Saturday, January 18, 2020

उजवी आणि डावी विचारसरणी

परंपरावादी  आणि सुधारणावादी अशा विचारसरणीच्या लोकांसाठी ह्या संज्ञा प्रामुख्याने वापरल्या जातात.याची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. तेथील लोकसभेतील बैठक व्यवस्थेवरून हि नावे पडली. परंपरावादी नेते उजव्या बाजूला बसत असत. तर नव्या विचारांचे सुधारणावादी नेते डावीकडे बसत असत. यावरून हे नावे पडली.

प्रत्यक्षात खुप वैचारिक वैविध्य या दोन प्रणालीत आहेत. इतकेच नव्हे तर या दोन मुख्य विचारसरणीच्या अंतर्गतही अनेक वेगवेगळे विचारप्रवाह वाहतात. प्रामुख्याने जरी राजकारणात या संज्ञा वापरल्या जात असल्या तरी मुळातून या तत्त्वप्रणाली आहेत. 
यातील काही मुद्द्यांची सरमिसळही काही वेळेस झालेली दिसते. तर काही वेळेस काही मुद्दे वगळले वा नवीन समाविष्टही केलेले आढळतात. कोणत्या मुद्यांचा अधिकाधिक समावेश आहे यावर मग उजवी वा डावी विचारसरणी आहे हे ठरवले जाते.


उजवी विचारसरणी हि अधिकारशाही, वर्गीकरण, श्रेणिबद्धता, उतरंड , कर्तव्य, परंपरा,राष्ट्रवाद या विचारांना प्राधान्य देते. उजव्या विचारसरणीचे लोक हे; परंपरावादी, भांडवलशाहिला प्रोत्साहन देणारे, साम्राज्यवादी, एकाधिकारशाही , फॅसिस्ट ( सर्वंकष सत्तावादी ), प्रतिगामी विचारांचे, पुराणमतवादी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. अधिकारशाही : समाज / राज्याचे सगळे अधिकार एका व्यक्तीच्या हाती असतील.
२. वर्गीकरण : समाजातील सर्व लोकांचे वर्गानुरूप विभाजन केले असेल.
३. श्रेणीबद्धता : समाजातील हे वर्गीकरण पायऱ्यापायऱ्यांच्या स्वरुपात असेल.
४. उतरंड : या पायऱ्यांची एक न बदलणारी उतरंड  असेल
५. परंपरा : समाजातील वर्षानुवर्षे चालता आलेल्या परंपरांंना जपले जाईल.
६. राष्ट्रवाद : आपल्या देशाबद्दल आत्यंतिक प्रेम अणि आदर असेल.
७. भांडवलशाही : समाजातील उत्पादनाची साधने, त्यांची मालकी अणि सर्व अधिकार समाजातील काहीच व्यक्तींच्या होती असतील.
८. साम्राज्यवाद : आपल्या देशाच्या उन्नत्तीसाठी इतर देशांवर अधिकार गाजवून, त्यांचे स्वातंत्र्य झिडकारुन त्यांच्यावर राज्य करणे .
९. एकाधिकारशाही : देशाचे सर्व राजकीय अधिकार एका व्यक्तीच्या हाती असणे .
१०. सर्वंकष सत्तावादी : देशातील सर्वच्या सर्व अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असावी असे मानणारे.
११. प्रतिगामी विचार : जुन्या काळाप्रमाणेच विचार, काळाप्रमाणे न बदलणारे विचार.
१२. पुराणमतवादी : परंपरेने चालत आलेले/ लिहून ठेवलेलेच नियम पाळणारे.

डावी विचारसरणी हि स्वातंत्र्य, समानता, बंधुता,अधिकार, प्रगती, आणि आंतरराष्ट्रीयता (संस्कृतमध्ये म्हणतो तसे वसुधैैव कुटुुंबकम) मानणारी विचारसरणी होय. अणि डावे विचारवंत हे, अराजकतावादी, साम्यवादी, लोकशाही समाजवादी, प्रगतिशील, उदारमतवादी, पुरोगामी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. स्वातंत्र्य : व्यक्तीला काहीही करण्यासाठी मुभा असणे.  कोणाच्याही परवानगीची गरज नसणे
२. समानता : समाजातील सर्व व्यक्ती समान असणे.
३. बंधुता : समाजातील सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रेमाच्या भावनेने जोडलेल्या असतील.
४. अधिकार : प्रत्येक व्यक्तीला आपले आचार, विचार, कृती निवडण्याचे परवानगी असणे .
५. प्रगती : समाजात नवीन विचारांना परवानगी असेल आणि त्याआधारे नवीन आयाम शोधले जातील.
६. आंतरराष्ट्रीयता : एका विशिष्ट देशापुरतेच आपले कर्तव्य न ठेवता, संपूर्ण जगाच्या भल्याचा विचार करणे.
७. अराजकतावादी :  समाजावरती राजकीय सत्तेचा अंकुश अमान्य असणे. किंवा समाजाच्या जीवनपद्धतीत  राजकीय सत्तेचा कमीत कमी प्रभाव असेल.
८. साम्यवादी :  अशी राज्यव्यवस्था जिथे कामगारांचे राज्यसंस्थेवर नियंत्रण असेल.
९. लोकशाही समाजवाद : अशी राज्यव्यवस्था जिथे समाजाच्या उत्पादनांच्या साधनांवर लोकनियुक्त सरकारचे नियंत्रण असेल.
१०. उदारमतवादी : समाजामध्ये विविध विचार, आचार, कृतींना सामान पातळीवर मानले जाईल.
११. पुरोगामी : काळ आणि परिस्थितीनुरूप बदलांना मान्यता देणारे.






       

Thursday, January 16, 2020

काश्मिरचा इतिहास भाग 1,2,3

( डिसक्लेमर : इथे शक्य तितका निरपेक्ष इतिहास लिहिते आहे. फॅक्टस काय आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचावं हा उद्देश.सध्या अर्धवट माहिती आणि सरसकट विधानं अशी परिस्थिती आसपास आहे. म्हणूनच  इथे या लेखनात कोणतेही मूल्यमापन, चूकबरोबर असं पूर्णत: टाळले आहे. आशा आहे त्याच दृष्टिकोनातून वाचले जाईल. इथल्या अनेक जणी अभ्यासू आहेत. माझ्या लिखाणात काही सुधारणा असतील तर जरूर कळवा, शक्यतो संदर्भासकट. सो मला माझं लिखाण तपासून पहाता येईल. धन्यवाद!)

भाग १.

“Paradise is a promise no god bother to keep. There’s only now, and tomorrow nothing will be the same, whether we like it or not.

- Heidi Heilig


प्राचीन काळात काश्मीर हा प्रदेश नेहमीच स्वतंत्र, सार्वभौम होता. अनेक आक्रमक आले, गेले. अनेकदा हा प्रदेश आक्रमकांच्या नियंत्रणाखाली आला, कालांतराने पुन्हा स्वतंत्र झाला.

काश्मीरचा पहिली ओळख सापडते तो कश्यप ऋषींच्या संदर्भात. कश्यप ऋषींनी त्यांच्या बरोबरच्या लोकांच्या साठी काश्मीर मधील तळे कोरडे केले आणि वसती साठी जागा तयार केली. यावरून कश्याप + मीर = काश्मीर असे नाव पडले असे मानले जाते.

आणखीन एक कथा आहे ती राजा जंबू याची. हा राजा शिकारी साठी तावी नदी किनारी फिरत फिरत आला. आणि या प्रदेशाच्या तो प्रेमात पडला. त्याने इथे आपले गाव वसवले. त्याच्या नावावरून जम्मू हे नाव पडले असे मानले जाते.

पहिले मोठे झाले आक्रमण झाले ते इ. स पू. ३२६च्या दरम्यान, अलेक्झांडर द ग्रेट याचे. काश्मीर मधले एक गाव अजूनही त्याची आठवण ठेऊन आहे. अलेक्झंडरच्या घोड्याच्या नावावरून बुफिया हे गाव ओळखले जाते. तिथे त्याची समाधी आहे.

काश्मीर मध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना, धर्मांना सामावून घेतेले गेले. अगदी सुरूवातीला हिंदू धर्मातील शैव पंथाचा इथे प्रसार झाला. अमरनाथ हे त्यांचे प्रसिद्ध दैवत! पुढे इ. स.२५० आसपास बौद्ध धर्माचाही इथे प्रसार झाला. खैबर खिंडीतून आलेल्या मुस्लिम आक्रमकांबरोबर मुस्लिम धर्माचाही इथे प्रसार झाला. पुढे नंद ऋषींनी इथे सूफी संप्रदाय वाढवला. हे सर्व धर्मीय एकोप्याने काश्मीर मध्ये रहात होते. त्यांची म्हणून एक वेगळी जीवनसरणी हळूहळू तयार होत गेली. जेवणाची विशिष्ट पद्धत – वाजवान. वेशभूषा. राहणीमान. कला.

जम्मूतील हिंदू संस्कृती, तिबेट मधली बौद्ध संस्कृती आणि मध्य आशियातील मुस्लिम संस्कृती यांचा मिलाफ बनून सर्वच बाबतीत एक वेगळी, स्वतंत्र संस्कृती काश्मीरमध्ये तयार होत गेली.

चवदाव्या शतकात , सुलतानी राजवटीमध्ये मुस्लिम जनतेमध्ये वाढ होत गेली. परंतु अल्पसंख्यांक हिंदूंनी राजदरबारातील प्रशाकीय जागा मिळवल्या. जोडीने व्यापार, शिक्षण यातही हिंदूंनी आपला जम बसवला. समाजातील सधन समाजात त्यांचा समावेश होता. मात्र मुस्लिम जनता प्रामुख्याने शेती आणि कलाकारी मध्ये काम करत राहिली.

सोळाव्या शतकात सुलतानशाही संपवून मुघल सत्ता उत्तर हिंदुस्थानात आली, काश्मिर मध्येही. परंतु  इ. स. १७७५ मध्ये अफगाणी टोळ्यांनी काश्मीर जिंकून घेतला. इ. स. १८१९ पर्यन्त अतिशय जुलमी अशी ही राजवट काश्मीरवर आपली सत्ता टिकवून होती.

इ. स. १८०० पासून शिखांनी आपला प्रभाव वाढवला. काश्मीर पर्यन्त त्यांनी आपले राज्य वाढवले. राजा रणजीत सिंग या अतिशय बलाढ्य राजाच्या नेतृत्वाखाली सर्वच उत्तर हिंदुस्थानात शिखांनी आपले बस्तान बसवले. रणजीत सिंग यांनी गुलाबा सिंग या डोगरा जमाती मधल्या नेत्याला काश्मीर मध्ये पाठवले. जोरावर सिंग या सेनानीच्या मदतीले गुलाब सिंग यांनी काश्मीर वरती आपले राजी प्रस्थापित केले काश्मीर व्हॅली, जम्मू आणि लडाख हे सर्व प्रांत गुलाबासिंग ने आपल्या अधिपत्याखाली आणले. एका अर्थाने आज जो काश्मीर आपण पहातो, तो गुलाबसिग यांनी प्रथम निर्माण केला. (इ. स. १८३४) इतकेच नव्हे तर लडाख, गिलगीट, बल्टिस्थान, गारटोक ( मान सरोवरा पर्यंत ) असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि तिबेट पर्यंत ताणल्या.


आज आपण जो काश्मीर ओळखतो तो काश्मीर गुलाब सिंग यांनी निर्माण केला. यात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन महत्वाच्या राजकीय मुत्सद्देगिरी गुलाब सिंगाने केल्या.

उत्तरेकडे आधी बघितल्याप्रमाणे लडाख, गिलगिट,बाल्टीस्थान, गारटोक  असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा वाढवल्या. शिवाय त्यांना मान्यताही मिळवली.

१८४१ मध्ये गुलाब सिंगाचा सेनापती जोरावर सिंग  आपल्या सैन्यासह तिबेटमध्ये धार्मिक पर्यटनासाठीगेला होता. तेव्हा टोयो या ठिकाणी चीन आणि तिबेट या दोघांनीं मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. जोरावर सिंग आणि त्याचे सैनिक अतिशय  शौर्याने लढले. परंतु  चीन आणि तिबेट यांच्या एकत्रित आणि अचानक झालेल्या आक्रमणात ते टिकू शकले नाहीत.  या युद्धात जोरावर सिंह आणि त्याचे ४००० सैनिक यात मारले गेले. त्यांचे शौर्य इतके वाखाणण्याजोगे होते कि शत्रूने जोरावर सिंग याची समाधी टोयो येथे बांधली. आजही अनेक पर्यटक त्याला भेट देतात.

