Thursday, August 13, 2020

6. अश्मयुग : सामान्य माहिती

अश्मयुग ! अश्म म्हणजे दगड ! म्हणजे दगडांचे युग ? नक्की काय असावं  अश्मयुग म्हणजे ? अगदी  प्रथम ( स्टोन एज ) हा शब्द वापरला गेला तो दॅनिश स्कॉलर ख्रिस्टिन जे. थॉम्सन यांनी, एकोणिसाव्या शतकात.  त्यांनी अगदी सुरुवातीच्या मानवी इतिहासाचे तीन प्रमुख टप्पे मांडले. अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग ( स्टोन एज, ब्रान्झ एज आणि आयर्न एज ) प्रामुख्याने विशिष्ठ काळात मानवाची हत्यारे ज्या वस्तूंपासून तयार झालेली सापडली; त्यांचे नाव त्या काळाल त्यांनी दिले.  ज्या काळात प्रामुख्याने दगडाचा वापर करून हत्यारे बनवली गेली त्या काळाला त्यांनी अश्मयुग हे नाव दिले.

दगडी हत्यारे कोठे कधी वापरली गेली हे ठरणार असल्याने त्यानुसार प्रत्येक प्रदेशात हा काळ बदलतो. पण सर्वसाधारणपणे पणे सुमारे अडिच मिलियन वर्षापूर्वीपासून आफ्रिकेमध्ये अश्मयुगीन मानव रहात होता. तर काही प्रदेशात इ. स. पूर्व  ३०००  वर्षामध्येही अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सापडते. प्रामुख्याने दगडी हत्यारे  वापरणारा मानव म्हनजे अश्मयुगीन मानव !

त्यातूनही अश्मयुग म्हणजे फक्त दगडी हत्यारे असे नव्हे तर नैसर्गिक साधनांचा हत्यारासाठी उपयोग करणारा मानव यात अपेक्षित आहे. दगड, लाकूड, प्राण्यांची हाडं - दात यांपासून हत्यारे तयार करणारा मानव म्हणजे अश्मयुगीन मानव !

अश्मयुगाचा काळ खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचे काही  टप्पेही मानले जातात.  पॅलिओलिथिक एज किंवा जुने अश्मयुग, मेसोलिथिक किंवा मध्य अश्मयुग आणि निओलिथिक म्हणजे नव अश्मयुग ! या काळात अतिशय कमी लोकसंख्या, तीही अतिशय विखुरलेली अशी होती. या काळातील मानव हा प्रामुख्याने हंटर अँड गॅदरर म्हण्जे शिकारी आणि निसर्गातील फळ फळावल, धान्य  जमवून आपली उपजिवीका जगत होता.

शिकार केलेल्या प्राण्याचा अन्न आणि हत्यारं, वस्त्र यासाठी वापर केला जाई. मांस खाण्यासाठी, कातडी वस्त्र म्हणून तर हाडं-दात यांचा वापर हत्यारांमध्ये केला जाई.
जंगलातील जंगली बेरी- छोटी फळं, जंगलात उगवणारे जंगली पण खाण्या योग्य धान्य आणि फळं हेही त्याच्या आहारात होते.
प्राणी आणि ही जंगलसंपत्ती स्वाभाविकच एका ठिकाणची खाऊन संपत असे, त्यामुळे हा मानव सतत स्थलांतर करत राही. शिवाय या काळात वातावरणातही सतत बदल होत असल्याने हा मानव एका ठिकाणी वस्ती करून फार काळ रहात नसे.

जुने अश्मयुग साधारण अडिच मिलियन वर्षांपासून पहिल्या हिमयुगापर्यंत म्हणजे इ. स. पू ९६०० पर्यंतचे मानले जाते. हत्यारांबरोबरच दागिने, गुहेतील भित्ती चित्र यांतून या काळातील मानवाची थोडी माहिती मिळते.
मध्य अश्मयुग हे इ.स. पू. ९६००  पासून मानवाने शेती करायला सुरुवात करे पर्यंतचा काळ म्हणजे साधारण इ. स. पू  ७००० ते इ.स.पू. ४००० हा मानला जातो. याकाळात पृथ्वीवरचे वातावरण प्रचंड थंड ऐवजी हळूहळु गरम होत गेले. उत्तर धृवावरचा बर्फ वितळू लागला. स्वाभाविकच समुद्राची पातळी वर आली. त्यातून भूभागातही बरेच बदल झाले. साधारण इ. स. पू. ५००० पर्यंत आज जसा भूभाग आहे, खंड आहेत तशी विभागणी तयार झाली.
नव अश्मयुग हे मानवाने शेती करणे सुरू केले तेव्हापासून  ते तांब्याचा वापर सुरू केला इथपर्यंत मानले जाते.






No comments:

Post a Comment