Thursday, April 25, 2024

5. विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1872)


विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म  1825 मध्ये रायगड जिल्ह्यातल्या शिरवली गावामध्ये झाला.
अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आणि गरीबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना दुकानांमध्ये कस्टमच्या कार्यालयामध्ये य अशा विविध ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्यात. लहानपणापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडील होता. त्यामुळे आपल्या नोकरीच्या काळातही विविध धार्मिक ग्रंथांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास चालू ठेवला. त्याचबरोबर कथाकिर्तेने, पुराणे,  साधू संन्यासी यांच्याशी संवाद अशांमधे त्यांचे मन रमत असे.  कालांतरानं यातही त्यांचे समाधान होई ना. अखेर 23 व्या वर्षी त्यांनी सगळ्याचा परित्याग केला आणि ते अरण्यामध्ये निघून गेले. विष्णुबुवांनी त्यानंतर अनेक सद्गुरुंना गुरु मानण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेच त्यांचे समाधान झाले नाही. अखेर सप्तशृंगीच्या डोंगरावर ते गेले आणि तेथील देवीचे सानिध्यात फक्त कंदमूळ खाऊन वेदांत विचार ध्यान साधना यावर त्यांनी स्वतःला गुंतवून  घेतले.  कालांतराने ज्यासाठी आपण साधना केली होती ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. उग्र तपश्चर्याच्या योगाने आपण स्वतःचा कल्याण तर साधला; पण आपला कार्यभाग पूर्ण झाला नाही. समाजाच्या कल्याणासाठी आपले उर्वरित आयुष्य आपण वेचले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.  त्याच वेळेस " पाखंडी मतांचे खंडन करून;  तू वैदिक धर्माची पुन्हा स्थापना कर" असा संदेश परमेश्वराने आपल्याला दिला आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे ते गावाकडे परत आले. विष्णुबुवा त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा वेगवेगळ्या गावी गेले. वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या वक्तृत्वाची छाप लोकांना पडत असे. लवकरच त्यांचं नाव सर्वांना माहिती झाले. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा या नावाने ओळखू लागले. 1856 मध्ये विष्णुबुवा मुंबईस आले. त्या काळी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी भारतीय लोकांच्या मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे काम अतिशय पद्धतशीरपणे चालवले होते. ख्रिस्ती धर्मातील उदात्त तत्त्वे, मानवतावादी तत्त्वे यांच्या आधारे सुशिक्षितांवरील प्रभाव त्यांनी पाडण्यास सुरुवात केली होती. आणि मिशनऱ्यांच्या  सेवाभावी वृत्तीचा सामान्य जनतेवर प्रभाव पडत होता.  ख्रिस्ती धर्मप्रचाराकांच्या या दुहेरी आक्रमणामुळे हिंदू धर्मावर मोठे संकट येऊ घातले होते.  ख्रिश्चन धर्मांच्या या प्रभावावर नियंत्रण घालण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी प्रयत्न सुरु केले.  ख्रिस्ती धर्म प्रचारकांच्या प्रचाराला उत्तर म्हणून विष्णुबुवांनी जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्मातील दोष सांगत असत, त्यांचे विष्णुबुवा आपल्या व्याख्यानातून खंडन करत. जवळ जवळ 50 सभा त्यांनी घेतल्या. यात त्यांनी वैदिक धर्मातील आक्षेपांचे खंडन करून त्याची श्रेष्ठता समाजाला पटवून दिली. आपल्या तार्किक युक्तिवादाने आणि पुराव्यांनी समाजातील सर्वांची मने त्यांनी पुन्हा हिंदू धर्माकडे खेचून आणली. त्यांच्या या व्याख्यानांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाले. त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलवायला झाला पुढे ख्रिस्ती धर्माच्या धर्मपदेशकां बरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी वीस दिवस जाहीर वादविवाद झाले. समुद्रकिनाच्या वादविवादांंचा समाजावरती खूप मोठा प्रभाव पडला. मुळात धार्मिक क्षेत्रात मिशनऱ्यांना अडवण्याचे पहिले पाऊल विष्णुबुवांनी उचलले.
पुढे विष्णुबुवांनी तामिळनाडू, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात येथे जाऊनही हिंदूंचे प्रबोधन केले.

विष्णुबुवा वैदिक धर्माचे अभिमाने असले तरी त्यांनी समाजाची दोषांकडे देखील त्यांनी डोळेझाक केली नाही. प्रचलित जातीधर्म हा वेदांतील वर्णव्यवस्थेला सोडून आहे. या जातीभेदामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे हिंदी समाजाची दुर्गती झाली आहे असे त्यांनी मांडले. समाजसुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यांचे व्यक्तिगत आचरण हे सुधारणांच्या विचारांना धरून होते. ते कोणाच्याही हातचे पाणी पीत असतात, अन्न खात असत. खाण्यापिण्याचे बाबतीत जातीभेदाचे, धर्माचे, स्पर्शाचे बंधन त्यांनी कधी पाळले नाही.
समाजातील जाती विषमतेप्रमाणेच अतिशूद्रांवर होणाऱ्या अमानुष अन्यायाविरुद्ध देखील विष्णुबुवांनी आवाज उठवला. दलितांच्या मागासलेपणाची जबाबदारी सर्व उच्च वर्णीयांवरती आहे. आणि म्हणून त्यांच्या सुधारण्यासाठी उच्च वर्णीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मत मांडले.
पुनर्विवाह, घटस्फोट, प्रौढविवाह, शुद्धीकरण या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे विचार आधुनिक होते. लोकांच्या स्तुती वा निंदा कशाची पर्वा त्यांनी केली नाही.

विष्णुबुवांनी 'वेदोक्तधर्मप्रकाश' या नावाचा धर्मग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजनीति संदर्भात एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिले आहे.  पुढे त्याच मतांचा विस्तार करून 1867 मध्ये 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी मांडलेले विचार साम्यवादाशी खूपच मिळते जुळते आहेत.  उदाहरणादाखल त्यांनी असं लिहिलंय की "सर्व प्रजे कडून सर्व जमिनीची लागवड करावी. आणि अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न उत्पादन करून गावोगावी कोठारे भरून ठेवावीत. त्यामधून सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तितके अन्न द्यावे. याप्रमाणे बाराही महिन्यात एकसारखे सर्व जमिनीतून उत्पन्न घ्यावे. ते सर्वांचे उत्पन्न एकत्रच ताब्यात राहून त्यातून सर्वांस खावयास भरपूर न्यावे.
सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगा मुलगी राजाच्या ताब्यात द्यावी. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकून ज्याला त्याला, ज्या कामात गती आहे तो उद्योग करण्याची सवड द्यावी." विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या या विचारावरून  त्यांनी साम्यवादा सारखाच विचार मांडला होता असे म्हणावे लागते. अर्थात बुवांचे हे विचार कार्ल मार्क्स याचे लिखाण वाचून बनलेले नव्हते, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे डोळेसपणे अवलोकन अवलंबून करून, साकल्याने विचार करून लिहिलेले आहेत.  यावरून त्यांची बौद्धिक झेप आणि आणि द्रष्टपणा कळून येतो. 

विष्णुबुवांनी भावार्थसिंधू , वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतु:श्लोकी भागवताचा अर्थ, बोधसागराचे रहस्य, सेतूबंधनी टीका, सहजस्थितीचा निबंध, समुद्र किनारीचा वादविवाद इत्यादी पुस्तके लिहिली होती.
---

Tuesday, April 23, 2024

4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)




रामचंद्र उर्फ भाऊ दाजी लाड यांचे सर्व शिक्षण मुंबईत झालं. विद्यार्थीदशेत ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. आणि अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (1843) त्यांनी दोन वर्षे मुंबईच्या एल्फिन्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. पुढे 1845 मध्ये ग्रँड मेडिकलची स्थापना झाली तेव्हा भाऊ दाजींनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. आणि 1850 वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या सन्माननीय डॉक्टरांमधले भाऊ दाजी हे एक होते.  त्यानंतर लगेचच ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी काही काळ सब असिस्टंट सर्जन आणि दुय्यम अध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसायात भाऊंनी अतिशय लौकिक कमावला. या काळात मुंबईतील एक विख्यात धन्वंतरी म्हणून ते ओळखले जात असतात.
वैद्यकीय संशोधनाचा पाया त्यांनी इथे घातला. महारोगावरील औषधाचा शोध त्यांनी लावला.
अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध करून समाज सुधारणेचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक प्रश्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांचा त्याग केल्याशिवाय आपल्या लोकांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे त्यांचे मत होते.

भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. अर्थात त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची ही भूमिका होती. इंग्रजी राजवटीमुळे आपल्या लोकांना प्रगतीचे दारे उघडली जात आहेत, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. इंग्रजी स्वतःचे समर्थन करत असताना भाऊ दाजींनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट येथील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत असे आग्रह धरून बरेच प्रयत्न  त्यांनी केले.

भाऊ दाजींनी विधवा विवाहाचे उघड समर्थन केले. तसेच ते शिक्षण स्त्री शिक्षणाचे पुरस्कार होते.

तत्कालीन नवसुधारकांमधले भाऊ दाजी लाड हे देखील एक महत्त्वाचे नेते होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचे प्रयत्न भाऊ दाजी यांनी केले.

आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहिले.  समाजातील गोर गरीब, निराधार लोकांना मोफत औषध उपचार केले  केले. मोफत दवाखाने उघडले.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा उभारणीत सहभाग घेतला.

इंग्रजी प्रशासनात  ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिकाऱ्यांना हिंदी अधिकाऱ्यांना कमी महत्व दिले जात असे त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यासाठी 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन मध्ये ते सहभागी होते.

