Sunday, November 6, 2022

त्र्यं. शं. शेजवलकर यांचे म. गांधींबाबतचे विचार


(मराठी विकास संस्था मुंबई आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित कै. त्र्यं. शं. शेजवलकर जन्मशताब्दि समारोहातील चर्चासत्रामध्ये केलेला शोधनिबंध - जुलै १९९५)

त्र्यंबक शंकर शेजवलकर हे एक अनेकविध पैलूंचे व्यक्तिमत्व ! त्यांच्या लेखांच्या सूचीतील विषयांची विविधता पाहिली तरी हे स्पष्ट होईल. त्यांच्या लेखांंतून व्यक्त होणाऱ्या म. गांधींवरील त्यांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात केला आहे.

म. गांधी वर असे, त्यांनी दोन लेख लिहिले. एक मोहनदास करमचंद गांधी' हा १९३० साली लिहीलेला लेख आणि दुसरा १९४८ साली लिहीलेला 'गांधी प्रणित समाजरचना शक्य आहे का?' हा लेख . असे असले तरी इतर अनेक लेखांमधून त्यांची गांधींबद्दलची मते व्यक्त झालेली दिसतात. पैकी रामदास, ब्राह्मण्याचा हास, विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने, पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना, टॉयन्बीचा इतिहासबोध, टॉयन्बीचे इतिहासावरील महाभाष्य, लोकमान्य टिळक इत्यादि लेखांचा उपयोग या निबंधामध्ये करण्यात आला आहे.

१९३० सालच्या 'मोहनदास करमचंद गांधी' या लेखामध्ये शेजवलकरांनी गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांचा उहापोह केला आहे. शेजवलकर लिहीतात, "गांधींचा विशेष देशभक्ती हा तर आहेच परंतु जोडीने अखिल मानवजातीच्या हिताचा मार्ग शोधण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांचा महत्त्वाचा विशेष होय"१ गांधींनी सांगितलेला सत्य-अहिंसा-ब्रह्मचर्य-अस्तेय-वैराग्य हा संयमाचा मार्ग प्राचीन काळापासून हिंदुस्थानात आहे. परंतु या नियमांचा उपयोग विशिष्ट काळामध्ये कसा करून दाखवायचा हे गांधींनी वर्तनाने दाखविले असे शेजवलकर मानतात.

म. गांधींनी सार्वत्रिक सुधारणेला प्राधान्य दिले आणि त्यासाठी कायद्यापेक्षा धार्मिक स्वरूपाच्या आचारांचे अधिष्ठान त्यांनी महत्त्वाचे मानले. "गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर अवलंबून होती"२ असे शेजवलकर सांगतात आणि अखिल मानवजातीत कायद्याने नव्हे तर गांधींसारखी शक्ती सर्व राष्ट्रांत गांधींमधून व्यक्त होणाऱ्या जगातील सर्व महापुरुषांचे तत्त्वज्ञान अनुसरण्यातून प्राप्त होईल"३ असा विश्वास शेजवलकरांनी या लेखामध्ये व्यक्त केला आहे. इ.स. १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रामदास' या लेखामध्ये "रामदासांचे राजकारण, समाजकारण, राजकीय संघटन, सर्वांगिण सुधारणा - टिळक व गांधी यांनी पुढे चालविली".४ असे शेजवलकर लिहितात. परंतु म. गांधींचे जीवन हे कोणत्याही हिंदी ग्रंथापेक्षा ख्रिस्ती नव्या कराराने उद्दिपीत झालेले आहे असे शेजवलकरांना वाटते. म. गांधींचा भर शुभवर्तमान, श्रद्धा, भक्तीभाव यांवर होता. याच लेखात "गांधीचा आतला आवाज म्हणजे श्रवण-मनन-निदि-ध्यासांनी निश्चित झालेला विचार एवढाच समजला पाहिजे"५ असे शेजवलकर लिहितात.

