या केवळ १५ दिवस आधी ब्रिटिशांनी गिलगिट प्रांत राजा हरीसिंगांना परत केला. तसेच कॅप्टन  ब्राऊन यांना जम्मू काश्मीरच्या सैन्याचे सर्व अधिकार दिले.

दरम्यान म. गांधींच्या प्रभावातून राजा हरिसिंग यांनी स्वातंत्र्याच्या केवळ ४ दिवस आधी रामचंद्र काक यांना पदच्युत केले. आणि काश्मीर भारताबरोबर जाईल अशी परिस्थिती दिसू लागली. भावी काळात गिलगिट प्रांत भारतात राहणे ब्रिटिशांना नको होते. आणि म्हणून कॅप्टन ब्राऊन यांनी मुस्लिम सैन्याला पाठबळ देत जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरलाच पदच्युत केले. आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाल्याचे जाहीर केले. कॅप्टन ब्राऊन यांच्या या कृतीला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता हे पुढे निश्चित झाले. १९४८ मध्ये कॅप्टन ब्राऊन यांचा ब्रिटिश सरकारने  MBE (Most Excellent Order Of The British Empire) हा पुरस्कार देऊन गौरव केला, यावरूनच हे स्पष्ट व्हावे. इतकेच नव्हे तर पुढे पाकिस्ताननेही कॅप्टन ब्राऊन यांना सितारा ए पाकिस्तान हा सर्वोच पुरस्कारही दिला.

अशा रीतीने पूँछ प्रांत, आझाद काश्मीर आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाले. काश्मीरचे तुकडे पडू लागले. सीमेवरील सततच्या आक्रमणांनी हि परिस्थिती अजूनच चिघळू लागली.  आक्रमक टोळ्यांना अटकाव करणे गरजेचे होते.

परंतु १९४७-४८ मध्ये कारगिलच्या पुढे लष्करी हालचाली करण्यायोग्य असे रस्ते नव्हते. त्यामुळे होणाऱ्या टोळ्यांच्या आक्रमणांना मागे ढकलणे हे आव्हानात्मक होते. त्याऐवजी या टोळ्यांची जे मूळ स्रोत होते त्यावर हल्ला करणे लष्कराला जास्त योग्य वाटत होते. परंतु यात दोन मुद्दे होते. एक तर त्यासाठी मूळ पाकिस्तानी भूमीवर हल्ले चढवावे लागले असते आणि हे सरळ सरळ भारताने पाकिस्तानवर केलेले  युद्ध मानले गेले असते.
आणि दुसरे हि सर्व कार्यवाही पंजाबमधून करावी लागली असती. जो पंजाब अजूनही फाळणीच्या जखामांमधून पुरता सावरला नव्हता.

या सगळ्या धामधूम मध्ये शेवटी प्रत्यक्ष युद्ध नको म्हणून शेवटी भारताने संयुक्त राष्ट्रसंघटनेकडे (युनो) धाव घेतली. व्ही. के. मेनन यांनी भारताची बाजू युनोमध्ये अतिशय सविस्तर मांडली. एप्रिल १९४७ मध्ये युनोने पाकिस्तानला सर्व प्रकारचे सैन्य काश्मीरमधून बाहेर काढण्यास सांगितले. भारतानेही सुरक्षीतता  आणि शांतता यासाठी लागेल तेव्हढेच सैन्य काशीरमध्ये ठेवावे असेही सांगितले. त्यांनतर युनोचे शिष्टमंडळ काश्मीर मध्ये जाऊन सार्वमत घेईल असे सांगितले.  परंतु हे दोन्ही देशांना मान्य झाले नाही.