या पराभवांनंतर चीन, तिबेट आणि काश्मीरचा राजा गुलाबसिंग यांच्यात चुशुल चा करार केला गेला (१८४२) हा तह अतिशय महत्वाचा ठरला. आणि अनेक वर्ष हा पाळला गेला. या तहानुसार प्राचीन काळापासून चालत आलेल्या सीमा तिघांनींहि मान्य केल्या. याशिवाय पूर्वापार चालत असलेला तीनही प्रदेशातील व्यापार तसाच चालू ठेऊ असेही ठरले. याशिवाय युद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी,  गुलाबसिंग यांना मान सरोवरा जवळील तीन गावानं जहागीर म्हणूनही देण्यात आली . एका अर्थाने गुलाब सिंगाचे काश्मीर मधले ( प्रामुख्याने लडाख मधले ) प्राबल्य चीन, तिबेट दोघांनीं मान्य केले.
आधी म्हटल्याप्रमाणे हा करार अतिशय सामंजस्याने  तिघांनीं स्वीकारला आणि मोठ्या काळासाठी अवलंबलाही ! अशा रीतीने गुलाब सिंगांनी उत्तरेकडच्या काश्मीरच्या सीमा निश्चित केल्या.

पुढे राजा रणजित सिंहाच्या मृत्यू नंतर अनेक शीख राज्ये कमकुवत होऊ लागली. काळाची पावले ओळखून गुलाब सिंगाने नव्याने प्रस्थापित होत असलेली सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीशी संपर्क वाढवला. कंपनीच्या कर्नल हेनरी लॉरेन्स यांच्याशी दोस्ती केली.

पहिल्या शीख ब्रिटिश युद्धापासून  गुलाब सिंग लांब राहिला (१८४५-४६). ब्रिटिशांनी पंजाब प्रांत जिंकून घेतला. रणजित सिंगांच्या वंशज दुलीप सिंग याचा पराभव झाला. त्याच्याशी ब्रिटिशांनी लाहोर करार केला आणि त्याची सत्ता संपुष्टात आली.  इतकेच नव्हे तर, त्याचा आता काश्मीरवरचा तथाकथित अधिकारही संपला. आणि गुलाब सिंग आता  स्वतंत्र राजा बनला. यावर शिक्कामोर्तब झाले ते अमृतसरच्या कराराने. ब्रिटिशांनी या करारान्वये गुलाब सिंग हा काश्मीरचा सार्वभौम राजा आहे हे मान्य केले. आणि वेळप्रसंगी गुलाब सिंग ब्रिटिशांकडून जमीन विकत घेऊ शकेल हेही मान्य केले. ( भावी काळात हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरला.) हे घडून आले याचे कारण होते ते म्हणजे  गुलाब सिंग आणि हेनरी लॉरेन्स यांची मैत्री.
यान्वये १८४६ मध्ये गुलाब सिंग यांनी शीख साम्राज्याचा भाग ब्रिटिशांकडून तेव्हाच्या ७५ लाख नाणकशाही रुपये देऊन विकत घेतला. शीख ब्रिटिश युद्धांचा झालेला खर्च ब्रिटिशांनी वसून केला.

अशा रीतीने दक्षिणेकडील काश्मीरच्या सीमाही गुलाब सिंगांनी निश्चित केल्या. एका अर्थाने जुलै २०१९ पर्यंत जों  काश्मीर आपण ओळखत होतो, त्याची पूर्ण निर्मिती गुलाब सिंग यांच्या मुत्सद्देगिरीचे फळ होते.

१८४६ ते १९४७ या काळात डोगरा घराण्याकडे काश्मीरची सत्ता होती. संरक्षण व्यवस्था, परराष्ट्र खाते, आणि दळणवळण हे मात्र ब्रिटिशांनी आपल्याकडेच ठेवले.

भाग २.

आता पर्यंत  पण काश्मीरमधली परिस्थिती काय होती ते पाहिले. काश्मीरमध्ये गुलाब सिंगांचे राज्य तयार करण्यासाठी ब्रिटिशांनीही मदत केली. एक मोठा भूभाग ब्रिटिशांनी गुलाब सिंग यांना विकला. यामागे ब्रिटिशांची कुटनिती होती. ती समजण्यासाठी आता आपल्याला थोडी आंतरराष्ट्रीय राजकारणाची, त्यातही युरोपची  माहिती घ्यावी लागेल.

प्राचीन काळापासून युरोप मध्ये काही साम्राज्ये फार महत्वाची होतो. काही देशांतील राज्यांनी आपला प्रभाव युरोपवर पाडला होता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि रशिया हे ते देश. रशिया हा देश  युरोप, आशिया दोन्ही खंडात पसरलेला, भला मोठा देश. उत्तरेकडे प्रचंड मोठी सागरी किनारपट्टी असलेला देश. परंतु तिचा काहीही फायदा नव्हता. कारण वर्षातले आठ महिने तिथे बर्फ असे. स्वाभाविकच   दुसरीकडची सागरीकिनार पट्टी रशियाला हवी होती. त्याचे कारण अर्थातच व्यापार हे होते. आणि हि किनारपट्टी रशियाला  भूमध्य समुद्रामध्ये ( मेडिटरेनियन समुद्र) हवी होती. त्यामुळे युरोप, आफ्रिका दोन्ही कडे व्यापार करणे सोपे जाणार होते. तर भारतातून दक्षिणेला इतर आशियातील देशांशी व्यापार करणे रशियाला सोपे जाणार होते.

आता थोडा नकाशाही पाहावा लागेल.

निळी रेषा बर्फ़ाळ किनारा दाखवतेय. तर हिरवी रेषा व्यापारासाठी रशियाला हवा असलेला मार्ग दाखवतेय.

इंग्लंडच्या दृष्टीने भारतातले त्यांचे साम्राज्य अतिशय महत्वाचे होते. आणि इंग्लंड- भारत  व्यापार प्रामुख्याने भूमध्य समुद्र (मेडिटरेनियन सी ) मधूनच असे. याच मार्गावर रशिया येऊ पाहात होता. त्यामुळे इंग्लंड आणि रशिया यांच्यात तणाव होता. काश्मीर प्रश्नामध्येही हेच घडले.  शिवाय इंग्लंड हा भांडवलशाही देश तर त्या विरुद्ध रशिया हा साम्यवादी देश होता. (साम्यवाद हे तत्वज्ञान भांडवलशाही तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. ) रशिया आणि  तत्कालीन हिंदुस्तान यांची उत्तरेला सीमा समान होती.





इ.स. १९३० मध्ये चीनने सिकयांग प्रांत अफगाणिस्तान कडून जिंकून घेतला. आणि चीनही तत्कालीन हिंदुस्तानच्या सीमेवर येऊन ठेपला.

रशिया आणि चीन या दोन्ही सत्तांपासून हिंदुस्तानातील सत्ता सुऱक्षित ठेवायची तर काश्मीर हे राज्य स्वतंत्र राहिलं तर उपयोगी पडेल असं ब्रिटिशांना वाटत होतं. (इंग्रजी मध्ये याला बफर स्टेट म्हणतात तर मराठीत उंट राज्य)
यासर्व दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी  गुलाब सिंगांच्या काश्मीर उभारणीला हातभारच लावला.

तर १९४७ मध्ये काश्मीरमध्ये हि परिस्थिती होती. माउंटबॅटन योजनेनुसार हिंदुस्तानची फाळणी होणार हे तत्कालीन सर्व पक्षांनी मान्य केले. या योजनेनुसार मुस्लिम बहुसंख्य असलेले दोन प्रदेश, म्हणजे काश्मीरच्या पश्चिमेकडचा प्रदेश आणि पूर्व बंगाल हे मिळून पाकिस्तान हा देश आणि बाकीचा भारत  असे दोन स्वतंत्र देश निर्माण होणार होते. बाकी रियासतींना (प्रिंसली स्टेट्स ) तीन पर्याय होते. एक तर भारतात सामील व्हायचे , पाकिस्तानात सामील व्हायचे अथवा स्वतंत्र राहायचे. अनेक रियासतींनी भारत वा पाकिस्तान मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु काहींनी स्वतंत्र राहणे स्वीकारले.

काश्मीरमध्ये राजा हरी सिंग हा डोगरा राजा  त्यावेळेस सत्तेवर होता. त्याला असे वाटत होते कि काश्मीर एक स्वतंत्र देश म्हणून राहावा. (कारण अनेक वर्ष -शंभर वर्षे, स्वतंत्रच असण्याची सवय काश्मीरला होती . ) किमान विचार करायला काही वेळ घेऊन मगच भारत वा पाकिस्तान मध्ये सामील व्हायचे हे काश्मीर ठरवेल; तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी काश्मीर बाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी असे राजा हरी सिंग यांचे मत होते.

पाकिस्तानाला काश्मीर प्रामुख्याने दोन कारणांसाठी हवा होता. १. काश्मीर हा बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रदेश होता. आणि त्याहूनही महत्वाचे; २. पाकिस्तानात येणाऱ्या सहाही  नद्यांचे स्रोत काश्मीर मध्ये होते. एका अर्थाने पूर्ण पाकिस्तानच्या पाण्याच्या सगळ्या नाड्या काश्मीरकडे होत्या. सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, रावी आणि  सहा नद्या म्हणजे पाकिस्तानचा जीवनस्रोत होत्या. तो स्रोत परकीय देशाकडे न राहाता आपल्याच देशात यावा असा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

दरम्यान काश्मीरमध्येही स्वातंत्र चळवळ सुरु झालेली होती. तेथील राजेशाही संपून लोकांचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी १९३२ पासून प्रयत्न सुरु झाले होते. सुरुवातीला मुस्लिम कॉन्फरन्स स्थापन झाली. पुढे हिचे नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स असे या पक्षाचे नाव ठेवले गेले. १९४७ पर्यंत काश्मीरमधली लोकशाही चळवळही जोर धरू लागली होती.

तर काश्मीर मध्ये हि अशी  परिस्थिती १९४७ च्या सुमारास होती. शंभर वर्ष स्वतंत्र असणारा काश्मीर आता एका मोठ्या स्थलांतराकडे वाटचाल करत होता.

( लिहिण्याच्या ओघात कधी ब्रिटन / इंग्लंड, ब्रिटिश / इंग्रज असे लिहिले गेले आहे. दोन्हीचा अर्थ एकाच अपेक्षित आहे याची कृपया नोंद घ्यावी )

भाग ३.

आधी बघितल्याप्रमाणे १९३२ मध्ये काश्मीरमध्ये राजेशाही विरुद्ध जनतेची चळवळ उभी राहू लागली. मुस्लिम कॉन्फरन्स आणि पुढे नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष जोर धरू लागले. शेख महंमद अब्दुल्ला हे या चळवळीचे प्रमुख नेते होते. चळवळीचा वाढता जोर पहाता ती दडपण्यासाठी राजा हरी सिंग यांनी १९४६ मध्ये शेख अब्दुल्लाआणि अनेक नेत्यांना अटकेत टाकले.

काश्मीरमधली हि लोकशाही चळवळ तत्कालीन काँग्रेसला योग्य वाटत होती. शिवाय पंडित नेहरू हे स्व:ता काश्मिरी असल्याने त्यांनी या चळवळीला पाठींबा दिला. शेख अब्दुल्ला आणि त्यांची खास मैत्री होती. अब्दुल्लाच्या सुटकेची मागणी करण्यासाठी नेहरू मे १९४६ मध्ये काश्मीर मध्ये गेले. परंतु राजा हरी सिंगांनी नेहरूंना अटक करून त्यांची रवानगी काश्मीर बाहेर केली.
जुलै १९४७ मध्ये म . गांधी काश्मीरमध्ये आले. म. गांधींच्या या सभेत काश्मीरमधील जनतेने दिलेल्या घोषणा फार महत्वाच्या होत्या. भारत/ पाकिस्तान किंवा म . गांधी / ब . जिना यांच्या बद्दल त्या नव्हत्या, तर " बागी अब्दुला कि जय !" अशा होत्या. या सभेत म . गांधींनीहि फार आग्रह धरला नाही. " राजाने न घाबरता आपल्याला हवा तो निर्णय घ्यावा परंतु शेख अब्दुल्लाना मोकळं करावं" असं  म. गांधींनी सांगितले.