बॉम्बे असोसिएशन प्रमाणे हिंदी जनतेच्या हितासाठी सनदशीर मार्गाने कार्य करण्याचे उद्देशाने निर्माण आलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेतही भाऊंचा महत्त्वाचा सहभाग होता. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत, आपणास अनुकूल करून घेणे; हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापारी उद्योगधंदे यावर कर बसवणारे एक विधेयक तयार केले होते (लायसन्स बिल). यामुळे भारतातील उद्योग आणि व्यापार यावर अनिष्ट परिणाम होणार होता.  या विरोधकाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा बोलवली गेली होती या सभेत भाऊ दाजी सक्रिय सहभागी होते.

1894 मधे स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेमधे भाऊ दाजींही सामील होते.

मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून भाऊंची नेमणूक झाली होती.

तसेच मुंबई विद्यापीठाचे फिलो म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती.

इंग्रजी इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लेखनातील चुका भाऊंनी दाखवून दिल्या. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामधे त्यांनी अनेक इतिहासपर अनेक लेख लिहिले. गुप्तकाल खंडावर त्यांचा विषेश अभ्यास होता. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांवर त्यांचा अभ्यास होता.

ग्रँट मेडिकल  सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

मुंबईच्या नगरपाल पदावर त्यांची दोनदा नियुक्ती केली गेली होती.

1855 च्या अँग्लो अफगाण युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदत करण्यासाठी त्यांनी एक वेगळा निधी जमवला होता.

तसेच मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्ध मोहिम उघडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
---

Sunday, April 21, 2024

3. दादोबा पांडुरंग (1814 ते 1882)


मुंबई येथे जन्म झालेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर जावरा संस्थांच्या नवाबाकडे त्यांची खाजगी शिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली. नंतर सुरत मध्ये सुरू झाले इंग्रजी शाळेतील त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तर 1852 मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर असतानाच 1857 मध्ये भिल्लांच्या बंडांचा बिमोड केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना "रावबहादूर" हा किताब दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. 

नोकरी चालू असतानाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुधारणांचा आरंभ झाला. दादोबा पांडुरंग यांचा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील समाजसुधारकांमध्ये समावेश होतो. हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होऊ लागला आणि त्यातून नवीन विचारांना चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे डोळस बनून आपल्या धर्मातील वैगुण्ये लक्षात येणाऱ्या तरुणांचा एक नवा वर्ग एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झाला. दादोबा पांडुरंग हे अशाच तरुणांपैकी एक होय.  हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा दादोबांना खटकू लागल्या. याच गोष्टीच हिंदू धर्माच्या पतनास कारणीभूत झाल्या आहेत अशी त्यांची खात्री झाली होती. परंतु धर्म न बदलता, स्वधर्मात राहून  सुधारणा करण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.  आणि म्हणून दादोबा पांडुरंगांनी मानवसभा व परमहंस सभा या संस्था स्थापन केल्या.  1844 मध्ये  सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना त्यांनी केली. या सभेच्या सभासदांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू धर्मातील जाती संस्थेला ही त्यांचा विरोध होता. निराकार प्रभूची प्रार्थना करण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरवले.  माणसामाणसांतील समानतेवर त्यांचा विश्वास होता. मानव सभेचे वरील तत्वे अतिशय उदात्त असली तरी ती उघडपणे पाळणं, स्विकारणे त्या काळात फार अवघड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ दादोबांना मिळाले नाही. आणि त्यामुळे ही संस्था लवकर संपुष्टात आली.
एलफिन्स्टन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. आपल्या देश बांधवात ज्ञानाचा प्रचार, प्रसार करणे आणि सामाजिक जागृती करून आणणे ही त्याची प्रमुख उद्दिष्टे होती. दादोबा पांडुरंग या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

पुढे 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची दुसरी संस्था दादोबा पांडुरंग यांनी सुरू केली. हिची तत्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वासारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्ती पूजा करू नये, जातपात मानू नये, विधवाला संमती असावी, अशा तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. परमहंस सभेत सर्व जातीचे सभासद प्रार्थनासाठी एकत्र जमत आणि नंतर सह भोजनही करत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिचे कामकाज गुप्तपणे चालत असे. याचे कारण त्या सभेच्या सदस्यांना सामाजिक आणि धार्मिक सुधारण्यासाठी तळमळ वाटत होती; परंतु त्याबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीतून सनातनी आणि कर्मठ लोकांचा जो जो रोष पत्करावा लागला असता, त्याला तोंड देण्यात की ताकद त्यांच्या अंगी नव्हती. यामुळे 1860 मध्ये ही सभा बरखास्त झाली.

याशिवाय आपल्याला समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून दादोबांनी प्रयत्न केले. आपल्या लोकांनी आधुनिक ज्ञान, विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे त्यांचे मत होते. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारचा आग्रह धरला. ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांचा परिचय करून देण्यावर त्यांनी भर दिला.

दादोबांचे वाङ्मयीन कार्यही मोठे आहे. मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यामुळे "मराठी भाषेचे पाणिनी" असे त्यांना म्हटले जाते.
तसंच इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दादोबांनी इंग्रजी व्याकरण मराठीत आणलं. त्यांनी संस्कृत व्याकरणही मराठीत उपलब्ध करून दिले.
तसेच मोरोपंतांच्या केकावली यावर त्यांनी 'यशोदा पांडुरंगी' नावाची टीका लिहून; मराठी भाषेतील आधुनिक समीक्षेचा पाया घातला.

याशिवाय लघुव्याकरण, महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, विधवाश्रुमार्जन, आत्मचरित्र इत्यादी पुस्तकात यांनी लिहिली. तसेच
नकाशाचं पुस्तक मराठीत काढण्याचा पहिला स्तुत्य उपक्रमही त्यांनी केला होता.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे गाढे अभ्यासक  अ. का. प्रियोळकर यांनी दादोबा पांडुरंग यांचे फार सुंदर अन तपशीलवार चरित्र लिहिले आहे.

Thursday, April 18, 2024

2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे पहिले पाक्षिक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून (काळबादेवी) सुरू केले. तसेच त्यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्याच वेळी, मे 1840 पासून सुरू केले. 

जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता सुरू केली तो काळ पेशवाईच्या अस्तानंतरचा (1818) होता. महाराष्ट्रातील पेशव्यांचे राज्य गेल्यानंतर मराठी माणसांचे मन, मेंदू, मनगट बधिर झाले होते. ते पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचे प्रतिबिंब! दर्पण सुरु केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे वीस वर्षे. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील ‘ज्ञानेश्‍वरी’नंतरचे महत्त्वाचे संक्रमण मानले जाते. त्या पाक्षिकात प्रत्येक पानावर अर्ध्या पानाचा मराठी मजकूर व त्यापुढेच त्याचे इंग्रजीत भाषांतर अशी छपाई असे. मराठी जनतेला काय म्हणायचे आहे ते मराठी भाषेत व ते इंग्रज प्रशासनास कळावे यासाठी इंग्रजीत अशी त्या मजकुराची कल्पक रचना होती. वाचकांना विचारप्रवृत्त करणे हा त्यांचा हेतू होता. मराठी भाषा व साहित्य-संस्कृती यांवर इंग्रजांच्या राजवटीमुळे काही संक्रमण होऊ लागले होते. त्याला पर्याय म्हणजे विकासाचा मार्ग म्हणून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे हा विचार जांभेकर यांचा होता. वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम शिक्षण, लोकशिक्षण, मराठी साहित्य व पाश्चिमात्य सुधारणावादी ज्ञानविज्ञान यांच्या प्रसारासाठी आहे अशी त्यांची धारणा झाली. 

पोंभुर्ले, ता. देवगड,  रत्नागिरी येथील गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा धाकटा मुलगा बाळ जांभेकर. वयाच्या तेराव्या वर्षी, 1826 च्या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी व अन्य विषयांच्या शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये दाखल झाला. बाळ जांभेकर बुद्धिमान होते. त्यांनी अवघ्या दोन वर्षांत इंग्रजी, गणित व अन्य नऊ भाषा यांत प्राविण्य मिळवले. त्यांची ती तडफ लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थिदशेतच उपएतद्देशीय सचिव म्हणून नियुक्ती प्रथम मिळाली. तो मराठी माणसासाठी फार मोठा गौरव होय !

गर्व्हनर एल्फिन्स्टन यांनी बाळ जांभेकर यांची विद्वत्ता ओळखून त्यांना आणखी पुढे संधी दिली; मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकाशी संबंधित ग्रंथ तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर पुढे, मार्च 1830 पासून त्याच शिक्षण संस्थेत (बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी) उप एतद्देशीय सचिव (डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी) म्हणून दरमहा पन्नास रुपयांवर नियुक्ती केली. बाळशास्त्री यांनी त्या काळात मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, हिंदी, फारसी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच अशा विविध भाषांत प्राविण्य मिळवले. तसेच अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, अंकशास्त्र, शून्य उपलब्धी गणित या विषयांतही विशेष प्राविण्य मिळवले. त्यांचे उत्तम अध्यापन, संस्थेबद्दल निष्ठा, सद्वर्तन आणि मुलांच्यातील व सहाध्यायींमधील लोकप्रियता हे गुण लक्षात घेऊन त्यांची त्याच संस्थेत पूर्ण वेळ एतद्देशीय सचिव म्हणून मार्च 1832 पासून सन्मानाने दरमहा शंभर रुपये पगारावर नियुक्ती झाली. 

तसेच 1831 मध्ये लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील पौर्वात्य भाषांतर समितीचे एतद्देशीय भाषा सचिव म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. पुढे 1842 मधे एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कार्यकारी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय  एप्रिल 1845 मध्ये मुंबई येथे सुरू केले. 

त्यांनी मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने 1845 मध्ये सुरू केले. 

लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’1845 मध्ये स्थापन केली. सार्वजनिक प्रश्नावर निबंध वाचन व त्यावर चर्चा असे सोसायटीमधील कार्यक्रमांचे अभिनव स्वरूप होते. 

काळबादेवी भागात वाडा भाड्याने घेऊन त्यात पहिले वसतिगृह 1845 मध्ये सुरू केले. 

