गुहेत असताना त्याला एक नैसर्गिक संरक्षण होते. गुहेची जागा पावसा उनापासून मानवाला वाचवत होती. इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करायलाही ही गुहा उपयोगी पडत होती. गुहेच्या तोंडावर दगड सरकवला की आतले सगळे सुरक्षित रहात. आता माळरानावर आल्यावर मात्र सुरक्षितता हा एक मोठाच प्रश्न उभा राहिला. ऊन पाऊस आणि हिंस्त्र प्राणी या तीनही गोष्टींपासून वाचायच होतं.
यावरही मानवाने आपल्या बुद्धीचातुर्याने मात केली. जमिनीत खळगा करून जमिनीच्या खाली गुहा केली. त्यावरून गवत पसरलं. पण पावसात आजूबाजूचे पाणी आत वाहून येऊ लागलं. तशी मग त्याने खळग्याच्या भोवती दगड रचले, फटींमध्ये ओली माती भरली. वरून गवत टाकले. आता जमिनी खालची गुहा सुरक्षित झाली. हळूहळू त्याच्या लक्षात आले की अरेच्या खळगा कराची गरज नाही आपण दगड एकावर एक ठेवत उंच भिंत केली अन मातीने ती घट्ट केली अन वरून गवत टाकले की छान जमिनीवरची गुहा तयार होते. आशा रीतीने घराची निर्मिती झाली . काळानुरूप, त्या त्या जागेत उपलब्ध असणा-या वस्तूंनुरूप घरांची बांधणी बदलत गेली. आधी दगडांची मग त्या सह मातीची. पुढे नुसती मातीची. कधी मातीसोबत गवत वापरले जाई. कधी जावळया. कधी झाडांच्या फांद्या, खोड...
जमिनीवरच्या वास्तव्यात अजून एक मोठी भीती होती ती हिंस्त्र प्राण्यांची. मानवाला अग्नी कसा वापरायचा आणि तो कसा तयार करायचा याची माहिती एव्हाना माहिती झाली होती. इतकेच नव्हे तर प्राणी या अग्नीला घाबरतात हेही माहिती झाले होते. याचाच उपयोग करून रात्री वसतीमध्ये अग्नी प्रजवलीत ठेवायची प्रथा सुरू झाली. शिवाय अग्नी सत्ता जागता ठेवला की तो पटकन हाताशी असणार होता. त्यामुळे अग्नी निर्माण करण्याचा खटाटोपही वाचणार होता. यातूनच वस्ती मध्ये एक तरी अग्नी सत्ता प्रज्वलित ठेवला जाऊ लागला.
या बरोबरीने प्राण्यांना अटकाव व्हावा यासाठी वस्तीच्या सभोवताली काटेरी झाडांचे कुंपणही मानव घालू लागला.
आशा रीतीने मानवाने शेती हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानून घेतला. शेती भोवतीच मानवी समाज विकसित होत गेली.
अनेक ठिकाणी हे घडत होते. जसा जशी स्थिरता येत गेली तसतशी मानवी वसाहत मोठी होत गेली. मग आपआपल्या वस्तीची कुंपणं वाढवली गेली. मानवांचा मोठा समूह तयार होत गेली. त्यांच्यातल्या शहाण्या सुरत्या / वयाने अनुभवी व्यक्ती यांच्या मताने त्या त्या समूहात कामकाज चाले. एक सुनियंत्रित अशी समाज रचना असणारी एक टोळी तयार होत असे.
कधी कधी एखाद्या ठिकाणचे पाणी संपले किंवा तिथे प्राण्यांचा जास्त उपद्रव सुरू झाला तर ती टोळी उठून वेगळी जागा शोधत असे. अशात एखाद्या ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या टोळ्या येत. त्यांतल्या कोणी आपली वसाहत बांधायाची यावरून वाद होऊ लागले. कधी ते सामंजस्याने सोडवले गेले तर कधी कधी त्यांच्यात सरळ मारामारी होत असे. अन जी टोळी या मारामारीत बलवान ठरे ती टोळी त्या ठिकाणावर आपला हक्क सांगत असे. यातून मग शस्त्र, लढण्याचे कौशल्य, लढाऊ योद्धे आणि सैन्य अशा संकल्पना पुढे आल्या.
जसजसा टोळीतील लोकसंख्या वाढू लागली तसतशी कोणताही निर्णय घेणं अवघड होऊ लागलं. मग काही टोळ्यांमध्ये शहाण्यासुरत्या लोकांचे एक मंडळ तयार झालं, तर काही टोळ्यांमध्ये वयस्कर व्यक्तीच्या हाती सगळे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवले गेले, तर काही टोळ्यांमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगात जास्त ताकद होती त्याच्या हाती सगळे अधिकार आले. यातूनच हळूहळू राजकीय सत्ता ही संकल्पना तयार झाली. यातूनच राजा तयार झाला; राजेशाही सुरु झाली.
अन मग या अशा वसाहती मोठ्या मोठ्या होत गेल्या. त्यांचे सैन्य उभे राहू लागले. स्वाभाविकच सुरक्षितता आली. अन मग ह्या वसाहती वाढत गेल्या, एका ठिकाणी स्थिरावत गेल्या. अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहात असताना त्यांची म्हणून जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धती तयार झाली; म्हणजेच संस्कृती तयार झाली.
जगात विविध ठिकाणी, प्रामुख्याने नाद्यांच्या काठावर, दोआबात, खोऱ्यात अशा अनेक संस्कृती आपल्याला दिसतात. याच त्या प्राचीन संस्कृती ! मेसोपोटेमियातील विविध संस्कृती, इजिप्तची संस्कृती, सिंधु संस्कृती, चिनी संस्कृती, माया संस्कृती, इंका संस्कृती, ॲझटेक संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या काही महत्वाच्या प्राचीन संस्कृती होत.
No comments:
Post a Comment