ऑगस्ट १९४७ मध्ये  भारत, पाकिस्तान स्वतंत्र झाले. काश्मीर बाबत राजा हरी सिंगाच मत होतं कि "जैसे थे परिस्थितीच राहावी, म्हणजेच काश्मीर हा स्वतंत्र राहील" असे मत त्यांनी मांडले. अधिक विचार करण्यासाठी त्यांना वेळही हवा होता. पाकिस्तान काश्मीरला सामील करून घेण्यास उत्सुक होता.( याची दोन कारणे आपण आधी बघितली आहेतच, -बहुसंख्य  मुस्लिम जनता आणि नद्यांचे स्रोत)

राजा हरी सिंगाकडून कोणतेच उत्तर येत नाही बघून पाकिस्तानने  ऑपरेशन गुलमर्ग सुरु केले. या ऑपरेशन मार्फत पख्तुनी पठाणी टोळ्या काश्मीरमधे पाठवल्या गेल्या. (या टोळ्या म्हणजे पाकिस्तानी सैन्य नव्हते.) या पख्तुनी पठाणी टोळ्यांनी  काश्मीरच्या उत्तर सीमेवरून घुसून अल्पसंख्य हिंदूंची कत्तल सुरु केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून जम्मूमध्ये हिंदूंनी मुस्लिमांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि पूर्ण काश्मीरमध्ये जातीय दंगली उसळल्या.

भारत सरकारने राजा हरी सिंग यांना विनंती केली कि हा क्षोभ कमी करायचा तर शेख अब्दुल्ला यांची सुटका करा. राजा हरी सिंग यांनाही लक्षात आले कि चिघळणारी परिस्थिती काबूत आणायची तर आता शेख अब्दुल्लाना सोडणे आवश्यक आहे. परंतु यामुळे पाकिस्तानचा असा समाज झाला कि आता काश्मीरवरती भारताचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानने शेख अब्दुल्ला आणि इतर काश्मिरी नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अब्दुल्ला यांचे मत अजून नक्की ठरत नव्हते. त्यांचे मत - "आधी राजेशाही बरखास्त करू. लोकांचे स्वातंत्र्य मिळवू  आणि नंतर इतर विचार करु. आणि भारत/ पाकिस्तान जे आपल्या अटी मान्य करतील तिथे सामील  होऊ. " असे होते.

दरम्यान ऑक्टॉबर १९४७ मध्ये पख्तुनी पठाणी टोळ्यांनी अचानक मोठे आक्रमण केले. आता त्यांचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडियर अकबर खान आणि स्थानिक पंजाबी नेता सरदार शौकत हयात यांच्याकडे होते.  उरी, बारामुल्ला, इथे प्रचंड लुटालूट झाली.

याच सुमारास सरदार इब्राहिम या पेशाने वकील असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुझफराबाद, पूंच , मीरपूर या उत्तर सीमेवरच्या  प्रांतांनी स्वतः: ला स्वतंत्र घोषित केले. ( जो आज पाक व्याप्त काश्मीरचा भाग आहे. )

सगळीकडून हल्ले होऊ लागले तसे राजा हरी सिंगाने भारताकडे मदत मागितली.

१९४७ च्या सुरुवातीसच. भारत आणि पाकिस्तान फाळणी होणार हे निश्चित झाले होते. काश्मीरमधील उत्तरेचा गिलगिट हा प्रदेश जो १९३५ मध्येच राजा हरीसिंगांकडून ब्रिटिश सरकारने ६० वर्षांसाठी  भाड्याने घेतला होता, आणि जिथे कॅप्टन विल्यम ब्राऊन याची पोलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली होती. फाळणीनंतर हा प्रांत पाकिस्तानात जावा अशी ब्रिटिशांची इच्छा होती. याचे कारण म्हणजे भावी भारत हा समाजवादी विचारांचा असण्याची शक्यता जास्ती होती. आणि अशा परिस्थितीत स्वतंत्र भारत हा रशियाचा मित्र म्हणून उभा राहण्याची शक्यता होती. तर पाकिस्तान मात्र रशियाशी मैत्री करण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे जा गिलगिट प्रांत पाकिस्तानकडे राहाता तर रशियाला भूमध्य समुद्रात येण्यासाठी आडकाठी करता आली असती.

राजा हरीसिंगांचे पंतप्रधान रामचंद्र काक हे होते. त्यांना  काँग्रेसचे अजिबात प्रेम नव्हते, उलट जीनांशी मात्र त्यांची दोस्ती होती. स्वाभाविकच पंतप्रधान काक यांचा सल्ला मानून काश्मीर पाकिस्तानात सामील होईल अशी शक्यता जास्त होती.  हे ओळखून सत्तांतराच्या केवळ १५ दिवस आधी ब्रिटिशांनी गिलगिट प्रांत राजा हरीसिंगांना परत केला. तसेच कॅप्टन  ब्राऊन यांना जम्मू काश्मीरच्या सैन्याचे सर्व अधिकार दिले.

दरम्यान म. गांधींच्या प्रभावातून राजा हरिसिंग यांनी स्वातंत्र्याच्या केवळ ४ दिवस आधी रामचंद्र काक यांना पदच्युत केले. आणि काश्मीर भारताबरोबर जाईल अशी परिस्थिती दिसू लागली. भावी काळात गिलगिट प्रांत भारतात राहणे ब्रिटिशांना नको होते. आणि म्हणून कॅप्टन ब्राऊन यांनी मुस्लिम सैन्याला पाठबळ देत जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरलाच पदच्युत केले. आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाल्याचे जाहीर केले. कॅप्टन ब्राऊन यांच्या या कृतीला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता हे पुढे निश्चित झाले. १९४८ मध्ये कॅप्टन ब्राऊन यांचा ब्रिटिश सरकारने  MBE (Most Excellent Order Of The British Empire) हा पुरस्कार देऊन गौरव केला, यावरूनच हे स्पष्ट व्हावे. इतकेच नव्हे तर पुढे पाकिस्ताननेही कॅप्टन ब्राऊन यांना सितारा ए पाकिस्तान हा सर्वोच पुरस्कारही दिला.

अशा रीतीने पूँछ प्रांत, आझाद काश्मीर आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाले. काश्मीरचे तुकडे पडू लागले. सीमेवरील सततच्या आक्रमणांनी हि परिस्थिती अजूनच चिघळू लागली.  आक्रमक टोळ्यांना अटकाव करणे गरजेचे होते.

परंतु १९४७-४८ मध्ये कारगिलच्या पुढे लष्करी हालचाली करण्यायोग्य असे रस्ते नव्हते. त्यामुळे होणाऱ्या टोळ्यांच्या आक्रमणांना मागे ढकलणे हे आव्हानात्मक होते. त्याऐवजी या टोळ्यांची जे मूळ स्रोत होते त्यावर हल्ला करणे लष्कराला जास्त योग्य वाटत होते. परंतु यात दोन मुद्दे होते. एक तर त्यासाठी मूळ पाकिस्तानी भूमीवर हल्ले चढवावे लागले असते आणि हे सरळ सरळ भारताने पाकिस्तानवर केलेले  युद्ध मानले गेले असते.
आणि दुसरे हि सर्व कार्यवाही पंजाबमधून करावी लागली असती. जो पंजाब अजूनही फाळणीच्या जखामांमधून पुरता सावरला नव्हता.

या सगळ्या धामधूम मध्ये शेवटी प्रत्यक्ष युद्ध नको म्हणून शेवटी भारताने संयुक्त राष्ट्रसंघटनेकडे (युनो) धाव घेतली. व्ही. के. मेनन यांनी भारताची बाजू युनोमध्ये अतिशय सविस्तर मांडली. एप्रिल १९४७ मध्ये युनोने पाकिस्तानला सर्व प्रकारचे सैन्य काश्मीरमधून बाहेर काढण्यास सांगितले. भारतानेही सुरक्षीतता  आणि शांतता यासाठी लागेल तेव्हढेच सैन्य काशीरमध्ये ठेवावे असेही सांगितले. त्यांनतर युनोचे शिष्टमंडळ काश्मीर मध्ये जाऊन सार्वमत घेईल असे सांगितले.  परंतु हे दोन्ही देशांना मान्य झाले नाही.

दरम्यान शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले. राजा हरिसिंग हे राज्याचे प्रमुख ( हेड ऑफ द स्टेट) झाले. आणि एका अर्थाने काश्मीर भारताचा भाग बनले. परंतु तरीही काश्मीरमधली परिस्थिती अतिशय प्रक्षोभकच होती. युनोने सांगूनही काश्मीरमध्ये युद्ध चालूच होते. सप्टेंबर १९४८ मध्ये पाकिस्तानी सैन्य पुढे पुढेच येत होते. त्यांना भारतीय सैन्याने द्रास, कारगिल येथ पर्यंत अडवले. मुख्यत: श्रीनगर ते लडाख हा महामार्ग भारतीय सैन्याने सुरक्षित केला. परंतु सैन्याला आगेकूच करण्याची परवानगी पं.  नेहरूंनी दिली नाही. याबाबात आजही खूप उहापोह केला जातो. त्या वेळी जर भारतीय सैन्याला पुढे जाण्याची परवानगी मिळाली असती तर आज काश्मीर प्रश्न शिल्लकच राहिला नसता, असेही मांडले जाते.

पं. नेहरूंनी हा असा निर्णय का घेतला असावा हे त्या काळातील काही राजकीय घडामोडींची  माहिती करून घेतल्या तर समजू शकते.

शेख अब्दुल्ला, ज्याच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये सरकार स्थापन झाले होते. त्यांचा या बाबतचा दृष्टिकोन या सर्व निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारा होता.  काश्मीर हे  आपल्याला जरी एकसंध राज्य वाटत असले तरी तशी परिस्थिती नाही. काश्मीर मध्ये जम्मू, काश्मीर खोरे ( श्रीनगर आणि आसपासचा भाग ), लडाख हे जसे तीन मुख्य भूप्रदेश आहेत, तसेच काश्मिरी जनतेमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या भाषानुरूप  त्यांचे नेतेही वेगवेगळे होते. प्रामुख्याने जे लोक काश्मिरी भाषिक होते, त्या लोकांवर शेख अब्दुल्लाचा प्रभाव होता. परंतु जे पंजाबी भाषा बोलणारे होते ते काश्मिरी मात्र अब्दुल्लाचे कितपत ऐकतील याची खुद्द अब्दुल्ला यांनाही खात्री नव्हती. द्रास, कारगिल याप्रांतांच्या पश्चिम-उत्तरेकडील प्रांत हे पंजाबी भाषा बोलणारे होते. स्वाभाविकच त्यांच्यावर शेख अब्दुल्ला यांचा प्रभाव फार नव्हता. अशा परिस्थितीत  अतिशय कष्टपूर्वक, सैन्याने बाजी लावून समजा उत्तरेकडचे प्रांत जिंकले असते तरी ते टिकवणे खूप अवघड होते. सैन्याने हे प्रांत जिंकूनही तेथे शांतता राखणे, तेथील नागरिकांना भारताचा भाग बनवणे कितपत जमेल याची ना अब्दुल्लाना खात्री होती, ना पं. नेहरूंना. तशात आजाद काश्मिर आणि गिलगिट या प्रांतांनी आधीच आपले स्वातंत्र्य घोषित केले होतेच. त्यांना पुन्हा भारतात सामील होण्याबद्दल वळवणे हेही अवघडच जाणार होते.

हे सगळे चालू असताना नवस्वतंत्र भारताची सर्व व्यवस्था लावण्याचे एक मोठे काम चालू होते हेही विसरता कामा नये. नुकते मिळाले स्वातंत्र्य टिकवायचे , त्यासाठी आवश्यक अशी अनेक अतिशय महत्वपूर्ण कामे चालू होते. स्वतंत्र  सार्वभौम भारताची राज्यघटनेने तयार  करणे , संसदीय संरचना निर्माण करणे, सार्वत्रिक निवडणुकांची तयारी, भारतातील प्रशाकीय संरचना  उभी करणे, न्यायव्यवस्थेची संरचना भारतीय करणे, एकूणच संपूर्ण भारताची रचनांना करण्याचे अतिशय जिकिरीचे, आव्हानपूर्ण काम  करावयाचे होते. अशा परिस्थितीत केवळ काश्मीर प्रश्न धसास न लावता; तो शक्य तितका सोडवणे आणि युद्ध थांबवून एक किमान शांतता प्रस्थापित करणे हे तत्कालीन सर्वच नेत्यांना योग्य वाटले. भावी बलाढ्य देश निर्मिती साठी अखेर ३१ डिसेंबर १९४८ ला युद्ध समाप्तीची घोषणा केली गेली.