तसेच मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही वर्षभर काम केले.

लंडन येथील जिऑग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेत कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून 1842 ते 1846 पर्यंत होते. 

प्रा. बाळशास्त्री जांभेकर पुरातत्त्व व इतिहास संशोधन असे काम लंडन येथील दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई येथील शाखेत (1830 पासून) करत असत. त्या शाखेने 1841 पासून ‘जर्नल ऑफ दि बॉम्बे ब्रँच एशियाटिक सोसायटी’ सुरू केले.

त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा सन्मान 1840 मध्ये मिळाला होता. तो त्या काळातील बहुमान समजला जात असे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ‘ग्रँड ज्युरी’मध्ये बसू शकत होते. 

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मधून साहित्यलेखनाचा आरंभ केला होता. त्यांचे लेखन भाषांतराच्या माध्यमातून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कॅप्टन जर्व्हिस यांचे लॉर्ड ब्रॉग्हम यांच्या ‘ट्रेएटाईज ऑन द ऑब्जेक्ट्स – अ‍ॅडव्हांटेज अँड प्लेजर्स ऑफ नॉलेज’ नावाच्या प्रसिद्ध शास्त्रीय पुस्तकाचे ‘विद्येचे लाभ, उद्देश आणि संतोष’ या नावाने भाषांतर केले. ते 1829 मध्ये छापले गेले. त्यांनीच पहिला मराठी शब्दकोष आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकासाठी संपादन व भाषांतर केले होते.

जांभेकर यांनी त्यांच्या ‘दर्पण’ व नंतर ‘दिग्दर्शन’मधून बरेच निबंध व लेख लिहिले आहेत. जांभेकर हे आद्य निबंधकार व आद्य गद्य लेखक होत. त्यांचे निबंध व लेख यांचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यातून धार्मिक व सामाजिक सुधारणा, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी-परंपरा यांचा त्याग, ज्ञान व विज्ञान यांची माहिती, स्त्रियांचे शिक्षण, शालेय शिक्षण ह्यांचे दर्शन होते.

त्यांनी ‘दर्पण’मधून हिंदुधर्म आणि सती, जातिभेदाचा प्रश्‍न , स्त्रियांस वेदाभ्यास, स्त्री शिक्षणाची दिशा , स्त्री-पुरुषांना समान हक्क 1 व 2 , ग्रंथपरीक्षणाचा नमुना , मुंज मुलींची का नाही?, सरकारी नोकरीत जातीयता , नाटकशालेस प्रोत्साहन  असे पुरोगामी विचारांचे लेख प्रसिद्ध केले होते. आणि ‘दिग्दर्शन’ या मासिकातूनही रसायनशास्त्र, इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोडी व बाळबोध अक्षरांचे ताम्रपट, वाफयंत्रे, ज्योतिष शास्त्र, सिद्ध पदार्थ विज्ञान असे अनेक विषय हाताळले.

भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन नाणी, चित्रलिपी, गूढ लिपी यांवर संशोधन करून इंग्रजीतून लेखन प्रसिद्ध केले

त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळाप्रेसवर मुद्रण सर्वात प्रथम 1845 मध्ये केले. 

त्यांच्यामुळेच ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत शक्य झाली.

त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नुसती नावे वाचूनही थक्क व्हायला होते. 

1. नीतिकथा

2. सारसंग्रह 

3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 व 2, 4. भूगोलविद्येची मूलतत्त्वे, 

5. भूगोलविद्या गणितभाग, 

6. बालव्याकरण (यांतील क्रमांक 4 व 6 ही पुस्तके मुंबई इलाख्याच्या प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासली जात होती), 

7. मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, 

8. शब्दसिद्धी निबंध, 

9. समीकरणाविषयी टिपणे, 

10. शून्यलब्धी गणित व मूलपरिणती, 

11. हिंदुस्थानचा इतिहास, 

12. हिंदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, 

13. मानसशक्ती विषयीचे शोध (अपूर्ण). 

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात.  बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात

विचार, लेखन आणि प्रत्यक्ष कृती अशा तीनही स्तरांवर मोठे काम केले. 

 त्यांचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरण.  शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या काळात त्यांनी लढा दिला.  सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना सामाजिक व धार्मिक रोषाला सामोरे जावे लागले; धार्मिक बहिष्कारही सहन करावा लागला. परंतु कायदेशीर आणि संमत मार्गाने लढा देता येऊ शकतो आणि न्याय मिळवता येतो याचा पाया त्यांनी भारतात घातला.

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी 17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचा मुंबईमधे मृत्यू झाला.

---

1. जगन्नाथ शंकरशेठ (1803-1865)

जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड या गावी झाला. नाना शंकरशेठ या नावाने ते विशेष प्रसिद्ध पावले. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे अतिशय श्रीमंत घरात जन्मले होते. त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती. त्यामुळे नानांचे बालपण अतिशय सुखात गेले. पुढे त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली. त्यांच्या व्यापाराचा इतका प्रचंड व्याप होता की त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. परंतु नानांना सार्वजनिक कामाची अत्यंत आवड होती. त्यामुळे जनसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.  मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीमध्ये नानांचा  सहभार होता.  बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एलफिनिशन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदतही केली. 


भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाचे ते खंदे पुरस्कार होते. त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्करून 1848 मध्ये मुंबई येथे, स्वतःच्या घरात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. 

1829 मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. या कायद्याला भारतातल्या सनातनी लोकांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे देशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अशावेळी नानांनी या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले.  आणि सतीची चाल कशी अमानुष आहे हे त्यांनी जनतेला पटवून दिले. 

सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावण्यासाठी  नाना तत्पर असत. मुंबईतील अनेक सामान्य लोकांची गाऱ्हाणी, त्यांनी सरकार दरबारी मांडली. आणि त्याला योग्य तो न्याय मिळवून दिला.  सामान्य जनतेला, विशेषत: गोरगरिबांना, नाना आपल्या आधार वाटत असत. 

नानांनी शिक्षण क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. मुंबई इलाख्यात नव्या शिक्षणाचा पाया घालण्याचे कार्य, मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांच्या मदतीने, नाना शंकरशेठ यांनी सुरु केले.  1823 मध्ये मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेच्या मार्फत मुंबई शहरांमध्ये आणि मुंबई बाहेरही अनेक शाळा त्यांनी उघडल्या. या कामी त्यांना सदाशिवपंत छत्रे, बाळाशास्त्री जांभेकर यांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सुरुवातीच्या इंग्रजी राज्यकारभारात पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांची पहिली पिढी उदयास आली. त्यापैकी अनेक तरुणांनी महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या कार्यात खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचे सर्वांचे श्रेय अर्थातच जगन्नाथ शंकरशेठ यांच्याकडे जाते. 

भारतीय समाजात विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि येथील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1845 मध्ये मुंबईमधे स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. नानांनी या संस्थेला आर्थिक आणि इतरही खूप मदत केली मुंबईच्या इलाख्याचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ड एलफिन्स्टन यांनी अतिशय चांगली काम केली होती. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी एक फंड जमवल्या. या फंडातून मुंबईमधे एल्फिन्टन कॉलेजची स्थापना केली. आजही हे अतिशय महत्त्वाचे कॉलेज म्हणून मुंबईत मानले जाते. तसेच मुंबई इलाखाचा आणखीन एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज उभारण्यात नानांनी पुढाकार घेतला होता. 

राजकीय कार्यातही नाना पुढे होते. राजकीय प्रश्नांबाबत नानांचे मत आज आपल्याला वेगळे वाटेल परंतु 1818  मध्ये मराठ्यांचा राज्य संपून ब्रिटिश राजवट भारतामध्ये स्थिरावली. आणि लगतच्याच काळात, साधारण 1825 ते 35 -40 पर्यंत नाना शंकरशेठ यांचे कार्य आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळातील सर्वांचे ब्रिटिश राजवटी बद्दल चांगले मत होते. अनेक वर्ष चालू असलेली युद्धे संपली, कायद्याचे राज्य आले, सुरक्षितता वाढली. यामुळे सुरवातीच्या शिक्षित वर्गाला ब्रिटिश राजवट आपल्या भल्यासाठी आली आहे असे वाटत असे.  इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाऱ्हाण्यांची, अडीअडचणींची दाद लावून घेता येईल असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवरती भर दिला. 

याच उद्देशाने जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत १८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशन संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून येथील जनतेची दुःखे, अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. आणि जनतेच्या सुखाकरता सरकारला प्रत्येक गोष्टी सहकार्य करावे, असा त्यांचा प्रयत्न असे. बॉम्बे असोसिएशन ही भारतातील राजकीय स्वरुपाची पहिली संस्था होती. बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही, भारतातील सनदशीर राजकारणाची सुरुवात मानता येईल. पुढील काळात हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. यावरूनच बॉम्बे असोसिएशनचे महत्त्व लक्षात येईल.  

प्रारंभीच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये खूप पक्षपात होत असे. प्रशासनातील महत्त्वाची पदे इंग्रज किंवा गोऱ्या लोकांसाठी राखीव ठेवली जात. सरकारच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध ज्या भारतीय नेत्यांनी सुरुवातीला आवाज उठवला, त्यामधे जगन्नाथ शंकरशेठ हे होते.  भारतीय लोकांना विविध क्षेत्रांमध्ये गोऱ्यांचे बरोबर अधिकार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.उदाहरणार्थ सुप्रिम कोर्टा मध्ये जी ज्युरीची पदे असत ती, सुरुवातीला फक्त गोऱ्यांनाच दिली जात.  नानांनी या पदांवर भारतीय लोकांचाही समावेश केला जावा म्हणून प्रयत्न केले.  1836 मध्ये प्रथमच भारतीय लोकांचा ग्रँड ज्युरी मध्ये बसण्याचा हक्क मान्य झाला. 