दरम्यान शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले. राजा हरिसिंग हे राज्याचे प्रमुख ( हेड ऑफ द स्टेट) झाले. आणि एका अर्थाने काश्मीर भारताचा भाग बनले. परंतु तरीही काश्मीरमधली परिस्थिती अतिशय प्रक्षोभकच होती. युनोने सांगूनही काश्मीरमध्ये युद्ध चालूच होते. सप्टेंबर १९४८ मध्ये पाकिस्तानी सैन्य पुढे पुढेच येत होते. त्यांना भारतीय सैन्याने द्रास, कारगिल येथ पर्यंत अडवले. मुख्यत: श्रीनगर ते लडाख हा महामार्ग भारतीय सैन्याने सुरक्षित केला. परंतु सैन्याला आगेकूच करण्याची परवानगी पं.  नेहरूंनी दिली नाही. याबाबात आजही खूप उहापोह केला जातो. त्या वेळी जर भारतीय सैन्याला पुढे जाण्याची परवानगी मिळाली असती तर आज काश्मीर प्रश्न शिल्लकच राहिला नसता, असेही मांडले जाते.

पं. नेहरूंनी हा असा निर्णय का घेतला असावा हे त्या काळातील काही राजकीय घडामोडींची  माहिती करून घेतल्या तर समजू शकते.

शेख अब्दुल्ला, ज्याच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये सरकार स्थापन झाले होते. त्यांचा या बाबतचा दृष्टिकोन या सर्व निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारा होता.  काश्मीर हे  आपल्याला जरी एकसंध राज्य वाटत असले तरी तशी परिस्थिती नाही. काश्मीर मध्ये जम्मू, काश्मीर खोरे ( श्रीनगर आणि आसपासचा भाग ), लडाख हे जसे तीन मुख्य भूप्रदेश आहेत, तसेच काश्मिरी जनतेमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या भाषानुरूप  त्यांचे नेतेही वेगवेगळे होते. प्रामुख्याने जे लोक काश्मिरी भाषिक होते, त्या लोकांवर शेख अब्दुल्लाचा प्रभाव होता. परंतु जे पंजाबी भाषा बोलणारे होते ते काश्मिरी मात्र अब्दुल्लाचे कितपत ऐकतील याची खुद्द अब्दुल्ला यांनाही खात्री नव्हती. द्रास, कारगिल याप्रांतांच्या पश्चिम-उत्तरेकडील प्रांत हे पंजाबी भाषा बोलणारे होते. स्वाभाविकच त्यांच्यावर शेख अब्दुल्ला यांचा प्रभाव फार नव्हता. अशा परिस्थितीत  अतिशय कष्टपूर्वक, सैन्याने बाजी लावून समजा उत्तरेकडचे प्रांत जिंकले असते तरी ते टिकवणे खूप अवघड होते. सैन्याने हे प्रांत जिंकूनही तेथे शांतता राखणे, तेथील नागरिकांना भारताचा भाग बनवणे कितपत जमेल याची ना अब्दुल्लाना खात्री होती, ना पं. नेहरूंना. तशात आजाद काश्मिर आणि गिलगिट या प्रांतांनी आधीच आपले स्वातंत्र्य घोषित केले होतेच. त्यांना पुन्हा भारतात सामील होण्याबद्दल वळवणे हेही अवघडच जाणार होते.

हे सगळे चालू असताना नवस्वतंत्र भारताची सर्व व्यवस्था लावण्याचे एक मोठे काम चालू होते हेही विसरता कामा नये. नुकते मिळाले स्वातंत्र्य टिकवायचे , त्यासाठी आवश्यक अशी अनेक अतिशय महत्वपूर्ण कामे चालू होते. स्वतंत्र  सार्वभौम भारताची राज्यघटनेने तयार  करणे , संसदीय संरचना निर्माण करणे, सार्वत्रिक निवडणुकांची तयारी, भारतातील प्रशाकीय संरचना  उभी करणे, न्यायव्यवस्थेची संरचना भारतीय करणे, एकूणच संपूर्ण भारताची रचनांना करण्याचे अतिशय जिकिरीचे, आव्हानपूर्ण काम  करावयाचे होते. अशा परिस्थितीत केवळ काश्मीर प्रश्न धसास न लावता; तो शक्य तितका सोडवणे आणि युद्ध थांबवून एक किमान शांतता प्रस्थापित करणे हे तत्कालीन सर्वच नेत्यांना योग्य वाटले. भावी बलाढ्य देश निर्मिती साठी अखेर ३१ डिसेंबर १९४८ ला युद्ध समाप्तीची घोषणा केली गेली.