एकुणातच भारताचा राज्यकारभार सुरळीत चालू व्हावा यासाठी संपूर्ण भारतभर शांतता असणे निकडीचे होते. काश्मीरमध्येही शांतता राहायची तर तेथील जनतेला लोकशाहीतील सर्व अधिकार देणे आवश्यक होते. यात मोठा अडथळा होता तो काश्मिरी राजवटीचा, राजपदाचा! जोवर तेथे राजवट अस्तित्वात राहील तोवर तिथे लोकशाही प्रस्थापित  झाली नसती. त्यामुळे भारत सरकारकडून राजा हरिसिंग यांना पद सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले. राजा हरिसिंग यांना हा प्रचंड मोठा धक्का होता. इतकेच नव्हे तर राज्य, देशाच्या भल्यासाठी त्यांनी काश्मीरही  सोडावा असेही सुचवले गेले. अखेर देश आणि  जनतेच्या भल्यासाठी राजा हरिसिंग यांनी राजपदाचा त्याग केला. राजपुत्र करणसिंग यांना प्रतिनिधी म्हणून नेमूनत्यांना  शेख अब्दुल्ला यांच्याकडे पाठवण्यात आले. तिथे करणसिंग केबिनेटलाही भेटले.

दरम्यान युनो मार्फत नवीन प्लान मांडला गेला. डिकन्स यांनी हा प्लान मांडला. त्यांनी सुचवले कि जम्मू, लडाख येथे हिंदू लोकसंख्या जास्ती असल्याने ते प्रांत भारतात सामील केले जावेत आणि गिलगिट, पूंछ येथे मुस्लिम लोकसंख्या अधिक म्हणून ते प्रांत पाकिस्तानात सामील केले जावेत. काश्मीर व्हॅली मध्ये सार्वमत घेऊन त्याचा निर्णय घेतला जावा. परंतु पाकिस्तानला हे अमान्य होते. लडाख, जेथून सर्व प्रमुख पाकिस्तानी नद्या उगम पावत होत्या त्या प्रांतांवरचा हे हक्क गमावणं पाकिस्तानला मान्य नव्हतं. अनेक चर्चा होऊन अखेर हाही प्लान नाकारला गेला.

दरम्यान ऑकटोबर १९५० मध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांनी एक मोठा कायदा आणला. जमीनदारी नष्ट करणारा कायदा. खरे पहाता हा अतिशय प्रगतिशील विचार होता. भारतातही अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचा कायदा १९४९ ते ५१ दरम्यान सर्व राज्यांमध्ये आणला गेला होता. काश्मीर मध्ये प्रामुख्याने जम्मूतील हिंदू, आणि काश्मीर व्हॅलीतील पंडित जमीनदार होते. या कायद्याने कसेल त्याची जमीन हे मान्य केले त्यामुळे स्वाभाविकच अनेक हिंदू आणि पंडित यांचे मोठे नुकसान झाले.

युनोमधून काही घडत नसल्याने सार्वमताऐवजी निवडणुकांचा मार्ग शेख अब्दुल्ला यांनी अवलंबायचा ठरवला आणि निवडणुका जाहीर केल्या. अल्पसंख्य हिंदूंच्या पक्षाने; प्रजा परिषदेने या निवडणुकांवर बहिष्कार घातला. नोव्हेंबर १९५१ मध्ये  नेशनल कॉन्फरन्स ने सत्ता स्थापन केली. नवीन स्थापन झालेल्या असेंब्लीनें राजपद नष्ट करून, सदर ए रियासत हे काश्मीर मधील घटनात्मक प्रमुख पद निर्माण केले. काश्मीरमधली राजेशाही कायद्याने संपुष्टात आली . करणसिंग  हे पहिले सदर ए रियासत म्हणून काश्मीरचे प्रमुख बनले. हे पद राज्यपालांच्या पदासारखे होते.
यानंतरची मोठी घोषणा होती ती म्हणजे ज्यांच्या जमिनी जमीनदारी नष्ट करण्याच्या कायद्यान्वये गेल्या होत्या त्यांना कसलीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही याची. याला प्रजा परिषदे हिंसक विरोध करायला सुरुवात केली. एकीकडे राज्यांतर्गत हिंसाचार बळावलेला अन दुसरीकडे राज्याची घडीही बसवायची या कात्रीमध्ये काश्मिरी सरकार सापडले. पुन्हा एकदा भारतासरकाराकडे मदत मागितली गेली. त्यान्वये काश्मीर आणि भारत सरकार यांच्यात दुसरा करार केला गेला - दिल्ली करार १९५२. काश्मीर सरकार आणि भारत सरकार यांच्यातील घटनात्मक आणि संस्थात्मक संरचना या करारान्वये ठरवली गेली.
एका अर्थाने काश्मीरला भारताचा भाग म्हणून मान्य करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरतो. या करारामध्ये काही अतिशय महत्वपूर्ण गोष्टी होत्या.
१. काश्मीर भारताचा भाग असेल. 
२. संस्थानांच्या विलीनीकरणाचा जो मूळ कायदा होता त्यातील कलमे काश्मीरला लागू असतील, त्याशिवाय राज्यघटनेतील नियम, कायदे यांना काश्मीर बांधील नसतील . 
३. काश्मीरच्या  असेंब्लीनें हे मान्य केलेलं असेल .  

या शिवाय काही विशेष सवलतीं काश्मीरला दिल्या गेल्या. जसे की काश्मीरचा  स्वतंत्र झेंडा असेल. काश्मीरचे मुखपद काश्मीरचे पंतप्रधान म्हणून ओळखले जाईल. हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये ३७० ए  हे नवीन कलम समाविष्ट केले गेले.
या करारामुळे काश्मीर राज्याला अपेक्षित स्वायत्तता मिळाली आणि काश्मीर भारतात सामीलही झाले.
(क्रमश: पुढील भाग जरा सावकाशीने लिहेन)


Sunday, September 29, 2019

16. कोरलंय काय या डोक्यावरती?

( लेखातील छायाचित्र By Saqib Qayyum - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=31036234 आणि नेटवरून साभार


परवा आपण  पृथ्वीच्या पाठीवर ठेवलेल्या टोपीखालची गंमत बघितली. आज आपण एका उंच डोंगराच्या डोक्यावर काय कोरलं बघुयात. याठिकाणाच नाव आहे सिगरिया ! आता तुम्हालाओसायरिस आणि सिगरिया यात काही साम्य हि दिसेल. अगदी नावापासून, हो ना?  OSIRIS and SIGARIYA पण या दोन जागा एकमेकींपासून खूप लांब आहेत/ ओसायरिस आहे इअफ्रिकेत उत्तरेला तर सिगरिया आहे आशिया मध्ये दक्षिणेला . श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. तशी हि जागा  आता बहुतेकांना माहिती असते. जागतिक वारसा म्हणून घोषित आणि संरक्षित आहे. बहुतांश श्रीलंका पर्यटना मध्येही याचा समावेश असतो.

श्रीलंकेच्या मध्यात असलेल्या डांबूला या गावाजवळ एक प्रचंड मोठी शिळा आहे. तिचेच नाव सिगारिया (म्हणजे  सिंहगिरी )


असं म्हट्लन जातं कि कश्याप राजाने (इ.स. ४७७ -४९५) या सिंहगिरीवरती आपली राजधानी वसवली. परंतु त्याच्या मृत्यूनेणार हि वसाहत ओस पडली.
काहीं पुरावे असे सांगतात कि तिसऱ्या शतकापासून चवदाव्या शतका पर्यंत इथे बुद्ध विहार होते. बॊध्द साधकांनी अनेक गुहा कोरून तिथे आपली साधना केली.

त्यांनतर सिगारियाचा जगाला विसर पडला. पुढे १८३१ मेजर जोनाथन फोर्ब्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली. अन तेव्हापासून आधुनिक जगाला या ठिकाणाची माहिती  मिळाली. पुढे १८९० मध्ये काही प्रमाणात उत्खनन झाले. १९८२ मध्या श्रीलंकेच्या सरकाराने  यावर पुन्हा काम सुरु केले. आणि आता हे ठिकाण आधी म्हटल्याप्रमाणे जागतिक वारसा म्हणून जाहिर केले गेले आहे .

६६० फूट उंच असलेल्या या उभ्या कातळाच्यावरती एक आश्चर्य आहे. या कातळावरती जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक वाट नाही. सुरुवातीला काही दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर सुरेख रचलेली बाग लागते.



विविध चौकोनी दगडी हौद त्यात पाणी आणि आसपास सुरेख हिरवळ. काही अंतर गेल्यानंतर मात्र आपण उभ्या कातळापाशी  येतो.



 आणि समोर असते ती अतिशय अवघड अशी लोखंडीशिड्यांची माळ. तीही तशी नवीन आहे. जरा बाजूला नजर फ़िरवली कि या कातळाला सिगारिया का म्हणातात याची पहिली प्रचिती येते.


कातळातून कोरलेला सिहंचा पंजा .

समोरच्या अतिशय उंच, चढाच्या जवळ जवळ १२०० पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सिगारियाच्या वरती पोहचतो.  खाली बघताना फार विहंगम दृश्य दिसतं.




या कातळाच्या वरती चढून गेल्यानंतर आपल्याला हा नजारा दिसतो.


 .


Monday, September 23, 2019

लोकशाही समाजवाद



यामध्ये दोन विचारसरणी एकत्र आल्या आहेत. लोकशाही आणि समाजवाद
लोकशाही म्हणजे काय हे बहुतांशी आपणास माहिती असते. समाजवाडा बद्दल मात्र काही शंका मनात असू शकतात.
लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. अगदी साधी सोपी, सरळ व्याख्या म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून केलेले राज्य. परंतु हि व्याख्या अतिशय सोपी, खरं तर अतिशय डायल्युट पातळ केलेली व्याख्या आहे. फार पूर्वी ग्रीक नागरराज्यामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. कालांतराने परिस्तितीनुरूप त्यात बदलही होत गेले. आज प्रामुख्याने वास्तवात आहे ती लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. यामध्येहि काही प्रकार आहेत, परंतु आता त्या तपशिलात जायला नको. इतकंच माहिती असू द्या कि एखाद्या देशातील लोक सार्वत्रिक मतदानाने आपले प्रतिनिधी निवडून देतात. आणि हे प्रतिनिधी लोकांच्यावतीने राज्याचा कारभार चालवतात.

लोकशाही हि प्रामुख्याने राज्यव्यवस्था कशी चालावी या संदर्भात आहे. तर समाजवाद हा समाजातील उत्पादनांच्या साधनांच्या मालकी बाबत आहे. कोणत्याही समाजामध्ये उत्पादनाची साधने असतात. जसे कि जमीन, कारखाने, कलाकौशल्याची साधने, कार्यालये, उद्योग, व्यापार, पर्यटन, असे सर्व ज्यातून अर्थ/ पैसा उत्पन्न होतो अशा सर्व गोष्टी. ह्या उत्पादनांच्या साधनांवर कोणाचा अधिकार असेल ह्यावरून त्या त्या समाजाची अर्थव्यवस्था ओळखली जाते.

या दोन्हीची एकत्रित  व्यवस्था म्हणजे लोकशाही समाजवाद.म्हणजे  एखाद्या समाजामध्ये राज्यकारभाराचे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींकडे सोपवले असतील. आई समाजातील सर्व उत्पादनांच्या साधनांचें अधिकार या लोकनियुक्त सरकार कडे सोपवलेले असतील.
या व्यवस्थेमध्ये सरकारही लोकांचे आणि उत्पादनाची साधने अशा लोकांच्या सरकारकडे असल्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त भले कसे होईल हे राजकीय आणि आर्थिक बाबतीतही बघितले जाईल. समाजाच्य जडणघडणीतील रहा आणि राजकारण असे लोकोपयोगी असले कि आपोआपच असा समाज जास्ती प्रगती करेल, जास्ती  सुखी असेल असे मानले जाते.