जगन्नाथ शंकरशेठ हे दातृत्वाबद्दल देखील फार प्रसिद्ध होते. शाळा, दवाखाने, धर्मशाळा, ग्रंथालय, मंदिरे यासारख्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. आपल्या संपत्तीचा अतिशय सुयोग्य वापर त्यांनी केला. नानांचा त्यांच्या कार्याचा भारतीयांनी गौरव केलाच परंतु ब्रिटिश सरकारनेही त्याचा गौरव केला. अनेक समित्या, पदे यावर त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या शिक्षणच्या व्यवस्थेवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारने 1840 मध्ये बोर्ड एज्युकेशनची स्थापना केली होती. हे बोर्ड जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत नाना त्याचे सन्माननिय सदस्य राहिले. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठाचे फेलो म्हणूनही नानांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबईचे मुन्सिपल कमिशनवरही त्यांची नियुक्ती झाली होती. 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमान ब्रिटिश सरकारने त्यांना दिला. 


आधुनिक मुंबईच्या शहराच्या उभाणीतही त्यांचा फार मोठा वाटा आहे. नानांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मुंबईच्या प्रगतीचा आलेखच होता असे म्हटले जाते. 

सर्वांगीण सुधारण्याचे बिजारोपण करणारे महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक असे वर्णन नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे केले जाते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आसामचा सहभाग

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आसामने महत्त्वाची भूमिका बजावली.  1826 मध्ये यंदाबूच्या तहानंतर आसाम थेट ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. तेव्हापासून, आसामच्या अनेक लोकांना परकीय वर्चस्वापासून स्वातंत्र्याची तीव्र इच्छा वाटू लागली.

गोमधर कोंवर यांनी असा पहिलाच प्रयत्न केला. मातृभूमीचे हरवलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी त्यांनी कंदुरा डेका फुकन, धर्मधर, हरनाथ आणि इतर काही सरदारांसह इंग्रजांविरुद्ध लढा दिला. 1828 मध्ये बंडखोरांनी सादिया येथील ब्रिटिश शस्त्रागारावर हल्ला केला. इंग्रजांनी हे बंड चिरडून टाकले, पण आसामच्या लोकांच्या मनातील स्वातंत्र्याची धगधगती इच्छा ते दाबू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या बंडाची नव्याने तयारी सुरू झाली. यावेळी पियाली बारफुकन यांनी पुढाकार घेतला. त्यांना जिउराम दुलिया बरुआ, बेनुधर कोंवर, रुपचंद कोंवर, देउराम दिहिंगिया, बौम चिंगफौ, हरनाथ आदींनी मदत केली. या अनुयायांच्या टोळीने पियाली बारफुकनने इंग्रजांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि रंगपूर येथील ब्रिटिश छावणी जाळण्याचा प्रयत्न केला. योजना यशस्वी झाली आणि छावणी उद्ध्वस्त झाली. पण इंग्रजांनी पियाली बारफुकन, जिउराम बरुआ आणि इतर काही जणांना ताब्यात घेतले. पियाली आणि जिउराम यांना फाशी देण्यात आली आणि इतरांना 14 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. 

त्या काळात, गदाधर गोहेन नावाचा आणखी एक देशभक्त ब्रिटीश सैन्यातील काही स्थानिक शिपायांसोबत उठावाची योजना आखत होता आणि त्याने वरच्या आसाममध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याची योजना प्रत्यक्षात येण्याआधीच इंग्रजांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले.

1857 मध्ये, जेव्हा उत्तर भारतात उठावाने झाला, तेव्हा आसाममधील मणिराम दिवाण नावाच्या व्यक्तीने  पूर्वेकडील कोपऱ्यात उठाव करण्याचा प्रयत्न केला. तो कोलकात्यात गेला आणि मधु मल्लिक नावाच्या दुसऱ्या बंडखोराच्या मदतीने त्याने आसाममध्ये उठावाची योजना आखली. तिथून त्याने शेवटचा अहोम राजा कंदर्पेश्वर सिंघा आणि त्याचा सल्लागार पियाली बरुआ यांना बंडाच्या मार्गाची माहिती देण्यासाठी पत्रे पाठवण्यास सुरुवात केली. मणिरामच्या ब्रिटीशविरोधी कटात सर्व लोकांनी भाग घेतला. मयाराम नझीर, नीलकांत चोलधारा फुकन, मरंगीखोवा गोहेन, दुतीराम बरुआ, बहादूर गावबुर्हा, फरमुद अली, त्रिनायन, कमला बरुआ आणि इतर उल्लेखनीय होते. सहाबाद येथे तैनात असलेल्या काही हिंदुस्थानी शिपायांनीही त्यांना पाठिंबा दिला. योजनेनुसार स्थानिक सैनिक अहोम राजाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांवर हल्ला करतील असे ठरले होते, तर मणिराम कोलकात्याहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन पुढे निघाले. दुर्दैवाने प्रयत्न अयशस्वी झाला.  इंग्रजांनी अनेक बंडखोरांना पकडले आणि तुरुंगात टाकले. मणिराम यांना कोलकाता येथे कैद करण्यात आले. इंग्रजांनी कंदर्पेश्वर सिंगालाही अटक करून तुरुंगात टाकले. मोठ्या संख्येने देशभक्तांना अंदमानात हद्दपार करण्यात आले. 26 फेब्रुवारी 1858 रोजी मणिराम दिवाण आणि पियाली बरुआ यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध 'उच्च देशद्रोह' केल्याबद्दल जोरहाट तुरुंगात फाशी दिली.

इ. स. 1861 मध्ये, नागाव जिल्ह्यातील फुलागुरी येथे शेतकरी उठाव झाला. 1894 साली दररंग येथील पाथरुघाट येथे आणखी एक शेतकरी उठाव झाला. या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांनी ब्रिटिश राजवटीच्या शोषण आणि जाचक धोरणाविरुद्ध निर्भीडपणे आंदोलन केले. इंग्रजांनी निर्दयीपणे हा उठाव दडपून टाकला आणि अनेक शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले.

काही काळ शांतता होती, पण आसामी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा धुमसत होती. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि 1905 मध्ये 'बंगालच्या फाळणीनंतर' 'स्वदेशी आंदोलन' यांचा आसाममधील देशभक्त लोकांवर मोठा प्रभाव पडला. 1921 मध्ये महात्मा गांधींच्या येण्याने, आसाममधील स्वातंत्र्यलढ्यालाही उर्वरित भारताबरोबरच वेग आला. हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे स्वयंसेवक 'असहकार', 'सविनय कायदेभंग' आणि इतर आंदोलनांमध्ये सामील झाले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील निशस्त्र आंदोलन आणि क्रांतिकारकांचे सशस्त्र प्रयत्न या दोन्हींमध्ये आसाममधील देशभक्त लोकांनी उडी घेतली. चंद्रनाथ सरमा, नवीन चंद्र बारदोलोई, तरुण राम फुकन, गोपीनाथ बारदोलोई आणि इतरांनी आसामच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले.

9 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली, तेव्हा देशाच्या या भागात या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले. गोपीनाथ बरदोलोई, बिष्णुराम मेधी, ​​फखरुद्दीन अली अहमद, ओमियो कुमार दास, ज्योतिप्रसाद अग्रवाला, हेम बरुआ, बिजॉय चंद्र भगवती, चंद्रप्रभा सैकियानी, पुष्पलता दास यांसारख्या सक्षम आणि कार्यक्षम नेत्यांनी राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनाचे आसाममधे नेतृत्व केले. आसाममधील जयप्रकाश नारायण आणि यांच्या समाजवादी अनुयायांच्या कारवायांमुळे या लढ्याची गती प्रचंड वाढली. 

 'रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' (RCPI) नावाच्या छोट्या कम्युनिस्ट गटाचे सदस्य त्यात सहभागी झाले. इंग्रजांच्या विरुद्ध देशभक्तीपर लढा आणि क्रांतिकारी कारवायां आणि समाजवादी क्रांतिकारी नेते शंकर बरुआ यांच्या 'मृत्यू वाहिनी'च्या स्वयंसेवकांनी केलेल्या विध्वंसक कारवायांमुळे ब्रिटिश सरकारला राज्य करणे अवघड होऊ लागले. 'छोडो भारत' आंदोलनादरम्यान कुशल कोंवर, टिलक डेका, कनकलता बरुआ, मुकुंदा काकती, भोगेश्वरी फुकनानी, मंगल कुर्मी, मणिराम कचारी, हेमोराम पातोर, गुणाभी बरदोलोई, लेरेला बोरो, रतन कचारी, लखी हजारिका, सुताराम सुजारिका, ठगाराम यांसारखे देशभक्त होते. मदन बर्मन, रौता बोरो, निधानू राजबंगशी आणि इतर अनेकांनी ब्रिटिश राजवटीतील फाशी, गोळीबार आणि इतर अत्याचारांमधे आपले प्राण दिले. त्यांच्या बलिदानाने केवळ या पूर्वेकडील लोकांनाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा दिली. बिष्णू राभा, हरेन कलिता, हरिदास डेका, खगेन बार्बोरा, मथुरा डेका, गोविंदा कलिता, चट्रासिंग टेरॉन, चिंताहरन कलिता, नीरेंद्र लाहिरी, उमा सरमा, सुरेश भट्टाचार्य, सरत राभा, मोहनलाल मुखर्जी, हेना गांगुली यांनी आरसीपीआयच्या क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

जेव्हा 'छोडो भारत' चळवळ अंतर्गत दृश्यावर वर्चस्व गाजवत होती, तेव्हा  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या 'आझाद हिंद फौज' किंवा 'इंडियन नॅशनल आर्मी' (आय एन ए) सोबत ब्रिटिश सैन्यावर बाहेरून हल्ला केला. आय एन ए ने आसामच्या पूर्व सीमेवरून भारतीय मुख्य भूमीत प्रवेश केला आणि मणिपूरमधील मोइरांग आणि नागालँडमधील कोहिमा यांना मुक्त केले. आझाद हिंदच्या सैनिकांनी इंफाळ, पालेल, बिशेनपूर, दिमापूर आणि इतर ठिकाणच्या टेकड्या आणि डेल आणि जंगलात इंग्रजांविरुद्ध युद्ध केले. आसामच्या मैदानी भागातील लोकांव्यतिरिक्त, नागा, मणिपुरी, कुकी आणि इतर जमातींचे अनेक डोंगरी लोक ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी या राष्ट्रीय मुक्ती दलात सामील झाले. उमेश चंद्र देवचौधरी, श्रीदाम चंद्र महंता, जलालुद्दीन अहमद, चित्तरंजन देबनाथ, एस रहमान, एस लॉरत सिंग, हरेंद्र नाथ मेच हे आसाम खोऱ्यातून आयएनएमध्ये सामील झालेल्या आणि मातृभूमीसाठी लढणाऱ्यांमध्ये  होते.