एकुणातच भारताचा राज्यकारभार सुरळीत चालू व्हावा यासाठी संपूर्ण भारतभर शांतता असणे निकडीचे होते. काश्मीरमध्येही शांतता राहायची तर तेथील जनतेला लोकशाहीतील सर्व अधिकार देणे आवश्यक होते. यात मोठा अडथळा होता तो काश्मिरी राजवटीचा, राजपदाचा! जोवर तेथे राजवट अस्तित्वात राहील तोवर तिथे लोकशाही प्रस्थापित  झाली नसती. त्यामुळे भारत सरकारकडून राजा हरिसिंग यांना पद सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले. राजा हरिसिंग यांना हा प्रचंड मोठा धक्का होता. इतकेच नव्हे तर राज्य, देशाच्या भल्यासाठी त्यांनी काश्मीरही  सोडावा असेही सुचवले गेले. अखेर देश आणि  जनतेच्या भल्यासाठी राजा हरिसिंग यांनी राजपदाचा त्याग केला. राजपुत्र करणसिंग यांना प्रतिनिधी म्हणून नेमूनत्यांना  शेख अब्दुल्ला यांच्याकडे पाठवण्यात आले. तिथे करणसिंग केबिनेटलाही भेटले.

दरम्यान युनो मार्फत नवीन प्लान मांडला गेला. डिकन्स यांनी हा प्लान मांडला. त्यांनी सुचवले कि जम्मू, लडाख येथे हिंदू लोकसंख्या जास्ती असल्याने ते प्रांत भारतात सामील केले जावेत आणि गिलगिट, पूंछ येथे मुस्लिम लोकसंख्या अधिक म्हणून ते प्रांत पाकिस्तानात सामील केले जावेत. काश्मीर व्हॅली मध्ये सार्वमत घेऊन त्याचा निर्णय घेतला जावा. परंतु पाकिस्तानला हे अमान्य होते. लडाख, जेथून सर्व प्रमुख पाकिस्तानी नद्या उगम पावत होत्या त्या प्रांतांवरचा हे हक्क गमावणं पाकिस्तानला मान्य नव्हतं. अनेक चर्चा होऊन अखेर हाही प्लान नाकारला गेला.

दरम्यान ऑकटोबर १९५० मध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांनी एक मोठा कायदा आणला. जमीनदारी नष्ट करणारा कायदा. खरे पहाता हा अतिशय प्रगतिशील विचार होता. भारतातही अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचा कायदा १९४९ ते ५१ दरम्यान सर्व राज्यांमध्ये आणला गेला होता. काश्मीर मध्ये प्रामुख्याने जम्मूतील हिंदू, आणि काश्मीर व्हॅलीतील पंडित जमीनदार होते. या कायद्याने कसेल त्याची जमीन हे मान्य केले त्यामुळे स्वाभाविकच अनेक हिंदू आणि पंडित यांचे मोठे नुकसान झाले.