Wednesday, September 18, 2019

19. शिवाजी सूरत - वस्तुस्थिती


( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.

Thursday, August 29, 2019

13. "या टोपी खाली, दडलंय काय?"

( डिस्क्लेमर : लेखातील सर्व छायाचित्रे नेटवरून साभार )


अंतराळातून पृथ्वीकडे पहाताना काही गोष्टी ठळकपणे  दिसतात. त्यातल्याच या तीन टोप्या ! असं म्हणतात की पृथ्वीच्या मध्यभागावर या तीन त्रिकोणी टोप्या आहेत. अजून नाहीओळखलंत ? वाळवंटात तीन त्रिकोणी टोप्या. बरोब्बर. आता बरोब्बर ओळखलंत.. इजिप्त मधले पिरॅमिड! जगातल्या आश्चर्यांमधील एक ! जणूकाही पृथ्वीने आपल्या डोक्यावर टोप्या ठेवल्यात अशीच दिसतात ती पिरॅमिड !

आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शिकलो की, इजिप्त मधील राजांच्या या दफनभूमी आहेत. इजिप्तमधे राजाच्या मृत शरीरावर काही शस्त्रक्रिया करून, नंतर  त्यावर विविध रसायने लावून त्यांचे  जतन केले  जाई.यांनाच  ममी असे संबोधले  जाते. अन या ममी सुरक्षित राहाव्यात, कालानुरूप त्यांचे कुजणे होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धतीच्या  इमारती बांधून, त्यात या ममी ठेवल्या गेल्या.  इजिप्त मध्ये असे बरेच पिरामिड सापडले आहेत. त्यापैकी महत्वाचे हे तीन !

अलीकडच्या काळात काही नवीन गोष्टी सापडत आहेत. काही नवी उत्खनन, काही नवीन पाहणी, काही नवीन अन्वयार्थ लावले जात आहेत. त्यातल्या एकाची थोडी माहिती, आज घेऊ.

गिझा इथले जे तीन पिरॅमिड आहेत त्यातीळ खुफरे पिरॅमिड कडे जाणारे जे दगडी बांधीव छोटे रस्ते आहेत त्याखाली एक शाफ्ट आहे.  ओसायरिस शाफ्ट. खरे तर या ठिकाणी सलग खडक आहे. हा खडक  खोदून शाफ्ट  तयार केलेला आहे. १९३३-३४ मध्ये सलीम हसन आणि यांच्या टीमने हा जमिनी खालचा शाफ्ट जगासमोर आणला. एक मजलाखाली  हा शाफ्ट उत्खनन करून त्यांनी मोकळा केला. परंतु त्या खाली जाणे त्यांना शक्य झाले नाही. 
पुढे १९९९ मध्ये झही हवास आणि त्यांच्या टीमने हे काम पुन्हा हाती घेतले. आणि जवळ जवळ ३० मीटर खोलवर उत्खनन  केले. एकाखाली एक अशा तीन टप्यामध्ये हा शाफ्ट आहे.

काय आहे या शाफ्टच्या पोटात? 

जमिनीच्या जवळ जवळ ८-१० फूट खाली एका भुयार तोंड दिसतं. 
  

पहिल्या टप्यावरून वर बघताना. 
या भुयारामध्ये आणि खाली पूर्ण खडक आहे. या भुयारातून सरळ पुढे गेले कि खोल खाली नऊ मीटर खडक खणलेला आहे. जेमतेम सहाफुटी लांबीरुंदीअसे  हे चौकोनी भुयार आहे.  खाली उतरण्यास आता लोखंडी  शिड्या लावल्या आहेत. नऊ मीटर खाली उतरले कि पहिला टप्पा येतो. या टप्यावर फार काही सापडले नव्हते.  

तिथून पुढे पुन्हा काही अंतर सरळ गेले कि दुसऱ्या टप्याकडे जाण्यासाठी पुन्हा खोलखाली सव्वा तेरा मीटर खोदले आहे. तिथेही लोखंडी शिडी उतरून खाली आले कि दुसरा टप्पा लागतो. 

दुसऱ्या टप्याकडे जाताना 

या दुसऱ्या टप्याच्या  मध्यात सलग आयताकार खोली आहे आणि तिच्या आजूबाजूला शवपेट्या ठेवण्यासाठी सहा खोल्यांसारखी जागा तयार केली आहे. या टप्यावर अनेक भांडी, वस्तू सापडल्या होत्या. याशिवाय सहापैकी दोन खोल्यांमध्ये दोन भल्या मोठ्या दगडी पेट्याही,  झाकणांसह  सापडल्या.  अंदाजे ७ फूट लांब , चार फूट रुंद आणि सहा फूट उंच अशा प्रचंड मोठ्या पेट्या आहेत. आश्चर्य म्हणजे  या पेटयांचा दगड संपूर्ण इजिप्त मध्ये कुठेही सापडत नाही. ह्या पेट्या इतक्या छोट्या भुयारून खाली कशा आणल्या, का आणल्या या कशाचीच उत्तरे आज आपल्याजवळ नाहीत. 
डावीकडे दगडी पेटी दिसतेय. शेजारी उभी आलेली व्यक्ती पाहिली कि पेटीची भव्यता लक्षात येईल.  


या टप्याच्या खाली पुन्हा साडे सात मीटर खोदलेले आहे. इथे जायचे भुयार अजूनच लहान आहे. फारतर चार बाय चार फुटाचे.
तिसऱ्या टप्याकडे जाताना 

 इथून खाली उतरले कि तिसरा टप्पा येतो. इथेही मोठी आयताकार खोली आहे. मध्यात पुन्हा एक दगडी पेटी आहे. खोलीच्या दुसऱ्या टोकाला, दोन वेगवेगळ्या दिशांना वर चढत जाणारी,  अतिशय लहान भुयारे आहेत. तिथून पुढचा मार्ग अजून शोधता आलेला नाही. 

या टप्यातील आश्चर्यजनक गोष्ट तर अजून सांगितलीच नाही. या खोली मध्ये ; भर वाळवंटी प्रदेशातल्या, जमिनी पासून तीस मीटरहून खोल जागेत , जिथे सूर्याचा प्रकाशही जाऊ शकत नाही, जिथे जमिनी वर दूरपर्यंत पाणी दिसत नाही कि एकही झाड दिसत नाही अशा या ठिकाणी, पिरॅमिडच्या टोपी खाली काय दडलं आहे? तर अतिशय स्वच्छ अगदी स्फटिकाप्रमाणे असणारे पाणी ! खोटं वाटलं ना? हा बघा फोटो. अतिशय अपुरा प्रकाश असूनही, त्या पाण्यात उभ्या असलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब सहजी दिसते आहे. 

तिसऱ्या टप्यातले स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी 

हे काय आहे?  इतके खाली कठीण खडकातून का खोदले गेले? त्या अवाढव्य दगडी पेट्या तिथे का नेल्या? कशा नेल्या? खाली असणारी छोटी भुयारं अजून कुठे जातात? तिसऱ्या टप्यामध्ये असलेले पाणी तिथे का आहे? ते कोठून आले, येते? भूगर्भात इतके पाणी असूनही जमिनीवर एकही झाड का नाही? हे स्थापत्य कसे केले? कोणी केले? काय हत्यारं, कोणती यंत्र वापरली गेली? कोणत्या काळात हे केले गेले? .... एक नाही अनेक प्रश्न ! पण कशाचेच संयुक्तिक उत्तर नाही. 

शेवटी मनात इतकाच येतं  " या टोपी खाली, दडलंय काय? "

Tuesday, August 27, 2019

9. कोण कुठले, कोण आपण ?

पृथ्वीवरील मानवी वसाहत आणि आपण

४५० कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. आणि साधारण ४२० कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टी निर्माण झाली.  
प्राणी जगताची सुरुवात साधारण  २५० कोटी वर्षांपुर्वी  झाली. आणि मानवाची निर्मिती साधारण तीस लाख वर्षांपूर्वी झाली.

असं असले तरी मानवाचा ज्ञात इतिहास मात्र जेमतेम पाचहजार वर्षातलाच !
का बरं असं  असावं ? तत्पूर्वीचा इतिहास काय असेल? त्याचे काही पुरावे आपल्याला सापडतात का? का बरं सापडत नाहीत ? पुरावे सापडत नाहीत म्हणजे  काही इतिहास नव्हताच? असे कसे बरं असेल? जरा पुन्हा एकदा मानवी उत्पत्ती आणि विकासाचा आढावा घेऊन बघुयात चला.

मानवाच्या निर्मिती यापासून पाहिले तर हा काळ तीन महत्वाच्या भागात विभागाला जातो. पाषाण युग (सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वीपासून ) , कास्य युग (सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीपासून)आणि लोह युग ( सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून) म्हणजे असे लक्षात येईल कि साधारण लोह युगापासून आपल्याला मानवाचा इतिहास माहिती आहे. त्या आधीचे कास्य युग त्यामानाने लहान होते. सुमारे साडेतीन हजार वर्षे. परंतु त्या आधीची  जवळ जवळ १८-२० लाख वर्षांचे काय ? तो इतिहास आज पूर्ण अज्ञात आहे.

आश्चर्य वाटावीतअसे काही जुने अवशेष सापडतात. उदा. गोबेकटी टेपे ( Gobekti Tepe ) तुर्कस्तान येथील संस्कृती , पेट्रा ( Petra ) जॉर्डन येतील संस्कृती ,  समुद्रात बुडालेल्या ग्रीक जहाजातील अनाकलनीय यंत्र, ईजिप्तमधील अनेक कोडी, वेरूळ लेणी, कुल्लर गुहा (द, भारत) या आणि अशा अनेक कोड्यांची  उत्तर आज आपल्याकडे नाहीत. 

मानवी समाजाची सुरुवात लाखो वर्षांपूर्वी झाली पण आपल्या हाती फारतर ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास हातात आहे. अगदी फार तर ७००० वर्षांपूर्वीचा. मग त्या आधी लाखो वर्ष काय घडले? आपण समजतो अहो ती आणि तीच संस्कृती आहे, होती? कि या आधी काही संस्कृती होऊन गेल्या अन काळाच्या पडद्याआड त्या हरवून गेल्या? ११००० हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिमयुगाने जुनी संस्कृती गिळंकृत केली? या आधीही अनेक हिमयुगीन येऊन गेली; त्यांनी किती माहिती आपल्या पोटात रिचविली ? अनेक समाजांमध्ये काही पुराणकथा सामान आढळतात; जसे कि महापूर आणि त्यातून वाचयासाठी बांधलेली महान नौका. किंवा अनेक धर्मीयांमध्ये काही सामान मान्यता आहेत. अनेक भाषांमध्ये काही समानता आहेत. या अशा अनेक उत्तरांचा शोध आज घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 

आज  जगभर अनेक उत्खननं होत आहेत. अनेक ठिकाणी खूप मोठमोठी दगडी बांधकामं, कोरीव दगड सापडत आहेत. अनेक ठिकाणी पिरॅमिड सदृश भव्य इमारती सापडत आहेत. तसेच अनेक ठिकाणांच्या विविध कोरीवकामांमधून दिसणाऱ्या वस्तू फार नंतर अस्तित्वात आलेल्या दिसतात. उदा. सायकल, दुर्बिणी, विमानं, हेलिकॉप्टर्स, इ.  यांचे अर्थ लावणं अजून चालू आहे.

तसेच ज्या जुन्या इमारती, वस्तूंचा अर्थ लावला आहे त्याबाबतही काही नवे पुरावे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासप्रणालींचा स्वीकार करून त्यांच्यामार्फत मिळणार-या माहितींचा साकल्याने विचार केला जातो आहे. खगोलशास्त्र ( Astronomy ), समुद्रशास्त्र (Oceanography), हवामानशास्त्र (Meteorology ), पूरपरिस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र ( ), भूविज्ञान  (geoscience), मानववंशशास्त्र ( genealogy), भाषिक मानववंशशास्त्र ( linguistic anthropology ),  या आणि अशा अनेक शास्त्रांमधून मिळणारी माहिती, त्यांचा एकमेकांशी असणारा संबध अभ्यासून त्यातून योग्य तो अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून मिळणारी माहिती कधी जुन्या माहितीला बळकट करेल तर कधी जुनी गृहीतकं पूर्ण बदलावीही लागती. यासाठी मन, बुद्धी यांचा  मोकळेपणा स्वीकार करायला हवा. हजारो वर्षांचे आपले विचार, मतं एखाद वेळेस झुगारावी  लागतील. त्याची तयारी हवी. 