स्वातंत्र्य लढा आणि जागतिक परिस्थिती या सर्वांतून शेवटी ब्रिटिशांनी भारतातून परत जाणे स्विकारले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी उर्वरित राष्ट्रासह आसामही  स्वातंत्र्य झाला.

---

(डिसक्लेमर: व्यक्ती, गावं यांच्या  नावांचे उच्चार मराठीत लिहिताना वेगळे झाले असण्याची शक्यता आहे. इंग्रजी स्पेलिंग नुसार लिहिले आहेत. तसच टिनेजसाठी- लिहिलं असल्याने भरपूर तपशील अन भाषाही जरा वेगळी वापरलीय😃)

Sunday, April 14, 2024

प्रार्थना समाज


ब्रिटिश राजवट भारतात स्थिरावल्यानंतर आणि इथे पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू झाल्यानंतर येथील नवशिक्षक भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी नवे विचारांची जाणीव होऊ लागली. जोडीने पाश्चात्य धर्म, धार्मिक विचार, मिशनरी यांचा प्रभावही वाढू लागला. काही विचारी सुशिक्षितांना, आपल्या समाजात सुधारणा केली पाहिजे असे वाटू लागले. बंगालमध्ये  राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आपल्या धर्मातील दुष्परिणामांची जाणीव आणि ख्रिश्चन धर्मातील विसंगत गोष्टी या दोन्हीवर येथील सुधारकांचा विचार सुरू झाला. राजा राममोहन रॉय यांच्या कार्याची माहिती बघून महाराष्ट्रातील सुधारक दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना 1848 मध्ये मुंबई येथे केली. खरे तर ही समाज सुधारण्यासाठीची संस्था. परंतु त्या काळात असे विचार मांडणे हेही अतिशय धाडसाचे होते. पारंपारिक धर्म मार्तंडांचा प्रचंड प्रभाव समाजावरती होता. त्यामुळे ही संस्था गुप्त स्वरूपात होती. एकेश्वरवाद, रोटीबेटीचे बंधन तोडणे, जातीभेद मोडणे ही त्यांची मूळ उद्दिष्ट होती. या गुप्त संघटनेतील सदस्यांची यादी कोणीतरी पळवली आणि त्यामुळे सगळे सदस्य हादरले. आपले नाव उघड झाले तर समाज आपल्याला वाळित टाकेल अशी भीती वाटल्यामुळे परमहंस सभा संपुष्टात आली. (1860) ( तेव्हा वाळित टाकणं हे अतिशय गंभीर असे. त्या घरांशी कोणताही संपर्क केला जात नसे)


 1864 मध्ये ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते केशवचंद्र सेन यांची मुंबई आणि पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली. या व्याख्यानांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा येथील समाजसुधारकांनी चंग बांधला. आणि मुंबईत 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आत्माराम पांडुरंग म्हणजेच दादोबा पांडुरंगाचे धाकटे भाऊ यांनी ही स्थापना केली. या संस्थेच्या पुणे, नगर, सातारा या ठिकाणीही शाखा निघाल्या.  प्रार्थना समाजामध्ये नंतर अनेक मोठे सुधारक सामील झाले. न्यायमूर्ती म. गो. रानडे, भाऊ महाजन, न्या. ना.ग. चंदावरकर,  व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर, मामा परमानंद, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे ( बहुजन समाजापर्यंत प्रार्थना समाज नेण्याचे काम यांनी केले), वामन आबाजी मोडक, इत्यादी.

 प्रार्थना समाजामध्ये तुकाराम आणि इतर संतांना मोठे महत्त्वाचे स्थान होते. अध्यात्म आणि संतांचे अभंग अशी मोट त्यांनी बांधली. 

सत्य, ज्ञान आणि आनंद अशा रूपातील सगुण ईश्वर प्रार्थना समाजाने मानला. उदबोधन, स्तवन, ध्यान व प्रार्थना, उपदेश, आरती अशा उपासना पद्धती प्रार्थना समाजामध्ये स्वीकारल्या. ईश्वर एकच आहे, त्यांनी विश्व निर्माण केले आहे, त्याची केवळ उपासना करणे पुरेसे आहे, सत्याची कास धरून केवळ मानसिक पूजन करणे पुरेसे आहे, असे प्रार्थना समाज बांधतो. मूर्ती व प्रतिमा यांचे पूजन प्राथमिक प्रार्थना समाज नाकारतो. तसंच त्यांना अवतारही मान्य नाहीत, आणि विशिष्ट धर्मग्रंथ ही त्यांना मान्य नाहीत. 

 सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत, म्हणून त्यांनी भेदभाव न मानता बंधुभावाने राहावे, असे प्रार्थना समाज मानतो. संत तुकाराम आणि त्यांचे साहित्य हे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यता निवारण, बालविवाह बंदी, दलितांचा उद्धार, शिक्षणाचा विस्तार, अनाथ आश्रमांची उभारणी, ग्रंथ लेखनासाठी प्रोत्साहन, अशी विविध सामाजिक कार्ये प्रार्थना समाजाने केली. अनेक शाळा ही त्यांनी सुरू केल्या.

---


Thursday, January 25, 2024

भारताचा प्रजासत्ताक दिन



प्रजासत्ताक देशामध्ये, देशाचा प्रमुख हा लोकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडलेला असतो. एक निश्चित नियम समूह म्हणजेच राज्यघटना (संविधान), देशातील लोकांनी सर्वसंमतीने स्विकारलेली असते. अशा देशात सर्व शासकीय कार्यालये व पदं ही देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात.


इ. स. १९४७ मधे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताने राज्यकारभारासाठी प्रजासत्ताक पद्धती स्विकारायचे ठरवले. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती तयार केली गेली. या समितीने अतिशय सखोल अभ्यास करून भारताची राज्यघटना (संविधान) तयार केली.


स्वातंत्र्यपूर्व काळात, २६ जानेवारी १९३० रोजी जवाहरलाल नेहरु यांनी तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून, २६ जानेवारी १९५० रोजी भारताने ही राज्यघटना स्विकारली आणि लागू केली गेली. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

या दिवशी, दर वर्षी राजधानी नवी दिल्ली येथे मोठे संचलन आयोजित केले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. अनेक देशांच्या प्रमुखांना तसेच भारतातील विविध क्षेत्रातील माननीयांना आमंत्रित केले जाते. 


प्रथम वीरगतिप्राप्त सैनिकांना  श्रद्धांजली वाहिली जाते. तसेच सैन्यातील पराक्रमींना अशोक चक्र, किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात. नंतर विविध शौर्य पुरस्कार दिले जातात.

 त्या नंतर तीनही सैन्य दलांचे (पायदळ, नौदल, वायुदल) यांचे संचलन होते. विविध शस्त्रास्त्रे, रणगाडे, विमाने यांचेही संचलन होते; भारताच्या लष्करी सामर्थ्याची ती एक झलक असते. नंतर प्रत्येक राज्याचे एक एक संचलन होते. यात आपापल्या संस्कृतींची झलक, राज्याचे नागरिक सादर करतात. महाराष्ट्राचा चित्ररथ आपले प्रतिनिधित्व करतो. 

२६ जानेवारी रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, खाजगी संस्था, कार्यालये, ग्रामपंचायत, अशा सर्व ठिकाणी ध्वजवंदन केले जाते. 

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० या दिवशी साजरा झाला. आज आपण आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. 


आपले प्रजासत्ताक चिरायु होवो! 

जय हिंद, जय भारत, जय भारतीय जनता!

🇮🇳😊😇🙏🏻

Sunday, November 6, 2022

त्र्यं. शं. शेजवलकर यांचे म. गांधींबाबतचे विचार


(मराठी विकास संस्था मुंबई आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित कै. त्र्यं. शं. शेजवलकर जन्मशताब्दि समारोहातील चर्चासत्रामध्ये केलेला शोधनिबंध - जुलै १९९५)

त्र्यंबक शंकर शेजवलकर हे एक अनेकविध पैलूंचे व्यक्तिमत्व ! त्यांच्या लेखांच्या सूचीतील विषयांची विविधता पाहिली तरी हे स्पष्ट होईल. त्यांच्या लेखांंतून व्यक्त होणाऱ्या म. गांधींवरील त्यांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात केला आहे.

म. गांधी वर असे, त्यांनी दोन लेख लिहिले. एक मोहनदास करमचंद गांधी' हा १९३० साली लिहीलेला लेख आणि दुसरा १९४८ साली लिहीलेला 'गांधी प्रणित समाजरचना शक्य आहे का?' हा लेख . असे असले तरी इतर अनेक लेखांमधून त्यांची गांधींबद्दलची मते व्यक्त झालेली दिसतात. पैकी रामदास, ब्राह्मण्याचा हास, विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने, पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना, टॉयन्बीचा इतिहासबोध, टॉयन्बीचे इतिहासावरील महाभाष्य, लोकमान्य टिळक इत्यादि लेखांचा उपयोग या निबंधामध्ये करण्यात आला आहे.