युनोमधून काही घडत नसल्याने सार्वमताऐवजी निवडणुकांचा मार्ग शेख अब्दुल्ला यांनी अवलंबायचा ठरवला आणि निवडणुका जाहीर केल्या. अल्पसंख्य हिंदूंच्या पक्षाने; प्रजा परिषदेने या निवडणुकांवर बहिष्कार घातला. नोव्हेंबर १९५१ मध्ये  नेशनल कॉन्फरन्स ने सत्ता स्थापन केली. नवीन स्थापन झालेल्या असेंब्लीनें राजपद नष्ट करून, सदर ए रियासत हे काश्मीर मधील घटनात्मक प्रमुख पद निर्माण केले. काश्मीरमधली राजेशाही कायद्याने संपुष्टात आली . करणसिंग  हे पहिले सदर ए रियासत म्हणून काश्मीरचे प्रमुख बनले. हे पद राज्यपालांच्या पदासारखे होते.
यानंतरची मोठी घोषणा होती ती म्हणजे ज्यांच्या जमिनी जमीनदारी नष्ट करण्याच्या कायद्यान्वये गेल्या होत्या त्यांना कसलीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही याची. याला प्रजा परिषदे हिंसक विरोध करायला सुरुवात केली. एकीकडे राज्यांतर्गत हिंसाचार बळावलेला अन दुसरीकडे राज्याची घडीही बसवायची या कात्रीमध्ये काश्मिरी सरकार सापडले. पुन्हा एकदा भारतासरकाराकडे मदत मागितली गेली. त्यान्वये काश्मीर आणि भारत सरकार यांच्यात दुसरा करार केला गेला - दिल्ली करार १९५२. काश्मीर सरकार आणि भारत सरकार यांच्यातील घटनात्मक आणि संस्थात्मक संरचना या करारान्वये ठरवली गेली.
एका अर्थाने काश्मीरला भारताचा भाग म्हणून मान्य करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरतो. या करारामध्ये काही अतिशय महत्वपूर्ण गोष्टी होत्या.
१. काश्मीर भारताचा भाग असेल. 
२. संस्थानांच्या विलीनीकरणाचा जो मूळ कायदा होता त्यातील कलमे काश्मीरला लागू असतील, त्याशिवाय राज्यघटनेतील नियम, कायदे यांना काश्मीर बांधील नसतील . 
३. काश्मीरच्या  असेंब्लीनें हे मान्य केलेलं असेल .  

या शिवाय काही विशेष सवलतीं काश्मीरला दिल्या गेल्या. जसे की काश्मीरचा  स्वतंत्र झेंडा असेल. काश्मीरचे मुखपद काश्मीरचे पंतप्रधान म्हणून ओळखले जाईल. हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये ३७० ए  हे नवीन कलम समाविष्ट केले गेले.
या करारामुळे काश्मीर राज्याला अपेक्षित स्वायत्तता मिळाली आणि काश्मीर भारतात सामीलही झाले.
(क्रमश: पुढील भाग जरा सावकाशीने लिहेन)


Sunday, September 29, 2019

16. कोरलंय काय या डोक्यावरती?

( लेखातील छायाचित्र By Saqib Qayyum - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=31036234 आणि नेटवरून साभार


परवा आपण  पृथ्वीच्या पाठीवर ठेवलेल्या टोपीखालची गंमत बघितली. आज आपण एका उंच डोंगराच्या डोक्यावर काय कोरलं बघुयात. याठिकाणाच नाव आहे सिगरिया ! आता तुम्हालाओसायरिस आणि सिगरिया यात काही साम्य हि दिसेल. अगदी नावापासून, हो ना?  OSIRIS and SIGARIYA पण या दोन जागा एकमेकींपासून खूप लांब आहेत/ ओसायरिस आहे इअफ्रिकेत उत्तरेला तर सिगरिया आहे आशिया मध्ये दक्षिणेला . श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. तशी हि जागा  आता बहुतेकांना माहिती असते. जागतिक वारसा म्हणून घोषित आणि संरक्षित आहे. बहुतांश श्रीलंका पर्यटना मध्येही याचा समावेश असतो.

श्रीलंकेच्या मध्यात असलेल्या डांबूला या गावाजवळ एक प्रचंड मोठी शिळा आहे. तिचेच नाव सिगारिया (म्हणजे  सिंहगिरी )


असं म्हट्लन जातं कि कश्याप राजाने (इ.स. ४७७ -४९५) या सिंहगिरीवरती आपली राजधानी वसवली. परंतु त्याच्या मृत्यूनेणार हि वसाहत ओस पडली.
काहीं पुरावे असे सांगतात कि तिसऱ्या शतकापासून चवदाव्या शतका पर्यंत इथे बुद्ध विहार होते. बॊध्द साधकांनी अनेक गुहा कोरून तिथे आपली साधना केली.