कधी काही उत्तरं मिळतात काही नाही. कधी त्यांचा मागोवा घेतला जातो. कधी आडकाठी केली जाते. आज गरज आहे ती स्वच्छ, खुल्या संशोधनपर नजरेची. आशा करूयात की ही कोडी सोडवली जातील. यासर्वांबाबत एक स्वच्छ,  सकारात्मक, खुला दृष्टिकोन आज स्विकारण्याची गरज आहे. अर्थातच पुराव्यांनीशीच नवीन काही स्वीकारले जावे.
 

Wednesday, May 23, 2018

8. काळ, समाज, कुटुंब ... बदल


काळाच्या एका टप्यावर निसर्गाने मानवामधे दोन मोठे बदल केले. आणि मानव इतर प्राण्यांहून वेगळा बनू लागला. एका बद्दल नेहमीच बोललं गेलं. दुसऱ्याचा मात्र अभावानेच उल्लेख झाला.

१. मानवाच्या मेंदूचा विकास झाला, त्याचे आकारमान वाढले. पर्यायाने त्याची बुद्धिमत्ता वाढली.

आणि

२. स्त्रीच्या प्रजनन काळाची सिमितता संपली. म्हणजेच विशिष्ठ काळातच तिची प्रजनन क्षमता असेल असे न रहाता ती कधीही प्रजनन करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.

या दोन्ही बदलांमुळे एका अर्थाने मानवी समुदाय, समाज निर्माण झाला असे म्हणावे लागेल.

बऱ्याच जणांना हे अतिरेकी, उगाच ताणलेलं विधान वाटू शकेल. परंतु बारकाईने विचार केला तर याची सत्यता पडताळून पहाता येऊ शकेल.

मानवी मेंदू विकसित झाला, स्वाभाविकच मानवाचे डोके मोठे झाले. परंतु हे असे मोठे डोके जन्मत: असणे अडचणीचे झाले असते. असे मोठे डोके घेऊन बाळ जन्मले असते तर आईच्या जिविताला धोका निर्माण झाला असता. स्वाभाविकच जन्मत: स्त्रीयोनीला झेपेल असाच बाळाच्या डोक्याचा आकार असेल अन जन्मानंतर काही काळ त्याची पूर्ण वाढ  होईल अशी योजना निसर्गत: झाली. याचा एक महत्वाचा परिणाम असा झाला की ही मेंदूची पूर्ण वाढ होई पर्यंत मानवी बाळाला संरक्षण, संगोपन अत्यावश्यक झाले. अगदी शब्दश:, स्वत:च्या पायावर उभं रहाण्यासाठी इतर प्राण्यांना जिथे 3-4 मिनिटं पुरतात तिथे मानवी बाळाला मात्र किमान 7-8 महिने लागतात. याचं कारण ही अपूर्ण वाढ हेच कारण! मग अशा अपूर्ण वाढ असलेल्या बाळाला पूर्ण वाढ होई पर्यंत आई, वेल प्रसंगी आजी, इतर सदस्य अत्यावश्यक झाले. का? तर एक बाळ वर्षाचं होतय तोवर त्याच्या आईला दुसरं बाळही होत असे. आणि मानवी बाळ तर किमान 4-5 वर्षा पर्यंत इतर प्राण्यांसारखं पळूही शकत नाही.

म्हणूनच मानवी मोठा मेंदू मानवाला बुद्धी तर देऊन गेलाच पण सोबत मानवी समुहाची, समाजाची देन ही देऊन गेला.

आता दुसरा मुद्दा! इतर प्राण्यांच्या मादीचा प्रजननकाळ सिमित असतो. त्याचमुळे मादी आणि नर यांचा शरीरसंबंधही विशिष्ट काळातच होतो. "मादी माजावर येणं" असा शूब्दप्रयोगही याच मुळे अस्तित्वात आहे. मानवी मादीबाबत मात्र निसर्गाने ही परिस्थिती बदलली. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेला साधारण वयाची 16-45 ह्या कालावधीत स्त्री कधीही प्रजनन करू शकते, वर्षातला कोणताही काळ तिला ही क्षमता असेल अशी देणगी तिला मिळाली. स्वाभाविकच स्त्रीपुरुष शरीरसंबंध यांना निसर्गाचे फार कमी बंधन राहिले. आपापत: दोघांचे एकत्र असणे निसर्गाच्या बदलावर अवलंबून राहिले नाही.

एकीकडे अपूर्ण वाढ झालेले नाजूक बाळ अन स्त्रीपुरुषांचा सततचा संपर्क यातून मानवी समुदाय एकत्र होत गेला. त्यांचा एकसंध असा समाज बनत गेला.

सुरुवातीला प्रजनन ही प्रक्रिया प्रामुख्याने स्त्रीशी निगडित असल्याने आणि जन्मलेले बाळ आणि त्याची आई यांचे नाते जास्त स्पष्ट असल्याने एक स्त्री आणि तिची मुलं अशा स्वरुपाची समाजरचना तयार झाली. पुढे एक स्त्री, तिची मुलं, तिच्या मुलींची मुलं, त्यातील मुलींची मुलं असा समाज वाढत गेला. स्वाभाविकच मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची ही सुरुवात होती.

या रचनेमधे प्रथम पुरुष एकाच कुटुंबात नसे. किंबहुना पुरुष त्यामानाने अजूनही भटका होता. एका गुहेतून दुसऱ्या गुहेत, एका जंगलातून दुसरे जंगल असा त्याचा वावर असे. स्त्रिया मात्र आपापल्या मातांच्या गुहेशी बांधल्या गेल्या.

या काळापर्यंत पुरुष आणि जन्मलेले बाळ यांचा अन्वयार्थ फार स्पष्ट नव्हता. त्यामुळे या काळात नातेसंबंधही स्पष्ट नव्हते. स्वाभाविकच नर आणि मादी हेच मुख्य नाते होते. मग एकाच कुटुंबातील स्त्रीपुरुषांचा शरीरसंबंध सहजी होत असे. अगदी मुलगी बाप, बहिण भाऊ, मुलगी काका असे संबंध अत्यंत सहज असत.

कालांतराने पुरुषाचा स्त्रीच्या प्रजननाशी असणारा संबंध जसजसा स्पष्ट होत गेला तसतशी पुरुष आणि बाळ यांच्यातला बाप अन मुल हे नाते उलगडत गेले. भाऊ आणि बहिण हेही नाते प्रस्थापित होत गेले. ही नाती जसजशी ठळक होत गेली तसतशी समाजरचना जास्त आखीवरेखीव होत गेली. याच काळात एक स्त्री आणि एक पुरुष अशी जोडी ठरत गेली. एकी अर्थाने लग्नसंस्थेची ही सुरुवात होती.

यानंतरचा टप्पा होता तो रक्ताच्या नात्यांमधे शरीरसंबंध टाळण्याचा. काही समाजात हे निषिद्ध मानलं गेलं तर काही ठिकाणी स्विकारलंही गेलं.

जिथे नाकारलं गेलं तिथे इतर समाजाशी हे नातं जोडलं गेलं.

हा जो संपूर्ण प्रवास आहे मानवी समाजाचा तो मानवाला रानटी जीवनापासून शेती समाजापर्यंत आणणारा.

या काळात सुरुवातीला शेती ही स्त्री करत होती तर जंगलातली शिकार, इतर कामं पुरुष करत होता. पण जसजसा हा समाज शेती करू लागला, तसतशी त्याची शिकारी अवस्था कमी होऊ लागली. शेतीतील नवनवीन शोध, पेरणी, नांगर यांचा शोध लागला, तशी जंगलाचे शिकारी जीवन मानवाने मागे टाकले. शिकारी सारखे अनिश्चित, प्रचंड ताकद आणि श्रमाचे काम करण्यापेक्षा त्यामानाने निश्चित फळ देणारे, दगदग कमी करणारे शेतीचे काम मानवाने अंगिकारले.

पुरुषही जेव्हा शेतीकडे वळले तेव्हा बाळांच्या वाढीकडे लक्ष वळवणे स्त्रीलाही सोपे गेले. हळुहळू शेती करणारी स्त्री बालसंगोपनाकडे वळली, तर शिकार करणारा पुरुष शेतीकडे वळला. एक जास्त स्थिर, नियमबद्ध समाजरचना उदयाला आली. कामांची विभागणी, मुलांचे संगोपन स्त्रीकडे आणि मुलांच्या वाढीसाठी खाद्य उत्पादनासाठी शेती पुरुषाकडे अशी होत गेली. आणि दोघांना मुलं वाढवण्यासाठी, एकमेकांची गरज असल्यामुळे या काळात खऱ्या अर्थाने लग्नसंस्था बळकट झाली असावी. अर्थात तरीही ही योजना 4-6 वर्षांसाठीच सुरुवातीला असावी.

कालांतराने शेतीसाठीची जमीन आणि तिची मालकी याबद्दल पुरुषांमधे संघर्ष सुरु झाला. जो जास्त ताकदवान, बळवान ( बळ=शारीरिक त्याचे आणि त्याच्या मुलांच्या संख्येचेही) त्याच्याकडे अधिक जमीन, अधिक कसदार, मुबलक पाणी असणारी जमीन अशी संरचना बनु लागली. एका अर्थाने टोळी प्रमुख आणि पुढे राजेशाहीची ही पाळंमुळं होती.

या काळापर्यंत बाळाचे जन्मदाते म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघाची निश्चिती झाली होती. ही माझी मुले, हे माझे कुटुंब, ही माझी जमीन अशी मालकी हक्काची भावना वाढीस लागली होती. शेती हे जगण्याचे मुख्य साधन होते आणि त्यावर पुरुषाचे वर्चस्व वाढत गेले अन स्त्री कुटुंबाची निर्माती झाली. 

हळूहळू स्त्री अन पुरुषांची क्षेत्र बदलत गेली. कुटुंब, मुलांची वाढ, प्रजनन पद्धती, कुटुंबांतर्गत वावराचे संकेत हे सगळं स्त्रीकडे आलं. तर समाजाचे नियम, कायदे, शेती, तिथल्या पद्धती हे सगळं पुरुषांकडे आलं.

जेव्हा दोन समुदायांचे, समाजांचे संघर्ष झाले तेव्हा त्या त्या समाजातील पुरुषांचा लढवय्ये म्हणून महत्व अधोरेखित होत गेले. पुढे माझी शेती, माझी जमीन, माझी मुलं, तशीच माझी स्त्री अशी मनोरचना होत गेली.
प्राचिन काळात, राजेशाही काळात जमीन, अन्नधान्य, हत्यारं, मुलं ही जशी आपली मालकी, आपली संपत्ती तशीच स्त्री ही देखील आपली संपत्ती समजली जाऊ लागली. कुटुंबाचे सगळे अधिकार पुरुषांच्या हाती केंद्रित झाले. याच सुमारास लग्नसंस्था ही आयुष्यभराची योजना झाली असावी.

याचाच पुढचा भाग होता को म्हणजे जशी मी माझी जमीन वाढवू शकतो तशी माझी स्त्रियांची संख्याही वाढवू शकतो. मग जो जास्त बलवान तो अधिक स्त्रियांसोबत राहू लागला. आपले बळ वाढवायचे तर आपली अधिकाधिक मुलं असणे पुरुषाला उपयुक्त वाटू लागले. याच कालखंडात लग्नाला समाजमान्यता आणि राजमान्यता आवश्यक वाटू लागली.
मध्ययुगात तर परिस्थिती अजूनच बिकट झाली. परक्यांचे आक्रमण, त्यापासून माझे कुटुंब वाचवायचे तर त्याचे संरक्षण करायचे म्हणून त्यांना जास्त बंधनात टाकले गेले. आपली मुलं, स्त्री सुरक्षित रहायला हवी तर तिने घरातच, उंबरठ्याच्या आतच राहिले पाहिजे अशी काहीशी भूमिका स्वाकारली गेली. यातून स्त्री अधिकाधिक बांधली गेली, बंद दाराआड केली गेली. कुटुंब, त्यांची बांधणी जास्त कठोर झाली. जाती धर्म इतकच नव्हे तर गोत्र, गाव यांची बंधनं अतिशय काटेकोरपणे स्विकारली गेली.