१९३० सालच्या 'मोहनदास करमचंद गांधी' या लेखामध्ये शेजवलकरांनी गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांचा उहापोह केला आहे. शेजवलकर लिहीतात, "गांधींचा विशेष देशभक्ती हा तर आहेच परंतु जोडीने अखिल मानवजातीच्या हिताचा मार्ग शोधण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांचा महत्त्वाचा विशेष होय"१ गांधींनी सांगितलेला सत्य-अहिंसा-ब्रह्मचर्य-अस्तेय-वैराग्य हा संयमाचा मार्ग प्राचीन काळापासून हिंदुस्थानात आहे. परंतु या नियमांचा उपयोग विशिष्ट काळामध्ये कसा करून दाखवायचा हे गांधींनी वर्तनाने दाखविले असे शेजवलकर मानतात.

म. गांधींनी सार्वत्रिक सुधारणेला प्राधान्य दिले आणि त्यासाठी कायद्यापेक्षा धार्मिक स्वरूपाच्या आचारांचे अधिष्ठान त्यांनी महत्त्वाचे मानले. "गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर अवलंबून होती"२ असे शेजवलकर सांगतात आणि अखिल मानवजातीत कायद्याने नव्हे तर गांधींसारखी शक्ती सर्व राष्ट्रांत गांधींमधून व्यक्त होणाऱ्या जगातील सर्व महापुरुषांचे तत्त्वज्ञान अनुसरण्यातून प्राप्त होईल"३ असा विश्वास शेजवलकरांनी या लेखामध्ये व्यक्त केला आहे. इ.स. १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रामदास' या लेखामध्ये "रामदासांचे राजकारण, समाजकारण, राजकीय संघटन, सर्वांगिण सुधारणा - टिळक व गांधी यांनी पुढे चालविली".४ असे शेजवलकर लिहितात. परंतु म. गांधींचे जीवन हे कोणत्याही हिंदी ग्रंथापेक्षा ख्रिस्ती नव्या कराराने उद्दिपीत झालेले आहे असे शेजवलकरांना वाटते. म. गांधींचा भर शुभवर्तमान, श्रद्धा, भक्तीभाव यांवर होता. याच लेखात "गांधीचा आतला आवाज म्हणजे श्रवण-मनन-निदि-ध्यासांनी निश्चित झालेला विचार एवढाच समजला पाहिजे"५ असे शेजवलकर लिहितात.

तत्पूर्वी १९४८ सालच्या 'गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे कां?' या लेखामध्ये शेजवलकर म. गांधींचा मार्ग आधुनिक काळामध्ये कसा शक्य नाही हे स्पष्ट करतात. गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर होती हे पुन्हा मांडून अशी भावना आज एकातही नाही. त्यामुळे गांधींच्या मार्गावर आधारित नवीन समाजरचना प्रत्यक्षात येणे शक्य नाही असे शेजवलकर लिहितात. याशिवाय बदलती जागतिक परिस्थिती आणि गांधींच्या तत्त्वज्ञानाची अनैतिहासिकता ही देखिल नवीन समाजरचना प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने शक्यतेतील नाही असे ते म्हणतात. "कोणत्याही नवमताची निर्मिती ही ऐतिहासिक गरजेतून जशी होते; तसाच तिचा नाशही ऐतिहासिक गरजेतून होतो. असे असतानाही जुन्या काळी नष्ट झालेल्या बौद्ध पंथाचे पुनरूज्जीवन गांधींनी का केले?" ६ असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. मानवाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये पूर्णतः नवीन असे काही घुसडणे शक्य नसते परंतु तरीही मानव जातीत निर्माण होणारे महात्मे हे मूलत: एकांगी एक कल्पनेने पछाडलेले असतात. आणि म्हणूनच ते महात्मे ठरतात. गांधींचे सर्वोदयी तत्त्वज्ञान आणि त्यांची सतत सत्याचे प्रयोग करण्याची भूमिका यामुळे शेजवलकर म. गांधींना संपूर्ण ज्ञानी मानीत नाहीत.७ संपूर्ण ज्ञानी हा संन्यस्त असल्याने त्याला ज्ञानोत्तर कर्माची आवश्यकता नसते आणि म्हणून खरा ज्ञानी जगाला ज्ञात होऊ शकत नाही. जगाला जो ज्ञात होतो तो ज्ञानी ज्ञानाच्या क्षेत्रातील खालच्या दर्जाचा असतो. गौतमबुद्धाच्या शब्दांचा दाखला देऊन शेजवलकर म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध धातू भेसळ केल्याशिवाय चलनी नाणे होऊ शकत नाही तसेच कोणत्याही महात्म्याचे तत्वज्ञान साकार व्हायचे असेल तर त्यात भेसळ करावीच लागते,

गांधींचा पंथ हा अंतिम सामाजिक विकास, राज्यसंस्था नष्ट होऊन मानव स्वतंत्र होण्यात मानतो आणि हा पंथ, संस्था प्रधान नाही असे शेजवलकर प्रतिपादन करतात. नवस्वतंत्र भारत हा अंतर्गत दृष्ट्या इतका विभिन्न झालेला आहे की असा देश जागतिक संकटांपुढे कसा उभा राहील हा मुख्य प्रश्न आहे. तेथे अशा नवीन समाजरचनेचा प्रयोग कसा सुरू करणार आणि यशस्वी कसा करणार असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. एकूणात गांधी तत्त्वज्ञान आणि गांधीप्रणित समाजरचना कितीही आदर्श असली तरी स्वतंत्र भारतामध्ये ती रूजविता येणार नाही असा विचार शेजवलकरांनी या लेखात मांडला आहे.

१९४८ साली शेजवलकरांचा आणखीन एक लेख प्रसिद्ध झाला तो म्हणजे 'ब्राह्मण्याचा हास' हा होय. यामध्ये भारतातील ब्राह्मणांचा, ब्राह्मण्याचा समाजावरील पगडा यांचे विवेचन करताना, म. गांधींच्या विचारांबाबत आपली मते शेजवलकरांनी मांडली आहेत. ते म्हणतात, 'गांधींनी हिंदुस्थानात शांतता प्रस्थापित न करता उलट खळबळ निर्माण केली'. ही खळबळ केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही तर सर्वच क्षेत्रात असंतोष निर्माण झाला. "हा निर्माण झालेला असंतोष इंग्रजांना बाहेर काढण्यास निश्चितच उपयुक्त ठरला पण स्वातंत्र्योत्तर काळात याच असंतोषाने येथील समाजाच्या अमानुषतेचे खरे स्वरूप चव्हाट्यावर आणले"८ असे शेजवलकर म्हणतात. या असंतोषाच्या जोरामुळे आणि महायुद्धाने अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांच्या अंदाजापूर्वी मिळाले. आणि येथील राजकीय तोल ढासळला. शेजवलकरांच्या मते म. गांधींनाही हे लक्षात आले नाही.

शेजवलकरांच्या मते गांधींच्या तत्त्वज्ञानामध्ये अनेक ढोबळ चुका आहेत पण सर्वात मोठा तोटा झाला तो त्यांच्या अहिंसेच्या निःसंदिग्ध तंत्रामुळे. शत्रूलाही गांधींबद्दल विश्वास निर्माण झाला की कोणत्याही परिस्थितीत गांधी अत्याचाराचा मार्ग स्विकारणार नाहीत. याचाच गैरफायदा जीनांनी पाकिस्तानाच्या निर्मितीसाठी करून घेतला. "गांधींना आपल्या मार्गाच्या खरेपणाबद्दल इतका निढळ विश्वास होता की त्यावर आधारित आपले जळजळीत जीवनकार्य त्यांनी रतिभर ढळू दिले नाही. परंतु, यामुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली असे म्हणावे लागते”९ असे शेजवलकर म्हणतात. गांधींचा मार्ग सर्व जगाच्या हिताचा होता हे शेजवलकर मान्यच करतात. परंतु मार्ग सोडण्यापेक्षा मरण पत्करावे हे मात्र आजच्या जगात अत्यंत घातक ठरेल. असे शेजवलकर सांगतात. याचा अर्थ शेजवलकरांना तेव्हा गांधीवाद पूर्ण अमान्य होता असे नव्हे तर गांधींच्या तत्त्वांशी ज्यांचे प्रामाणिक मतभेद आहेत त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे असे ते म्हणतात. "आज जगामध्ये गांधींचा मार्ग स्वीकारला नाही तर जग सुधारणार नाही आणि हा मार्ग व्यवहार्य नसल्याने आज जगामध्ये देशाने कोणता मार्ग स्विकारावा हा प्रश्न आहे.' १० असे शेजवलकरांना वाटते.

म. गांधींबाबत शेजवलकरांचे विचार व्यक्त होणारा आणखीन एक लेख सापडतो तो म्हणजे 'पानिपत' या पुस्तकासाठी लिहिलेली परंतु प्रत्यक्षात न छापलेली त्यांची प्रस्तावना होय. यात शेजवलकरांनी गांधींबाबत आपली मते अत्यंत परखडपणे मांडलेली दिसतात. इतिहासाची खरोखरीच गरज नाही हे गृहीत धरून जगाला चकीत करून सोडणारे राजकारण गांधींनी अवलंबिले असे सांगून शेजवलकर पुढे लिहितात, “पाकिस्तान देण्यात गांधींनी या देशातील हिंदू प्रजेचेच नुकसान केले असे नसून त्यांच्या तत्त्वचळ्या आचरणाने पाकिस्तानातील मुस्लिम जनतेचेही तितकेच नुकसान झाले आहे”११ काँग्रेसच्या तथाकथित अहिंसेच्या तत्त्वाने निरपराध हिंदू-मुस्लिम जनतेची प्राणहानी टळली नाही वा परक्यांना या भूमीपासून दूर ठेवण्यात यश आले नाही; असा आरोप शेजवलकरांनी केला आहे.