त्यांनतर सिगारियाचा जगाला विसर पडला. पुढे १८३१ मेजर जोनाथन फोर्ब्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली. अन तेव्हापासून आधुनिक जगाला या ठिकाणाची माहिती  मिळाली. पुढे १८९० मध्ये काही प्रमाणात उत्खनन झाले. १९८२ मध्या श्रीलंकेच्या सरकाराने  यावर पुन्हा काम सुरु केले. आणि आता हे ठिकाण आधी म्हटल्याप्रमाणे जागतिक वारसा म्हणून जाहिर केले गेले आहे .

६६० फूट उंच असलेल्या या उभ्या कातळाच्यावरती एक आश्चर्य आहे. या कातळावरती जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक वाट नाही. सुरुवातीला काही दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर सुरेख रचलेली बाग लागते.



विविध चौकोनी दगडी हौद त्यात पाणी आणि आसपास सुरेख हिरवळ. काही अंतर गेल्यानंतर मात्र आपण उभ्या कातळापाशी  येतो.



 आणि समोर असते ती अतिशय अवघड अशी लोखंडीशिड्यांची माळ. तीही तशी नवीन आहे. जरा बाजूला नजर फ़िरवली कि या कातळाला सिगारिया का म्हणातात याची पहिली प्रचिती येते.


कातळातून कोरलेला सिहंचा पंजा .

समोरच्या अतिशय उंच, चढाच्या जवळ जवळ १२०० पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सिगारियाच्या वरती पोहचतो.  खाली बघताना फार विहंगम दृश्य दिसतं.




या कातळाच्या वरती चढून गेल्यानंतर आपल्याला हा नजारा दिसतो.


 .


Monday, September 23, 2019

लोकशाही समाजवाद



यामध्ये दोन विचारसरणी एकत्र आल्या आहेत. लोकशाही आणि समाजवाद
लोकशाही म्हणजे काय हे बहुतांशी आपणास माहिती असते. समाजवाडा बद्दल मात्र काही शंका मनात असू शकतात.
लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. अगदी साधी सोपी, सरळ व्याख्या म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून केलेले राज्य. परंतु हि व्याख्या अतिशय सोपी, खरं तर अतिशय डायल्युट पातळ केलेली व्याख्या आहे. फार पूर्वी ग्रीक नागरराज्यामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. कालांतराने परिस्तितीनुरूप त्यात बदलही होत गेले. आज प्रामुख्याने वास्तवात आहे ती लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. यामध्येहि काही प्रकार आहेत, परंतु आता त्या तपशिलात जायला नको. इतकंच माहिती असू द्या कि एखाद्या देशातील लोक सार्वत्रिक मतदानाने आपले प्रतिनिधी निवडून देतात. आणि हे प्रतिनिधी लोकांच्यावतीने राज्याचा कारभार चालवतात.

लोकशाही हि प्रामुख्याने राज्यव्यवस्था कशी चालावी या संदर्भात आहे. तर समाजवाद हा समाजातील उत्पादनांच्या साधनांच्या मालकी बाबत आहे. कोणत्याही समाजामध्ये उत्पादनाची साधने असतात. जसे कि जमीन, कारखाने, कलाकौशल्याची साधने, कार्यालये, उद्योग, व्यापार, पर्यटन, असे सर्व ज्यातून अर्थ/ पैसा उत्पन्न होतो अशा सर्व गोष्टी. ह्या उत्पादनांच्या साधनांवर कोणाचा अधिकार असेल ह्यावरून त्या त्या समाजाची अर्थव्यवस्था ओळखली जाते.

या दोन्हीची एकत्रित  व्यवस्था म्हणजे लोकशाही समाजवाद.म्हणजे  एखाद्या समाजामध्ये राज्यकारभाराचे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींकडे सोपवले असतील. आई समाजातील सर्व उत्पादनांच्या साधनांचें अधिकार या लोकनियुक्त सरकार कडे सोपवलेले असतील.
या व्यवस्थेमध्ये सरकारही लोकांचे आणि उत्पादनाची साधने अशा लोकांच्या सरकारकडे असल्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त भले कसे होईल हे राजकीय आणि आर्थिक बाबतीतही बघितले जाईल. समाजाच्य जडणघडणीतील रहा आणि राजकारण असे लोकोपयोगी असले कि आपोआपच असा समाज जास्ती प्रगती करेल, जास्ती  सुखी असेल असे मानले जाते.