असे असले तरी कौटुंबिक पातळीवर हा समाज खुप सक्षम होता. जीवन जगण्याच्या पद्धती खुप स्पष्ट होत्या. त्यावर आधारित सणसमारंभ, रिती पद्धती, रुढी यांची एक छान रचना तयार झाली होती. शिवाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, अनुभव,  हस्तांतरण करण्याचीही एक पद्धत विकसित जाली होती अन ती पाळली जात होती. याचेही काही दोष, कमतरता होत्या ( जातिनिहाय/ कुटुंबनिहाय/ स्त्रि-पुरुष निहाय काम, ज्ञान वगैरे) पण त्या समाजरचनेत त्या कमतरता निभावल्या जात होत्या. 

प्रबोधन काळात इतर समाजांशी आलेला संपर्क, जीवन जगण्याच्या पद्धतीतला अमुलाग्र बदल यातून इथली समाजव्यवस्था बदलू लागली. हा बदल अगदी हळू होता, पण होता.

आता उपजिविकेची वेगळी साधने पुढे आली. कारकुनी, कारखान्यातील कामगार ही दोन नवीन क्षेत्र समोर आली.
यात
१. मालकी हक्क न येता काम आणि मोबदला होता.
२.जबाबदारी न येता मोबदला होता.
३. अधिकार न येता काम करणं होतं. या जीवनपद्धतीचा परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवर विविधांगांनी झाला.
(- क्रमश:)


Tuesday, May 23, 2017

5.सृजन: शेतीची सुरुवात


( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात  आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
कधी सकाळीच डोंगरामागच्या छोट्या झालेल्या नदीत पाय सोडून बसावं अन ऊन अंगाला अगदी भाजू लागलं तर मनसोक्त नदीमधे डुंबत रहावं, पाण्यापासून जराही दूर होऊ नये असं वाटू लागलं तिला. पण मग ऊन फारच तळपायला लागलं की राम तिला ओढून जवळच्या झाडांच्या सावलीत नेई. मग तिथे बसल्या बसल्या फळांच्या खाली पडलेल्या इवल्या इवल्या बिया ती गोळा करत बसे. राम शेजारी पडलेल्या वाळलेल्या फांद्या गोळा करी अन वाळक्या वेलींनी बांधून त्याची मोळी करे. मग ऊन्हाचा मारा अगदीच असह्य झाला की दोघे गुहेत परत येत.
अजून काही दिवस उलटले. अन एक दिवस, दिवस उगवलाच नाही. रात्रभर कसले कसले आवाज येत राहिले. अन मधेच लख्ख उजेड होई, जंगलातला काळाकुट्ट अंधार क्षणात उजळून निघे. अन मग जोरात सुरु झाला पाऊस!

साऱ्या आकाशातून जणू मोठी नदीच वाहू लागली साऱ्या जंगलावर. सगळे अतिशय आनंदले. गुहेच्या बाहेर आले. आणि आकाशातून पडणाऱ्या या नदीखाली चिंब भिजू लागले. मधेच उजेडाचा लखलखाट होई आणि पुन्हा कडकडाट असा आवाज. लहानमुलं घाबरून आपल्या आयांच्या कुशीत लपत. सीतेलाही या आवाजाची भिती वाटे. पण आता आईपासून ती खूप दूर आलेली. मग ती चटकन रामाचा हात घट्ट पकडे. लखलख होई तशी ती चटकन रामाजवळ सरके. रामही तिला जवळ घेई अन हसून म्हणे, " अग किती घाबरतेस? आता काही दिवस हे असंच चालायचं."
" मग काही दिवस तू माझ्या अगदी जवळ रहा बरं सतत" ती हळूच म्हणायची. त्या दोघांच्या वागण्याकडे वडिलधारी मंडळी जरा दुर्लक्षच करत पण सहान मुलं बघून खुखु खिखि करत.
हळूहळू सगळेच चिंब भिजले. आता गार वाराही जोरात सुटला. सगळेच आता गारठू लागले. आणि एक एक करत सगळे गुहेच्या आत आले. मोठ्या बाबांनी शेकोटीत अजून लाकडं घातली, जाळ मोठा केला. सगळे त्या शेकोटी भोवती उब घेत बसून राहिले.

सीतेला माहिती होतं. आता हा पाऊस असाच खूप दिवस पडत राहील. ती लहान होती तेव्हापासून हा पाऊस तिला खूप आवडत असे. त्याहून जास्त आवडे, ते पाऊस आल्यानंतर आजुबाजूचे सगळे जंगल कसे नवे, ताजे, हिरवेगार होई, ते!  पावसाचे आणि या जंगलाच्या हिरवेपणाचे नाते तिने कधीचेच ओळखले होते. राम भेटल्यापासून तिला, तिचे आणि रामचे नातेही असेच काहीसे वाटायचे.
हा, त्या दोघांचा एकत्र असा दुसरा पाऊस! या आधीचा पाऊस झाला तेव्हा सीता नुकती रामच्या गुहेत रहायला आलेली. पण तेव्हा ती मनातल्या दु:खात इतकी बुडालेली की तो पाऊस तिला फारसा कळलाच नव्हता. आईबाबांना सोडून पहिल्यांदाच इतकी दूर आलेली ती. नवीन लोकं, नवीन गुहा, नवीन जंगल... ती खूप बावरली होती, गोंधळली होती. पण मग तिला हे सगळं ओळखीचं होत गेलं. रामच्या साथीत याही जंगलाचे हिरवे होणे ती अनुभवत गेली. पावसासारखाच राम तिचा सखा होत गेला.

खूप दिवस पाऊस सतत पडत राहिला. हळूहळू जमीन, माती-पाणी यांनी नरम, मऊ, उपजाऊ झाली. गेले काही दिवस सीतेने एक वेगळाच खेळ शोधून काढलेला. गुहेच्या एका बाजुला ती गोळा केलेल्या फळांच्या इवल्या इवल्या बिया मऊ झालेल्या मातीत ठेऊ लागली. कधी गोल आकारात, कधी एका एका रेषेत. कधी डोंगराच्या आकारात तर कधी झाडांच्या फांद्यासारख्या. मऊ मातीत काही वेळाने या बिया हळूच आत जात, नाहीशा होत.  असं करत तिने जमवलेल्या सगळ्या बिया त्या मऊ मातीत झोपून गेल्या, लपून गेल्या...

अन मग एके दिवशी सुर्याचे सोनेरी ऊन जंगलावरती पसरले. गुहे बाहेरचा पाऊस थांबला होता. सगळे आनंदाने बाहेर आले.  सीताही बाहेर आली. आणि चकितच झाली. तिने जिथे जिथे फळांच्या बिया ठेवल्या होत्या, तिथे काही काही छोटी छोटी पाने जमिनीतून वर डोकं करत होती. तिने उत्सुकतेने त्यातल्या एकाला हात लावला. तशी ती पानं हळूच तिच्या हातात आली. माती अजूनही खूप ओली, मऊ होती. त्यातून ही पानं सहज मातीतून सुटून तिच्या हातात आली. तिने नीट पाहिले. तर पानांच्या खाली तिला फळांची बी दिसली. हो हो, तीच बी, जी तिने गोळा केलेली, मऊ मातीत ठेवलेली. अन मातीत लपून गेलेली बी! पण त्या बी मधून ही पानं कशी बाहेर आली? तिला काहीच कळेना. तिने अजून 2-3 पानं काढून बघितली. एकाखाली होती तशीच बी. तर काहींच्या खाली नव्हती. तेव्हढ्यात तिला रामने हाक मारली. खाली नदीकडे चल म्हणून. सीता मग सगळे विसरली. आणि दोघे नदीकडे निघाले.

इतक्यात नदी किती मोठी झालेली! पाणी लालकाळे दिसत होते. नदी नुसती धो धो धावत होती. आता त्या नदीत उतरायची सीतेला भीती वाटली. ती परत फिरली. तिला काही गोष्टी आता अगदी नको वाटायला लागलेल्या. मोठे आवाज नकोत, फार माणसं नकोत, गुहेच्या एका कोपऱ्यात बसून रहायची.

अजून असेच काही दिवस गेले. सीता खूप दिवसांनी गुहे बाहेर आली. तिचे लक्ष गेले तर तिने ठेवलेल्या बियांमधून आलेली छोटी छोटी पानं आता दिसत नव्हती. ती थोडी पुढे झाली तर तिथे मात्र दोन छोटी झुडुपं  उभी होती अजूनही. तिला फार आवडली ती झुडुपं. आता सीता त्या झुडुपांपाशीच बराच वेळ असे. तसंही तिला आता फार हालचाल झेपत नव्हती. ती मग गुहेत नाहीतर त्या झुडुपांपाशीच बसायची. तिच्या हळूहळू दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर ही दोन छोटी झुडुपं अगदी नदीकाठच्या मोठ्या झाडांसारखी होती. त्यांची पानं, त्यांचा रंग, वास सगळं त्या झाडांसारखं होतं. आणि दुसरं, तिच्या पोटात मधेच काहीतरी जोरात हलत असे.

असेच अजून काही दिवस गेले... आता पाऊस अगदीच थांबलेला. सारे जंगल हिरवेगार झालेले. नेहमीप्रमाणे बायका, पुरुष धान्य गोळा करायला, शिकार करायला बाहेर पडली. सीतेला मात्र आता हे अगदीच जमेना. तिच्या पोटाचा घेरही खूप वाढलेला. खाली वाकताना त्रास होई. मोठ्या बायका आता तिची जास्त काळजी घेत होत्या. जास्त बाहेर जाऊ देत नव्हत्या. सीतेलाही गुहेबाहेरच्या त्या दोन झाडांजवळच बसावसं वाटे. आता ती दोन्ही झाडं चांगलीच मोठी झाली होती.

अजून काही दिवस असेच गेले. हवेतला गारठा आता खूपच वाढला होता. सीता आता अजूनच थकली होती. जेमतेम गुहेबाहेर येऊन बसे. ती दोन झाडं आता अगदी नदी जवळच्या झाडांसारखी दिसू लागली होती. 



सीता मनात म्हणाली " ही त्यांच्याहून लहान पण थेट त्यांच्यासारखीच. जणूकाही त्यांची बाळंच! ..." अन अचानक सीतेच्या मनात काही चमकलं. अन तेव्हाच तिच्या पोटातही जोरात काही हललं. ती जोरात ओरडली. पुन्हा पोटात एक कळ उमटली. ती पुन्हा कळवळली. तशी मोठ्या बायका धावत आल्या. त्यांनी तिला आधार देत गुहेत आणलं.

" आई, रामच्या आई,..." सीता कळवळत म्हणाली
" हो ग, हो पोरी कळतय मला. खुप दुखतय ना? थोडं सहन कर. " रामच्या आई तिला थोपटत म्हणाल्या.
" आई,  ती बाहेरची दोन झाडं.... आईग...."
" हा, हा, दमानं जरा. बोलू नको आता काही"
" आई, अहो ती नदी जवळच्या... झाडांची... आईग.... बाळं आहेत..."
" हो हो, बाळच होतय तुला. दम धर. थोडी कळ सोस, बोलू नको बाळा आता काही..."
" आई... आईग... अहो माझ्या बाळाबद्दल नाही, झाडाची बाळं.... आईग..."

अन मग अजून कितीतरी वेळा तिने कळा दिल्या... अन मग एका मोठ्या आई...ग... बरोबर एक नाजूक, छोटासा टॅह्यॉ एेकू आला. अन मग थोड्या वेळाने पुन्हा एका मोठ्या आई...ग बरोबर अजून एक टॅह्यॉ ...
" अगबाई दोन दोन झाडांचं काहीतरी बोलत होती न सीता? बघा दोन बाळं जन्माला आली" रामची आई आनंदाने बोलली. सीतामात्र अगदी थकून गेली होती. पण ती जास्त थकली होती यासाठी, कि जे ती सांगत होती, ते समजलच नव्हतं अजून कोणाला...

झाडांनापण बाळं होतात आणि ती आपण लावू शकतो हे सीतेला मात्र अगदी स्पष्ट कळलं होतं!