तत्पूर्वी १९४८ सालच्या 'गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे कां?' या लेखामध्ये शेजवलकर म. गांधींचा मार्ग आधुनिक काळामध्ये कसा शक्य नाही हे स्पष्ट करतात. गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर होती हे पुन्हा मांडून अशी भावना आज एकातही नाही. त्यामुळे गांधींच्या मार्गावर आधारित नवीन समाजरचना प्रत्यक्षात येणे शक्य नाही असे शेजवलकर लिहितात. याशिवाय बदलती जागतिक परिस्थिती आणि गांधींच्या तत्त्वज्ञानाची अनैतिहासिकता ही देखिल नवीन समाजरचना प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने शक्यतेतील नाही असे ते म्हणतात. "कोणत्याही नवमताची निर्मिती ही ऐतिहासिक गरजेतून जशी होते; तसाच तिचा नाशही ऐतिहासिक गरजेतून होतो. असे असतानाही जुन्या काळी नष्ट झालेल्या बौद्ध पंथाचे पुनरूज्जीवन गांधींनी का केले?" ६ असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. मानवाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये पूर्णतः नवीन असे काही घुसडणे शक्य नसते परंतु तरीही मानव जातीत निर्माण होणारे महात्मे हे मूलत: एकांगी एक कल्पनेने पछाडलेले असतात. आणि म्हणूनच ते महात्मे ठरतात. गांधींचे सर्वोदयी तत्त्वज्ञान आणि त्यांची सतत सत्याचे प्रयोग करण्याची भूमिका यामुळे शेजवलकर म. गांधींना संपूर्ण ज्ञानी मानीत नाहीत.७ संपूर्ण ज्ञानी हा संन्यस्त असल्याने त्याला ज्ञानोत्तर कर्माची आवश्यकता नसते आणि म्हणून खरा ज्ञानी जगाला ज्ञात होऊ शकत नाही. जगाला जो ज्ञात होतो तो ज्ञानी ज्ञानाच्या क्षेत्रातील खालच्या दर्जाचा असतो. गौतमबुद्धाच्या शब्दांचा दाखला देऊन शेजवलकर म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध धातू भेसळ केल्याशिवाय चलनी नाणे होऊ शकत नाही तसेच कोणत्याही महात्म्याचे तत्वज्ञान साकार व्हायचे असेल तर त्यात भेसळ करावीच लागते,

गांधींचा पंथ हा अंतिम सामाजिक विकास, राज्यसंस्था नष्ट होऊन मानव स्वतंत्र होण्यात मानतो आणि हा पंथ, संस्था प्रधान नाही असे शेजवलकर प्रतिपादन करतात. नवस्वतंत्र भारत हा अंतर्गत दृष्ट्या इतका विभिन्न झालेला आहे की असा देश जागतिक संकटांपुढे कसा उभा राहील हा मुख्य प्रश्न आहे. तेथे अशा नवीन समाजरचनेचा प्रयोग कसा सुरू करणार आणि यशस्वी कसा करणार असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. एकूणात गांधी तत्त्वज्ञान आणि गांधीप्रणित समाजरचना कितीही आदर्श असली तरी स्वतंत्र भारतामध्ये ती रूजविता येणार नाही असा विचार शेजवलकरांनी या लेखात मांडला आहे.

१९४८ साली शेजवलकरांचा आणखीन एक लेख प्रसिद्ध झाला तो म्हणजे 'ब्राह्मण्याचा हास' हा होय. यामध्ये भारतातील ब्राह्मणांचा, ब्राह्मण्याचा समाजावरील पगडा यांचे विवेचन करताना, म. गांधींच्या विचारांबाबत आपली मते शेजवलकरांनी मांडली आहेत. ते म्हणतात, 'गांधींनी हिंदुस्थानात शांतता प्रस्थापित न करता उलट खळबळ निर्माण केली'. ही खळबळ केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही तर सर्वच क्षेत्रात असंतोष निर्माण झाला. "हा निर्माण झालेला असंतोष इंग्रजांना बाहेर काढण्यास निश्चितच उपयुक्त ठरला पण स्वातंत्र्योत्तर काळात याच असंतोषाने येथील समाजाच्या अमानुषतेचे खरे स्वरूप चव्हाट्यावर आणले"८ असे शेजवलकर म्हणतात. या असंतोषाच्या जोरामुळे आणि महायुद्धाने अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांच्या अंदाजापूर्वी मिळाले. आणि येथील राजकीय तोल ढासळला. शेजवलकरांच्या मते म. गांधींनाही हे लक्षात आले नाही.