Wednesday, September 18, 2019

19. शिवाजी सूरत - वस्तुस्थिती


( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.

Thursday, August 29, 2019

13. "या टोपी खाली, दडलंय काय?"

( डिस्क्लेमर : लेखातील सर्व छायाचित्रे नेटवरून साभार )


अंतराळातून पृथ्वीकडे पहाताना काही गोष्टी ठळकपणे  दिसतात. त्यातल्याच या तीन टोप्या ! असं म्हणतात की पृथ्वीच्या मध्यभागावर या तीन त्रिकोणी टोप्या आहेत. अजून नाहीओळखलंत ? वाळवंटात तीन त्रिकोणी टोप्या. बरोब्बर. आता बरोब्बर ओळखलंत.. इजिप्त मधले पिरॅमिड! जगातल्या आश्चर्यांमधील एक ! जणूकाही पृथ्वीने आपल्या डोक्यावर टोप्या ठेवल्यात अशीच दिसतात ती पिरॅमिड !

आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शिकलो की, इजिप्त मधील राजांच्या या दफनभूमी आहेत. इजिप्तमधे राजाच्या मृत शरीरावर काही शस्त्रक्रिया करून, नंतर  त्यावर विविध रसायने लावून त्यांचे  जतन केले  जाई.यांनाच  ममी असे संबोधले  जाते. अन या ममी सुरक्षित राहाव्यात, कालानुरूप त्यांचे कुजणे होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धतीच्या  इमारती बांधून, त्यात या ममी ठेवल्या गेल्या.  इजिप्त मध्ये असे बरेच पिरामिड सापडले आहेत. त्यापैकी महत्वाचे हे तीन !

अलीकडच्या काळात काही नवीन गोष्टी सापडत आहेत. काही नवी उत्खनन, काही नवीन पाहणी, काही नवीन अन्वयार्थ लावले जात आहेत. त्यातल्या एकाची थोडी माहिती, आज घेऊ.

गिझा इथले जे तीन पिरॅमिड आहेत त्यातीळ खुफरे पिरॅमिड कडे जाणारे जे दगडी बांधीव छोटे रस्ते आहेत त्याखाली एक शाफ्ट आहे.  ओसायरिस शाफ्ट. खरे तर या ठिकाणी सलग खडक आहे. हा खडक  खोदून शाफ्ट  तयार केलेला आहे. १९३३-३४ मध्ये सलीम हसन आणि यांच्या टीमने हा जमिनी खालचा शाफ्ट जगासमोर आणला. एक मजलाखाली  हा शाफ्ट उत्खनन करून त्यांनी मोकळा केला. परंतु त्या खाली जाणे त्यांना शक्य झाले नाही. 
पुढे १९९९ मध्ये झही हवास आणि त्यांच्या टीमने हे काम पुन्हा हाती घेतले. आणि जवळ जवळ ३० मीटर खोलवर उत्खनन  केले. एकाखाली एक अशा तीन टप्यामध्ये हा शाफ्ट आहे.

काय आहे या शाफ्टच्या पोटात? 

जमिनीच्या जवळ जवळ ८-१० फूट खाली एका भुयार तोंड दिसतं. 
  

पहिल्या टप्यावरून वर बघताना. 
या भुयारामध्ये आणि खाली पूर्ण खडक आहे. या भुयारातून सरळ पुढे गेले कि खोल खाली नऊ मीटर खडक खणलेला आहे. जेमतेम सहाफुटी लांबीरुंदीअसे  हे चौकोनी भुयार आहे.  खाली उतरण्यास आता लोखंडी  शिड्या लावल्या आहेत. नऊ मीटर खाली उतरले कि पहिला टप्पा येतो. या टप्यावर फार काही सापडले नव्हते.  