१९४८ पासून पुढील कालावधीमध्ये इतर अनेक लेखांतून शेजवलकरांची गांधी तत्त्वज्ञान-मार्ग-गांधीवादी याबद्दल मते व्यक्त झालेली आहेत. पैकी काहींमध्ये गांधींच्या बाजूची मते व्यक्त होतात. उदा. “रानडे, टिळक, गांधी तीनही पुढाऱ्यांचे खोल ठसे जनमानसावर उठलेले असूनही त्यातील वाईट तेवढ्या बाजूच दुर्दैवाने पुढे आलेल्या दिसतात"१२ किंवा, "महाराष्ट्राला पूर्वेतिहास नसता तर महाराष्ट्रात गांधींविरद्ध जी अढी दिसते ती मुळातूनच धरली नसती"१३

तर काहींत गांधीवादाच्या अव्यवहार्यतेबाबत मते व्यक्त होतात. उदा. “आज जगाची रचना अशी झाली आहे की तीत कोणत्याही एका बलिष्ट य राष्ट्राला स्वराष्ट्राची घटना स्वतःला वाटेल त्या उच्च तऱ्हेची घडविता येणार नाही. कारण परचक्राची भीती होय. गांधींच्या अतिउच्च अहिंसावादाच्या मार्गातील ही मोठी धोंड आहे."१४ तर काहींत गांधींच्या पूर्ण विरोधी मते व्यक्त होताना दिसतात. उदा." गांधीवाद हा आचारदृष्ट्या व भावनिक दृष्ट्या निश्चितच उपयुक्त ठरत असला तरी ज्ञानाचा डोळसपणा मात्र त्यांत दिसत नाही."१५ किंवा "गांधींची सर्वच सुधारणा या देशात स्वखुषीने क्वचितच कोणी मान्य केली असेल. मतपरिवर्तनाने पटली म्हणून गांधींची मते हिंदुस्थानात प्रचलित झालेली नसून ती लादली गेलेली आहेत"१६

किंवा, "गांधी हे हिंदु मुत्सद्दी म्हणजे हिंदू धर्माचे, लोकांचे व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बद्ध परिपक्व झालेले परमदेशभक्त मुत्सद्दी नव्हते. आपली तत्त्वे जे स्वीकारणार नसतील त्यांचे काय झाले याची चौकशी करावयास त्यांस फुरसत नव्हती, इतके ते स्वतत्त्वभ्रमिष्ट होते” १७

१९३० पासून शेवटपर्यंत शेजवलकरांची गांधींबद्दलची मते आपल्याला अशी बदलत जाताना दिसतात. सुरुवातीला केवळ हिंदुस्थानातच उद्भवू शकेल असे आदर्श तत्त्वज्ञान, गांधींची धार्मिक भावना, आणि ईश्वर निष्ठेतील कार्यप्रेरक शक्ती, त्यांचे वेगळेपण, त्यांची ताकद आणि महात्म्य याबद्दल शेजवलकर पुनःपुनः लिहितात. १९४८ सालपासून गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांच्या व्यवहार्यतेबद्दल शेजवलकरांची मते बदललेली दिसतात. तरीही १९५८ पर्यंत गांधींच्या तत्त्वज्ञानाचे मानव जातीच्या हितामधील महत्त्व आणि हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल एखादा अपवाद सोडला तर शेजवलकर गौरवोद्गारच काढतात. तोपर्यंत गांधीमार्ग - तत्त्वज्ञान हे आदर्श असले तरी आधुनिक जगात व्यवहार्य नाहीत असेच मत शेजवलकरांचे दिसते.

पानिपतच्या अप्रकाशित प्रस्तावने मात्र पूर्ण गांधी विरोध आपणास दिसतो. विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखामध्ये त्याची पूर्वपिठिका दिसते. एकंदरीत बदलत्या परिस्थितीत गांधीवाद कसा त्याज्य ठरत गेला याची झलक शेजवलकरांच्या लेखातून दिसते.

या सर्व लेखांतून शेजवलकरांची अभ्यासूवृत्ती, गांधी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास, या तत्त्वज्ञानाचा फोलपणा कोठे आहे, या मार्गाची अव्यवहार्यता नेमकी कशात आहे, हे शेजवलकरांनी स्पष्ट केले आहे. गांधींचे मोठेपणा कशात आहे, मार्गाचा स्विकार आजच्या जगात कोठपर्यंत आणि कसा करणे शक्य आहे, याचा सखोल विचार त्यांच्या लेखनातून आपणास दिसतो. एखाद्या विषयावर आपला त्याची उदाहरणे, व्यवहार्यता, अभ्यास, त्यावरील मते, त्याची सत्यासत्यता आणि अशा सर्वांचा साकल्याने विचार लेखासारख्या मर्यादित लेखनप्रकारामध्ये करणे ही अतिशय कठीण गोष्ट. मं. गांधींच्या तत्त्वज्ञानाबाबत ते अधिकच कठीण! परंतु शेजवलकरांनी आपल्या लेखांमधून ते साध्य केलेले दिसते. आपल्या विषयाची चौकट-मर्यादा याची स्पष्ट जाणीव, अत्यंत चपखल शब्द आणि वाक्यरचना, विषयाचा परिपूर्ण अभ्यास, विषयामागील तळमळ, लेखनाप्रती निष्ठा शेजवलकरांच्या लेखनातून जाणवते. त्यांनी सांगितलेला कितीही अवघड विचार वाचताना चटकन समजतो. कोणतेही वाक्य सहसा पुन्हा वाचावे लागत नाही. विचारांची अत्यंत स्पष्टता असल्याशिवाय लेखनामध्ये ती येत नाही. शेजवलकरांच्या लेखनात ही स्पष्टता अत्यंत सहजतेने येते.

----

तळटिपा

१. मोहनदास करमचंद गांधी : शेजवलकरांचे लेख-संग्रह तृतीय खंड, पृ.३६०

२. कित्ता, पृ. ३६२

३. कित्ता, पृ.३६३

४. रामदास : शेजवलकर लेख-संग्रह - तृतीय खंड, पृ. २३

५. कित्ता, पृ. २४

६. गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे का? : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड, पृ.२५७

७. कित्ता, पृ. २५७

८. ब्राह्मण्याचा ऱ्हास : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड पृ. २८६

९. कित्ता, पृ. २८८

१०. कित्ता, पृ. २८८

११. पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना : शेजवलकर लेख-संग्रह पृ. २८६.

१२. न्या. रानडे : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड पृ. ३३२

१३. महाराष्ट्राच्या मानगुटीवरचा समंध : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. २७६.

१४. क्रांतीच्या मूलतत्वांचा महाराष्ट्रातील अनुक्रम: शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. 

१५. ब्राह्मण्याचा -हास : शेजवलकर लेखसंग्रह, पृ. २९४

१६. लोकमान्य टिळक : शेजवलकर लेख संग्रह, तृतीय खंड पृ. ३५१

१७. कित्ता, पृ.२५२.

---

लोकनायक जयप्रकाश नारायण

बिहारमधील गंगा--शरयू नद्यांच्या संगमाच्या गावी सिताबदियारा येथे ११ ऑक्टोबर १९०२ या दिवशी जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. एक मध्यमवर्गीय, सरकारी अधिकारी असलेले हरसूदयाळ हे त्यांचे वडील आणि प्रेमळ आणि कर्तबगार फुलराणी ही त्यांची आई. जयप्रकाश लहानपणापासून शांत आणि गंभीर वृत्तीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथे झाले. मोठेपणी शास्त्रज्ञ व्हायचे या विचारांतून विज्ञान शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण घेणे त्यांनी सुरू केले. दरम्यान बंगालमधील क्रांतिकारकांचे आणि त्यांच्या क्रांतिकार्याचे आकर्षण तरुण जयप्रकाशना वाटले. याच सुमारास बिहारचे नेते ब्रजकिशोर प्रसाद यांची कन्या प्रभावतींशी जयप्रकाश यांचा विवाह झाला. ब्रजकिशोर प्रसाद राष्ट्रीय चळवळीतील अनेक नेत्यांशी जवळून संबंधित होते. त्यांच्यामुळे राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद इत्यादींशी जयप्रकाशांची ओळख झाली.

१९२० मध्ये म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. सरकारी नोकऱ्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, परदेशी माल यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन म. गांधींनी जनतेला केले. १९२१ मध्ये जयप्रकाशांनी या अवाहनानुसार

महाविद्यालय सोडले आणि ते राष्ट्रीय चळवळीत उतरले. परंतु चौरीचौरा प्रकरणामुळे म. गांधींनी ही चळवळ मागे घेतली.

जयप्रकाश पुन्हा शिक्षणाकडे वळले. अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरवले. आवश्यक ते आर्थिक पाठबळे नसल्याने अमेरिकेत गेल्यानंतर मिळेल ते काम करून त्यांनी पैसा उभा केला आणि शिक्षण घेतले. वेळप्रसंगी मळ्यात, कारखान्यात, हॉटेलमध्ये वेटर अशी अनेक तऱ्हेची कामे त्यांनी केली, आणि शिक्षण चालू ठेवले. निसर्गविज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करता करता मार्क्स, लेनिन, मानवेंद्रनाथ रॉय, ट्रॉटस्की इत्यादींच्या साम्यवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. १९२९ मध्ये समाजशास्त्राची एम.ए. ही पदवी घेऊन जयप्रकाश भारतात परतले.

म. गांधींनी भेटण्यासाठी साबरमतीच्या आश्रमात जयप्रकाश गेले. तेथे म. गांधींनी जयप्रकाशांची आणि जवाहरलाल नेहरूंची ओळख करून दिली. दोन समान समाजवादी विचारवंतांची भेट झाली. नेहरूंनी अखिल भारतीय काँग्रेस च्या मजूर विभागाची सूत्रे जयप्रकाशांकडे सुपूर्द केली. मजुरांसाठीच्या विविध योजना जयप्रकाशांनी मांडल्या. दरम्यान म. गांधींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला. जयप्रकाशही यात सहभागी झाले. याच लढ्यात त्यांना देशासाठी पहिली तुरुंगवासाची शिक्षा झाली. ही शिक्षा संपल्यानंतर पुन्हा मजूर विभागाचे काम त्यांनी सुरू केले. परंतु आईचा मृत्यू, वडिलांचे आजारपण, कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक अडचणी या सर्वांमुळे कडव्या मार्क्सवादी जयप्रकाशांना उद्योगपती बिर्लांकडे सचिव म्हणून काम स्वीकारणे भाग पडले.