शेजवलकरांच्या मते गांधींच्या तत्त्वज्ञानामध्ये अनेक ढोबळ चुका आहेत पण सर्वात मोठा तोटा झाला तो त्यांच्या अहिंसेच्या निःसंदिग्ध तंत्रामुळे. शत्रूलाही गांधींबद्दल विश्वास निर्माण झाला की कोणत्याही परिस्थितीत गांधी अत्याचाराचा मार्ग स्विकारणार नाहीत. याचाच गैरफायदा जीनांनी पाकिस्तानाच्या निर्मितीसाठी करून घेतला. "गांधींना आपल्या मार्गाच्या खरेपणाबद्दल इतका निढळ विश्वास होता की त्यावर आधारित आपले जळजळीत जीवनकार्य त्यांनी रतिभर ढळू दिले नाही. परंतु, यामुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली असे म्हणावे लागते”९ असे शेजवलकर म्हणतात. गांधींचा मार्ग सर्व जगाच्या हिताचा होता हे शेजवलकर मान्यच करतात. परंतु मार्ग सोडण्यापेक्षा मरण पत्करावे हे मात्र आजच्या जगात अत्यंत घातक ठरेल. असे शेजवलकर सांगतात. याचा अर्थ शेजवलकरांना तेव्हा गांधीवाद पूर्ण अमान्य होता असे नव्हे तर गांधींच्या तत्त्वांशी ज्यांचे प्रामाणिक मतभेद आहेत त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे असे ते म्हणतात. "आज जगामध्ये गांधींचा मार्ग स्वीकारला नाही तर जग सुधारणार नाही आणि हा मार्ग व्यवहार्य नसल्याने आज जगामध्ये देशाने कोणता मार्ग स्विकारावा हा प्रश्न आहे.' १० असे शेजवलकरांना वाटते.

म. गांधींबाबत शेजवलकरांचे विचार व्यक्त होणारा आणखीन एक लेख सापडतो तो म्हणजे 'पानिपत' या पुस्तकासाठी लिहिलेली परंतु प्रत्यक्षात न छापलेली त्यांची प्रस्तावना होय. यात शेजवलकरांनी गांधींबाबत आपली मते अत्यंत परखडपणे मांडलेली दिसतात. इतिहासाची खरोखरीच गरज नाही हे गृहीत धरून जगाला चकीत करून सोडणारे राजकारण गांधींनी अवलंबिले असे सांगून शेजवलकर पुढे लिहितात, “पाकिस्तान देण्यात गांधींनी या देशातील हिंदू प्रजेचेच नुकसान केले असे नसून त्यांच्या तत्त्वचळ्या आचरणाने पाकिस्तानातील मुस्लिम जनतेचेही तितकेच नुकसान झाले आहे”११ काँग्रेसच्या तथाकथित अहिंसेच्या तत्त्वाने निरपराध हिंदू-मुस्लिम जनतेची प्राणहानी टळली नाही वा परक्यांना या भूमीपासून दूर ठेवण्यात यश आले नाही; असा आरोप शेजवलकरांनी केला आहे.

१९४८ पासून पुढील कालावधीमध्ये इतर अनेक लेखांतून शेजवलकरांची गांधी तत्त्वज्ञान-मार्ग-गांधीवादी याबद्दल मते व्यक्त झालेली आहेत. पैकी काहींमध्ये गांधींच्या बाजूची मते व्यक्त होतात. उदा. “रानडे, टिळक, गांधी तीनही पुढाऱ्यांचे खोल ठसे जनमानसावर उठलेले असूनही त्यातील वाईट तेवढ्या बाजूच दुर्दैवाने पुढे आलेल्या दिसतात"१२ किंवा, "महाराष्ट्राला पूर्वेतिहास नसता तर महाराष्ट्रात गांधींविरद्ध जी अढी दिसते ती मुळातूनच धरली नसती"१३

तर काहींत गांधीवादाच्या अव्यवहार्यतेबाबत मते व्यक्त होतात. उदा. “आज जगाची रचना अशी झाली आहे की तीत कोणत्याही एका बलिष्ट य राष्ट्राला स्वराष्ट्राची घटना स्वतःला वाटेल त्या उच्च तऱ्हेची घडविता येणार नाही. कारण परचक्राची भीती होय. गांधींच्या अतिउच्च अहिंसावादाच्या मार्गातील ही मोठी धोंड आहे."१४ तर काहींत गांधींच्या पूर्ण विरोधी मते व्यक्त होताना दिसतात. उदा." गांधीवाद हा आचारदृष्ट्या व भावनिक दृष्ट्या निश्चितच उपयुक्त ठरत असला तरी ज्ञानाचा डोळसपणा मात्र त्यांत दिसत नाही."१५ किंवा "गांधींची सर्वच सुधारणा या देशात स्वखुषीने क्वचितच कोणी मान्य केली असेल. मतपरिवर्तनाने पटली म्हणून गांधींची मते हिंदुस्थानात प्रचलित झालेली नसून ती लादली गेलेली आहेत"१६

किंवा, "गांधी हे हिंदु मुत्सद्दी म्हणजे हिंदू धर्माचे, लोकांचे व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बद्ध परिपक्व झालेले परमदेशभक्त मुत्सद्दी नव्हते. आपली तत्त्वे जे स्वीकारणार नसतील त्यांचे काय झाले याची चौकशी करावयास त्यांस फुरसत नव्हती, इतके ते स्वतत्त्वभ्रमिष्ट होते” १७

