Wednesday, September 18, 2019

19. शिवाजी सूरत - वस्तुस्थिती


( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.

No comments:

Post a Comment