भारतातील व जगातील घडामोडी, रशियातील मार्क्सवादाचा प्रत्यक्ष प्रयोग, भारतातील मार्क्सवादी चळवळीऐवजी समाजवादी तत्त्वज्ञानाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली.

दरम्यान, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत १९३२ मध्ये म.गांधींना तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. त्यावेळच्या भारतमंत्र्यांना वाटले; काँग्रेस संपली, पण असे झाले नाही. जयप्रकाशांनी चळवळीची सूत्रे हाती घेतली. चळवळ पुन्हा उभी राहिली. अखेर जयप्रकाशांनाही अटक झाली. वृत्तपत्रांमध्ये बातमी झळकली. “काँग्रेस ब्रेन ॲरेस्टेड!”

जयप्रकाशांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे अनेक समविचारी मित्र त्यांना भेटले. जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आच नरेंद्रराव, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, मिनू मसानी, युसूफ मेहेरअल्ली इत्यादि नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कामगार, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, विद्यार्थी या सर्वांना एकत्र आणावयाचे ठरवले. या सर्व नेत्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास होता. आणि राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग

होता. यातूनच १८ मे १९३४ मध्ये 'काँग्रेस समाजवादी पक्ष' ही काँग्रेसांतर्गत संघटना उभी राहिली. पक्षाचे संघटन मंत्री म्हणून जयप्रकाशांची नेमणूक झाली. प्रचारासाठी काँग्रेस सोशालिस्ट नावाचे वृत्तपत्र जयप्रकाशांनी अशोक मेहतांच्या

मदतीने चालवले.

१९३४ च्या काँग्रेस अधिवेशनात विधिमंडळाच्या निवडणुका लढविण्या ठरवले गेले. परंतु जयप्रकाशांनी याला विरोध केला. काँग्रेसचे अनेक नेते त्यामुळे नाराज झाले. पुढे म. गांधींनी जयप्रकाशांचे मत मान्य केले. याच सुमारास

कामगारांची ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस फुटण्याची शक्यता निर्माण झाली. ही फूट थांबविण्यासाठी जयप्रकाशांनी यशस्वी प्रयत्न केले. पुढे मुंबई, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, बंगाल आदि प्रांतांत कामगार संघटना रुजल्या. महायुद्ध काळात

जमशेटपूरच्या टाटांच्या लोखंड कारखान्यातील मजूर संघटनेच्या कामात जयप्रकाश स्वतः उतरले. तेथील तार कंपनीच्या कामगारांच्या संपाचे नेतृत्वही त्यांनी केले. याच सुमारास महायुद्धात भारताला ओढण्याबाबत सरकारविरुद्ध लिहिल्यामुळे जयप्रकाशांना अटक झाली.

तुरुंगातही ते स्वस्थ बसले नाहीत. तुरुंगातील कार्यकर्त्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादि विषय ते शिकवित. तुरुंगातून सुटका झाल्यावर देशव्यापी लढ्याच्या दृष्टीने संघटना मजबूत करण्यासाठी जयप्रकाशांनी विविध प्रांतातून दौरे काढले. परंतु सरकारने त्यांना पुन्हा अटक केली. देवळी जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. या तुरुंगात राजबंद्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाला सुरुवात झाली. जयप्रकाशांनी एकतीस दिवसांचे उपोषण केले. अखेर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले.

१९४२ मध्ये त्यांना हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. याच सुमारास म. गांधींनी चले जाव चळवळ सुरू केली. या चळवळीत भाग घेता यावा म्हणून

जयप्रकाशांनी साहसपूर्ण रीतीने तुरुंगातून पलायन केले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर राष्ट्रीय चळवळ तीव्र करण्यासाठी जयप्रकाशांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. गनिमी पद्धतीचे सैनिकी शिक्षण देण्यासाठी आझाद रस्ते संघटनेच्या अनेक शाखा उभ्या केल्या. ब्रिटिश राज्यातील हिंदी पोलीस आणि सैनिकांना स्वातंत्र्य लढ्यात गावकऱ्यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्रिटिश सरकारने जयप्रकाशांना पकडण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु जयप्रकाशांनी भूमिगत राहून कार्य चालूच ठेवले. १९४३ मध्ये अमृतसर येथे त्यांना अटक झाली. लाहोर येथील तुरुंगात त्यांचा अतिशय छळ करण्यात आला.

दुसरे महायुद्ध संपता संपता भारताच्या स्वातंत्र्याच्या विविध योजना मांडल्या जाऊ लागल्या. जयप्रकाशांची तुरुंगातून सुटका झाली. स्वतंत्र भारतामध्ये समाजवादाची स्थापना व्हावी, या विचाराच्या नेत्यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला.

शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी जयप्रकाशांनी किसान पंचायतीची स्थापना केली. शेतकऱ्यांना स्वतःला अन्यायाची जाणीव व्हावी आणि त्या अन्यायाविरुद्ध त्याने स्वतःच उभे राहावे अशी रचनात्मक शिकवण जयप्रकाशांनी दिली.गावांचा, खेड्यांचा उद्धार करण्यासाठी गावकऱ्यांनीच एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. सरकारी कृपेवर अवलंबून राहता कामा नये, हे सांगून त्यासाठी त्यांनी अनेक गावांमध्ये भूसेना स्थापन केल्या.

शेतकऱ्यांप्रमाणे भारतातील एक महत्त्वाचा गट म्हणजे तरुण विद्यार्थी वर्ग या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी नॅशनल युनियल ऑफ स्टुडंटस ही संघटना स्थापन केली. तसेच कामगार संघटना- किसान संघटना, अखिल भारतीय रेल्वे कामगार

संघटना, कृषक मजदूर संघटना इत्यादि संघटनांच्या उभारणीतही जयप्रकाशांचा मोठा

सहभाग होता.

१९५२ मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पंडित नेहरूंवर समाजवादाचा प्रभाव असल्याने, स्वतंत्र भारतातील भावी कार्यवाही संदर्भ व समाजवादाचा विचार करण्यासाठी १९५३ मध्ये पंडित नेहरूंनी जयप्रकाशांना भेटीसाठी बोलविले. या भेटीत जयप्रकाशांनी चौदा कलमी कार्यक्रम मांडला; परंतु

याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही मात्र होऊ शकली नाही. दरम्यान विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीत जयप्रकाश उतरले. १९५४ च्या गया येथील सर्वोदय संमेलनात जयप्रकाशांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली. याच संमेलनात त्यांनी स्वत:च्या जीवनदानाची घोषणा केली.

भूदान-ग्रामदान-ग्रामस्वराज्य या चळवळी चालू असताना त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडेही लक्ष होते. रशियाच्या पूर्व युरोपमधील साम्यवादी साम्राज्यावादावर टीका करून जगाला सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. चीन-भारत मैत्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याचा गौरव १९६५ मध्ये मॅगसेस पुरस्काराने केला गेला. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक शांततेसाठीच्या कार्याबद्दल त्यांना दिला गेला.

भारतातील बिहार राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी विविध संघटना त्यांनी उभ्या केल्या. बंगालमधील नक्षलवादी चळवळीला थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे मनपरिवर्तन घडवून, त्यांना समर्पित होण्यास जयप्रकाश यांनी उद्युक्त केले. शिक्षण व निवडणूक प्रणालींमधील सुधारणांसाठी 'यूथ फॉर डेमॉक्रसी' हा अपक्षीय कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या आणि अशा अनेकविध चळवळी, कार्यक्रम, कृती, विचार जयप्रकाशांनी स्वातंत्र्योत्तर भारतात रुजविल्या.

जयप्रकाशांच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाचे पर्व म्हणजे आणीबाणीचा काळ. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशांनी स्वयंप्रकाशित दीपस्तंभाचे कार्य केले. देशाला हुकूमशाहीच्या गर्तेतून बाहेर काढावयाचे तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे जयप्रकाशांचे मत होते.

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच जयप्रकाशांना अटक झाली. तुरुंगातच सर्व पक्षांतील विचारवंतांना एकत्र करण्याचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे काम त्यांनी केले. १९७६ मध्ये जयप्रकाशांच्या निमंत्रणामुळे समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल या पक्षांची एकत्रित बैठक झाली. त्याचे फलित म्हणून जनता पक्ष स्थापन झाला. जयप्रकाशांनी जनतेला आवाहन केले. “या निवडणुकीत देशाचे पुढील पन्नास वर्षांचे भवितव्य ठरणार आहे. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही यातून निवड करायची आहे.” जयप्रकाशांच्या या आवाहनाला भारतीय जनतेने प्रतिसाद दिला. १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्ष बहुमताने निवडून आला.

आणीबाणीत जे झाले ते पुन्हा होऊ नये, स्वातंत्र्याची गळचेपी पुन्हा होऊ नये, लोकशाही अन् स्वातंत्र्य तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचावे, यासाठी जयप्रकाशांनी सर्वंकष क्रांतीची कल्पना मांडली. लोकांची व युवकांची शक्ती पुन्हा वर उसळून येते आहे. तिचा उपयोग भारतीय समाजात रचनात्मक दृष्टीने संपूर्ण क्रांतीकडे करण्यासाठी कसा करावयाचा ते पाहावयाचे आता राहिले आहे. असे जयप्रकाशांनी मांडले. या सर्वकष क्रांतीसाठी देशभर दौरा करावयाचा त्यांचा मानस होता; परंतु प्रकृतीने साथ दिली नाही. त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर ८ ऑक्टोबर १९७९ रोजी जयप्रकाशांनी जगाचा निरोप घेतला.

---