१९३० पासून शेवटपर्यंत शेजवलकरांची गांधींबद्दलची मते आपल्याला अशी बदलत जाताना दिसतात. सुरुवातीला केवळ हिंदुस्थानातच उद्भवू शकेल असे आदर्श तत्त्वज्ञान, गांधींची धार्मिक भावना, आणि ईश्वर निष्ठेतील कार्यप्रेरक शक्ती, त्यांचे वेगळेपण, त्यांची ताकद आणि महात्म्य याबद्दल शेजवलकर पुनःपुनः लिहितात. १९४८ सालपासून गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांच्या व्यवहार्यतेबद्दल शेजवलकरांची मते बदललेली दिसतात. तरीही १९५८ पर्यंत गांधींच्या तत्त्वज्ञानाचे मानव जातीच्या हितामधील महत्त्व आणि हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल एखादा अपवाद सोडला तर शेजवलकर गौरवोद्गारच काढतात. तोपर्यंत गांधीमार्ग - तत्त्वज्ञान हे आदर्श असले तरी आधुनिक जगात व्यवहार्य नाहीत असेच मत शेजवलकरांचे दिसते.

पानिपतच्या अप्रकाशित प्रस्तावने मात्र पूर्ण गांधी विरोध आपणास दिसतो. विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखामध्ये त्याची पूर्वपिठिका दिसते. एकंदरीत बदलत्या परिस्थितीत गांधीवाद कसा त्याज्य ठरत गेला याची झलक शेजवलकरांच्या लेखातून दिसते.

या सर्व लेखांतून शेजवलकरांची अभ्यासूवृत्ती, गांधी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास, या तत्त्वज्ञानाचा फोलपणा कोठे आहे, या मार्गाची अव्यवहार्यता नेमकी कशात आहे, हे शेजवलकरांनी स्पष्ट केले आहे. गांधींचे मोठेपणा कशात आहे, मार्गाचा स्विकार आजच्या जगात कोठपर्यंत आणि कसा करणे शक्य आहे, याचा सखोल विचार त्यांच्या लेखनातून आपणास दिसतो. एखाद्या विषयावर आपला त्याची उदाहरणे, व्यवहार्यता, अभ्यास, त्यावरील मते, त्याची सत्यासत्यता आणि अशा सर्वांचा साकल्याने विचार लेखासारख्या मर्यादित लेखनप्रकारामध्ये करणे ही अतिशय कठीण गोष्ट. मं. गांधींच्या तत्त्वज्ञानाबाबत ते अधिकच कठीण! परंतु शेजवलकरांनी आपल्या लेखांमधून ते साध्य केलेले दिसते. आपल्या विषयाची चौकट-मर्यादा याची स्पष्ट जाणीव, अत्यंत चपखल शब्द आणि वाक्यरचना, विषयाचा परिपूर्ण अभ्यास, विषयामागील तळमळ, लेखनाप्रती निष्ठा शेजवलकरांच्या लेखनातून जाणवते. त्यांनी सांगितलेला कितीही अवघड विचार वाचताना चटकन समजतो. कोणतेही वाक्य सहसा पुन्हा वाचावे लागत नाही. विचारांची अत्यंत स्पष्टता असल्याशिवाय लेखनामध्ये ती येत नाही. शेजवलकरांच्या लेखनात ही स्पष्टता अत्यंत सहजतेने येते.

----

तळटिपा

१. मोहनदास करमचंद गांधी : शेजवलकरांचे लेख-संग्रह तृतीय खंड, पृ.३६०

२. कित्ता, पृ. ३६२

३. कित्ता, पृ.३६३

४. रामदास : शेजवलकर लेख-संग्रह - तृतीय खंड, पृ. २३

५. कित्ता, पृ. २४

६. गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे का? : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड, पृ.२५७

७. कित्ता, पृ. २५७

८. ब्राह्मण्याचा ऱ्हास : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड पृ. २८६

९. कित्ता, पृ. २८८

१०. कित्ता, पृ. २८८

११. पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना : शेजवलकर लेख-संग्रह पृ. २८६.

१२. न्या. रानडे : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड पृ. ३३२

१३. महाराष्ट्राच्या मानगुटीवरचा समंध : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. २७६.

१४. क्रांतीच्या मूलतत्वांचा महाराष्ट्रातील अनुक्रम: शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. 

१५. ब्राह्मण्याचा -हास : शेजवलकर लेखसंग्रह, पृ. २९४

१६. लोकमान्य टिळक : शेजवलकर लेख संग्रह, तृतीय खंड पृ. ३५१

१७. कित्ता, पृ.२५२.

---

No comments:

Post a Comment