तिथून पुढे पुन्हा काही अंतर सरळ गेले कि दुसऱ्या टप्याकडे जाण्यासाठी पुन्हा खोलखाली सव्वा तेरा मीटर खोदले आहे. तिथेही लोखंडी शिडी उतरून खाली आले कि दुसरा टप्पा लागतो. 

दुसऱ्या टप्याकडे जाताना 

या दुसऱ्या टप्याच्या  मध्यात सलग आयताकार खोली आहे आणि तिच्या आजूबाजूला शवपेट्या ठेवण्यासाठी सहा खोल्यांसारखी जागा तयार केली आहे. या टप्यावर अनेक भांडी, वस्तू सापडल्या होत्या. याशिवाय सहापैकी दोन खोल्यांमध्ये दोन भल्या मोठ्या दगडी पेट्याही,  झाकणांसह  सापडल्या.  अंदाजे ७ फूट लांब , चार फूट रुंद आणि सहा फूट उंच अशा प्रचंड मोठ्या पेट्या आहेत. आश्चर्य म्हणजे  या पेटयांचा दगड संपूर्ण इजिप्त मध्ये कुठेही सापडत नाही. ह्या पेट्या इतक्या छोट्या भुयारून खाली कशा आणल्या, का आणल्या या कशाचीच उत्तरे आज आपल्याजवळ नाहीत. 
डावीकडे दगडी पेटी दिसतेय. शेजारी उभी आलेली व्यक्ती पाहिली कि पेटीची भव्यता लक्षात येईल.  


या टप्याच्या खाली पुन्हा साडे सात मीटर खोदलेले आहे. इथे जायचे भुयार अजूनच लहान आहे. फारतर चार बाय चार फुटाचे.
तिसऱ्या टप्याकडे जाताना 

 इथून खाली उतरले कि तिसरा टप्पा येतो. इथेही मोठी आयताकार खोली आहे. मध्यात पुन्हा एक दगडी पेटी आहे. खोलीच्या दुसऱ्या टोकाला, दोन वेगवेगळ्या दिशांना वर चढत जाणारी,  अतिशय लहान भुयारे आहेत. तिथून पुढचा मार्ग अजून शोधता आलेला नाही. 

या टप्यातील आश्चर्यजनक गोष्ट तर अजून सांगितलीच नाही. या खोली मध्ये ; भर वाळवंटी प्रदेशातल्या, जमिनी पासून तीस मीटरहून खोल जागेत , जिथे सूर्याचा प्रकाशही जाऊ शकत नाही, जिथे जमिनी वर दूरपर्यंत पाणी दिसत नाही कि एकही झाड दिसत नाही अशा या ठिकाणी, पिरॅमिडच्या टोपी खाली काय दडलं आहे? तर अतिशय स्वच्छ अगदी स्फटिकाप्रमाणे असणारे पाणी ! खोटं वाटलं ना? हा बघा फोटो. अतिशय अपुरा प्रकाश असूनही, त्या पाण्यात उभ्या असलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब सहजी दिसते आहे. 

तिसऱ्या टप्यातले स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी 

हे काय आहे?  इतके खाली कठीण खडकातून का खोदले गेले? त्या अवाढव्य दगडी पेट्या तिथे का नेल्या? कशा नेल्या? खाली असणारी छोटी भुयारं अजून कुठे जातात? तिसऱ्या टप्यामध्ये असलेले पाणी तिथे का आहे? ते कोठून आले, येते? भूगर्भात इतके पाणी असूनही जमिनीवर एकही झाड का नाही? हे स्थापत्य कसे केले? कोणी केले? काय हत्यारं, कोणती यंत्र वापरली गेली? कोणत्या काळात हे केले गेले? .... एक नाही अनेक प्रश्न ! पण कशाचेच संयुक्तिक उत्तर नाही. 

शेवटी मनात इतकाच येतं  " या टोपी खाली, दडलंय काय? "