हिच ती शेतीची सुरुवीत होती! एका सृजनातून दुसरे सृजन समजले होते सीतेला. अन पुढे समजणार होते साऱ्या मानवजातीला! सृजन, मानवाला मिळालेले एक वरदान!

( अधिक माहिती : ही कथा असली तरी त्यामागची परिस्थिती खरी आहे. इतिहासात पुरावे असं सांगतात की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. अर्थातच तत्कालिन भाषा कशी असेल, संवाद कसे असतील , इतर तपशील यांबाबत तार्किक अंदाजच बांधला आहे.  नावंही अर्थातच काल्पनिक पण परंपरेशी नाळ जोडणारी.)








Thursday, April 6, 2017

4. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
(डिसक्लेमर : कथा सांगताना थोडी लेखकाची स्वयत्तता वापरली आहे; जाता जाता मुलामुलींना पाळीबद्दल सोपी माहिती देता येईल या कारणास्तव)

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.



अगदी थोडं खाली उतरलं की लगेच मोठं रान होतं. मोठं गवत तिथे असे. आधी हिरवं गार अन आता पिवळं धमक.
आज ते कापायला जायचं असं आई म्हणत होती. आता त्यातून धान्याचे दाणे मिळणार होते.  खूप लहान पणापासून आई बरोबर इथे येत होते, त्यामुळे आज मला काही वेगळं वाटलं नाही. या रानात लाल बेरीची काही झाडंही होती. आम्ही मुली त्या बेरी गोळा करत असू. आजही आईला सांगून आम्ही मुली बेरीच्या झाडाजवळ आलो.
 


एकमेकींना मदत करत आम्ही झाडावर चढलो. मस्त लालचुटूक्क बेरी लगडल्या होत्या. मग आम्ही थोड्या तोंडात टाकत, थोड्या खांद्यावरच्या झोळीत टाकत होतो. झाडावरून खाली बघितलं तर, सगळ्या आया खाली गवत कापत होत्या. कसा सरसर हात चालवत होत्या. त्याच्या हातातले दगडी विणे सपासप गवतावर चालत होते.


मध्येच मला हुक्की आली, आपणही कापुयात का गवत? मग मी झाडावरून खाली आले. आई जवळ गेले आणि म्हटलं, " आई मला पण शिकव ना, गवत कापायला. " आई हसली, म्हणाली " अगं थोडी मोठी हो, मग शिकवेन हं " मी नाराज झाले. तिला म्हटलं, " बघ मोठी झालेय की, तुझ्या खांद्या पर्यंत आलेय की " आई हसली, " तशी नाही वेडाबाई, कळेल तुला काही दिवसातच. जा आता सगळ्यांना गोळा कर. गुहेत परतायचय. "

मला काही कळलं नाही, मी अगदीच हिरमुसले आणि परत बेरीच्या झाडापाशी आले. " चला ग सगळ्या परत जायचय. " मी जारा घुश्यातच म्हटलं. मग आमची सगळी वरात परत आली. परत आलो तर दारातच मोठी आई हातात छोटसं गाठोडं घेऊन उभी होती. आई लगबगीने पुढे झाली. " अगबाई आला का नवीन पाहुणा? की पाहुणी? " आजी हसत म्हणाली " पाहुणी आहे हो, छोटीशी "

अरे हां, आई थोड्या दिवसांपूर्वी म्हणालेली, छोट्या आईला बाळ होणारे ! मग काय सगळे ओरडायला लागले, " नवीन बाळ, नवीन बाळ " मग मोठी आई रागावली, " हळु की जरा, बाळ घाबरेल." मग सगळ्यांनी हळूच बाळाला लांबूनच पाहिलं. छोटी आई आत झोपली होती. खूप दमलेली दिसली ती. "आई, छोटी आई तर आली नव्ह्ती आपल्या बरोबर गवत काढायला. मग ती इतकी का दमली ? " मी विचारलं. तशी हसून आई म्हणाली, " कळेल, मोठी झालीस न की कळेल आपोआप ! "
मी पुन्हा विचार करू लागले, कधी मोठी होणार मी? मग बाबा मंडळीही आली. सगळ्यांनी बाळाला बघितलं. सगळेच आनंदात होते.



तेव्हढ्यात बाळ रडायला लागले. इतकुसा आवाज त्याचा. मग मोठ्या आईने त्याला छोट्या आईकडे सोपवले. अन त्या दोघी आत गेल्या.

रात्री सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं यावर खल केला. मी म्हटलं , " बाळ, पिटुकल्या लाल लाल बेरी सारखं आहे, त्याला बेरीच म्ह्णूयात? " सगळेच हसायला लागले. मग छोटी आई म्हणाली, "  पिटुकली लाल म्हणुन लीला म्हणुयात तिला. " आणि मग सगळ्यांनाच ते नाव आवडलं.

रात्री मला सारखी गवत कापायची आणि छोट्या बाळांची स्वप्न पडत होती. एकदा तर गवत कापतना हातातला विळा चुकून पोटाला लागला असा भासही झाला. पोटात एकदम खूप दुखलं ही... अगदी दचकून जाग आली. शेजारी आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपले, तेव्हा जरा बरं वाटलं.



सकाळी आईने उठवलं. तर पुन्हा पोटात खूप दुखलं. माझा कळवळलेला चेहरा पाहून आईने काळजीने विचारले, " काय ग, काय झालं ? काही दुखतय का? "
 " आई पोटात खूप दुखतय.." मी रडतच  म्हटलं. "बरं मग तू पडून रहा आता. मी येते थोड्या वेळाने" आई म्हणाली. आणि भरभर चालत मोठ्या आईपाशी गेली. त्या दोघींचे काही तरी खुसूर-फुसूर झाले. तशी मोठी आई माझ्या जवळ आली. माझ्या जवळ बसून माझी तपासणी सुरू केली. नंतर माझ्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत बसून राहिली.




मग पुन्हा उठली आणि आईला काही तरी सांगितलं. मग आईने बाकीच्या सगळ्यांना नेहमीच्या कामांसाठी पाठवलं.

" आई मलाही जायचय बेरी काढायला " मी उठायचा प्रयत्न करत म्हटलं. तशी मोठी आई चटकन माझ्या जवळ आली. म्हणाली, " थांब इतक्यात नको उठूस. " मला काही कळेच ना? मोठी आई एरवी मला लवकर उठ, लवकर उठ म्हणायची. आज उलटं का म्हणतेय?

सगळे बाहेर, जंगलात, रानात गेले.  तशी आई माझ्या जवळ आली. मोठी आई आता काही महत्वाचे सांगणार याची जाणीव झाली मला. मी थोडी घाबरलेली. काय झालय मला? आता पोटात अजूनच कसं तरी होत होतं. उलटी होईल असंही वाटत होतं. अंगात अगदी ताकदच नाही असं वाटत होतं. आणी पोटात काहीतरी तुटत होतं, काही तरी सुटत होतं...

"सीता, मला वाटतं तू आता मोठी होतेयस." आई.
" म्हणजे आता मी गवत कापू शकेन ? " - मी
मोठी आई हसत म्हणाली. " अग हो , हो, किती घाई तुला? तशी तर मोठी होशीलच. पण त्याहून एक खूप छान मोठेपण येणारे तुला. "
" घाबरू नको बाळा. हे असं सगळ्या मुलींना होतं " - आई
" म्हणजे, असं पोटात दुखण? " - मी
" हो ग, प्रत्येक मुलीला मोठं झाल की दर काही दिवसांनी  पोट थोडं दुखतं. आणि पोटात साचलेली बाळासाठीची गादी साफही होते"
" म्हणजे? मला बाळ होणारे? मला नाही, मला नको बाळ... " मी जोरात रडत म्हतलं.
" अगं , इतक्यात नाही ग होणार तुला बाळ, नको घाबरू. आता फक्त बाळासाठी पोटात मऊ मऊ रक्ताची गादी तयार होते दर महिन्यात. आणि इतक्यात बाळ होणार नाही म्हणुन मग ती पोटातून बाहेर टाकली जाते. तेव्हा थोडं दुखतं सुरुवातीला. पण मग एकदा सवय झाली की नाही दुखत काही. " - मोठी आई.

" मऊ रक्ताची गादी? पण माझं पोट तर इतकुसं आहे, त्यात गादी कशी मावणार? आणि गादी तर मऊ गवताची असते, रक्ताची कशी?" - मी
" अग, पोटाच्या आत गवत कसं रहाणार? तुलाच टोचेल नं? म्हणुन आपल्या रक्ताचीच गादी असते पोटात. अगदी छोटीशी. बाळ पोटात आलं तर ती गादी मोठी होते अन मग बाळही त्यात मोठं होतं. आणि बाळ पोटात नाही आलं तर दर महिन्याला पोटातली रक्ताची गादी हळुहळु चार दिवसात बाहेर पडते. शू बाहेर पडते न तशी. पण शू कशी दिवसातून ७-८ वेळा बाहेर पडते तसं नाही होत."- आई
" ती गादी चार दिवस थोडी थोडी सारखी बाहेर येते.म्हणुन मग आपण कमरेला वेगळी पिशवी लावतो. आणि मग ती सकाळी पलीकडच्या छोट्या ओहळात धूवून टाकून पुन्हा वापरतो. घाबरू नको. मी आणि आई मदत करतो तुला सवय होई पर्यंत." - मोठी आई
" पण मग बाळ कधी येणार पोटात? मला नको इतक्यात बाळ बिळ. ते सारखं रडतं. " मी अगदीच बावचळले होते.
आई हसून म्हनाली. " नाही हं इतक्यात नाही येणार बाळ. तुला हवं तेव्हाच होईल हं. आणि त्यासाठी तुला आधी मित्र शोधावा लागेल. तो तुला आवडावा लागेल. मग बाळबीळ. हं "
मनात काही तरी हुळहुळलं, काय कळलं नाही .. मग म्हटलं, " हा मग ठिक. बरं आता मी जाऊ बेरी गोळा करायला? "
" नाही बाळा, आता हे चार दिवस थोडे सांभाळायचे. आपली ताकद थोडी कमी होते, पोट, पाय दुखू शकतात. म्हणुन हे चार दिवस गुहेतलीच कामं करायची, फारतर खाली फिरून यायचं. पण ही आपली हक्काची विश्रांती बरं " आई डोळे मिचकावत बोलली .
" आणि गवत कापणं? माझ्या विळा? " - मी
" हो ग बाई, आता तुला गवत कापणंही शिकवायचं. तुझ्यासाठी वेगळा विळा तयार करायचा. इतकच नाही तर गुहेतली चित्र कशी काढायची हेही शिकवेल मोठी आई. होना आई ? "-आई
" वॉव, मी मोठी झाले? गवत कापणार आता मी! आणि ती रंगीत मस्त चित्रही काढणार ! आई मला न छान नाच करावासा वाटतोय ! " - मी
" हो , हो, तू मोठी झालीस आता. सगळं शिकायचं आता. पण हळूहळू. गडबड नको हा. आधी आपण नवीन पिशवी कशी बांधायची शिकायचय, हो ना? " - मोठी आई
" हो, हो. चला आता आपण पलिकडच्या ओहळा कडे जाऊ. " - आई.

आम्ही बाहेर पडलो. मला आता खूप छान वाटत होतं. मी मोठी झाले होते. मला गवत कापता येणार, चित्रं काढता येणार, आणि नंतर मित्रही शोधायचाय अन बाळही... आईला मी नाही म्हटलं पण आत मनाच्या एका कोपर्‍यात मित्र, बाळ म्हटल्यावर लक्कन काहीतरी हललं होतं.

हो, मी मोठी झाले होते !

___

( ते बेरीचे झाड सोडता बाकीची चित्र मीच काढली आहेत फोटोशॉपमध्ये. बेरीचे झाड मीच काढलेल्या फोटोला बेर्‍या चिकटवल्यात अन जरा फोशॉ इफेक्ट दिलेत ;) 
तसच या निमित्ताने मुलांना पाळी, गर्भधारमा, बाळाचा जन्म या गोष्टीही जाताजाता थोडक्यात सोपं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ त्या काळात याबाबत इतकी स्पष्ट जाणीव असेल असं नाही. याही बाबतीत मी थोडे लेखनस्वातंत्र्य घेतलय.
हे लिखाण पूर्णतः माझी कल्पनाशक्ती आणि तर्कशास्त्र यावर आधारित आहे. सो "पुरावे द्या" ह्याला यावेळी पास )